जगाला प्रकाश दाखवा

14
2013
Mar
बंगलोर, भारत
सत्संगमध्ये बसून अंतर्मुख होणे महत्वाचे आहे.

(प्रेक्षक :जाऊ नका)

असे म्हणू नका. कितीतरी कार्यक्रम ठरलेले आहेत आणि लोक माझी वाट बघताहेत. मला कुणाला नाराज करायला आवडत नाही. आजही मी म्हटलं, की मी काही वेळ तरी सत्संगमध्ये येतो, मी इतक्या सगळ्या लोकांना नाराज नाही करणार.

म्हणूनच मी माझी फ्लाईटदेखील थोडी उशिरा केली.म्हणजे मला दहा मिनिटं तरी तुमच्याबरोबर राहता येईल.

साधना सेवा आणि सत्संग करत रहा आणि आपण जगात लोकांना ज्ञानाचा प्रकाश जास्तीत जास्त कसा देऊ शकू याचा विचार करा. बघा, असेही आपण आणखी ४०,५० वर्षेच या जगात रहाणार आहोत. त्यामुळे जीवानाला काहीतरी दिशा असायला हवी. ‘आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे’, याचा विचार करायला हवा.

खाणे,झोपणे, विचार करणे, वर्तमानपत्र वाचणे, टीव्ही पाहणे याच्याशिवाय आणखी जास्त काहीतरी करायला हवे. आणि हे ‘आणखी जास्त काहीतरी’ म्हणजे आपण काय करू शकू ? लोकाना ज्ञान देऊ शकू, लोकांना आनंदी करू शकू. आणि त्यांना जास्त आनंदी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना ज्ञानमार्गावर आणणे.

जर कुणी दु:खी असेल तर त्याचा अर्थ त्यांनी ज्ञान घेतले नाही किंवा स्वीकारलेले नाही, त्यांनी ज्ञान पचवलेले नाही आणि त्यामुळे ते दु:खी आहेत.

मग तुम्ही म्हणाल की, ‘ गुरुदेव, काही लोकांकडे पाणी नाही, अन्न नाही आणि ते त्रास त्रासात आहेत म्हणून दु:खी आहेत, तर ते आनंदी कसे होतील ? ‘

तर ही वेगळी गोष्ट आहे, वेगळी बाब आहे. होय, त्रास सहन करावा लागणे वेगळी गोष्ट आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो, दुष्काळ किंवा पूर यामुळे त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही सेवा करायला हवी. आणि तेही ज्ञानात राहून सेवा केलेली जास्त चांगली. जीवनात संकटे येतात पण त्यां संकटांवर मात करण्यासाठी बळ असायला हवे आणि हे बळ केवळ आध्यात्मिक ज्ञानातून येते.

बघा, दक्षिण अमेरिकेत एखादे फुलपाखरू फडफडले तर त्याचा परिणाम चीनमधल्या ढगांवर होऊ शकतो.याचा अर्थ संपूर्ण सृष्टीचे जाळे विणलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर छोटीशी पूजा मनोभावे केलीत तर त्यामुळे वातावरणात काही सुंदर आणि सकारात्मक तरंग निर्माण होतात आणि त्याचा अंतराळावर नक्कीच परिणाम होतो.

गुरुपूजेमुळे चांगला परिणाम होतो असे कुणाकुणाला दिसून आले आहे ? गुरुपूजेचे मंत्र नुसते म्हटल्यानेही फरक पडतो. नुकतेच कुणीतरी मला लिहून कळवले होते की कुणीतरी दवाखान्यात होते आणि गुरुपूजा मंत्र म्हटल्याने त्यांना बरे वाटले. एक मुलगा सतत रडत होता, गुरुपूजेचे मंत्र म्हटल्याने तो मुलगा शांत झाला.

तर बरे होण्याचे असे बरेच अनुभव आहेत आणि यात काहीच आश्चर्य नाही.हे असेच व्हायला हवे आणि ते होते. हे अगदी साहजिक आहे. जर असे झाले नाही तरच ती आश्चर्याची गोष्ट असेल.

