गुरु आणि अध्यात्मिक मार्ग

09
2012
Oct
बंगलोर, भारत

प्रश्न : गुरुदेव, उपनिषदांमध्ये, समित पाणी (गुरूला वाळलेल्या काड्या देऊ करण्याच्या प्रथेचा) चा उल्लेख आम्हाला नेहमी सापडतो. गुरुदेव, कृपा करून याचे काय महत्व आहे ते सांगाल का?

श्री श्री : समित म्हणजे अग्नीमध्ये जाळण्यासाठी तयार असलेली काडी. इथे तयार असणे हे प्रतिक आहे, म्हणजे जेव्हा तुम्हाला ज्ञान दिले जाईल तेव्हा ते त्वरित ग्रहण करा.

समित पाणी याला अनेक अर्थ आहेत. 'सावध असणे' हा एक अर्थ आहे.

'शंभर टक्के मेहनत देण्यासाठी तयार असणे' हा दुसरा अर्थ आहे.

तुम्हाला माहिती आहे जेव्हा समित (वाळलेली काडी ) ला अग्नीमध्ये टाकले जाते तेव्हा ती पूर्णपणे जाळून जाते कोणतीही राख मागे न सोडता. म्हणून, समित पाणी याचा अर्थ असा होतो ,'ज्ञानकण टिपून घेण्यासाठी सज्ज राहा आणि शिकलेल्याप्रमाणे जगा. तुमचे शंभर टक्के योगदान द्या'. 

'गुरूकडे स्थिरपणे जा', असा देखील समित याचा अर्थ होतो.

विद्यार्थ्याकडे स्थिरता आणि सहनशक्ती हे दोन्ही असणे गरजेचे आहे. थोडीसुद्धा अडचण आली, अन म्हणून तो विद्यार्थी जर पळून गेला तर तो विद्यार्थी काहीही अभ्यासू शकणार नाही.

नेहमी वैद्यकीय कोलेज किंवा अभियांत्रिकी कोलेजच्या प्रथम वर्षात असे घडते. मुलांना अभ्यासापासून सुटका करून कुठेतरी पळून जायचे असते. असे तुमच्याबरोबर झाले आहे कि नाही?

किती अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना असे वाटले आहे? हे असे वाटते कारण अभ्यासक्रम कठीण आहे असे भासते. परंतु तुम्हाला त्यातून जावेच लागते. अशा कठीण प्रसंगी तुम्हाला उभे रहावेच लागते.

म्हणून समित पाणी म्हणजे संयमशीलता आणि सोशिकता राखणे होय.

पूर्वीच्या काळी असे म्हणत, 'रिकाम्या हाताने जाऊ नकोस. जेव्हा तू गुरुदेवांकडे जाशील तेव्हा काहीतरी बरोबर घेऊन जा.'

गुरु तुम्हाला ज्ञान देणार आहेत,मग तुम्ही काय करू शकता तर त्याच्या बदल्यात छोटीशी काठी द्या. बदल्यात काहीतरी द्या कारण ज्ञान हे देवाण-घेवाण केल्यानेच पसरते. काहीतरी येते आणि काहीतरी जाते.

तर या प्रकारे समित पाणी चे अनेक अर्थ आहेत.

उमेद, उत्साह आणि निष्ठा याने अभ्यास करण्यास सुरवात करणे आणि ज्ञान ग्रहण करण्यास सदैव तयार असणे,कणखर बनण्यास तयार असणे.

'जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी कोणतीही मौजमजा नाही. आणि जर तुम्ही मौजमजेचे शोधक आहात तर तुमच्याकरिता कोणतेही ज्ञान नाही', अशी एक म्हण आहे. म्हणून एका विद्यार्थ्याला मेहनत ही करावीच लागेल.

याचा अर्थ तुम्हाला मौजमजा करायची आहे तर मग तुम्ही विद्यार्थी नाही होऊ शकत. 

इंग्रजीमध्ये एक शब्द आहे 'स्टुडीयस' (studious) त्याचा अर्थ आहे पूर्णपणे केंद्रित असणे आणि मौजमजा आणि आरामाच्या गोष्टींकडे न धावणे, आणि आपल्या आरामाच्या कक्षेपलीकडे जाणे.

प्रश्न : गुरुदेव,पुराणामध्ये असे नेहमी वाचण्यात येते की इंद्राने काही पाप केले. अग्नी, वरुण, वायू अथवा दुसऱ्या देवाने पाप केल्याचे वाचण्यात येत नाही. गणपतीच्या कथे प्रमाणे, याचे काही तरी महत्व असेल किंवा यातून सुद्धा काही शिकण्यासारखे असेल. याचा अध्यात्मिक अर्थ कृपा करून समजावू शकाल काय?

श्री श्री : इंद्र हा आहे झुंडशाहीची मानसिकता. आपण जमावाचे मानसशास्त्र कशाला म्हणतो? एका घोळक्याचे स्वतःचे मन असते. त्या जमावाला इंद्र संबोधिले आहे.

इंद्राला एक हजार डोळे आहेत असे म्हणतात. एक हजार डोळे याचा अर्थ असा नाही की एका व्यक्तीला शरीरभर डोळे आहेत. इथे पाचशे लोकांच्या जमावाला उल्लेखिले आहे. मग असा जमाव निर्माण करतो एक चेतना, एक मानसिकता आणि हाच तर आहे इंद्र.

म्हणूनच जेव्हा साक्षात्कारी मनुष्य जन्माला येतो तेव्हा इंद्र इतका रागावतो, कारण मग जमावाची मानसिकता तग धरून राहू शकत नाही.साक्षात्कारी आणि जागरूक मनुष्य झुंडशाहीच्या मानसिकतेला वाढू देत नाही. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

तो लोकांच्या मनात समंजसपणा घालतो. तो सगळ्यांना सांगतो,'अरे! तुमच्या मनाने विचार करा! तुमच्यापैकी प्रत्येकाने विचार करा!'

म्हणूनच जेव्हा कधी कोणी ऋषी किंवा साधू तपस्येला बसत तेव्हा इंद्र भयभीत व्हायचा. 

जमाव,सामुहिक चेतना यालाच इंद्र म्हणतात. तो कोणी वर स्वर्गात बसलेला एक व्यक्ती नाहीये. इंद्र हा इथे आता या क्षणी आहे.

ज्याप्रमाणे पृथ्वी,आप,तेज,वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आपल्याकडे आहेत; त्याचप्रमाणे इंद्र हा सामुहिक चैतन्य आहे.

झुंडशाहीमुळे नेहमी काय घडते;कोणीतरी म्हणेल,'अरे,आपल्या नेत्याचा अपमान झाला', आणि मग सगळे चालू पडतात. ते बसेसना आग लावतात,पुतळ्यांची तोडफोड करतात,इ.इ. आणि आपण काय करतो आहे हे जाणून न घेता जमाव ते काय करीत आहेत त्यातच कार्यरत राहतो.माणसे, जीव आणि मालमत्तेचे नुकसान करीत जमावाचा धुडगूस चालूच राहतो; हो की नाही?

तर अशी असते झुंडशाहीची मानसिकता. जिथे ज्ञान, सदसद्विवेकबुद्धी आणि जागरुकता असते तिथे झुंडशाहीची मानसिकता उभी राहू शकत नाही.

प्रश्न : गुरुदेव, अनेक साक्षात्कारी गुरु, ज्यांनी खूप लोकांना बरे केले, त्यांना भरपूर तीव्र दुःख सहन करावे लागले,हे असे का?

श्री श्री : हे पहा,आत्मा किंवा मन यांना यातना होत नाही. जी बंधने आहेत ती केवळ शरीरालाच आहेत. जर तुम्ही तुमच्या शरीराला फार जास्त ओढाताण केली तर मग शरीराला नित्यनेमाचे परिपाठ करावे लागतील. मग शरीराला सर्दी पडसे आणि खोकला आणि असे आजार होतील.

एका संताचे शरीर हे श्रद्धा आणि प्रेम यांनी बनलेले असते. म्हणून जेव्हा श्रद्धा आणि प्रेम विघटन पावतात तेव्हा त्याचा परिणाम शरीरावरसुद्धा होतो.

प्राचीन काळी, संत आणि ज्ञानी माणसे ही नेहमी त्यांच्या जवळ असणाऱ्यांना शिव्या द्यायचे. हे असे होते कारण जेव्हा प्रिय व्यक्तीच्या मनात संताप किंवा वाईट विचार येत तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्यावर देखील होत. उदाहरणार्थ, तुमच्या घरात एक व्यक्ती बसून आहे आणि नुकसान करीत आहे याचा परिणाम रस्त्यावर नुकसान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यावर जास्त होईल.

जेव्हा रस्त्यावर कचरा असतो तेव्हा तुम्हाला इतका त्रास होत नाही जितका घरातील कचऱ्याचा होतो. असे आहे ना? त्याचप्रमाणे संतांचे जवळच्यांबरोबर वागणे होते!

म्हणूनच प्राचीन काळापासून सशक्त व्यक्तित्व (शील) याला अतिशय महत्वाचे मानले गेले आहे. माणसाकडे षट संपत्ती असायला पाहिजे :

साम ( मनाचा शांतपणा आणि गंभीरपणा)
दाम (स्वयंवर नियंत्रण आणि स्वतःच्या वासनांवर नियंत्रण)
उपरती (तृप्तता)
तितिक्षा (सहनशक्ती)
श्रद्धा (विश्वास)
समाधान (संयमशीलता किंवा केंद्रित मन)

हे सहा गुण असल्याशिवाय, मनुष्य मुमुक्षु (ज्याला मोक्ष किंवा मुक्ती पाहिजे) बनू शकत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य मुमुक्षु बनत नाही तोपर्यंत त्याला ज्ञान प्रदान केल्या जात नाही.

म्हणूनच माणसाकडे विवेक (चांगल्या आणि वाईट यामधील फरक कळण्याची समज), वैराग्य(उदासीनता), आणि षट संपत्ती हे असतील तर तो मुमुक्षु बनतो. यानंतरच त्याला शिष्याची, विद्यार्थ्याची किंवा भक्ताची उपाधी दिल्या जाते.

नाहीतर हे म्हणजे होडीमध्ये वेड्या माणसाने असण्यासारखे झाले. तो होडीमध्ये असताना वेडा झाला किंवा नाचू लागला तर तो बुडेल , होडी बुडेल आणि त्यावरचे सगळे लोक बुडतील.

म्हणूनच भगवान बुद्ध म्हणाले की शील,समाधान (इथे,संयमशीलता) आणि प्रज्ञा (दैवी ज्ञान) हे शिष्यमध्ये उपस्थित असले पाहिजे.

एका विद्यार्थ्यामध्ये अहिंसा,शील इ.इ. गुण असले पाहिजे. त्याला समाधी अवस्थेचा अनुभव असायला हवा. तेव्हाच तो प्रज्ञावान (ज्ञान आणि सद्सद्विवेकबुद्धी या ईश्वरीय देणग्या असलेला) बनू शकतो.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही आम्हाला उदासीन राहायला सांगता. तुमच्याबाबतीत मी उदासीन कसा काय राहू? माझे तुमच्यावर प्रेम आहे आणि आपुलकी रोजच्या रोज वाढतच चालली आहे.

श्री श्री : ही आपुलकी जर तुम्हाला इतर नकोश्या गोष्टींपासून दूर राहण्यास मदत करत असेल तर ठीक आहे. त्याने जर तुम्ही केंद्रित होत असाल तर छान आहे. परंतु जर यामुळे मत्सर, क्रोध, लोभ आणि इतर नकारात्मक भावना निर्माण होत असतील, तर तुम्हाला तुमच्यावर मेहनत घ्यावी लागणार आहे. स्वतःमध्ये खोल जा, ध्यान करा आणि समजून घ्या.

कोणतीही आपुलकी जर तुमच्या स्वयंला वरच्या पातळीवर नेते किंवा उच्च ध्येयाकडे नेत असेल तर ती ठीक आहे. परंतु जर त्यामुळे तुम्ही खाली येत असाल तर तुम्हाला ज्ञानाकडे परतणे आवश्यक आहे.

आपण प्रत्येक कृती करताना आपल्या स्वतःच्या अंतर्मनात डोकाऊन पाहायला पाहिजे. जर आपण कोणावर दोषारोप करीत असेल तर त्याचा अर्थ असा की आपण त्याशिवाय राहू शकत नाही.

बहुतांश वेळा असे बघण्यात येते की जर कोणी वाईट असेल तर तुम्ही त्यापासून दूर होता. परंतु जेव्हा तुम्ही त्यांचा तिरस्कार करता तेव्हा त्याचा अर्थ असा की आतमध्ये काही जोडणी आहे ज्यापासून तुम्ही दूर हटू शकत नाही. तुम्हाला त्यांच्या सोबत राहायचे आहे,म्हणूनच तुम्ही त्यांचा तिरस्कार करणे सुरु करता.

मी तुम्हाला सांगतो मन हे इतके गुंतागुंतीचे आहे. म्हणून मी म्हणत राहतो की तुम्हाला मनोरंजनासाठी इतर कोणत्याही साधनांची गरज नाही. मन हेच उत्तम मनोरंजन आहे. तुमच्या मनात सगळे चँनल कायम चालूच असतात.

जो मनुष्य मनाच्या भोवऱ्यात अडकला त्याच्यावर संताप न करता त्याला केवळ दया मिळाली पाहिजे. नेहमी आपण काय करतो? जर कोणी नकारात्मक असेल किंवा तुमच्या विरुद्द असेल तर तुम्ही त्यांच्यावर रागावता.

तुम्ही विचार करता की ते स्वतंत्र आहेत.

मला याच्या उलट त्यांच्याबद्दल कीव वाटते कारण ते त्यांच्या स्वतःच्या मनाच्या भोवऱ्यामध्ये फसलेले आहेत. ते काय करीत आहेत हे त्यांचे त्यांना कळत नाहीये आणि त्यांच्या कृतींवरून हे स्वच्छ दिसत आहे.

आणि काही कुठे चुकीचे होत असेल तर अशी माणसे आनंदी होतात. एखादा सुंदर कार्यक्रम सुरु असेल आणि पावसाने येऊन व्यत्यय निर्माण केला तर ते म्हणतात,'बरे झाले! पाउस आला, निसर्गसुद्धा आपली नापसंती दर्शवित आहे'.

त्यांना याचा फारच आनंद वाटतो. हे तर चुकीचे आहे.

तुम्ही हे दुसऱ्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे. पाउस जरी पडत असला तरी लोक अजूनसुद्धा बसलेलेच आहेत आणि ध्यान करीत आहेत, किंवा सेवा करीत आहेत किंवा त्यांनी कार्यक्रम पुढे सुरूच ठेवला आहे. परंतु आतून संपूर्ण नकारात्मक असलेल्या व्यक्तीला जर काही काम करत नसेल तर केवळ असुरी आनंदच होतो.

हे फार मजेशीर आणि फार विचित्र आहे.

हे केवळ मनाची विकृती दर्शविते.जगात कुठेही कोणालाही चांगली गोष्ट झालेली त्यांना सहन होत नाही. म्हणून अशा लोकांची तुम्ही केवळ कीव करू शकता.

प्रश्न : गुरुदेव, जर आपले चप्पल बूट हरवले किंवा जर कोणी ते घेऊन गेले तर असे म्हणतात की ते आपले वाईट कर्मेदेखील घेऊन जातात हे खरे आहे काय?

श्री श्री : जर महागडे बूट असतील तर होय, निदान तसा विचार केल्याने थोडे बरे तरी वाटेल. तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. पण त्या स्वस्तातील चप्पल असतील तर....(श्री श्री त्यांचे डोके हलवतात)

हे पहा,मुख्य कल्पना होती लोकांना वर्तमान क्षणात रहाण्यास सांगणे.

भूतकाळात अडकून राहू नका आणि तक्रार करू नका आणि असे करून हा क्षण वाया घालवू नका. जे घडले ते घडले! संपले!

जर तुम्ही वाहतुकीच्या खोळंब्यात अडकलात, मग संपले! आता जेव्हा तुम्ही घरी पाहोचाल, तेव्हा बसून दोन तास हे बोलण्यात वाया घालवू नका की कसा तुम्ही दुसरा मार्ग घ्यायला पाहिजे होता. हा निरर्थक वेळेचा अपव्यय आहे.

आपल्या पूर्वजांना इतके डोके होते आणि म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितले,"अरे! हे ग्रह ताऱ्यांच्या उपस्थितीमुळे तुम्हाला असे झाले ". आता तुम्ही ग्रह ताऱ्यांवर तर रागावू शकत नाही. म्हणून तुम्ही आजूबाजूच्या लोकांवर संतप्त होण्याऐवजी म्हणता,"अरे,हे तर माझ्या कर्मामुळे,ग्रह ताऱ्यांमुळे झाले".

यामुळे तुमच्यात एक प्रकारची स्वीकृती आणि शांतपणा येतो आणि यामुळे तुम्ही जीवनात कोणत्याही कटुतेशिवाय पुढे जाता.

भारताची ही अतिशय सुंदर गोष्ट आहे.

भारतीय समाजात वाईट गोष्टी घडत असतील परंतु आपण त्यामुळे वाईट वाटून घेत नाही आणि त्याची तक्रार करत बसत नाही.

माझी इच्छा आहे की संपूर्ण जगाने हा धडा शिकवा.

हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे; आपल्या रक्तात आहे. जर समाजामध्ये काही वाईट घडले, तर आपल्यामध्ये सहनशक्ती आहे,आपण तक्रार न करता पुढे जातो.

हे फार रोचक आहे.

बहुदा लोक म्हणतात,"तू ५० वर्षापूर्वी माझ्याबरोबर असे वागलास आणि तू अजूनसुद्धा माझा शत्रू आहे". लोक वैर भाव आणि शत्रुत्व त्यांच्या मनात आणि हृदयात ठेवतात.

परंतु इथे, ही अतिशय आगळीवेगळी गोष्ट आहे. आपण वैर भाव आणि शत्रुत्वाला खतपाणी घालत नाही.