तर जीवनाला काहीतरी दिशा असायला हवी. आणि ती दिशा म्हणजे ‘आपण हे प्राचीन ज्ञान सर्वांपर्यंत कसे पोहोचवू शकू ?’ हे प्राचीन ज्ञान असेही पुढे चालत राहिले आहे. आपण आपल्या आयुष्यात हा कसा पुढे नेणार आहोत, जेणे करून हा अनंत काळापासून असलेला ओघ अनंत काळापर्यंत चालू कसा राहील याचा विचार करायला हवा. आपली शक्ती या दिशेने वापरायला हवी.
09
2013
Feb
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव, आज मदिरापान हा आध्यात्मिक जीवनासाठी तसेच सुरक्षित समाजासाठी एक मोठा प्रश्न होऊन बसला आहे. परंतु मागील दोन दिवसांच्या व्यावसायिक संस्कृती आणि आध्यात्मिकता परिषदेत या विषयी कोणीच काही बोलले नाही. कृपया आम्हाला मार्गदर्शन करा.

श्री श्री : आम्ही लोकांना सांगतो कि आमच्यापाशी अधिक नशील्या गोष्टी आहेत जसे कि ध्यान, गायन आणि सेवा. हे जास्त नशीले असून तुम्हाला अधिक उंचीवर घेऊन जातात. लोकांना हा मद्याचा प्रकार माहित नाही असे दिसते.

लोकांची सेवा करण्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघणे हा आनंद वेगळाच असतो याची लोकांना कल्पना नाही. ध्यानात आनंद असतो, खूप खोलवर शांती आणि खूप खोलवरची सुविधा या बाबतीत लोकांना काही कल्पना नसते. आपण लोकांना याची जाणीव करून द्यायची गरज आहे म्हणजे ते मदिरेच्या बाटल्या फेकून देतील.

प्रश्न: गुरुदेव, मुठभर ब्रिटिशांनी अध्यात्मात अग्रेसर असलेल्या भारतावर अनेक वर्ष राज्य कसे केले ? यातून काही शिकण्यासारखे आहे काय?

श्री श्री : बरे तर तुम्हाला त्याचे आश्चर्य वाटू शकते! भारताचे एक वैशिष्ट्य असे होते कि येथे लोकांमध्ये कधीच एकी नव्हती.

एकदा मी युरोपला गेलो असतांना तेथील एका पत्रकाराने असे विचारले कि” गुरुदेव, साधारणपणे असे दिसते कि इतर कोणापेक्षा भारतीय पत्रकार हे भारतावर सर्वाधिक टीका करीत असतात, हे कसे?”

मी त्यांना म्हणालो कि “ हि तर आमची खासियत आहे कि आम्ही नेहमी एकमेकांशी भांडत असतो.”

अनेक राज्यांमधील एकमेकांतील कलह आणि स्वार्थी राजे यांच्यामुळे हि आपत्ती ओढवली. पण एका अर्थी जे झाले ते बरे झाले कारण कि ब्रिटिशांनी भारतीय वसाहतींसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक बाजूकडे पहायला शिकले पाहिजे. अर्थातच भारतातील ब्रिटीश राज्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी होत्या पण तुम्ही त्यातील सकारात्मक गोष्टी पण पहा. नाहीतर आज आपण इंग्रजी बोलू शकलो नसतो आणि भारताने संगणक कधी बघितलाच नसता. मग आपली परिस्थिती चीन सारखी झाली असती. मग आपली प्रत्येकाची स्वतंत्र भाषा असती, ६०० बोली भाषा, २४ भाषा आणि मग भारताचे खरोखर विभाजन झाले असते.

कसेही असले तरी आज इंग्रजी हि एक सर्वसाधारण वापरातील भाषा झाली आहे आणि त्यामुळे आपण सर्व जगाशी संपर्क ठेवू शकतो. म्हणजे त्यात काही फायदे आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत.

साहजिकच काही वाईट गोष्टी पण आहेत. आज वापरात असलेले अनेक कायदे हे कालबाह्य झालेले आहेत. तुमच्या सारख्या तरुण लोकांनी पुढे येऊन हे सर्व कायदे बदलायला पाहिजेत.