प्रश्न : तुम्ही म्हणता की समाजातील भ्रष्टाचार हा समाजाच्या अध्यात्मीक निर्देशांकाबरोबर जोडलेला आहे. परंतु असे की पश्चिमेकडे जिथे भारतापेक्षा अध्यात्म कमी आहे तरीसुद्धा भारतापेक्षा तिथे भ्रष्टाचार कमी आहे. चीनचा सुद्धा अध्यात्मिक निर्देशांक कमी आहे, तरीसुद्धा प्रगतीमध्ये ते भारतापेक्षा सुस्थितीत आहेत.

श्री श्री : भारत अजूनसुद्धा त्याच्या भूतकाळातील अध्यात्मिक स्वादावर जिवंत आहे. हे म्हणजे असे झाले,स्वयंपाक घरात अजूनपर्यंत अन्नाचा वास येतो आहे परंतु भांड्यांमध्ये अन्नच नाहीये. हेच तर झाले आहे.

तुम्ही स्वयंपाक घरात प्रवेश करता आणि तिथे भजे आणि वड्याचा वास येत आहे परंतु भांड्यात वडे आहेत असा विचार करू नका.

तर भारताकडे हेच तर आहे त्याच्या भूतकाळाकडून. परंतु गेल्या २० वर्षात समाज बेजबाबदारपणा,बंधुत्वाचा आणि प्रामाणिकपणाचा अभाव, खास करून राजकीय क्षेत्रात समाज एका अतिशय खालच्या पातळीवर झुकला आहे आणि याचा देशावर परिणाम होत आहे.

सर्वसामान्य माणूस जरी प्रामाणिक असला तरी नेतृत्व प्रामाणिक नाही म्हणूनच भ्रष्टाचाराने प्रवेश केला.

"यथा राजा तथा प्रजा" अशी म्हण आहे.
"यथा प्रजा तथा राजा " अशी म्हण नाहीये.

भ्रष्टाचार हा वरून सुरु होतो. म्हणून जेव्हा वरच्या पातळीवर भ्रष्टाचार असतो तेव्हा तो खालच्या पातळीपर्यंत फोफावत जातो.

खरे तर भारत अजूनपर्यंत सुस्थितीत आहे. याचे कारण आहे सगळ्या गोष्टी शहाणपणाच्या पातळीवर असण्याकरिता आणि लोकांना एकत्र ठेवण्याकरिता एक प्रकारचा अध्यात्मिक कल आहे. तो तसा नसता तर भारताचे केंव्हाच तुकडे तुकडे होऊन गेले असते.

प्रश्न : गुरुदेव, अध्यात्मिक मार्गात प्रगती करण्याकरिता, सकारात्मक गुण,जसे काही साधी राहणी आणि नैसर्गिकता, यांची जाणूनबुजून जोपासना करायला पाहिजे का की ते आपणहून वृद्धिगत होतात?

श्री श्री : नाही, चांगले गुण वाढवायचे प्रयत्न करायची अजिबात गरज नाही. चांगले गुण तुमच्यात आपणहून फुलून येतात.

ज्याप्रकारे एका कळीचे विनासायास फुल होते,त्याचप्रकारे तुमच्यात चांगले गुण नैसर्गिकरित्या फुलून येतात.

तुम्हाला केवळ त्यांच्यावरून झाकण वर उचलायचे आहे.

असे पहा,जर तुम्ही एका कळीला झाकून ठेवले तर ती उमलू शकते का? तुम्हाला त्याच्यावरचे झाकण काढायची गरज आहे आणि मग उमलायला सुरुवात होईल. चांगल्या गुणांनासुद्धा हा नियम लागू आहे. केवळ यत्न केल्याने चांगले गुण उमलून येत नाही. त्याकरिता खोल आरामाची म्हणजेच ध्यानाची गरज आहे. जेव्हा तुम्ही तणाव मुक्त, शिथिल आणि स्वयंमध्ये विश्राम करीत असता तेव्हा चांगले गुण तुमच्यामध्ये सहजपणे उमलून येतात.

प्रश्न : गुरुदेव, बऱ्याचवेळा नोकरीच्या ठिकाणी जेव्हा अनेक अपूर्ण कामे असतात तेव्हा मन अस्वस्थ होते आणि हरल्याची भावना निर्माण होते आणि काय घडते आहे हेच कळेनासे होते. अशा वेळी काय करावे?

श्री श्री : तुम्हाला करायच्या कामांची एक यादी बनवा आणि मग महत्वाच्या कामांना अग्रक्रम द्या.आणि यासगळ्या कामाच्या व्यापामध्ये ध्यानाला सर्वात अग्रक्रम द्या.

तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत अशी श्रद्धा ठेवा आणि या भावनेने थोडा वेळ ध्यानाला बसा.

भगवान कृष्णांनी वाचन दिले आहे की जो कोणी त्याचे मन आणि बुद्धी माझ्याकडे वळवेल,त्याच्यापासून मी कधीही दूर नाही आणि तो माझ्यापासून कधीही दूर नाही. म्हणून हे केवळ लक्षात असू द्या. दररोज थोडा वेळ ध्यान करण्याचा आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि मग देव निश्चितपणे आपल्या सगळ्या प्रार्थनांना पूर्ण करेल. तेव्हा तर मग आपल्याला मागण्या करण्याचा हक्कच मिळेल. हे म्हणजे असे झाले तुम्ही योग्य गुण जमवता तेव्हा तुम्हाला त्यांचा मोबदला मिळतो. म्हणून जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा तुम्ही गुण जमा करीत असता ज्यांचा तुम्हाला मोबदला मिळतो.

अनेकदा जेव्हा सत्संग करिता बाहेर जातो तेव्हा लोक माझ्याकडून हे धमकावून वसूल करतात!(हंशा) कार्यक्रम संपल्यानंतर मी जेव्हा आराम करायला माझ्या खोलीत जातो तेव्हा रात्री ११ किंवा १२ वाजता लोक माझ्याकडे दर्शना करिता येतात. ते मला सांगतात,"या लोकांनी इतकी सेवा केली आहे आणि आता ते तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत. गुरुदेव,कृपा करून यांना भेटा."

मग मी म्हणतो,"ठीक आहे,मी येतो".

मला काही पर्याय राहातच नाही,मला दर्शन द्यावेच लागते कारण त्यांनी इतकी सेवा केली आहे! (हंशा) तर आपण अशाप्रकारे आपले गुण वाढवीत राहायला पाहिजे.

याच प्रकारे एक साधक देवाला त्याच्या प्रार्थनेला फळ देण्यास भाग पडतो. देवाला काही पर्याय उरत नाही आणि त्याला भक्ताचे कार्य पूर्ण करावेच लागते. याच प्रकारे आपण या जगातसुद्धा जिंकू शकतो.

जर आपण चांगली कामेच करीत असू तर कोणी आपला कशाला तिरस्कार करेल? चांगले काही करणाऱ्याचा कोणी तिरस्कार करते का? हे असे कधीच घडणार नाही.

आपण नेहमी काय करतो, आपण आपल्या आरामाच्या कक्षेच्या आतच राहतो, आणि आपल्या सुखसोयींनी महत्व देतो आणि आपल्याला बरे वाटेल असे वागतो. मग कशाला कोणाला आपण आवडणार?

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही धर्माच्या १० लक्षणांबाबत बोललात. आम्ही ही लक्षणे कशाप्रकारे वाढीस लावावीत आणि या ग्रहावर धर्माची स्थापना कशी करावी यावर काही बोलाल का?

श्री श्री : तुम्ही जे करीत आहात तेच करून!

मनाची स्पष्टता नसणे आणि तणाव यामुळे अधर्म असतो. जेव्हा मन केंद्रित नसते आणि हृदयात सल असते तेव्हा अधर्म होतो.

म्हणून ज्ञान आणि सद्बुद्धी हे तुम्हाला धर्माच्या मार्गाला नेतील.

प्रश्न : गुरुदेव, कोणत्या कारणाने प्राण शरीराला सोडून जातात, आणि त्याने पुन्हा यावे कधी याचा निर्णय काय करते?

श्री श्री : ठीक आहे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे! तुम्ही तुमचा पोशाख का बदलता? तुमचा पोशाख कशामुळे बदलल्या जातो?

तुम्ही जन्मभर एकच शर्ट का नाही वापरत?

तुम्ही तुमचे कपडे बदलता कारण ते वापरून जीर्ण शीर्ण होतात किंवा तसेच काहीतरी, हो ना? मिळाले उत्तर!

प्रश्न : गुरुदेव, मेरू पर्वत कुठे आहे आणि मेरू पर्वताचे काय महत्व आहे?

श्री श्री : मेरू पर्वत हा उर्जेचा गूढ पर्वत आहे. मेरू पर्वताची भौतिक जागा अशी नाहीये. 

प्रश्न : गुरुदेव,मी २१ वर्षांचा आहे आणि अनेक ,मुली माझ्याकडे आकर्षित होतात. माझे शिक्षक म्हणाले की त्या माझ्यातील गुरु ऊर्जेकडे आकर्षित होतात. मी हे कसे काय हाताळावे? 

श्री श्री : कोणताही निर्णय घेण्याकरिता २१ हे फार लहान वय आहे.

तुमच्याकडे बरेच पर्याय आहेत, परंतु एखादा पर्याय निवडण्यासाठी तुम्हाला दोनेक वर्षे थांबावे लागेल, ठीक आहे!

असे बघा, जर कोणीही आकर्षित झाले नाही तर ती एक समस्या आहे. लोक तुमच्याकडे आकर्षित होताहेत आणि तुम्हाला ती समस्या वाटते. प्रत्येक वळणावर जीवनात आव्हान आहे.

जीवन जसे आहे तसे स्वीकारा आणि जसे आहे तसे आवडून घ्या!

म्हणून तुम्हाला दुसऱ्यांकडून जे लक्ष मिळत आहे आवडून घ्या, परंतु सध्या थोडे अंतर ठेवून राहा. त्यांना सांगा की तुम्ही अजून अपरिपक्व आहात आणि तुम्हाला अजून दोन ते तीन वर्षे लागतील.

कामवासना, इच्छा-आकांक्षा यांच्या पलीकडे जा

08
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न : माझे प्रिय गुरुदेव, कित्येक वेळा माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा आणि माझ्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा या मला स्वाभाविक राहू देत नाही. स्वाभाविक राहण्याकरिता काय करावे?

श्री श्री : केवळ थोड्या वेळा पुरत्या,सतत पूर्णवेळ नाही,हो ना?

जर पूर्ण वेळासाठी हवे तर मी एक उपाय सांगतो. थोड्यावेळासाठी ते ठीक आहे.

जसजसे तुम्ही ज्ञानामध्ये परिपक्व होत जाता,जसजसे तुम्हाला या जगाचा स्वप्नवतपणा दिसू लागतो-सर्व काही एका स्वप्नाप्रमाणे आहे,सगळे निघून जात आहे,सगळ्यांमध्ये परिवर्तन घडून येत आहे,तेव्हा घडणाऱ्या घटनांचा तुम्हाला कमीत कमी त्रास होऊ लागतो.

घटनांपासून निर्लेप राहण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्या संपूर्ण घटनेकडे एक क्षणिक स्वप्न म्हणून बघणे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, स्वतःचा शोध घेणे आणि स्वतःची परीक्षा घेणे यात काय फरक आहे? तुम्ही बऱ्याच वेळा सांगता की स्वतःचे परीक्षण बंद करा, याचे कृपया तपशीलवार विवरण कराल?

श्री श्री : तुम्ही मध्य मार्ग स्वीकारा.

थोडे लोक असे आहेत जे आपल्या वागण्याचे सतत समर्थन करीत राहतात, आणि थोडे असे आहेत ज्यांना स्वतःमध्ये कायम दोष दिसत राहतो. या दोहोंमुळे एक प्रकारचे असंतुलन निर्माण होऊ शकते.

तुम्ही मध्य मार्ग स्वीकारा,असा जिथे तुम्ही आपली प्रत्येक कृती पाहून त्यात काही सुधारणा करू शकता का हे पाहून त्याच वेळी पाउल पुढच्या दिशेने उचलू शकता.

तुम्ही भूतकाळाकडे केवळ एवढेच पाहू शकता.(आपल्या बोटांनी "इतकेसे" अशी खुण करतात).

बघा,हे असे आहे,तुमची कार कशी असते तसे, त्यात समोर बघण्याची काच ही भली मोठी असते आणि मागच्या गाड्या बघण्याचा आरसा हा छोटासाच असतो.आता अशी कल्पना करा की पुढचे पाहण्याच्या काचेच्या जागी मागचे पाहण्याचा भला मोठा आरसा आहे आणि पुढे पाहण्यची काच ही एकदम छोटीशी आहे. तुम्ही सध्या त्याच गाडीत आहात. तुमचा मागे बघण्यचा आरसा हा समोरच्या काचेची अर्धी किंवा त्याहून जास्त जागा अडवून बसला आहे आणि म्हणून तुम्ही सतत मागेच बघित आहात.हे बरोबर नाही. तुम्ही मागे केवळ थोडेसे पहा आणि पुढे जात राहा.

हे तर सर्वोत्तम उदाहरण आहे. तुम्ही तुमची कार डोळ्यासमोर ठेवा,त्याची समोर बघण्याची काच आणि मागच्या गाड्या पाहण्याचा आरसा. तुम्ही मागे केवळ थोडेसेच पहा.

प्रश्न : गुरुदेव,मला अलिप्तपणा आणि निःस्वार्थीपणा बौद्धिक पातळीवर समजतो,पण ते सरावात आणणे मला अवघड वाटते. मी काय करू?

श्री श्री : आयुष्य तुम्हाला तो धडा शिकवेल.

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला ज्ञानाविरहितपणे अति बांधलेले असता,तेव्हा त्याने तुम्हाला अतीव दुःख मिळते.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, आमच्यापैकी थोडे लोक दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये बरेच उशिरा येतात,तर इतर बरेच जण आधीपासून येत आहेत.हा आमच्या पुर्वकर्मांचा परिणाम आहे का? मी तुम्हाला जीवनात आधीच जर भेटलो असतो तर त्याने मी बऱ्याच आघातापासून बचावलो असतो.

श्री श्री : आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो- गाडीमध्ये असणाऱ्या मागचे दृश्य दिसणाऱ्या आरश्यामध्ये फार जास्त निहाळून पाहू नका.

प्रश्न : प्रिय गुरुदेव,एका साधकाचे ध्येय काय असले पाहिजे? किंवा मग साधकाने केवळ आपले काम करावे, आणि निसर्ग नियमानुसार घटनांना घडू द्यावे?

श्री श्री : होय,तेच तर आहे,आपले काम करा! तुम्ही योग्य जागी आहात,फक्त आपले काम करा आणि बघा कसा काय होतंय ते.

प्रश्न : भावना अतिरेक,इच्छा आकांक्षा आणि काम वासना विचारांवर विजय मिळवण्याचा सर्वात सोप्पा मार्ग कोणता?

श्री श्री : स्वतःला कशामध्ये तरी गुंतवून ठेवा.

तुमचा भावावेग हा मोठ्ठ्या कारणासाठी कामाला लावा. काही निर्माण करण्याची किंवा काही बनवण्याची तुमच्यात उत्कटता असू द्या.

ज्ञानाचा किंवा धर्माचा प्रसार करण्यात गर्क व्हा. आपण लोकांपर्यंत कसे पोहचू याचा दिवस न् रात्र विचार करा,आणि जीवनात काही चांगले कार्य करा. किंवा मग लेख ,संगीत,गाणी लिहा. 

जेव्हा तुम्ही इतकी व्यस्त असता तेव्हा तुम्ही बघाल की तुम्हाला भावातीरेकाचा त्रास होणार नाही.

खास करून तरुणांनी अतिशय व्यस्त राहायला पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही व्यस्त राहिलात तर हे सर्व काही तुम्हाला त्रस्त करणार नाही.

आम्ही असेच तर होतो;२० ते २५ वर्षे वयात मी फार कार्यमग्न होतो.सकाळी सहा वाजता उठल्यापासून ते रात्रीचे एक दोन वाजेपर्यंत माझी धावपळ चालूच असायची.

तर,स्वतःला व्यस्त ठेवा,खास करून अशा वयात जेव्हा संप्रेरके(हार्मोन्स) गडबड करीत असतात. तुम्हाला असे दिसून येईल की भावातीरेक,लालसा आणि सगळ्यांवर तरुन तुमची नाव पैलतीरी लागेल.

प्रश्न : गुरुदेव, सामाजिक मद्य प्राशनापासून कोवळ्या तरुणांना कसे परावृत्त करावे?

श्री श्री : त्यांना सांगा की ती एक महाभयंकर वस्तू आहे, मग ते सामाजिक मद्यप्राशन असो वा वैयक्तिक मद्यप्राशन असो त्याने काही फरक नाही पडत. त्याला नाही म्हणा,बस्स,संपले! खरे तर सामाजिक वर्तुळामध्ये "नाही" म्हणायला तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे.

जर तुम्ही ,"मी एक चहाबाज आहे,मी मद्याच्या थेंबालाही स्पर्श केला नाही", हे गर्वाने सांगाल तर तुम्हाला तुमच्या दोस्तांमध्ये एक प्रकारचा मान मिळेल.

तुम्ही तुमच्या मुल्यांवर भर दिला पाहिजे. एखाद्या घोळक्यात असतानादेखील तुम्ही आत्मनिष्ठ आणि वैयक्तिक पसंती जपली पाहिजे.

आपण कायम हेच तर करतो. आपण मोठ्या सभांमध्ये,सगळीकडे जातो ते आपापल्या वैयक्तिक निवडी जपून.

तुम्हाला माहिती आहे की जगाने याची दाखल घेणे चालू केले आहे. ज्या कुठल्या संस्थेने मला डॉक्टरेट बहाल केली आणि जिथे कुठे मी गेलो, तिथे केवळ माझा मान राखण्याकरिता त्यांनी शाकाहारी जेवण ठेवले आणि कोणत्याही प्रकारचे मद्य नव्हते.

बहुदा विश्व विद्यालयांमधून मदिरा आणि मांसाहारी जेवण दिल्या जाते. परंतु कोरडोबा असू दे अथवा नेथार्लंड असू दे अथवा न्येनरोड विश्व विद्यालय असू दे,जेव्हा त्यांनी मला डॉक्टरेट देऊ केली तेव्हा स्वागत समारंभांमध्ये त्यांनी केवळ शाकाहारी जेवण आणि सरबत हेच वाढले.

यु न ची एच आय व्ही-एड्स वरील सभा या सारख्या मोठ्या जागतिक सभांमध्ये सुद्धा त्यांनी शाकाहारी अन्नाचा वेगळा विभाग ठेवणे सुरु केले आहे. यापूर्वी हे असे नसायचे.

जागतिक आर्थिक व्यासपीठा (दि वर्ल्ड इकोनॉमिक फोरम)वरसुद्धा जर तुम्ही शाकाहारी आहात तर ते त्याचा मान करतात आणि शाकाहारी अन्नाकरिता त्यांनीदेखील वेगळा विभाग ठेवला आहे.

हे असे पूर्वी नव्हते. जवळ जवळ १० ते २० वर्षांआधी हे कल्पनाशक्तीच्या बाहेर होते. १० वर्षांआधी सुद्धा आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये तुम्हाला हे दिसले नसते. परंतु आता हे बदलेले आहे आणि ते तसे झाले ते केवळ आपल्या मदिरा आणि मांसाहार याला स्पर्श न करण्याच्या निर्धारामुळे. आणि जगाने त्याचा मान ठेवला. म्हणूनच तुमचे मित्रसुद्धा याचा मान ठेवतील.

गेल्या १० वर्षात आता विमान कंपन्यांनीसुद्धा हे करणे सुरु केले आहे. आधी असे नसायचे. आता तर विमान प्रवासात बटाटे,गाजर रहित असे जैन जेवणसुद्धा वाढल्या जात आहे. तुम्हाला कसे जेवण पाहिजे याचा तुम्ही विशेष उल्लेख करू शकता.

म्हणून तुम्ही आपल्या वैयक्तिक चांगल्या सवयी चालू ठेवा आणि त्या तशा कायम राहण्यावर भर द्या. नाहीतर मग तुम्ही सामाजिक मदिरा प्राशनाने सुरुवात कराल आणि मग हळू हळू मद्याचा राक्षस हा मोठे वैयक्तिक संकट होऊन बसेल.

प्रश्न : गुरुदेव, जय आणि विजय हे भगवान नारायणाचे सेवक आपापली सेवा करीत होते तरीसुद्धा त्यांना शाप मिळाला.जर कोणी आपली सेवा करीत असेल तर त्यांनासुद्धा शाप मिळण्याचा हक्क आहे का?

श्री श्री : त्या शापांमध्ये समस्त मानवजातीचे अतिउच्च भले दडलेले होते. कोणत्याही संताच्या शापाने कधीही कोणतेही नुकसान वा तोटा झालेला नाही. संताच्या या शापांमुळेच जगाचे इतके भले झाले आहे-भगवान राम आणि भगवान कृष्ण आले आणि पुढचे तर तुम्हाला माहिती आहेच. म्हणूनच असे म्हटले आहे- मूर्ख माणसाच्या प्रेमानेदेखील समस्या निर्माण होतात, आणि संतांच्या क्रोधानेदेखील आशीर्वादच मिळतात.

आयुष्य आणि त्याची आव्हाने

07
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न: भौतिक आणि अध्यात्मिक आयुष्याची सांगड कशी घालावी?

श्री श्री: तुम्हाला सायकल चालवायला येते का? तुम्ही तोल कसा सांभाळता? तुमच्या आयुष्यात असाच समतोल साधा. दोन्ही बरोबर असू द्या.

जर अध्यात्माकडे जास्तच कल असेल तर मी सांगेन कि तुम्ही घरच्या जबाबदार्यांकडे लक्ष द्या. जर तुम्ही भौतिक गोष्टीत अडकून तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर मी सांगेन कि या दलदलीत फसू नका आणि अध्यात्म मार्गावर चला.

तुम्ही जेंव्हा टी.व्ही. पाहता तेंव्हा असे म्हणू शकता का “मी आधी पाहीन आणि मग ऐकेन?”

काही लोक म्हणतात “मी माझ्या सर्व संसारिक गोष्टी संपवतो आणि मग अध्यात्मिक मार्गावर येतो” मी सांगतो असे कधीही होत नाही. दोन्ही बरोबरीने झाले पाहिजे. आयुष्यात दोन्हीची गरज आहे. आपल्याला मनशांती, प्रेम आणि आनंद हवा असतो, त्याच बरोबर आयुष्यात जबाबदाऱ्या सुद्धा घ्याव्या लागतात.

प्रश्न: गुरुजी नुकत्याच शोध लागलेल्या देव कणावर थोडा प्रकाश टाकाल का?

श्री श्री: देव कणाचा शोध लावलेले शास्त्रज्ञ हेच सांगत आहेत की संपूर्ण विश्व एकाच पदार्थाने बनले आहे, एकच गोष्ट, आणि तीच गोष्ट मग अनेक होते.

वेदांतात सुद्धा हेच सांगितले आहे. पूर्वीच्या काळी ते हेच सांगत असत की संपूर्ण विश्व एकाच चेतनेपासून बनले आहे. ही एक चेतनाच सर्वव्यापी होते.

जसे आपण एकाच गव्हापासून चपाती, सामोसा, हलवा बनवतो हे तसेच आहे. हे विश्व इतके वैविध्यपूर्ण आहे पण एकाच कंपनापासून, एकाच चेतनेपासून बनले आहे, यालाच ते देवकण असे म्हणतात.

या एकाच गोष्टीपासून विश्वाची विविध अंगे बनली आहेत.

प्रश्न: जेंव्हा मन शंकांनी भरलेले असते, तणावाखाली असते त्यावेळी मला वाटणारी भीती खरी नाही हे मनाला कसे समजावू?

श्री श्री: जेंव्हा मन तणावाखाली असेल, शंकांनी भरलेले असेल त्याचा अर्थ प्राणशक्तीची पातळी खाली आली आहे. जेंव्हा प्राणशक्तीची पातळी खाली असेल तेंव्हा शंका येतात, आपण उदास होतो. यावर उपाय म्हणजे प्राणायाम, योग्य आहार, व्यायाम. संगीत आणि उपवास याद्वारे प्राणशक्तीची पातळी वाढवणे.

काही दिवस फलाहार करा. आपण भूक नसेल तरीही जेवण पोटात भरत असतो.

प्रश्न: विशालाक्षी मंडप खूप सुंदर आहे. मला त्याच्याकडे बघून खूप छान वाटते. तुम्ही त्याबद्दल काही सांगाल का? ही इमारत वास्तूशास्त्र नुसार आहे का?

श्री श्री: विशालाक्षी मंडप कसा दिसावा याचा मी फक्त आराखडा काढला. या इमारतीसाठी कोणी मोठा वास्तुविशारद नाही. जेंव्हा वास्तू तज्ञांनी हे पहिले तेंव्हा ते म्हणाले की याची रचना उत्तम आहे आणि वास्तूशास्त्रा नुसार आहे.

प्रश्न: पूर्वीच्याकाळी साधू जनावराची चमडी ध्यानाला बसण्यासाठी वापरत. पण सुदर्शन क्रियेला बसण्यापूर्वी अंगावरच्या सर्व चामड्याच्या वस्तू काढायला सांगतात, असे का?

श्री श्री: पूर्वीच्या काळी ते हरणाचे चामडे वापरत. ज्या हरणाला नैसर्गिक मृत्यू आला आहे अश्याच हरणाचे चामडे ते वापरत. पूर्वी चांगली बैठक नसे म्हणून ते हरणाचे चामडे वापरत. मेलेल्या जनावराचे चामडे न वापरण्याची अजूनही कारणे आहेत, तुम्हाला ती शिक्षक प्रशिक्षण वर्गात कळतील.

प्रश्न: माझ्या २४ वर्षाच्या मुलाने नैराश्यातून तीन महिन्यापूर्वी आत्महत्या केली. मी त्याला समजून घेऊ शकले नाही आणि त्याला वाचवू शकले नाही या विचाराने मला ग्रासले आहे.

श्री श्री: कर्नाटकात आणि आपल्या देशात असे अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. त्याचे आयुष्य इतकेच होते. त्याबद्दल विचार करून तुमचे स्वास्थ्य बिघडवू नका.

तरुणांना या मार्गावर घेऊन येण्यासाठी काम करा. येथे गाणे आहे, ज्ञान आणि ध्यान आहे. त्यांच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणा.

प्रश्न: माझ्या नवऱ्याच्या फुफुसाला गाठ आहे. डॉक्टर्स म्हणतात की ती कर्करोगाची आहे.

श्री श्री: त्यांना प्राणायाम करू द्या. शिवाय शक्ती ड्रोप वापरू देत, त्याने प्रतिकारशक्ती वाढते. काल एका कर्करोग तज्ञाने सांगितले कि त्यांनी ३-४ रुग्णांवर प्रयोग केले आणि शक्ती ड्रोप वापरल्याने त्यांचे कॅन्सर पेशी ४८ तासात ४०% ते कमी झाल्या.

याचे ते पुढे संशोधन करणार आहेत. आपण आताच काही बोलणे योग्य नाही पण हे संशोधन करायला ते खूप उत्सुक आहेत. बऱ्याच लोकांना याचा फायदा झाला आहे, तुम्ही सगळ्यांनी ते वापरा.

प्रश्न: गुरुजी, तुमच्या मते विद्यार्थीच्या अभ्यासा व्यतिरिक्त काय प्राथमिकता आहेत?

श्री श्री: पहिली प्राथमिकता अभ्यास, चांगला अभ्यास. दुसरी, तुमचे स्वतःसाठी एक उद्दिष्ट ठेवा, देशासाठी एक उद्दिष्ट ठेवा.

प्रश्न: हे जग सोडून गेलेल्या आत्म्याबद्दल काही बोलाल का?

श्री श्री: प्रथम जे जिवंत आहेत त्यांच्याशी सूर जमवा! हेच एक मोठे काम आहे! भारतात इतक्या भाषा आहेत कि संवाद कठीण आहे. होय गेलेल्या आत्म्यांशी जोडण्याचे मार्ग आहेत. ध्यान करा आणि ते मार्ग आपोआप समोर येतील.

अंर्तमनातील कमालीचे परिवर्तन

22
2012
Sep
आचेन, जर्मनी








तर, आजचा विषय आहे IT – नवे परिमाण

तुम्हाला माहीत आहे का? माझ्यासाठी IT म्हणजे अंर्तमनातील परिवर्तन, आणि तुम्ही जर IIT म्हणाल तर त्याचा अर्थ आहे अंर्तमनातील कमालीचे परिवर्तन.

आपण आपले शरीर, मन, श्वास याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत असतो. पण सर्व तंत्रशास्त्र त्याच्या मध्येच सामावलेले आहे.

आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि आपली चेतना जी शरीर चालविते, शरीर विकसित करण्यासाठी मदत करते त्याच्या कडेच आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. मग पहा जीवनात कसे नवीन परिमाण खुलतात ते.

ह्या चेतनेमुळे आज जगात तंत्रविज्ञान अस्तित्वात आहे.

कुणाच्यातरी मनात एक कल्पना येते, त्याच कल्पनेचे रुपांतरण तंत्र शास्त्रात होते. पण या कल्पना येतात कुठून? या कल्पनांना अस्तित्वात आणायला कोण मदत करतो? त्यालाच चेतना म्हणतात.

आज आपल्याकडे भ्रमण-ध्वनी (मोबाईल) आहे, पण २०-३० वर्षापूर्वी आपल्याला याची कल्पना सुध्दा नव्हती.

भ्रमणध्वनी कसा तयार करावा अशी कल्पना कुणाच्या तरी चेतने मध्ये आली आणि त्याच चेतने मुळे पुढे जावून विकसित झाली. हो कि नाही?!

हीच चेतना जी जबाबदार आहे सर्व सृजनशीलते साठी, जगातील सर्व वैज्ञानिक शोध, सर्व प्रकारच्या संगीत, कला, फॅशन आणि सर्व काही, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

ज्या चेतने मुळे वैज्ञानिक शोध होतात, कला आणि शिल्प विद्या विकसित होतात तीच चेतना आनंदाचे मोठे भांडार आहे.

तीच चेतना स्वास्थ्य, सुख, प्रेम आणि करुणा आविष्कृत करु शकते. तर हि चेतना जी आपल्या मेंदू आणि शरीराच्या विविध भागात काम करत असते, तिच्या मध्ये खूप कामे करण्याची कार्यक्षमता आहे. चेतना ज्या पद्धतीने कारुण्य, प्रेम, शांती आणि आनंद अभिव्यक्त करू शकते, त्याच प्रमाणे ती त्या निर्माण करू शकते, समजू शकते.

पहा मोबाईल मध्ये किती विविध सुविधा आहेत. त्याच्या मध्ये कॅमेरा आहे (गुरुदेव प्रेक्षकांचा फोटो काढतात). त्या मध्ये ट्विटर आहे. माझे ट्विटर अकाऊंट माहीत आहे का? @SriSriSpeaks.

तर हे आहे ट्विटर अकाऊंट, मग याच्यामध्ये SMS सुविधा आहे, टेलिफोन बुक आहे आणि संगीत आहे (गुरुदेव मोबाईल वर भजन लावतात).

आता हे बंद कसे करायचे मला माहीत पाहिजे (मोबाईल वर भजन च्या संर्दभात बोलतात). मला आता कळले कि बंद करायचे कुठले बटन आहे.

आपल्या मनाचे पण तसेच आहे, एकदा विचार करायला सुरुवात केली कि ते विचार करत राहते, आपल्यालाच माहीत नसते कुठे थांबायचे. बरोबर आहे कि नाही?!

मोबाईलचा किती प्रकारे वापर करता येतो, त्यामध्ये घड्याळ सुध्दा आहे.

ज्या प्रमाणे मोबाईलचा विविध प्रकारे उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीचा आणि जीवनाचा उपयोग करता येतो.

आपल्या चेतनेचा उपयोग आयुष्याच्या विविध परिस्थितीमध्ये केला जावू शकतो. हि एकच परिस्थिती अस्तित्वात आहे असे नाही.

तुम्ही जर तुमच्या चेतनेचा वापर फक्त कला आणि संगीता साठी उपयोग केला तर आयुष्य परिपूर्ण झाले असे नाही, किंवा फक्त शास्त्र आणि युक्तिवाद या साठी उपयोग केला तरी पण आयुष्य परिपूर्ण झाले असे नाही. तुम्ही जर आयुष्य म्हणजे मजा आहे असे समजले तरी आयुष्य परिपूर्ण नाही.

ज्याप्रमाणे मोबाईलच्या बटनाने आपण त्यावरील सर्व कार्ये चालू बंद करू शकतो त्याच प्रमाणे निसर्गाने आपल्याला दिलेल्या क्षमता बंद चालू करण्याची क्षमता आपल्या चेतने मध्ये आहे.

आपल्या मध्ये कुठेतरी साधेपणा हा लपलेला असतो. निरागसपणा आणि साधेपणा आपल्यामध्ये जन्मताच असतो पण आपण जस जसे मोठे होत जातो तस तसे तो आपण कुठेतरी हरवत जातो.

आपण जसे मोठे होतो तसे आपले स्मितहास्य हरवते, आपला स्वभाव बदलतो. हो कि नाही?

म्हणून मी म्हणतो कि संवेदनशीलता आणि हळवेपणा दोन्ही महत्वाचे आहे.

मनुष्याने तर्कबुद्धी ने विचार करण्याची गरज आहे. कुणीतरी म्हटले म्हणून एखाद्या गोष्टीचा स्वीकार करू नये. आपण आपल्या बुद्धीचा वापर करावा. हे मनुष्याचे प्रथम कर्तव्य आहे. तर्क दृष्ट्या अयोग्य असेल तर त्या गोष्टीचा आपण स्वीकार करू नये.

तर्क हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण त्याच्या मुळे संवेदनशीलता निर्माण होतो.

आता संवेदनशीलता पुरेशी नाही, तुमच्या कडे हळवेपणा पण असला पाहिजे. हळवेपणा हा आपल्या हृदयाचा एक भाग आहे. तुम्ही तर्क दृष्टीने बरोबर असाल पण तुम्हाला दुसऱ्यांचा दृष्टीकोन समजता आला पाहिजे. बऱ्याच वेळा लोक जे काही बोलतात त्याचे प्रमाणे ते वागतात. ते बरोबर असतील पण ते काही लोकांना दुखावत असतात.

जो मनुष्य रागीट आहे तो त्याचा राग तर्कबुद्धी ने समजावतो, पण त्यांना कळत नाही कि ह्या कारणामुळे किती जण दुखावतात. दुसरेच नाही पण त्याचा स्वत:ला पण त्रास होतो. तर हा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संवेदनशीलता.

तुम्हाला माहीत आहे कि एखादी व्यक्ती मुर्ख आहे, तुम्ही जर त्यांना सारखे मुर्ख म्हणालात किंवा त्याच्यावर सारखे ओरडलात किवा रागवलात तर त्याने काही होणार नाही. त्याच्या बाबतीत तुम्हाला संवेदनशील रहावे लागेल.

तुम्हाला माहीत आहे, एकदा एका कार्यक्रमात एक स्त्री एका व्यक्तीला रागवत होती कारण त्या व्यक्तीने त्याचे काम व्यवस्थितरित्या केले नव्हते. मग मी त्या स्त्रीला बोलविले आणि विचारले कि, “ तुम्हाला काय वाटते, तुमच्या रागावण्याने तो व्यक्ती बदलेल?”

ती स्त्री म्हणाली, “नाही”.