काही महिलांनी पुढे येऊन त्या दृष्टीने पाऊले टाकून सर्व लगाम आपल्या हाती घेऊन काही कायदे बदलायला सुरवात केली आहे. मला खात्री आहे कि ते नक्की तसे होईल.

प्रश्न: गुरुदेव, एक गोष्ट माझ्या लक्षात येत आहे ती अशी कि आपल्या देशात जरी शिक्षित पदवीधर तयार होत आहेत तरी त्यांना उद्योग धंद्यात येताना प्रशिक्षण द्यावे लागते. तुमच्या विद्यापीठाच्या सहयोगाने आम्ही त्यांना आमच्या उद्योगासाठी आवश्यक असे प्रशिस्कन देऊ शकतो काय?

श्री श्री : नक्कीच आपण अशी कौशल्य केंद्र सुरु करू शकतो. तुम्ही कुलगुरू डॉ.मिश्रा (ओरिसातील श्री श्री विद्यापीठाचे) आणि इतर सदस्यांशी या विषयावर बोलू शकता, ते सर्व आज येथे उपस्थित आहेत. आपण नीट विचार करून विद्यार्थ्यांसाठी नवीन पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम तयार करू शकू.

पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडील उत्तम असे मी विद्यार्थ्यांना देई इच्छितो.

आज सीमा रेषांना फारसे महत्व नाहीये, खरेतर सीमारेषा या नाहीशा झाल्या आहेत. आज आपण एका जागतिक समाजात राहत आहोत आणि येणारी पिढीसमोर अशा एकत्रित जगाची जागतिक दृष्टी असणे आवश्यक आहे.’माझा देश’ ‘आपला देश’ या संकल्पना आता विसरायला पाहिजेत. एकसंध जागतिक समाज ज्या मध्ये काहीच अंतर असणार नाही अशा दिशने आपण वाटचाल करीत आहोत.

 असे पहा कि काल येथे एक परिषद झाली, पण त्यात इंटरनेटचा वापर करून ९० देश सहभागी झाले होते. जगातील अनेक देशातील लोक ते वेबकास्टच्यामदतीने पहात होते. आपण ज्ञान आणि शहाणपणा याच्या एका नवीन युगाकडे वाटचाल करीत आहोत. म्हणून आपण आपले मन यासाठी तरी केले पाहिजे. आणि म्हणून मी पूर्व आणि पश्चिम यातील सर्वोत्तम हे विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो मग ते या जागतिक नागरिक होऊन ते राहत असलेल्या देशाची सेवा करतील.

प्रश्न: गुरुदेव, उत्कृष्टता न साधल्यामुळे मी नेहमी असमाधानी राहतो. उत्कृष्टता न साधता समाधानी राहता येते काय? ते कसे, याचे कृपया मार्गदर्शन करा.

श्री श्री : जर निराशा हि उत्कृष्टतेची जननी असती तर आज असे अनेक देश आहेत कि जे नैराश्याने ग्रासलेले आहेत आणि आपल्याला तेथे उत्कृष्टता दिसत नाही.

लोक असे म्हणतात कि ‘ समाधान तुम्हाला सुस्त आणि निष्क्रीय बनविते’.जर निराशेतून रचनात्मकता येत असेल तर लेबेनन, अफगाणिस्तान आणि त्यासारखे अनेक देश आज रचनात्मक कार्यात पुढे गेलेले दिसले असते. पण ते तसे नाहीये, होय कि नाही?

म्हणून समाधान हि एक गोष्ट आहे आणि रचनात्मकता हि दुसरी वेगळी गोष्ट बाब आहे. तुम्ही जेंव्हा अगदी शांत , बिलकुल निर्मल असता तेंव्हा आतमध्ये खोलवरून रचनात्मकतेचे अंकुर फुटायला सुरवात होते.

प्रश्न: गुरुदेव, फारसे कष्ट न करता मी खूपसारा पैसा कसा मिळवू शकतो? त्यासाठी काही मंत्र आहे काय?

श्री श्री : असेच तर घोटाळे सुरु होतात (हास्य).

तुम्ही या सर्व घोटाळ्याविषयी ऐकले असेलच, होय कि नाही? एका पाठोपाठ एक असे प्रत्येक महिन्यात ते बाहेर येत आहेत.

नाही, झटपट पैसे मिळवायच्या नादी लागू नका कारण मागते तसेच झटपट नाहीसे होतात.निरंतर अर्थव्यवस्था हि चांगली असते. तुमची नैतिक मूल्ये चागली असतील तर तुम्ही म्हणाल कि ‘ मी खूप पैसा मिळवणार आहे पण तो नैतिक मार्गाने आणि अनैतिक पणे काहीही मिळवणार नाही.

मागील शतकात लोक वाईट कर्मांपासून लांब राहायचे,कारण मग देव दुखी होईल. देवाची भीती किंवा वाईट कर्मांची भीती त्यांना अनैतिक कामांपासून दूर ठेवीत असे.

लोक असे म्हणायचे ‘ ते पाप आहे, मी ते पैसे घेणार नाही’. ते असे का म्हणायचे ते तुम्हाला माहित आहे? कारण लोकांचा असा दृढविश्वास होता कि वाईट मार्गाने मिळविलेला पैसा खर्च करून त्यांना आनंद मिळणार नाही. ते असे म्हणत कि ‘ त्यामुळे मी जास्ती दुर्दैवी होईन’. हा असा दृढ विश्वास त्यांना होता. खरे तर लोक असे म्हणायचे कि अनैतिक मार्गाने मिळविलेला पैसा हा इस्पितळे आणि कोर्ट यातच खर्च होतो.

अशी एक टोचणी कायम असायची, आज ती दिसत नाहीये.

ते म्हणतात कि ‘जेंव्हा आम्ही निगमित सामाजिक जबाबदारी चे काम करतो तेंव्हा आम्हाला त्याचा कितीतरी अधिक प्रमाणात परतावा मिळणार आहे.’

अशी निगमित सामाजिक जबाबदारी हि एक गुंतवणूक मानली जायची तर अनैतिक मार्गाने मिळविलेला पैसा हि एक शिक्षा मानली जायची. आज हि सर्व नैतिक मूल्ये हरवली आहेत म्हणून आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा बघायची गरज आहे.

प्रश्न: गुरुदेव, आज कोठल्याही क्षेत्रात मग ते निगमित असो किंवा सामाजिक असो, चांगले / वाईट समजणे खूप अवघड झाले आहे. आता निगमित सामाजिक जबाबदारी हि निगमित क्षेत्रात अनिवार्य केल्यामुळे काम करण्यासाठी चांगली बिगर सरकारी संस्था कशी ओळखावी?

श्री श्री : ती बिगर सरकारी संस्था पारदर्शी व्यवहार करतेय का आणि त्यांच्यात काही धार्मिक पूर्वग्रह आहेत काय हे बघणे महत्वाचे आहे.

काही लोक निगमित सामाजिक जबाबदारी म्हणून काम करीत असतात पण त्यांचे उदेश वेगळे असतात. ते लोकांना एका धर्मातून दुसऱ्या धर्मात परिवर्तीत करू इच्छितात , किंवा एका विचारसरणी मधून दुसऱ्या विचारसरणीत परिवर्तीत करू इच्छितात किंवा मग एक गठ्ठा मत विभागणीत बदल करू इच्छितात. खरेतर हे टाळले पाहिजे कारण हे काही परोपकार नव्हे तर परोपकाराच्या नावाखाली चालणारा धंदा होय. यासाठी लोकांचे इरादे चांगले असले पाहिजेत, त्यांचे मन स्वच्छ आणि शुद्ध असायला पाहिजे.

अशा अनेक बिगर सरकारी संस्था आहेत कि ज्याचे उद्धिष्ट हे लोकांना आनंदी करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे हे आहे. त्यांचे इरादे चांगले आहेत काय, त्यांचे ताळेबंद बरोबर आहेत काय , पैसे खर्च करण्यात ते पारदर्शी आहेत काय आणि त्यांचे प्रशासनिक खर्च मर्यादित आहेत काय हे पण पहा. त्यांचे प्रशासनिक खर्च जास्त असता कामा नयेत. काही वेळ प्रशासनिक खर्च जास्त असल्याने लाभार्थींना फार कमी फायदा मिळतो.