मी म्हणालो, “ नुसते त्या व्यक्तीवर ओरडून काय फायदा? त्या मध्ये तुम्ही तुमची प्रतिमा खराब करून घेता. ज्या क्षणी तुम्ही कुणावर रागावता, जरी तुम्हाला त्यांना काही चांगल्या सूचना करावयाच्या असतील तरी ते त्याच्या कडे दुर्लक्ष करतात. तुमच्या ओरडण्याचा हेतू त्या व्यक्ती मध्ये समज आणण्याचा असतो आणि जर तो हेतूच साध्य होत नसेल तर ओरडून काय फायदा?”

मग ती स्त्री म्हणाली, “ गुरुदेव, तुम्ही बरोबर आहात! मी आयुष्यभर हेच करत आले आणि मीच माझ्या भोवती शत्रू निर्माण केले.’

मी म्हणालो’ “ त्यासाठीच, तुम्ही एक गाढव घोड्या सारखे धावेल अशी अपेक्षा करू नका.’

तुम्ही जर गाढवावर बसून तो घोड्या सारखा धावेल अशी अपेक्षा कराल तर ते अशक्य आहे. म्हणून गाढव गाढव आहे आणि घोडा घोडा आहे ह्या वस्तुस्थितीचा स्वीकार करा. मग क्रोध कुठे आहे? हि संवेदनशीलता आहे – दुसऱ्याच्या भावनांचा आणि त्यांच्या गरजेचा संवेदनशीलतेने विचार करणे हि एक आपल्या हृदयाचा सद्गुण आहे.

काही व्यक्ती खुपच संवेदनशील असतात. ते त्यांचा युक्तिवाद विसरून जातात. ते खुपच भावनात्मक होतात. हे पण चांगले नाही. तुम्हाला संवेदनशीलता आणि हळवेपणा या मध्ये समतोल राखता आला पाहिजे. काय म्हणता तुम्ही? मी बरोबर आहे का? (

(प्रेक्षक : हो)

संवेदनशील आणि हळवे असणे हा आपल्या चेतने च्या शास्त्रातला महत्वाचा भाग आहे. नंतर येतो धीरगंभीरपणा. प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी काही सेंकद, काही मिनिटे गंभीर होतात. ज्यावेळेस तुम्ही गंभीर होता त्यावेळेस तुम्ही शांत होता आणि तुम्हाला मौन जाणवते आणि तुम्ही आध्यात्मिक आहात असे वाटते. गंभीर आणि मौनचा कुठेतरी तुम्हाला समज येतो.

आपल्या बऱ्याच मोबाईल मध्ये आपण हे कार्य बंद करून ठेवले आहे किंवा त्याचा जास्त वापर केला गेला नाही. आपल्या चेतने ने ह्या कार्याला स्पर्श सुद्धा केला नाही आणि इथेच आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्या मदतीला येते, जे तुम्हाला स्मितहास्य करायला शिकविते आणि सेवा सुद्धा.

तुम्हाला माहीत आहे का, एक छोटे बाळ दिवसातून ४०० वेळा स्मितहास्य करतात, युवक १७ वेळा आणि आपण मोठे सगळेजण स्मितहास्य करायचे विसरून गेलो आहोत. हेच तर आर्ट ऑफ लिव्हिंग तुमच्या साठी घेवून येते, स्मितहास्य करत रहा! हसत रहा सेवा करत रहा. संवेदनशील आणि हळवे रहा, शांतता आणि मौन चा अनुभव घ्या.

प्रश्न: गुरुदेव, शिस्त आणि स्वातंत्र्य या मध्ये समतोल कसा ठेवावा?

श्री श्री: या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिस्ती मुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळते.

तुम्हाला लहानपणी रोज सकाळ संध्याकाळ दात घासण्याची शिस्त लावली गेली. त्यामुळे तुम्हाला दात दुखणे आणि किडणे या पासून स्वातंत्र्य मिळाले. हो कि नाही?!

तुम्हाला जर जेवण्याची शिस्त असेल तर तुम्हाला कोलेस्त्रोल किंवा बाकी आजारापासून स्वातंत्र्य मिळेल.

प्रश्न: सर्व काही शांत झाल्यांनतर काय होईल? मृत्यूनंतर च्या शांतते पासून ते कसे वेगळे आहे?

श्री श्री: खूप फरक आहे! मौन हे सर्व निर्मिती क्षमतेची ती जननी आहे. सुंदरता, प्रेम, अंर्तज्ञान, अविष्कार, काव्य ह्या सर्व गोष्टीची जननी मौनच आहे, मौन मधूनच सर्व काही व्यक्त होते.

सुदर्शन क्रिया हि पण मौन मधूनच निर्माण झाली आहे.

मला माहीत आहे तुम्ही सर्वानी सुदर्शन क्रियाचा अनुभव घेतला आहे, आणि तुम्हाला त्याचे महत्व पण माहीत आहे.

या दिवसात मी दौऱ्यावर होतो, दक्षिण भारत ते दक्षिण आफ्रिका, मग दक्षिण अमेरिका, त्यानंतर उत्तर अमेरिका आणि आता युरोप. मी हा सर्व प्रवास एका महिन्याच्या कालावधीत केला आहे. मी ब्राझील आणि अर्जेटिना येथील जेल मध्ये भेट दिली. अर्जेटिना जेल मध्ये ५२०० कैदी आहेत ज्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केला आहे आणि ते सुदर्शन क्रिया करतात, त्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते, एक ही असा कैदी नव्हता कि त्याचे डोळे कोरडे होते. त्यांच्या जीवनात खूप परिवर्तन झाल्याचे जाणवत होते.

ते म्हणाले, ‘ आधी आम्ही जेलच्या बाहेर होतो पण आम्हाला स्वातंत्र्य नव्हते, आता आम्ही जेल मध्ये आहोत पण स्वतंत्र आणि आनंदी आहोत. ह्या कोर्सने आमचे पूर्ण जीवन बदलून टाकले आहे.’

तुम्हाला माहीत आहे, जेल मध्ये भेट देताना माझ्या बरोबर तेथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पण होते आणि ते म्हणाले, ‘ गुरुदेव, इथे जे काही होत आहे ते खरच अविश्वसनीय आहे. आमची इच्छा आहे कि असा बदल सर्व जेल मध्ये होवो.’

ह्या बदलाकडे लक्षात घेवूनच मला तेथील विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी प्रदान केली. ‘मी एका दिवसात या विद्यापीठाचा माजी विद्यार्थी बनलो आहे, मी विनोद केला.

मी हे का सांगत आहे, कारण आपण एक अहिंसा मुक्त समाज निर्माण करू शकतो. माझा दृष्टीकोन हे एक अहिंसा मुक्त समाज, रोग मुक्त शरीर, संमोह विरहीत मन, निरोधन मुक्त बुद्धी, आघात विरहीत स्मृती आणि दु:ख विरहीत आत्मा बघण्याचा आहे.

सध्या पहा जगात काय वेडेपणा चालला आहे. कारण कुणीतरी एक चित्रफीत बनविली आहे, त्याच्या साठी सर्व देशात हिंसा चालू आहे. हा वेडेपणा नाही का?

कारण त्यांना अहिंसेचे शिक्षण, ज्ञान दिले गेले नाही, जे खूप महत्वाचे आहे.

प्रश्न: आजच्या घटकेला सुध्दा गुरुचे अनुगमन करणे योग्य आहे का?

श्री श्री: तुम्हाला हा प्रश्न का सुचला? हा प्रश्न विचारून तुम्ही स्व:ताला जाळ्यात अडकवून घेतले आहे. मी जर उत्तर दिले आणि तुम्ही जर ते एकले, याचा अर्थ तुम्ही गुरुचे अनुगमन करता.

मी जर म्हणालो, ‘ नाही, काही गरज नाही’, तर तुम्ही म्हणाल, ‘ ठीक आहे मी नाही कुठल्या गुरुचे अनुगमन करणार’, याचा अर्थ तुम्ही गुरुचे अनुगमन करता.

मी जर म्हणालो, ‘हो’, तरी पण तुम्ही गुरुचे अनुगमन केले हे सिद्ध होईल.

म्हणून मी म्हणतो. ‘नाही!’

हा प्रश्न खूप मनोरंजक आहे. बरोबर आहे?

हे पहा, फुटबॉल खेळायचा असेल तर प्रशिक्षक हा आवश्यक आहे. प्रत्येक फुटबॉल खेळाडूसाठी प्रशिक्षकाची गरज असते. कोणत्याही खेळासाठी, संगीताचे शिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षकाची गरज असतेच. तुम्ही शाळेत जात असताना ज्या विषयात तुम्हाला कमी गुण मिळत असतील तर त्या विषयासाठी तुम्हाला शिक्षकाची गरज असते. त्याच प्रमाणे आध्यात्मिक मार्गावर किंवा ध्यान करताना सुरुवातीला मार्गदर्शनाची गरज असते, हो कि नाही! त्यासाठी गुरुची गरज असते. पण तुम्हाला जर आवश्यकता वाटत नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.

प्रश्न: मी केलेल्या चुकीमुळे मला अपराधी असल्या सारखे वाटते, माझी या पासून सुटका कशी होईल?

श्री श्री: ध्यान!!

प्रश्न: युरोप मध्ये सध्या कोणती मोठी समस्या आहे जी सोडविण्याची गरज आहे?

श्री श्री: मी युरोप बद्दल असे एकले आहे कि येथील ३०% ते ४०% जनता खिन्न, उदासीन होत आहे. किती तरी लोक Prozac सारख्या औषधीच्या आहारी जात आहेत आणि लहान मुले स्वमग्नता मध्ये हरवत चालले आहेत. हा खूप गांर्भियाचा प्रश्न आहे. आपण याकडे लक्ष दिले पाहिजे.

त्यासाठीच तर ध्यान, सुदर्शन क्रिया आहे. आनंदी आणि आरोग्य कसे रहावे या बद्दलच्या कार्यशाळा आहेत. हे सर्व जर आपण आत्मसात केले तर आपण नक्कीच आनंदी समाज निर्माण करू शकतो.

मला खात्री आहे ह्या मुळे आपण एक आनंदाची लाट निर्माण करू शकतो.

प्रश्न: मी रोज व्यायाम करतो, म्हणून माझे श्वासांवर नियंत्रण आहे. दि आर्ट ऑफ लिविंग च्या कोर्स मध्ये असे काय विशेष आहे? मला वाटते कि या कोर्सेस मधून मला जे काही मिळणार आहे ते माझ्या रोजच्या व्यायामातून मला मिळेल. मला हा कोर्स केल्याने काय मिळेल सांगाल का.

श्री श्री: हा कोर्स तुम्हाला खूप मार्गाने मदत करू शकतो म्हणून तर तो खूप लोकप्रिय आहे. जगात कोट्यावधी लोक हा कोर्स करतात म्हणजे त्यात काही तरी तथ्य असले पाहिजे.

मी तुम्हाला सांगतो हा कोर्स खूप सखोल आहे आणि एकदम साधा सरळ सोपा आहे.

हा कोर्स म्हणजे फक्त व्यायाम नाही. व्यायामाबरोबर अध्यात्मिक उर्जेचा उद्धार करणारा आहे. हे सत्य आहे तुम्ही जेव्हा हा कोर्स करून बाहेर पडाल त्या वेळेस तुमच्या चेहऱ्यावर मोठे स्मितहास्य, प्रसन्नता असेल आणि तुम्ही तृप्त असाल; तुमच्या आयुष्याला नवी परिमाण मिळेल.

तुम्हाला माहीत आहे आपल्या मनामध्ये दुसऱ्या बद्दल काही विचार, ग्रह असतात. आपण या विचारांपासून मुक्त झाले पाहिजे. आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात.

पहा, आपण जगातील कोणत्याही कोपऱ्यातील अन्न स्वीकार करतो, तसेच संगीताच्या बाबतीत. पण ज्ञान किंवा दुसऱ्या लोकांच्या ज्ञानाविषयी आपण स्वीकार करू शकत नाही. 

आपण या विचारांवर मात केली पाहिजे आणि जाणले पाहिजे कि सर्व माझेच आहेत, सर्व जग एक कुटुंबच आहे.

भक्तीचे रंग

05
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रामाणीकपणा हा मनुष्य स्वभावाचा एक गुण आहे.

एखादा मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो घरी प्रामाणिक असतो आणि त्याच्या कामामध्ये पण प्रामाणिक असतो. पती किंवा पत्नी म्हणून तो त्यांच्या जोडीदाराबरोबर पण प्रामाणिक असतो.

तुम्ही कोठेही गेलात तर त्यांच्या चरित्रातील प्रामाणीकपणा हे नेहमी चमकत असतो. 

भक्तीचे पण तसेच आहे. देवभक्त हा देशभक्त आणि त्या जग निर्माण करणाऱ्याचा भक्त पण असतो. त्यांचे प्रेम आणि भक्ती हि आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येते.

अनेक वेळा लोक असा प्रश्न विचारतात कि देवभक्त हा देशभक्त किंवा देशाभिमानी कसा असू शकतो. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो कि तसे असू शकते.

कोणी जर त्यांच्या देशावर प्रेम करीत असेल तर ते दुसऱ्या देशाचे किंवा देशांचे शत्रू असतात असे नाही. आपण देशभक्तीकडे नेहमीच एका संकुचित दृष्टीने पहात आलो आहोत. 

साधारणपणे देशभक्ती कशी व्यक्त केली जाते? दुसऱ्या देशाला विरोध करणे किंवा त्यांना शत्रू मानणे म्हणजे देशप्रेम असा सर्वसाधारण समाज आहे.

भारतात जेंव्हा ब्रिटीश राज्य करीत होते तेंव्हा ब्रिटीशसत्तेविरुद्ध आवाज उठविणे म्हणजे देशप्रेम असा समज होता. हल्लीच्या काळात जर तुम्ही पाकिस्तान विरोधी बोललात तर तुम्ही देशप्रेमी असे समजले जाते. हे योग्य नाही.

तुमच्या देशप्रेमासाठी तुम्ही दुसऱ्याचा देशाचा विरोध करणे किंवा त्यांना खाली मान घालायला लावणे असे नाही.

तुम्ही जर अमेरिकेकडे बघितलेत असे लक्षात येईल कि जे स्वतःला देशभक्त म्हणवितात ते फक्त त्यांचा देशाचा अभिमान बाळगतात. त्यांचा दुसऱ्या देशांना विरोध नाहीये.

म्हणजे, देशभक्त हे केवळ त्यांच्या देशाला नव्हे तर साऱ्या जगाला आणि जग निर्माण करणाऱ्याला समर्पित असतात.

जे विश्वात्म्याला समर्पित असतात ते त्यांची देवभक्ती किंवा त्यांची देशभक्ती यात भेदभाव किंवा संघर्ष करीत नाहीत.

तुम्ही जेंव्हा तुमच्या कुटुंबाची काळजी घेता किंवा त्यांचे पालन पोषण करता याचा अर्थ असा नाही कि तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे शत्रू आहात. तुम्ही त्यांच्यावर पण प्रेम करता, त्यांचीपण काळजी घेता, होय कि नाही?

जेंव्हा एक आई तिच्या मुलांवर खूप प्रेम करीत असेल तर ती इतर मुलांवरबाबत पण तिला प्रेम वाटू शकते. असे नसते कि जेंव्हा तिला तिच्या मुलांविषयी आपुलकी वाटत असेल तर तीला दुसऱ्या मुलांविषयी आपुलकी वाटू शकत नाही. तसे असेल तर ते खरे प्रेम किंवा आपुलकी नव्हे.

भक्ती किंवा समर्पण हि एक अशी गोष्ट आहे कि ती कोठेही असु देत त्याचा सुगंध हा फुलासारखा सर्वत्र दरवळतो.

हे फुल पहा, ते कोठेही ठेवले तरी त्याचा सुगंध हा सगळीकडे पसरतो. मोगऱ्याचे फुल तुम्ही स्वयंपाक घरात ठेवा किंवा नाहणी घरात ठेवा त्याचा सुगंध येणारच.

फुल असे कधीही म्हणणार नाही कि मी येथे सुगंध देईन, तेथे नाही.

त्याच प्रमाणे कोठेही तुम्ही भक्ती किंवा श्रद्धा ठेवा किंवा तिला कोणतीही दिशा द्या, ती तेथे पसरेल, वाढेल, आणि तिला फुले फळे पण येतील.

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कामाविषयी पण भक्ती आणि समर्पण भावना ठेऊ शकता.

एक कन्नड संत कवीने एकदा असे म्हटले आहे कि “कयाकावे कैलास” , याचा अर्थ असा कि जो आपले काम मन लावून करतो तो कैलासाला पोहोचतो.

अनेक संस्कृत शास्त्रात पण हेच सांगितले आहे.

खरी पूजा म्हणजे लोकसेवा हि होय. पूजा आणि सेवा यात काही फरक नाहीये. का? कारण या दोन्हींचा पाया किंवा उगम म्हणजे समर्पण आणि त्याचा परिपक म्हणजे पण समर्पण होय. 

हेच अहंकाराला पण लागू होते. तुम्ही तुमचा अहंकार जिकडे न्याल त्या गोष्टीला तो चिकटून जातो.

तुम्ही जर तुमचा अहंकार “ब्रम्ह्न” कडे वळविला तर तुम्ही “अहं ब्रम्हास्मि” या स्थितीला पोहोचाल. ( अहं म्हणजे मी, छोट्या मर्यादित अहंकाराचे व्यक्तीकरण आणि ब्रम्हास्मि म्हणजे मी ब्रम्ह आहे. म्हणून स्वतःला ब्रम्हांडाबरोबर एकरूप करण्याने अहंकाराचे निराकरण होते).

जेंव्हा तुम्ही तुमचा अहंकार छोट्या आणि नगण्य गोष्टींमध्ये वापरू लागता तेंव्हा साहजिकच तुम्ही त्या छोट्या गोष्टींशी जोडले जाता आणि मग तुम्ही त्या छोट्या गोष्टींसारखे मर्यादित होऊन जाता. त्यामुळे तुम्हाला मग असे वाटायला लागते कि “ मी कोणीतरी आहे”, “मी मंत्री आहे”, किंवा “मी पापी आहे”, “मी बुद्धिमान आहे”, “मी मुर्ख आहे” वगैरे. मग ज्याला अहंकाराचा स्पर्श झाला आहे त्यामध्ये वृद्धी होईल. म्हणूनच, जसे अहंकार हा अमर्यादित प्रमाणात वाढू शकतो, तसेच भक्ती पण अमर्यादित पणे वाढू शकते. योग विद्या पण हेच सांगते.