बऱ्याच बिगर सरकारी संस्था सुमारे ४०% ते ५०% हे प्रशासकीय खर्च करतात. हे अपेक्षित नाही. प्रशासकीय खर्च ५% ते १०% पर्यंत मर्यादित ठेवायला पाहिजेत, फार फार तर १५%. हे सर्व बघा आणि कोण लोक त्या संस्थेत काम करीत आहेत ते बघा, त्यांची मदत घ्या.

प्रश्न: गुरुदेव, माझे वडील म्हणतात कि मी कधी तणावाखाली नसतो पण मी दुसऱ्यांसाठी तणावाची परिस्थिती निर्माण करतो. मला असे म्हणायचे आहे मी जर त्यांना तणाव देत असेल तर ते तो का घेतात? इतरांनी त्यांची तणावाची परिस्थिती त्यांच्या काबूत ठेवू नये काय?

श्री श्री : त्याकडे बघण्याचा तो एक दुसरा दृष्टीकोन पण आहे.

काही लोक म्हणतात कि ‘ मी येथे फक्त तुमचे धैर्य बघायला आलो आहे. देवाने मला सर्वांचे धैर्य बघायला पाठविले आहे.

एक जुनी म्हणा अशी आहे कि ‘ कोणी दुसरा तुम्हाला समस्या किंवा सुविधा देत नाही तर समस्या आणि सुविधा हे तुमच्या मनाचे खेळ आहेत’.

आपण कोठे सुविधापूर्ण राहायचे किंवा कोठे अभागी राहायचे हा सर्वस्वी आपला निर्णय आहे.

प्रश्न: गुरुदेव, अशी एक प्राचीन म्हण आहे कि ‘जेंव्हा तुम्ही गुरूच्या सानिध्यात येता तेंव्हा तुमच्यातील कौशल्ये वृद्धिंगत होतात. हे खरे आहे काय? कारण येथे आश्रमातील हत्तीला मी तोंडाने बाजा वाजविताना बघितले.

श्री श्री : होय, हे असे होताना दिसत आहे.

ज्यांना कधी संगीताचा गंध नव्हता ते गायला लागले आहेत. अनेकजण कविता करायला लागले आहेत. मला आजूबाजूला अनेक रचनात्मक गोष्टी नजरेस पडू लागल्या आहेत. असे वाटते कि ते ती प्राचीन म्हण खरी असल्याचे सिद्ध करीत आहेत!

असे पहा कि जेंव्हा तुमचे मन मूक आणि शांत असते, जेंव्हा तुम्ही ध्यान करता, जेंव्हा तुम्ही आतून आनंदी असता, तेंव्हा रचनात्मकता हि आपोआप फुलायला लागते. हे अगदी साहजिक आहे आणि ते जर तसे झाले नाही तरच नवल आहे.

प्रश्न: गुरुदेव, हल्ली सर्वजण द्वेषपूर्ण भाषण करतात त्यामुळे लोकांच्या मनात खळबळ निर्माण होते आणि मग त्यांना अटक होते. कोणताही राजकीय पुढारी प्रेमाने बोलत नाही. आम्ही काय करावे?

श्री श्री : आता, सर्व-प्रथम तुम्ही येथे सर्वजण असा जो शब्दप्रयोग केलात तो मागे घ्या.

सर्व जण असे करीत नाहीयेत. काही लोक असे करीत आहेत ते फार तर एक किंवा दोन असतील. ते असे करतात कारण असे केल्याने ते माध्यमांच्या दृष्टीला पडतात. त्यांची द्वेषपूर्ण भाषणे हि माध्यमे प्रदर्शित करतात. त्यांना माध्यमांच्या दृष्टीला पडायचे असते म्हणून ते असे करतात. आणि मग अटक झाल्यावर त्यांच्या समाजात त्यांना नायक म्हणून मान मिळतो. यात आपण काय करू शकतो? त्यांचा सकारात्मक प्रचार होत नाही म्हणून मग ते नकारात्मक प्रचार निवडतात. असा नकारात्मक प्रचार होण्यासाठी मग ते कोणाविरुद्ध गरळ ओकतात किंवा कोठेतरी द्वेषपूर्ण भाषणे करतात.