असे म्हटले आहे कि “ तस्य भूमीषु विनियोगः” - (विभूती पद # ६, पतंजली योग सूत्र)

योग सिद्धी (योगामुळे प्राप्त होणाऱ्या असाधारण चमत्कारपूर्ण क्षमता) आणि वाढीव जाणीव किंवा चेतना , या नेहमी पृथ्वीतलावरील समाजाच्या उन्नतीकरिता वापरल्या पाहिजेत. 

प्रश्न: गुरुदेव, वेदिक ग्रंथांमध्ये असे म्हटले आहे कि या आकाशगंगा, हे विश्व, यांसहित हे सर्व जग म्हणजे एक भ्रम आहे. हे काही माझ्या लक्षात येत नाहीये. तुम्ही हे जरा पुढे समजावून सांगाल काय ?

श्री श्री : होय, हे सारे स्पष्टच आहे. तुम्ही जर मात्रा भौतिक शास्त्र अभ्यासिले तर हे लक्षात येईल कि वस्तू मात्रांचे नाव आणि आकार हे स्थिर नसून ते सर्व एकाच बदलत्या परिमाणाचे भाग आहेत.

एका उर्जेपासून सर्व गोष्टी निर्माण झाल्या आहेत. वेदांतात पण हेच सांगितले आहे.

भ्रम म्हणजे काय तर, जे अस्तित्वात नाही असे नव्हे तर जे सतत बदलत असते ते. येथील सर्व वस्तू बदलत असतात आणि या बदलालाच माया असे नाव आहे. जे काही मोजले जाते त्याला पण माया असे म्हणतात. म्हणून माया म्हणजे भ्रम असे म्हणणे बरोबर नाही. 

आपल्या काळातील एक प्रसिद्ध प्रोफेसर डॉ. हान्स पीटर दुरर , हे काही दिवसांपूर्वी येथे आश्रमात आले होते. हे काय म्हणाले तुम्हाला माहित आहे काय?

ते म्हणाले,” गुरुदेव, मी गेली ३५ वर्षे वस्तूस्थिती अभ्यास केल्यावर असे लक्षात आले कि ते अस्तित्वात नाही. जे काही अस्तित्वात आहे ती फक्त उर्जा होय.

पुढे ते असे पण म्हणाले कि” मी जेंव्हा व्याख्यान देत असतो तेंव्हा मी पूर्वेकडील तत्वज्ञान सांगतो आहे कि काय असे मला नेहमी वाटत असते.

आजचे शात्रज्ञ जे सांगत आहेत ते पूर्वेकडील तत्वज्ञ हजारो वर्षापासून सांगत आले आहेत. म्हणून जसे दिसते तसे नसते.

हि कुपी एका भरीव वस्तू सारखी दिसत आहे, पण पदार्थ वैज्ञानिक म्हणतात कि “नाही , ते फक्त काही अणु आहेत.” पुढे जाऊन ते असे पण म्हणतील कि “हि फक्त एक उर्जा आहे”. 

वस्तू स्थिती नाहीये. आपली समज हि आपल्या ज्ञानेंद्रियद्वारे होते तर शास्त्रज्ञ हे त्याच्या पलीकडील वस्तू स्थिती समजावून घेतात.

असे पहा कि अणु हा साध्या डोळ्यांनी दिसत नाही. तुम्हाला अणु दिसत नाही , उर्जा पण दिसत नाही पण तुम्ही ती तेथे आहे हे तुम्हाला समजते.

म्हणजेच जग अस्तित्वात नाही महाजने काय तर जागे व्हा आणि डोळे उघडून बघा, सर्व भूतकाळ आज अस्तित्वात आहे काय? नाही, तर फक्त त्याच्या स्मृती आहेत.

काळाच्या ओघात घटना दिसेनाश्या होतात, म्हणून त्या अस्तित्वात नाहीत.

आता जे काही अस्तित्वात आहे , ते पुढच्या क्षणात नाहीसे होते. ज्या प्रमाणे प्रत्येक क्षणाला नदीत नवीन पाणी असते. तसेच निसर्ग सारखा बदलत असतो, आणि हे जे काही सारखे बदलत असते त्याला माया म्हणतात. ज्याला मोजमाप आहे ती पण माया होय.

म्हणून, प्रवाहित म्हणून ते अस्तित्वात असते पण प्रत्यक्षात मात्र नसते.

हे सर्व जग हे नाव आणि आकार आहे,पण नाव आणि आकार हे काही नेहमी सारखे नसतात- असा हा संदेश आहे.

नावे वेगळी असू शकतात.तुम्ही येथे एका गोष्टीला काही नाव दिले असेल, आणि त्याच देशात दुसऱ्या ठिकाणी त्याला काही दुसरे नाव असेल. आणि मग दुसऱ्या देशात त्याला अजून काही दुसरे नाव असेल. म्हणून नावे हि काही कायमची नसतात, तर ती सोयीप्रमाणे असतात. आकाराचे पण तसेच आहे.

प्रश्न: गुरुदेव, “सत्य हे बहु आयामी आहे” याचा अर्थ काय?

श्री श्री : होय, त्यातच सर्व काही आले.

असे पहा कि, या जागी येण्यासाठी कोणी म्हणेल कि “ प्रथम सरळ दिशेने जा आणि मग डावीकडे वळा”. मी म्हणेन कि हे बरोबर आहे.

दुसरा अशी दिशा सांगेल कि “प्रथम सरळ जा आणि मग उजवीकडे वळा”

मी म्हणेन कि हे पण बरोबर आहे.

तिसरा माणूस सांगेल कि “ फक्त सरळ जा , डावीकडे, उजवीकडे वळू नका”

मी म्हणेन कि हे पण बरोबर आहे.

मग तुम्ही म्हणाल कि “ फक्त एकच दिशा दर्शक बरोबर असू शकतो. तीन दिशा दर्शक बरोबर असू शकत नाहीत.” मग मी म्हणेन कि “ सत्य हे बहू आयामी आहे”.

हि जागा बहु आयामी आहे. या जागी येण्यासाठी अनेक सूचना असू शकतात, अनेक मार्गदर्शिका असू शकतात आणि त्या सर्व बरोबर आहेत.

प्रश्न: या निर्मितीचा काय उद्धेश आहे?

श्री श्री : कोणत्याही खेळाचा काय उद्धेश असतो? ( उत्तर: जिंकणे किंवा करमणूक)

होय, फक्त करमणूक, किंवा मजा , होय कि नाही? तोच तर आहे !

जेंव्हा ब्रम्ह एकटे होते, तेंव्हा त्यांना त्याचा कंटाळा आला, आणि मग त्यांनी विचार केला कि चला आता एकाचे अनेक होऊयात. आणि मग मनात हा विचर येताच ते एकाचे अनेक झाले.

तुम्ही एका मोठ्या आरशात सहस्रावधी छोटे छोटे आरसे पहिले आहेत काय? माणूस त्याच्या समोर उभा राहिला तर त्याला त्याच्या हजारो छबी बघायला मिळतात. आणि त्या हजारो आरशात पूर्ण छबी अवतरते. तुम्ही तुमचा पूर्ण चेहरा त्यात बघू शकता.

मग ते असे म्हणत नाही कि” तुमची पूर्ण छबी जर एका आरशात दिसत आहे तर ती दुसऱ्या आरशात पण कशी दिसते?” नाही! हा तर्क बरोबर नाही, होयना ?!

हे अगदी असेच आहे, एक परमात्मा आपल्या हजारो आणि लाखो प्रतिमा तयार करतो पण सत्य मात्र एकच असते.

प्रश्न: गुरुदेव, परत , परत जन्म न घेता मुक्ती मिळविण्यासाठी नियमित साधनेशिवाय अजून काही करता येईल काय?

श्री श्री : संतोष! समाधान!

प्रत्येक गोष्ट हि आनंदाने आणि संतोषाने करा.

तुम्ही आजचे काम केले आहे आणि तुम्ही संतुष्ट आहात. आणि उद्या तुम्ही जे काही काम करणार आहात ते संतोषाने करा.

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा संतोषाने जगा कारण त्यामुळे तुमची जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होईल.

प्रश्न: गुरुदेव, मी तुमचे अष्टवक्र गीतेवरील पुस्तक वाचले आहे. त्यातील प्रत्येक शब्द मला खूप आनंद देऊन जातो. परंतु तुम्ही त्यात जे धर्म ( सामाजिक आणि नैतिक धर्म बाबतची कर्तव्ये), अर्थ ( भौतिक आणि आर्थिक उन्नतीविषयी वागणूक) आणि काम ( यौवन सुख) हि बंधनाची कारणे आहेत असे म्हणता ते अगदी खरे आहे. पण मी या बंधनातून मुक्त होऊ शकत नाहीये. मी पुरुषार्थ ( धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ( मुक्ती) या बाबतची) कर्तव्ये पूर्ण केली आहेत तरी पण मला असे वाटते कि त्यासाठी तुमचे आशीर्वाद आवश्यक आहेत.

श्री श्री : असे पहा कि अष्ट वक्र गीता असे सांगते कि “ ना ग्राह्यं, ना त्याज्यम” तुम्ही त्याला चिकटून राहता कामा नये, तसेच ते सोडून देता कामा नये. फक्त पोकळ आणि रिकामे व्हा आणि जी गोष्ट जशी आहे तशी पाहायला शिका.

असे म्हटले आहे कि “ ये द्रिष्ट लाभ संतुष्टम्”

याचा अर्थ असा कि ‘ तुम्हाला जे काही मिळेल, जेवढे काही मिळेल, त्यामध्ये संतुष्ट रहा’. संतोष हा खूप महत्वाचा आहे.

साधक हा संतुष्ट आणि क्रियेत गतिशील असा दोन्ही असायला पाहिजे.

मी नेहमीच संतोषच्या बाजूने असतो. पण जेंव्हा मी संतुष्ट असतो तेंव्हा माझ्या आजूबाजूचे लोक त्याला आत्मतुष्ट समजतात. म्हणून वेळो वेळी मी असे भासावितो कि जे काही होत आहे त्याबद्धल मी काही पूर्ण संतुष्ट नाही आणि मग त्यांना कधी इकडे, तर कधी तिकडे काही बाही गोष्टी करायला लावतो. त्यामागे एवढाच उद्धेश असतो कि तुम्ही आळशी आणि निरुध्योगी होऊ नये म्हणून.

म्हणून तुम्ही नेहमी कार्यरत रहा पण त्याच बरोबर मनात संतुष्ट रहा.हे फार महत्वाचे आहे.

काही लोक फार क्रियाशील असतात आणि सारखे काम करीत असता पण संतुष्ट मात्र नसतात. आणि काही लोक असे असतात कि थोडेसे संतुष्ट होतात आणि मग आळशी बनतात. त्यांच्यात कामात समर्पित व्हायची वृत्ती नसते. हे काही बरोबर नाही.

यासाठी आपण मध्यम मार्ग स्वीकारायला पाहिजे. आपल्याला दोन्ही गोष्टी बरोबर पाहिजेत- कामात गतिमानता आणि वृत्तीमध्ये संतोष. असे आपले स्वरूप असायला पाहिजे.

काही वेळा लोक आश्चर्य व्यक्त करतात, “ गुरुदेव असे का वागत आहेत?हे करा, ते करा, असे का सांगत आहेत? ते संतुष्ट होऊन आराम करायला का सांगत नाहीयेत?

पण मी सर्वत्र बारीक नजर ठेऊन असतो, आणि ज्याला जर काही करायची आवश्यकता असते त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करतो.

जे खुपच अस्वस्थ असतात मी त्यांना शांत बसून विश्रांती घ्यायला सांगतो.आणि जे खुपच शांत असून मोकळेपणे नसतील त्यांना मी सांगतो कि “ चला लवकर, उठा! काहीतरी करा, हे करा, ते करा! ते पहा त्याने किती चांगले काम केले बघा, तुम्ही तर नुसते बसून राहिला आहात आणि काहीच करीत नाही आहात.” असे सांगून मी त्यांना कामाला उद्युक्त करतो. 

भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अगदी याच पद्धतीने सांगितले आहे.

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात “ तू युद्ध करणार नाहीस? तू म्हणतोस तरी काय? लोक तुझ्याकडे बघून हसतील. असा अपमान सहन करण्यापेक्षा मरण बरे!

अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाला तयार करतात.

ते त्याला सांगतात ”भ्याडपणे जगण्याला काही अर्थ नाही.असे जगण्यापेक्षा मरण केंव्हाही चांगले. त्या नंतर ते अर्जुनाला सांगतात :

सर्व धर्म परीत्याज्य मामेकं शरणंव्रज|| 
अहं त्वं सर्व-पापेभ्यो मोक्ष्यास्यामी मा सुखः|| 

सर्व धर्माचा परित्याग करून मला शरण ये. मी तुझी सर्व पापातून सुटका करून तुला मोक्ष मिळवून देईन. तू स्वतः होऊन या पापातून मुक्त होऊ शकणार नाहीस. मी तुला सर्व पापातून मुक्ती देईन. तुझ्या पापांची चिंता करू नकोस, मी त्यांची योग्य ती विल्हेवाट लावीन. तू आनंदी रहा आणि असा अपराधी वाटून घेऊन नकोस.

आता तुमच्या लक्षात आले असेल कि ज्ञान हे अनेक स्तरावर असते आणि त्या प्रत्येक स्तराचा एक विशिष्ट हेतू असतो.

तीर्थयात्रेचे महत्व

04
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न: प्रिय गुरुजी, कृपया बंधनाबद्दल काही सांगू शकाल कां ? आत्म्याला बंधनात अडकल्यासारखे कां वाटते आणि बंधनाची कारणे काय ?

श्री श्री : अज्ञान हे बंधनाचे कारण आहे. आणि अज्ञान कां असते तर त्याला उत्तर नाही. देवाने प्रथम अज्ञान निर्माण केले आणि मग त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग निर्माण केले. असे कां ? म्हणूनच त्याला ‘लीला’ असे म्हटले जाते.

हे म्हणजे असे विचारण्यासारखे झाले की , ‘आपल्याला फुटबॉलची मॅच खेळायलाच हवी असे कां ? एका बाजूला काही प्रशिक्षक आणि काही खेळाडू आणि काही दुसऱ्या बाजूला असे मैदानाचे दोन भाग कां असतात ? खेळाडू एक बॉल पायाने इकडून तिकडे कां ढकलत असतात ? त्यांचा आपापला बॉल कां नसतो की ज्याच्या बरोबर ते ते आपापल्या भागातच राहतील ? असे झाले तर मग तो खेळच रहाणार नाही नां ? तर अज्ञानामुळेच खेळ असतो, क्रिडा असते. त्यामुळेच या संपूर्ण सृष्टीला ‘परमपुरुषाचा खेळ’ असे म्हटले आहे.

प्रश्न : गुरुदेव, असे म्हटले आहे की साधकाने समजण्याला अनुभूती मानण्याची आणि अनुभूतीला मुक्ती मानण्याची गल्लत करू नये. कृपया समजावून सांगाल कां ?

श्री श्री : असे कोण म्हणते ? दुसऱ्या कुणाच्या वक्तव्यावर टिपणी करण्याची मला सवय नाही. समजणे हे बुद्धीचे काम आहे. अनुभव हा त्याहून सूक्ष्म आहे. आणि अनुभूतीच्या पलीकडे मुक्ती आहे.....जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही अनुभव नाही आहात तर अनुभव घेणारे आहात.

त्यामुळेच भगवद्गीतेत म्हटले आहे , नास्ती बुद्धीरयुक्तस्य नचायुक्तस्य भावना , नचाभावयत: शांती: अशांतस्य कुत: सुखम् (भगवद्गीता , अध्याय २ , श्लोक ६६ )

जर तुमचे स्वत:चे चित्त तुमच्या आत्म्याशी स्थिर झालेले नसेल तर ना तुमच्या बुद्धीला धार येईल नां तुम्हाला भावनिक स्थैर्य आणि स्पष्टता येईल.

प्रश्न : गुरुदेव, जर तुम्ही गुरूबरोबर थेट जोडलेले असाल तर देवळात जाण्याची गरज आहे कां ?

श्री श्री  : देवदर्शनासाठी देवळात जाणे ही जास्त करून सांस्कृतिक आणि सामाजिक घटना आहे. अर्थात त्याला आध्यात्मिक बाजूही आहेच. पण ती आवश्यक गोष्ट नाही. तुम्ही घरीच बसून जिथे आहात तिथे देऊळ वाटून घेऊ शकता.

संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी आणि आपल्या मुलांवर आणि लहानांवर पावित्र्याची भावना निर्माण करण्यासाठी तीर्थयात्रा करणे, अधून मधून देवळात जाणे चांगले . पण फक्त तिथेच देव भेटतो म्हणून नव्हे तर परंपरा जपण्यासाठी जावे. त्यासाठीच आपल्याकडे सण साजरे केले जातात, तीर्थ यात्रा केल्या जातात. जेणेकरून लोक एकत्र यावे. तर हे मुख्यत्वे सामाजिक कारणासाठी आहे.

तुम्ही घरातच ध्यान करू शकता आणि भजने म्हणू शकता पण जेव्हा तुम्ही इथे आश्रमात येता आणि आपण एकत्र ध्यान करतो, एकत्र भजने म्हणतो तेव्हा सामुदायिक चेतना उंचावली जाते. तुमची सामुदायिक उर्जा उंचावली जाते आणि त्यात वेगळीच मजा आहे. 

तसेच जर कुणी विचारले की , “ आम्ही घरीच ध्यान करू शकत नाही कां ?” मी म्हणतो, हो, नक्कीच करू शकता. तुम्ही घरी बसून तर ध्यान करायलाच हवे आणि कधी कधी तुम्ही इथेसुद्धा यायला हवे. देवळांच्या बाबतीतही तसेच आहे.

प्रश्न : गुरुदेव, कृपया ध्वनी लहरींबद्दल आणि त्यां विचारांच्या माध्यमातून कसे काम करतात याबद्दल सांगा. म्हणजे आपण ध्यानात मंत्र कसा घेतो याबद्दल.

श्री श्री : ते घडते. एवढेच. कसे घडते आपल्याला माहित नाही. बघा, आजकाल बऱ्याच गोष्टींना ‘सेन्सर’ बसवलेले असतात. आणि तुम्ही त्यां वस्तुला हात लावला की दिवा लागतो. तुमच्या नुसत्या स्पर्शाने कुलूप उघडू शकते. तुमचा फोनही केवळ तुमच्या बोटांच्या स्पर्शाने चालतो. तुमचा लॅप् टॉप आणि आय पॅड सुद्धा असाच चालतो. हे सगळे केवळ स्पर्शाने चालते. हो की नाही ? तर आपली पाचही ज्ञानेंद्रिये- स्पर्श, गंध, चव, दृष्टी, आणि श्रवण हे सर्व दुसरे काही नाही तर इलेक्ट्रॉनिक लहरी आहेत. विज्ञान याचे जास्त चांगले स्पष्टीकरण देऊ शकेल.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, मला हे कळते की तुमच्या भक्तांच्या सागरातला मी केवळ एक कण आहे . तरीही मला दृढ विश्वास आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि तुम्हाला माझ्या गरजांची जाणीव आहे. मी तुमच्यासाठी खास आहे असे मला वाटणे हा माझा अहंकार आहे कां ?

श्री श्री : नाही. हे अगदी योग्यच आहे. तुम्हाला खास वाटायलाच हवे. म्हणूनच म्हटले आहे, अनुपमा ( ज्याला कोणतीही उपमा नाही ), अद्वितीय ( असा दुसरा कोणी नाही ), अप्रमेय
( कुणाशीही तुलना होऊ शकत नाही असा ). ही सर्व आत्म्याची लक्षणे आहेत. आत्म्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.

तर तुम्हाला स्वत:बद्दलची खास भावना असू द्या. काहीच प्रश्न नाही. पण कुठल्याही मागण्या करू नका. हे तुमच्यातच तुमच्या भावनांच्या मर्यादेपर्यंत आहे तोवर तुम्हीही सुरक्षित आणि बाकीचे सगळेही सुरक्षित आहेत. पण जर तुम्ही म्हणाल की, “मी खास आहे त्यामुळे तुम्ही मला हे अमुक तमुक द्याच.” तर मग ते अवघड होऊन बसेल. पण तुम्ही स्वत:ला खास मानावे हेच मला हवे आहे.

प्रश्न : गुरुदेव, कधी कधी आम्हला सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती आपल्याला मुक्ती कशाने मिळेल ? तर देवाने आपल्यात ही भीती कां निर्माण केली आहे ? भीतीची काही गरज नाही.

श्री श्री : भीती म्हणजे फक्त उलटे झालेले प्रेम. त्यामुळे जिथे प्रेम असते तिथे थोडीशी भीती ही आलीच.

ज्ञान, वैराग्य, विवेक ह्या तीन गोष्टींमुळे भीतीचे रुपांतर पुन्हा प्रेमात होण्यास मदत होऊ शकते. जेव्हा प्रेम आसक्ती मध्ये रुपांतरीत होते तेव्हा भीती डोके वर काढते. त्यामुळे वैराग्य आणि विवेक यांच्यामुळे प्रेम त्याच्या शुद्ध स्वरुपात ठेवा.

प्रश्न : प्रिय गुरुजी, आध्यात्माचा मार्ग इतका कठीण आणि मेहनतीचा कां आहे ? कधी कधी मला वाटते मी जेव्हा अज्ञानी होतो तेव्हा माझे आयुष्य जास्त सोपे होते.

श्री श्री : आध्यात्म अवघड आहे ? (श्री श्री हसतात ) असे कोण म्हणते ? जर ते अवघड असेल तर तुम्ही आत्ता हसतमुख कसे असता ? पूर्वी तुम्ही संवेदनशील नव्हतात , आता तुम्ही संवेदनशील झाला आहात इतकेच ! जेव्हा तुम्ही गेंड्याच्या कातडीसारखे असता तेव्हा तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला काहीच वाटत नाही. तुमचे आयुष्य असेच चाललेले असते. पण जेव्हा तुम्ही संवेदनशील बनता...... जेव्हा कापड निर्मळ आणि शुभ्र होते तेव्हा एखादा छोटासा डाग किंवा ठीपकाही मोठा वाटतो, इतकेच.

अध्यात्म तुम्हाला दु:खी कधीच होऊ देणार नाही. असे म्हटले आहे की , हेयं दु:खं अनगात्मम् \ योगाचे हे तत्व आहे, ध्येय आहे, उद्दिष्ट आहे की दु:खं येण्याच्या आधीच त्याला थांबवायचे. 

प्रश्न : माझे प्रिय गुरुदेव, आध्यात्मावारचे लक्ष पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी संसारी जगात अपयश येणे महत्वाचे आहे कां ?

श्री श्री : नाही, लक्ष केंद्रित होण्यासाठी अपयश येण्याची गरज नाही. तुमच्या मनात असा संकल्प करू नका. ती गरजेची गोष्ट नाहिये.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही खूपच उदार आहात. तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात पण मी तुम्हाला ज्या गोष्टी करण्याचा वादा केला होता त्या मी पूर्ण केलेल्या नाहीत. मला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही मला शिक्षा करणार की माझ्या इच्छा पूर्ण करत रहाणार ?

श्री श्री : ( हसतात ) ते मी तुम्हाला आत्ता कां उघड करू ? तुम्ही अंदाज करत रहा. आणखी काही इच्छा करण्याच्या आधी तुम्ही केलेले वादे पूर्ण करा. मला तुम्हाला लोभी बनवायचे नाहिये. नाहीतर तुम्ही खूपच लोभी व्हाल.

जेव्हा तुम्हाला कळते आहे की इच्छा पूर्ण होताहेत तेव्हा तुम्ही जास्त मोठ्या गोष्टींसाठी इच्छा केल्या पाहिजेत, फक्त स्वत:साठी नाही. राष्ट्र , जग , मानवता यासाठी इच्छा धरा. 

जर तुमच्या इच्छा काहीतरी मोठे मिळवण्यासाठी असतील, हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असतील तर ते जास्त अर्थपूर्ण असेल आणि मग त्यात तुमचीही उन्नती आहे.

तुम्ही असा संकल्प केला पाहिजे की, ‘वेदांताचे ज्ञान ह्जारो लोकांपर्यंत पोहोचू दे, योग ह्जारो लोकांपर्यंत पोहोचू दे.’ तुम्ही तुमच्यात अशा इच्छा जोपासायला हव्यात.

खरे म्हणजे इच्छा जोपासता येत नाहीत पण ही इच्छांची योग्य दिशा आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, बारा ज्योतीर्लींगे (महादेवाची बारा पवित्र तीर्थस्थाने) कशी आणि कधी अस्तित्वात आली ? कृपया यावर प्रकाश टाकावा.

श्री श्री : बघा, प्रत्येक ज्योतिर्लिंग कसे निर्माण झाले याची वेगळी कहाणी आहे. प्रत्येकाशी निगडीत एक ‘स्थळ पुराण’ आहे. उदाहरणार्थ श्रीरामांनी पूजेसाठी रामेश्वर येथे शिवलिंगाची स्थापना केली. याचा उद्देश हा होता की भारतातील सर्व लोकांना भक्तीच्या एका धाग्यात एकत्र बांधावे. भारतातले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. काशीमध्ये (वाराणसी ) वेगळीच भाषा बोलतात रामेश्वरमध्ये वेगळी भाषा बोलतात.

प्राचीनकाळी लोकांना रामेश्वरला जायला सांगितले जायचे आणि तिथून काशीला जाऊन नंतर गंगास्नान करायला सांगितले जायचे. आणि तिथून येताना सोबत आणलेले गंगाजल घेऊन पुन्हा रामेश्वरला जाऊन तिथे ते ज्योतिर्लिंगावर वहायला सांगितले जायचे. आणि त्यानंतर तिथला प्रसाद घेऊन पुन्हा काशी विश्वेश्वराला जायला सांगितले जायचे. पूर्वीच्या काळी असे करायला सांगण्यामागचा हेतू हाच असायचा की ( देशात निराराळ्या ठिकाणी असलेल्या या पवित्र देवस्थानांना भेट देऊन) राष्ट्रीय एकात्मता भाव जागृत व्हावा.

तुमच्या या पवित्र पाण्याची शंकराला गरज असते असे नाही. शंकर महादेव त्याचे काय करणार ? सृष्टीतले सगळे पाणी त्याचेच तर आहे. पवित्र गंगाजल काशीहून रामेश्वरला नेण्याचे शंकराला काही महत्व नाही. पण हो, देशासाठी ते महत्वाचे आहे.

लोक जेव्हा एकत्रपणे देशातल्या विविध ठिकाणी तीर्थाटनासाठी जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या एकमेकातील मित्रत्वाचे धागे अधिक घट्ट होतात.

बघा, दक्षिण भारतातले लोक अमरनाथच्या तीर्थयात्रेला जातात. त्यामुळे ही तीर्थयात्रा म्हणजे दक्षिणेतील कन्याकुमारीतील लोकांना उत्तरेतील काश्मीरमधील लोकांशी जोडण्याचे एक साधन बनते. तीर्थयात्रा हा त्यांना जोडणारा दुवा बनतो. आणि जेव्हा आपण कोणतीही गोष्ट शुद्ध आणि पवित्र भावनेने करतो तेव्हा आपली संपूर्ण चेतना फुलून यायला सुरवात होते. त्यामुळेच सगळी बारा ज्योतिर्लिंगे कधीच एका जागी किंवा एकाच राज्यात स्थापन केली गेली नाहीत. काही उत्तरेत तर काही दक्षिणेत तर काही पश्चिमेला अशी सगळीकडे पसरलेली आहेत.

आणि त्या काळी, या सर्व ठिकाणी प्रवास करणे खूपच कठीण होते. त्या ठिकाणी पोहोचणे खूपच जिकीरीचे होते या तीर्थस्थानांना पोहोचण्यासाठी दाट जंगलातून जावे लागे, धोकादायक दऱ्या, ओसाड गावे किंवा बर्फाच्छादित हिम शिखरे वगैरे पार करावी लागत असत. उदाहरणार्थ केदारनाथ हे तीर्थस्थान हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये खोलवर दडलेले आहे.

अशाप्रकारे, देशातील विविध ठिकाणी शिवाची पवित्र स्थाने स्थापन करून साधुसंतांनी त्याकाळी एक एकसंध देश निर्माण केला.

असेही म्हटले जाते की, तत्रोपजग्मुर भुवनं पुनण महानुभाव मुनय: स्-शिष्य प्राये तीर्थाभिगमपदेसी: स्वयंही तीर्थानी पुनन्ति संत: श्रीमद भागवतम् ( कांड १ , अध्याय १९, श्लोक ८ )

याचा अर्थ ... जिथे जिथे पवित्र मुनी स्थानस्थ झालेले असतात ते ठिकाण म्हणजे तीर्थस्थानच होऊन जाते.

कितीतरी संतांनी या पवित्र स्थानांना भेट दिली आहे, तिथे ध्यान केले आहे आणि तपस्या केली आहे आणि त्यामुळे या स्थानांचे पावित्र्य आणि महात्म्य काळानुसार वाढत गेले आहे.

हे सर्व जरी असले तरी आज या सर्व ठिकाणी तुम्हाला अस्वच्छता आणि अनागोंदी कारभार दिसेल. तेथील व्यवस्था नीट ठेवली जात नाही. आजकाल श्रद्धा आणि भक्ती याचा भाव न ठेवता केवढेतरी दूध आणि इतर गोष्टी निष्काळजीपणे आणि वाया जातील अशाप्रकारे इथे वाहिल्या जातात. गडबडीने सर्व विधी आणि सोपस्कार कसेतरी आटोपतात. ही ‘पूजा’ नव्हे. मनापासून, भक्तीभावाने आणि ध्यानस्थ स्थितीत केलेली उपासना म्हणजे खऱ्या अर्थाने ‘पूजा’.

तुमच्या स्वार्थी इच्छा किंवां भूक पूर्ण करण्यासाठी किंवा काही तरी करायलाच हवे म्हणून केले तर तुम्ही स्वत:लाच मुर्ख बनवताय. तेव्हा असे करू नये तर पूर्णपणे भक्ती भावाने करावे.

जेव्हा शिव रुद्र म्हटले जात असते आणि शिवलिंगावर रुद्राभिषेक सुरु असतो तेव्हा आपण डोळे मिटून स्वत:मध्ये लीन होऊन जावे. गहिऱ्या ध्यानात जावे. तर ते अर्थपूर्ण होईल. 

शिवतत्वाच्या अथांग विशालतेचा अनुभव घ्यावा जे परमानंद चिदाकाश (परम चेतना) बनून सर्वत्र पसरले आहे

अहंपणावरील सर्वोत्कृष्ट उतारा

03
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न : अहं आणि अधिकारवृत्ती यांच्यामध्ये काही नाते आहे का, आणि या दोहोंच्या बाहेर आम्ही कसे यायचे?

श्री श्री : हो.

अहं, अधिकारवृत्ती, असूया, क्रोध आणि लोभ हे सगळे जोडलेले आहेत. हे सगळे अहंला जोडलेले आहेत. आता या अहंपासून सुटका कशी मिळवायची, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

खरं तर यावर उपाय एकदम सोप्पा आहे. फक्त एका दिवसासाठी चक्रम होण्याचे मान्य करा. केवळ एकच दिवस वेड्या माणसासारखे वागा. इतकेच करणे चांगले आहे.

अहंचा अर्थ असा की तुम्ही समोरच्या व्यक्तीवर स्वतःचा प्रभाव पडण्याचा प्रयत्न करीत आहात.अहंच्या अस्तित्वा करिता समोरची व्यक्ति असणे जरुरी आहे. एखाद्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तिथे अहं असू शकत नाही. समोरची व्यक्ति असेल तेव्हाच आपला अहंकार उफाळून येतो जर तुम्ही एखद्या बालकासारखे असाल, जेव्हा तुम्ही सहज, नैसर्गिक असाल तर हा अहंपणावरील सर्वोत्कृष्ट उतारा आहे.

जेव्हा तुमच्यामध्ये जास्त नैसर्गिकता येते आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांबरोबर मनमोकळे असता आणि सगळ्यांबरोबर तुम्ही तद्भावीत असता तेव्हा अहंपणाचा निभाव लागू शकत नाही आणि तो टिकू शकत नाही. या सगळ्या गुणांमुळे तुमचा संपूर्ण कायापालट होतो. जर तरीसुद्धा अहंपणा "मी, मी" करीत असेल, तर अहंच्या कक्षा रुंद करा.

एक आहे पारदर्शक अहं आणि दुसरा आहे रुंदावलेला अहं. दोन्हीचा अर्थ समानच आहे. रुंदावलेल्या अहंचा अर्थ आहे-सगळ्यांचा समावेश केलेला आहे-सगळे माझेच आहे.मी सर्वस्व आहे. हे फार चांगले आहे.

तर मग एक तर अहंला अजून फुगवून खुपच मोठा करा किंवा मग साध्यासुध्या आणि निष्पाप अशा सहज कृतींनी त्याचे रुपांतर करा.याने अहं पारदर्शक होतो.

प्रश्न : गुरुदेव,मी अशा काही परिस्थितीत आहे की मी माफ करू शकत नाही आणि विसरूही शकत नाही. कृपा करून मला मार्गदर्शन करा की मी काय करू.

श्री श्री : मग असे करा की तुम्ही तुमच्या मृत्यूचा विचार करा, की तुमचा मृत्यू होणार आहे. तुमचे मन जरी (त्या प्रसंगात) अडकलेले असेल, तरीदेखील तुमचा अंत अटळ आहे; तुम्ही हे जग सोडून जाणार आहात. आता,तुम्हाला हा ठसा घेऊन जायचे आहे का? चला उठा,जागे व्हा!

जीवन हे अल्प आहे आणि प्रत्येक जण एक बुजगावणे आहे. बुजगावण्याला स्वतःचे डोके नसते. सगळेजण हे बुजगावण्यासारखे आहेत आणि प्रत्येकामध्ये एक खास शक्ती आणि उर्जा कार्यरत आहे.

ते परमकारणाकारण सगळ्या कारणांचे कारण आहे. वेगवेगळया लोकांच्या मनात वेगवेगळया गोष्टी भरणे हा सगळा शिवतत्वाचा खेळ आहे. हे अद्वैत ज्ञान समजून घ्या, अनुभवा.

आपण सगळे एकाच पदार्थापासून बनलेलो आहे.

सगळी लहान लहान मने आहेत पण हे मन मोठ्या मनाने आणि कर्मानुसार प्रभावित असते. म्हणून वेगवेगळे लोक हे विविध प्रकारे वागतात.

तुम्ही कोणचे काहीही वाईट केले नसतानादेखील ते लोक तुमचे शत्रू बनतात असे कधी तुमच्या लक्षात आले आहे? तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आला आहे?असे लोक शत्रू बनतात ज्यांचे तुम्ही खास करून खूप भले केलेले असते.आणि मग ही व्यक्ति माझी खास दोस्त आहे, मी या व्यक्तीकरिता इतके केले आणि ही व्यक्ति माझी शत्रू झाली असे तुम्ही नवल करता ! हो ना?

त्याचप्रमाणे असेपण लोक आहेत ज्यांना तुम्ही काही खास मदत केली नाही तरीदेखील ते तुमचे चांगले दोस्त बनतात, असे नाही का झाले?

तुम्ही आगगाडीमध्ये कोणलातरी भेटला आणि मग त्यांनी बाहेर येऊन तुमची अतिशय मदत केली होती.

तर मग म्हणून मैत्री आणि शत्रुत्व निर्माण होते ते काही अनोळखी कर्मफलानुसार. म्हणूनच मित्र किंवा शत्रू हे सगळे सारखेच असतात कारण त्यांच्यामार्फत एक निराळीच शक्ती कार्य करीत असते. हे जाणून घ्या आणि आरामात राहा.

त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही काही चांगले काम करता तेव्हा त्याची टीका करणारे लोक असतात. महाभयंकर कामे करणारी माणसे आहेत आणि त्याचे कौतुक करणारे लोकदेखील आहेत. तुम्हाला हे सर्व विचित्र वाटत असेल. म्हणून सगळे सोडा आणि निश्चिंत व्हा.

प्रश्न : गुरुदेव, जीवनात ध्येय असणे जरुरी आहे का, का आयुष्यात आपल्याकडे जे येईल त्याच दिशेने जावे?

श्री श्री : तुम्हाला आयुष्यात काय करायचे आहे याचे एक व्यक्तिगत ध्येय असायला हवे. जर ध्येय असेल तर जीवन हे एका नदीसारखे वाहत जाते. जेव्हा ध्येय नसते तेव्हा पाणी शेतात वेडेवाकडे वाट्टेल तसे धावते आणि शेतभर पसरते. ध्येय ही एक बांधिलकी आहे, हे एक वचन आहे.म्हणूनच तुम्हाला ध्येय,लक्ष्य असायला पाहिजे.

ध्येय काय आहे? सर्वोत्कृष्ट मिळवणे, योगी होणे, ध्यानी बनणे आणि जगाची सेवा करणे हे ध्येय आहे.

जगाची सेवा करणे हीच खरी पूजा (प्रार्थना) आहे.

प्रश्न : गुरुदेव, केवळ काही खास प्रसंगीच मी लोकांना आणि घटनांना त्यांच्या गुणदोषांसहित स्वीकारू शकतो,परंतु काही प्रसंगी मी तसे स्वीकारू शकत नाही. हे असे का आहे ते मला माहित नाही. लोक आणि घटना यांना कायम कसे स्वीकारावे हे मला माहित नाही.

श्री श्री : त्याची गरज नाही. तुम्हाला सतत तसे करण्याची आवशक्यता नाही. तुम्हाला त्यांना स्वीकारण्याची गरज नाही. लढा द्या!

किती मोठा सुटकारा मिळाला, नाही का? तुम्हाला लढण्याची मुभा मिळाली! मी सांगतो की जा आणि खुशाल आनंदाने भांडा.

हे बघा, अशी कोणतीही गोष्ट जी तुम्ही करू शकत नाही ती तुम्ही करणे बंधनकारक नाही. जे आणि जितके तुम्ही करू शकता ते आणि तेवढेच तुम्ही करा. जर स्वीकारणे एवढे अवघड आहे तर स्वीकारू नका. जर अस्वीकार सोप्पा आहे तर अतिउत्तम; परंतु जर स्वीकारणे सोप्पे असेल तर ते करा.

प्रश्न : सर्वसामान्यपणे सदाचरणी माणसे असतात ती दुःखी असतात आणि पाप मार्गावरील माणसे समाधानी आणि आनंदी असतात. खरे तर त्यांचेच कौतुक होते आणि ते अतिशय वरच्या हुद्द्यावर असतात. असे कसे?

श्री श्री : मी दुःखी दिसतो का? इथे असलेले स्वामीजी दुःखी दिसत आहेत का? हे पहा,स्वामीजी तर हसत आहेत. सभोवती बघा;ही सगळी सर्वसामान्य साधी माणसे आहेत. ती सर्व तुम्हाला दुःखी दिसत आहेत का? इथे तुम्हाला ही माणसे आनंदी नाही का दिसत? पाकशाळा बघा, स्वागतकक्ष बघा, सगळीकडे लोक आनंदी आहेत, नाही का?

 (उत्तर : हो)

जर तुम्ही मौजमजेच्या मागे लागलात तर वाट्याला दैना येते. जर तुम्ही ज्ञानाच्या मागे लागलात तर आनंद तुमच्या मागे मागे येतो.

प्रश्न : माझी इच्छाशक्ती अतिशय कमकुवत आहे.मी अनेक प्रयत्न केले परंतु जीवनात दहापैकी आठ वेळा मी असफल राहिलो आहे. माझी इच्छाशक्ती चांगली होण्याकरिता मी काय करू?

श्री श्री : सर्वात प्रथम म्हणजे तुमची इच्छाशक्ती कमकुवत आहे असे लेबल तुम्ही स्वतःला चिटकवून घेतले आहे. मामला खलास. तुम्ही स्वतःला कोणतेही लेबल लावून घेऊ नका. 

नंतर लहानसहान गोष्टींनी सराव सुरु करा. छोट्या अवधीचे, लहानशा कालमर्यादेचे संकल्प ठेवा.

उदाहरणार्थ दहा दिवसांचा संकल्प,मी दररोज व्यायाम करणार,पुढचे दहा दिवस मी कोणतेही अपशब्द वापरणार नाही. एकदा का तुम्हाला हे जमायला लागले की मग तुम्ही अधिक कालमर्यादेचे संकल्प ठेवू शकता.

प्रश्न : मी बऱ्याच काळापासून ध्यान साधना करीत आहे. अलीकडच्या ध्यानादरम्यान तुम्ही मला दर्शन दिले आणि तुम्ही मला प्रसाद दिलात. माझे डोळे तर बंद होते परंतु तुम्ही सगळ्याचे अवलोकन करीत होतात. आता माझा प्रश्न असा आहे की ते तुम्ही खरोखर होतात का तुमच्या अवतारातील तो देव होता?

श्री श्री : एका साधकाला त्याच्या आयुष्यात अनेक अनुभव येतात. त्याच्याबद्दल जास्त चिरफाड करण्याची आवश्यकता नाही. पुढे जात राहा.

कालचा अनुभव हा कालचा होता:आजचा अनुभव हा आजच्यासाठी आणि उद्या तुम्हाला एक नवीन अनुभव येईल. मिळालेला अनुभव हा सुखावह असू दे किंवा वाईट असू दे, आपण त्यात अडकून न राहता पुढे जात राहिले पाहिजे.

मी देवावर विश्वास ठेवायला पाहिजे काय?

02
2012
Oct
बंगलोर
प्रश्न: गुरुदेव, देवाचा अध्यात्माशी काय संबंध? मी देवावर विश्वास न ठेवता आध्यात्मिक होऊ शकतो काय?

श्री श्री: होय !

तुम्हाला हे माहित आहे काय कि सहा दर्शनापैकी ( भारतीय तत्वज्ञानाच्या विचारसरणी) , पहिले तीन दर्शन हे देवाचा उल्लेख पण करीत नाहीत – ती म्हणजे न्याय, वैशेशिका, आणि सांख्य.

गौतम महर्षींचे न्याय दर्शन हे ज्ञानावर भर देते, तुमचे ज्ञान बरोबर आहे कि नाही या वर भर देते. उदाहरणार्थ, तुमच्या जाणीवेतून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त बघू शकता. पण न्याय दर्शन असे सांगते कि “ तुम्ही जे बघितलेत फक्त त्यावर विश्वास ना ठेवता खरोखरच सूर्योदय होतोय कि पृथ्वी फिरत आहे ते शोधून काढा.”

कोपर्निकसने पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा शोध लावला असे आपण समजतो, पण ते योग्य नाही. त्याने ते शोधून काढले यात काही वाद नाही, पण त्याच्या कितीतरी आधी भारतातील लोकांना हे माहित होते कि पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

हे असे सर्व न्याय दर्शनात सांगितले आहे. ते अनुभव, अनुभूती आणि त्यातील सुधारणा याविषयी सांगते.

आणि त्यानंतरचे वैशेशिका दर्शन हे या जगातील पृथ्वी, पाणी, अग्नी, हवा, वातावरण अशा या भूतलावरील नानाविध वस्तू आणि विषय यांचे विश्लेषण करते. अशा या वैशेशिका दर्शनमध्ये मन , चेतना, बुद्धी, स्मृती अशा गोष्टीविषयी माहिती आहे.

त्या नंतर येते ते सांख्य दर्शन.

या तिन्ही दर्शनात देवाचा उल्लेख नाहीये, पण ते चेतनेविषयी बोलतात. पण चौथ्या दर्शनात म्हणजे योग सूत्रामध्ये देव हा एक विषय आहे.

म्हणून तुम्हाला देवावर विश्वास असलाच पाहिजे अशी जबरदस्ती नाही, पण तुम्ही कोणावर तर विश्वास ठेवायला पाहिजे. अगदीच काही नाही तर तुम्ही तुमच्या चेतनेवर विश्वास ठेवायला पाहिजे.

जेंव्हा आपण देव या संकल्पनेबद्धल विचार करतो तेंव्हा साधारण पणे असा विचार केला जातो कि देव म्हणजे उंच आकाशात , स्वर्गात बसलेली अशी एक व्यक्ती कि ज्याने हि सर्व सृष्टी तयार केली आहे आणि मग स्वर्गात बसून सर्वांचे दोष शोधायला सुरवात केली आहे. तुम्ही काहीही केले तरी ते हातात एक काठी घेऊन तुम्हाला शिक्षा करायला बसले आहेत. पण आपण अशा प्रकारच्या देवाविषयी कधीच सांगितले नाही.

हे सर्व जग हे प्रेम या संकल्पनेने तयार झाले आहे आणि तोच देव आहे.

तुम्ही काही देवापासून वेगळे नाही.

देव या संकल्पनेच्या बाहेर काहीही नसून, हे सर्व त्या संकल्पनेतच सामावलेले आहे. ते सर्व चांगले, वाईट, बरोबर, चूक या सर्वांच्या पलीकडले आहे. सुखद, दुखद यातही काही अर्थ नाहीये.

जी एकच गोष्ट अस्तित्वात आहे , आणि त्याला जर काही नाव द्यायचे झाले तर तुम्ही त्याला देव म्हणू शकता, अगदीच तो पण विचार करायचा नसेल तर स्वतःला समजून घ्या. 

प्रश्न: गुरुदेव, चालू आठवडा हा आर्ट ऑफ लिविंग तर्फे महात्मा गांधी जयंती निमित्त “शांती आणि आरोग्य” म्हणून साजरा केला जात आहे. या संधर्भात आपण “शांती आणि आरोग्य” यांच्यातील परस्पर संबंधांविषयी काही बोलाल काय?

श्री श्री : हे साहजिकच आहे कि जर तुम्ही आरोग्यपूर्ण असाल तर तुम्ही शांतीप्रिय असता. आरोग्यातून शांती उदयाला येते. तुम्ही जर शांत, समाधानी नसाल तर तुम्ही स्वतःला आरोग्यपूर्ण म्हणणार नाही. जेंव्हा मन अशांत असते, तेंव्हा शरीर पण अशांत असते. 

आजारीपण हे नुसते शारीरिक नसते, तर ते मानसिक असू शकते, ते तुमच्या बुद्धीत असू शकते, तो तुमच्या बुद्धीचा संकोच असू शकतो, तुमच्या आत्म्याचा उदासपणा असू शकतो- या सर्व गोष्टी आजारपणात मोडतात. म्हणूनच “स्वास्थ्य” या शब्दाला खूप महत्व आहे. 

तुम्ही जर बालीला गेलात तर ते तुमचे स्वागत “ ओम् स्वस्ति रस्तु” म्हणून करतात.

हे तुम्हाला “अभिनंदन” किंवा “नमस्ते” म्हणण्यासारखे आहे.

बालीत ते तुम्हाला “ ओम् स्वस्ति रस्तु” म्हणतील, म्हणजे तुम्ही तुमच्यात स्थापित व्हा. 

तुम्ही जेंव्हा तुमच्यात स्थापित होता तेंव्हा तुम्ही शांतीपूर्ण असता, तुमच्यात कोणताही संकोच नसतो, तुमच्यात कोणतीही नकारात्मक भावना नसून तुमचे मन स्वच्छ असते, आणि मग तुमचे शरीर स्वस्थ असते.

या सर्वांसाठी “स्वस्थ” असा संस्कृत शब्द आहे.

प्रश्न: आर्ट ऑफ लिविंग मध्ये आल्यापासून माझे कोणतेही काम असेल तरी ते होणारच असा विश्वास निर्माण झाला आहे. पण केंव्हा तरी ते तसे होत नाही. असे का होते?

श्री श्री : होय, कधी असे होते. तेंव्हा असे लक्षात घ्या कि त्यापेक्षा चांगले असे काहीतरी घडणार आहे.

असे पहा कि आयुष्यात सुख आणि दुखः, चढ आणि उतार, आदर सत्कार आणि अपमान, हे सर्व होतच असते. पण या सर्व गदारोळात समभाव ठेवणे फार गरजेचे असते. आयुष्यातील कठीण काळच सांगू शकतो कि तुम्ही किती समतोल आहात ते.

जेंव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असते तेंव्हा तुम्ही असे म्हणालात कि “ माझ्यात खूप विश्वास आणि भक्ती आहे” तर त्यात काही मोठेपणा नाही. पण जर जेंव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित चालू नसतात आणि तेंव्हा जर तुम्ही तुमच्यातील भक्ती आणि विश्वास जागृत असेल तरच ती खरी श्रद्धा होय.

प्रकृती कि तुमच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण करते कि जेंव्हा तुमच्या श्रद्धेची कसोटी लागते, पण त्याही परिस्थितीत जर तुमची श्रद्धा अढळ राहिली तरच तुम्ही खरे समतोल आणि मग सारे काही सुरळीत होईल. हा तर निसर्गाचा नियमच आहे.

प्रश्न: माझ्यात सकारात्मक गुणांची वाढ होण्यासाठी मी काय करावे?

श्री श्री : साधना आणि सेवा हे सकारात्मक गुणांची वाद होण्यास उपयुक्त ठरतात. आणि जर सेवा करतांना लोकांनी तुम्हाला दुषणे दिली तर ते फक्त ऐकून घ्या. त्यांना सांगा “ द्या , देता येतील तेवढी दुषणे द्या.”

असे पहा कि जेंव्हा दुषणे घ्यायची तुमची तयारी होते तेंव्हा सकारात्मक गुण फुलायला सुरवात होते. पण जर तुम्ही त्यांना म्हणालात कि “ तुम्ही असे कसे बोलू शकता, मला दुषणे देऊ नका” आणि जर त्याचा प्रतिकार केलात तर मात्र सकारात्मक गुण फुलणे कठीण होते. 

म्हणून साधना करा आणि ध्यान करा. जेंव्हा आपण अशा क्रियांमध्ये व्यग्र असतो, चेतना जागृत होऊन सर्व सकारात्मक गुण वाढीस लागतात.

प्रश्न: गुरुदेव, अब्जावधी लोकांचे आदर्श असताना तुम्हाला कसे वाटतेय?

श्री श्री : पोकळ आणि रिकामे, पण त्याचवेळी अत्यंत परिपूर्ण.

प्रश्न: उपनयानाम सभेत बोलताना तुम्ही आम्हाला ब्राह्मयाग्न म्हणजेच चार वेदातील चार मंत्राबद्धल सांगितलेत. या मंत्रांचे अर्थ कृपा करून सांगाल काय?

श्री श्री : या मंत्रातील कंपने त्याच्या अर्थापेक्षा जास्त महत्वाची आहेत. हे मंत्र ऋषी मुनींनी अधिग्रहण करून लोकांना सोपविले आहेत. याचा अर्थ असा कि ते त्या कंपनाद्वारे त्यांच्या पर्यंत पोहोचले असून ते काही त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने लिहून काढलेले नाहीत.

हे मंत्र सहज ज्ञानयुक्त शुद्ध चेतनेच्या पासून निर्माण झाले आहेत.

असे पहा कि एके ठिकाणी बसून चार शब्द एकमेकाला जोडून, त्यापासून काही अर्थ शोधणे हि एक वेगळी गोष्ट होय. पण कवितेसारखी, जर आतून काही सहज ज्ञान होत असेल तर पुढील पिढ्यांसाठी त्याचा विस्तार करता येईल. आणि जेंव्हा प्रत्येक वेळी त्यातून काही वेगळा अर्थ येत असेल तर त्यांना मंत्र म्हणतात.

मन्नतात त्रयते इति मंत्रात- जेंव्हा तुम्ही त्याचा पुनरुच्चार करताना तुम्हाला एक वेगळी उर्जा मिळते असे हे मंत्र.

या मंत्रांना निश्चितच काही अर्थ आहे, पण तो अर्थ हे हिमनगाचे एक टोक झाले. मंत्रात अर्थ नव्हे तर कंपने महत्वाची असतात.

प्रश्न: जेंव्हा आपण गायत्री मंत्र म्हणतो, तेंव्हा त्याचा किती जप झाला हे महत्वाचे असते का? जर का तो थोडा कमी किंवा जास्त झाला तर चालते , कि त्याचे काही वाईट परिणाम होतात का फक्त ते म्हणण्याच्या मागची भावना महत्वाची आहे.

श्री श्री : भावनाभारित पठणाला जास्त महत्व आहे.

कमी जास्त झाले तर काही शिक्षा नाही. तुम्हाला जर तसे कोणी म्हणाले तर मी तुमचा वकील व्हायला तयार आहे.

अनेक विद्वान लोक असे गैरसमज पसरवितात कि काही विपरीत घडेल, स्त्रिया गायत्री मंत्र म्हणू शकत नाहीत. हे सर्व चुकीचे आहे, कारण असे काही नसते. प्रेमाने त्याचे पठन करावे केवळ भीती पोटी नव्हे.

प्रश्न: मी कितीही निश्चय केला तरी, नकारात्मक विचार माझ्या मनात येताच राहतात.मी काय करू?

श्री श्री : तुम्ही जर त्यांना अडवत राहिलात, विरोध करू लागलात, त्यांना दूर घालवायला लागलात तर ते भूतासारखे तुमच्या मागे लागतील.

त्यांच्याशी हस्तांदोलन करा, त्यांना तुमच्या जवळ बोलवा आणि बसवून घ्या आणि सांगा कि तुम्ही त्यांना कधीच सोडणार नाही आणि मग बघा ते कसे नाहीसे होतात ते. विचार तुम्हाला घाबरतात.

तुम्ही जर त्यांना घाबरलात तर ते तुम्हाला नियंत्रित करतील. पण जर तुम्ही त्यांना जवळ बोलावलेत तर ते नाहीसे होतील.

प्रश्न: गुरुदेव, पाप आणि चूक यात काय फरक आहे, आणि ते दोन्ही क्षम्य आहेत काय?

श्री श्री : बिलकुल, ते दोन्ही क्षम्य आहेत.

पापाच्या मागे काही विचार असू शकतो,पण चूक हि तुम्ही जागृत नसतांना होते.

पाप करतांना तुम्हाला माहित असते कि ते बरोबर नाही तरीपण तुम्ही ते करीत असता.तो फरक असू शकतो.

पण काही हरकत नाही, तुम्ही फार विचार करू नका ते दोन्ही क्षम्य आहेत. त्यांना विसरुन जा.

प्रश्न: गुरुदेव, जर सर्व गोष्टी या आधी लिहून ठेवल्याप्रमाणे असतील तर कर्माचा यात काय भाग आला?

श्री श्री : तुम्ही म्हणताय कि सर्व लिहून ठेवले आहे तर ते तसे नाहीये. काही गोष्टी या विधी-लिखित आहेत तर काही तुमच्यावर सोडलेल्या आहेत.

उदाहरणार्थ, जर पाऊस पडणे हे विधी-लिखित आहे तर तुम्ही भिजणे किंवा नाही हे तुमच्यावर सोडलेले आहे, तो तुमचा निर्णय आहे. जर तुम्ही छत्री घेतलीत तर तुम्ही भिजणार नाही आणि जर छत्री घेतली नाहीत तर भिजाल. तर सर्व गोष्टी या विधी लिखित नसून काही तुमच्यावर अवलंबून असतात.

प्रश्न: गुरुदेव, पालकत्व स्वीकारल्यावर काय महत्वाचे असते, मुलांना सर्व सुखसोई पुरवणे कि त्यांच्या बरोबर वेळ घालविणे?

श्री श्री : असे पहा कि तुम्ही नोकरदार आहात आणि तुम्ही तुमच्या मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही म्हणून तुमच्या मनात हे विचार येत आहेत. जो काही वेळ देऊ शकाल त्याचा योग्य उपयोग करणे महत्वाचे आहे.

प्रश्न: गुरुदेव, मी खूप विसराळू आहे, मी माझी स्मरण शक्ती कशी वाढवू?

श्री श्री : काही आयुर्वेदिक औषधी जसे कि शंखपुष्पी, ब्राम्ही रसायन, मेध्यरसायन हि खूप चांगली असून त्याचा स्मरण शक्तीसाठी फायदा होतो.

यू टूब आणि दूरदर्शन यात फार वेळ घालवू नका. तुम्ही त्यासाठी काही वेळ देऊ शकता पण एकावेळी जास्त वेळ त्यासाठी घालवू नये.

काही वेळा तुम्ही पाच ते सहा तास इंटरनेट समोर बसता, चार पाच तास एकापाठोपाठ एक सिनेमे बघता, असे करू नका.

प्रश्न: गुरुदेव, अमली पदार्थांच्या विळख्यातून मी बाहेर कसा येऊ?

श्री श्री : येथून बाहेर पडायच्या अशी शपथ घ्या कि तुम्ही परत त्याला स्पर्श करणार नाही.

आणि जर तुम्ही दुसऱ्या कोणा बाबतीत बोलत असाल तर त्यांना येथे घेऊन या, अनेक वेळा सुदर्शन क्रिया केल्यावर त्यांची हि सवय जाईल.

लक्षावधी लोकांना प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि सहज समाधी ध्यानाचा फायदा होऊन ते यातून बाहेर पडले आहेत.

प्रश्न: गुरुदेव, मी एक ऋषी मुख मासिकात असे वाचे आहे कि भगवान विष्णू हे देवाचे देव आहेत, पण मग भगवान शिव हे भगवान विष्णूंचे गुरू हे कसे?

श्री श्री : होय, भगवान शिव हे देवांचे देव आहेत.

असे पहा कि ते काही वेगळे नाहीत. हरी आणि हर हे काही वेगळे नाहीत.

शिव आणि विष्णू एकच आहेत.

थांबा आणि बघा आयुष्य कुठे चालले आहे

14
2012
Sep
..
तर मग आज कशावर चर्चा करायची ? माझी बोलणाऱ्याची भूमिका आहे आणि तुमची श्रोत्याची. आज तुम्हाला कशाची माहिती हवी आहे हे कळलं तर बरं होईल. तुम्ही अशा मुद्यांचा विचार करा.

तुम्हाला माहितिये कां, आपल्या एखाद्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वातावरण अगदी अनौपचारिक असावे लागते. विवेकपूर्ण आणि विश्वसनीय अशा गोष्टींबद्दल बोलण्यासाठी औपचारिक वातावरण पोषक नाही. मला सगळं अनौपचारिकरीत्या करायची सवय आहे.

तर आता आपण आपल्या समोरच्या, बाजूच्या आणि मागच्या व्यक्तीला शुभेच्छा देऊन सुरवात करुया. तुमच्या भोवतालच्या प्रत्येकाची ओळख करून घ्या.

मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खरे सर्वांना शुभेच्छा दिल्यात की केवळ औपचारिकपणे केलेत ? तुम्ही तुमच्या बाजूच्या माणसाला हे सांगायची गरज नाही. ‘ तुम्ही त्यांना हे सांगायची गरज नाही की “ मी तुम्हाला केवळ औपचारिकपणे शुभेच्छा दिल्या.” मला तुम्हाला स्वत:ला विचारायचे आहे की तुम्ही त्या व्यक्तीला खरेच शुभेच्छा दिल्यात कां ?

तुम्हाला माहितीये , जेव्हा तुम्ही विमानातून उतरता तेव्हा त्या हवाई सुंदरी तुम्हाला, “ दिवस छान जाउ दे” अशा शुभेच्छा देते. पण त्यांना खरेच तसे वाटत नसते. ते नुसते वर वरचे असते.

पण असेच शब्द जर तुम्हाला तुमच्या आईकडून किंवा बहिणीकडून, किंवा जवळच्या मित्राकडून आले तर त्यात काही तरंग असतात. तर आपण त्या तरंगाच्या द्वारे आपल्या भावना जास्त चांगल्या पोहोचवतो.

कुणी दोन तासं उभे राहून प्रेमाबद्दल भाषण देऊ शकेल पण एखादे बाळ किंवा कुत्रा आपल्या तरंगागामधून जे पोहोचवेल ते त्या भाषणातून पोहोचणार नाही.

जिथे लोक अगदी निराश आहेत तिथे तुम्हाला दिसेल की काही कारण नसताना तुम्हालाही उगाचच निराश वाटू लागेल. त्याचं प्रमाणे अशा एखाद्या ठिकाणी गेलात जिथे लोक अगदी आनंदी आहेत तर तिथे तुम्हालाही आनंदी वाटायला लागेल.

सर्व जग हे केवळ तरंग आहेत. लहरी आणि केवळ लहरी.

आपले मन तरंग आहे आपले शरीर तरंग आहे, विचार तरंग आहेत, भावना तरंग आहेत. पण त्या तरंगांना, सकारात्मकतेला सुधारण्यासाठी आपण काहीही करत नाही. हो की नाही ? 

ज्याच्यामुळे तुमचे तरंग अगदी आनंदी, सकारात्मक आणि शांतीपूर्ण होतील असे ते काहीतरी म्हणजेच ध्यान.

प्राणायाम आणि ध्यान यामुळे हे अगदी झटकन होते. सहसा ध्यान म्हटले की तुम्हाला वाटते की त्यासाठी कुठे तरी माचू पिचुला किंवा हिमालयात जावे लागते पण तसे नाहिये. तुम्ही त्याचा अनुभव तुमच्या स्वत:च्या घरातच घेऊ शकता.

आणि ध्यानाचे फायदे काय आहेत ? आपण ते कशाला करायचे ? जसे मी म्ह्टले की त्याने आपले तरंग सकारात्मक होतात.

कधी कधी तुम्ही एखाद्याला भेटता आणि तुम्हाला त्याच्यापासून दूर निघून जावेसे वाटते, तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलावेसेही वाटत नाही. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय कां ? आणि कधी कधी असेही लोक असतात की त्यांना भेटल्यावर तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. त्यांच्याशी संबध ठेवावेसे वाटते. हेही पुन्हा तरंगाच.

तसेच तुमच्या मनात काही विचार येतात आणि ते अगदी बरोबर असतात. आणि कधी कधी तुमच्या मनात असे विचार येतात की जे अगदी चुकीचे असतात. असे होते नां ?

तर हे म्हणजे आपल्याच चेतनेला जाणून न घेता अंधारात चाचपडत राहिल्या सारखे आहे. तुम्ही जर चेतनेला जाणले तर बऱ्याच गोष्टी घडतात आणि तुमचे आयुष्य जास्त आनंदी होते. आपले स्वास्थ्य सुधारते, लोकांशी असलेले संबंध सुधारतात.तुम्ही ऐकले असेल की तुरुंगातल्या लोकांच्या हिंसक वृत्ती कशा कमी होतात.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होतात. चार प्रकारचे लोक असतात. काही लोकांना इच्छा असतात. ते इच्छा करत राहतात पण त्या कधीच पूर्ण होत नाहीत. काही लोक असे असतात की जे इच्छा करतात आणि त्या साठी ते भरपूर मेहनत घेतात आणि बऱ्याच काळानंतर त्या पूर्ण होतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असे असतात की ते इच्छा करतात आणि फारसे कष्ट न करताच त्या पूर्ण होतात. आणि चौथ्या प्रकारचे लोक असे असतात की ज्यांना इच्छा करावी पण लागत नाही, गोष्टी आपोआपच झालेल्या असतात. तर तुम्हाला कोणत्या प्रकारात राहायचे आहे ? चौथ्या नां ? होय. ते सर्वात नशीबवान असतात . हे म्हणजे असे आहे की तुम्हाला अजून तहान लागलेलीही नाही आणि पाणी तयार आहे.

भारतात एक म्हण आहे की,” दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत.” बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती असते. ते संपूर्ण आयुष्यभर इतकी मेहनत घेतात , खूप पैसे कमावतात, बँकेत ठेवतात आणि मरून जातात. आणि आई वडिलांनी कमावलेल्या त्या पैशांसाठी मुले भांडत बसतात. जगातील ७० टक्के न्यायालयीन खटले हे वारसा हक्कावरून असतात. बघा, कोणीही स्वत: कमावलेल्या पैशांसाठी भांडत नाहीत. तुम्ही काय केले ? तुम्ही पैसा कमावला, तो बँकेत ठेवला आणि मुलांना एकमेकात भांडण्यासाठी तो ठेवून दिला. हे हुशारीचे काम आहे कां ?

आपण आपले अर्धे आरोग्य पैसे कमावण्यात घालवतो आणि मग अर्धी संपत्ती आरोग्य परत मिळवण्यासाठी खर्ची घालतो. हे काही तितकेसे हुशारीचे नाही. आर्थिकदृष्ट्या योग्यही नाही.

आपल्याला हे बघायला हवे की आयुष्य कुठे चालले आहे ?

एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे. एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता. त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला. तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे . तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे ? “ तर तो म्हणतो, “ मला माहित नाही. गाढवाला विचारा.”

बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे ? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.

बघा जेव्हा मनात कडवटपणा असेल तेव्हा तुम्हाला जगात कुठेही आनंद मिळणार नाही. जेव्हा मनात गोडवा असेल तेव्हा तुम्हाला सगळीकडेच गोडवा दिसतो.

तर ध्यान म्हणजे आपल्यातलाच खोलवर दडलेला गोडवा शोधणे. आणि जेव्हा तुम्हाला तो मिळतो तेव्हा तुम्हाला काय करायचे असते माहित आहे ? तुम्हाला तो सर्वांना द्यायचा असतो.

लोक मला विचारतात की तुम्हाला स्फूर्ती कशी मिळते आणि तुम्हाला यातून काय मिळते ? तुम्ही जगभर सारखे कां फिरत असता ? मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, “ तुम्ही जर एखादा चांगला सिनेमा बघितला तर तुम्ही काय करता ? तुम्ही तुमच्या खोलीत गपचूप बसून रहाता कां ? की तुम्ही फोन उचलून तुमच्या मित्रांना फोन करून सांगाता की “ अरे, मस्त सिनेमा आहे, तुम्ही बघायलाच पाहिजे. “ तर असे करण्याने तुम्हाला काय मिळते ? त्या सिनेमाचे निर्माते तुम्हाला काही पैसे देतात कां ? ते सगळे फोन करून तुम्हाला काय मिळते ? तुम्ही तसे करता कारण सर्वांना वाटणे हा आनंदाचा स्वभाव आहे.

आनंदाचा स्वभाव सर्वांना देण्याचा आहे.

आनंदाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे हिसकावून घेण्यातला आनंद लहानपणी अशी वृत्ती उपजतच होती.जर इथे तुम्ही एखाद्या मुलाला सोडले तर तो फुलच घेईल, चादरच खेचेल, खुर्चीच ओढेल , सगळे उलटे पालते करेल आणि वस्तू धरून ठेवेल. तो काहीही धरून ठेवेल. अगदी चाकूही धरेल. नकळत त्याच्या हाताला लागू शकते. मूल चाकू धरेल पण आया चाणाक्ष असतात. त्या मुलाला दुसरे काही तरी देऊन त्याचा सुरीवरचा हात सैल करतील . हो की नाही ? अशी नुकसानकारक गोष्ट मुलांनी घेतली तर तुम्ही त्यांना दुसरे काही तरी देता. 

तर, काही तरी मिळण्यातला आनंद, हा एक प्रकारचा आनंद आहे जो पोरकट आनंद आहे. दुसऱ्या प्रकारचा एक आनंद आहे तो म्हणजे देण्यातला आनंद.

इथे हजर असलेल्या स्त्रियांनो, जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा मुले घरी येणार असतील, तेव्हा तुम्ही काय करता ? तुम्ही तऱ्हे तऱ्हेचे पदार्थ बनवता आणि ते छान सजवून टेबलावर ठेवता. आई म्हणून तुमचा आनंद देण्यात असतो.हो की नाही ?

आजी आजोबांचे बघा, त्यांनाही नातवंडानां सतत काही तरी देण्यात आनंद वाटतो. हो नां ? देण्यात आनंद असतो आणि हा सर्वात जास्त प्रगल्भ असा आनंद आहे.

आपण देण्यातला आनंद घेतल्याशिवाय फक्त घेण्यातला आनंद घेत आयुष्य जगू शकत नाही. एकदा कां तुम्ही देण्यातला आनंद घेतला की मग तुम्हाला जीवनात काही अर्थ वाटू लागतो समाधान वाटू लागते.

त्यामुळे हसत रहा ! तुम्हला माहितीये, लहान बाळ दिवसातून ४०० वेळा हसते, तरुण लोक फक्त १७ वेळा हसतात आणि प्रौढ क्वचितच हसतात. आणि जर तुम्ही मोठे अधिकारी किवा राजकीय नेते वगैरे झालात तर तुम्ही हसायचेच विसरता. तुमचे हसू नाहीसेच होते, हवेत विरून जाते.

हसणे म्हणजे कृत्रिम हसणे नाही, ते आतून आले पाहिजे. आणि जेव्हा तणाव पूर्णपणे निघून जाईल , जेव्हा आपण ध्यानात खोलवर जाऊ तेव्हाच हे शक्य होईल. जर कुणी म्हणाले की, “मी ध्यान करतोय”, याचा अर्थ ते जास्त हसू शकतात. पवित्रता संवेदनशीलाता ,समज, अध्यात्मिकता खूप आहे.

अध्यात्मिकता म्हणजे संवेदनशीलता,समाज,गोडवा,स्मीत हे सगळं एकत्र.

प्रश्न: जर मला बाहेरून तणाव कारणीभूत होत असेल तर काय करावे ? जर माझ्या नियंत्रणा पलीकडचे काही घडत असेल तर काय ? तर मी शांती कशी आणावी ?

श्री श्री : त्यासाठीच आपण लोकांना हे शिकवायला हवे की त्यांच्या तणावावर नियंत्रण कसे करायचे. जर घरातल्या एकाला बरे वाटत नसेल तर त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांवर होतो की नाही ? हो, नक्कीच होतो. तसेच समाजात मानसिक दृष्ट्या आजारी असलेले काही जण असतील तर समाजात गुन्हेगारी वाढते.

तुरुंगात असलेले काही जण म्हणताहेत की, “ आता आम्हाला हिंसेमध्ये रहायचे नाहिये.” पण बाहेर अजूनही कितीतरी आहेत जे समाजात त्रासदायक ठरत आहेत.आणि त्यासाठीच लोकांना हे अध्यात्मिक शिक्षण देण्याची गरज आहे.

आपण लोकांना हे शिकविण्याची गरज आहे की शांत कसे राहायचे, नकारात्मक भावनांना कसे हाताळायचे आणि मनाला कसे सावरायचे. कारण मनाला कसे सावरायचे हे ना घरात शिकवले जाते ना शाळेत शिकवले जाते. त्यामुळे राग, द्वेष,तिरस्कार हे सगळ असतं आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यां भावनांसोबत जगत असता त्यावेळी आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया होते. त्यां भावनांना कसे घालवायचे ते तुम्हाला समजत नाही. त्यांना तुम्ही धरून ठेवता आणि त्याप्रमाणे तुमचे वागणे असते. आणि मग तशा वागण्याचा तुम्हाला पश्चाताप होतो. हीच समस्या आहे. ही साधना आणि हा विवेक हाच त्यावर उपाय आहे.