आश्चर्य असे वाटते कि अशा भाषणाला अनेक लोक टाळ्या वाजवितात कारण त्यांच्यासाठी ते फारच रोमांचकारी असते.

गोड बोलणे आणि चांगल्या प्रेम कथा लोकांना हितकारक वाटत नाही. ‘सर्व जण या आपण त्याला एक ठोसा मारु’ असे म्हटले कि लोकात जोश येतो.

याला जमावाचे मनोविज्ञान म्हणतात. जमावाला जगात नेहमी विघातक गोष्टीत जास्त रुची असते.जमाव कधीच विधायक गोष्टी करीत नाही तर तो नेहमी विघातक गोष्टी करताना दिसतो.

अर्थात काही वेळा विघातक गोष्टींची पण आवश्यकता असते जसे कि स्वातंत्राची चळवळ जी ब्रिटीश राजवटीविरुद्ध सुरु केली होती. तेंव्हा पण जमाव एकत्र आला होता पण शांततापूर्ण मार्गाने. आणि हे कसे झाले ? कारण त्यांचे पुढारी हे एक आध्यात्मिक पुरुष होते-महात्मा गांधी. ते पण आपल्याप्रमाणे सत्संग करीत असत. प्रत्येक दिवशी भजन, ध्यान आणि देशापुढील आणि जगासमोरील प्रश्नावर चर्चा होत असे.

त्यावेळच्या सत्ताधार्यांना खिळखिळे करण्यासाठीची ती एक रक्त-हीन, हिंसा-हीन चळवळ होती. जगाच्या इतिहासातील ती एक अद्वितीय अशी चळवळ होती जेथे कि जमाव एकत्र झाला तरी त्यांनी कोणाचे नुकसान केले नाही, कोणाला वेदना दिल्या नाहीत किंवा कोणाला पीडा दिली नाही.

असाच जमाव सध्या जगात एकत्र येताना दिसत आहे.अरब जगात काय होत आहे पाहिलेत? लोक एकमेकांचे प्राण घेत आहेत आणि सगळीकडे दुख व्यापून राहिले आहे.

मी एक वेगळेच स्वप्न बघत आहे. मला लोकांनी रचनात्मक कल्पना आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी एकत्र यावे असे वाटते. अशाच एका क्रांतीचे बीज ३ फेब्रूवारीला दिल्ली येथे पेरण्यात आले तेंव्हा भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातील लोकांपेक्षा तिप्पट जास्त लोक जमले होते. त्या जमावाने काही विधायक करण्याची शपथ घेतली. चिंतीत सरकारने मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आत येताना आणि बाहेर जाताना प्रत्येकाची तपासणी केली जात होती आणि या प्रक्रियेला खूप वेळ लागत होता. परंतु तेथे कोणतेही दोषारोप , कोणतेही द्वेषपूर्ण भाषणे नव्हती तर ते सर्वजण काहीतरी विधायक करण्यासाठी जमले होते. 

आपल्या तरुणामध्ये खूप उर्जा आहे फक्त तो योग्य दिशेला वळवली पाहिजे.

तुम्ही कल्पना करू शकता काय कि कोणतीही साधने नसताना दिल्लीमध्ये २ महिन्यात सुमारे १००० प्रकल्प पूर्ण करण्यात आले. आर्ट ऑफ लिविंगने दत्तक घेतलेल्या १७ झोपडपट्ट्यात छोटे सुमारे १००० प्रकल्प पूर्ण करण्यात आले. आता ते स्वयंसेवक १०० झोपडपट्ट्यात काम करू लागले आहेत.

भारतात सध्या घोटाळे आणि झोपडपट्ट्या यांचे पेव फुटले आहे आणि आपल्याला काहीतरी विधायक करण्यासाठी अशा उत्साही लोकांची गरज आहे.

कुमाद्वती नावाची एक नदी आहे जी आता पूर्णपणे सुकून गेली आहे. म्हणून मग आमच्या काही स्वयंसेवकांनी तिचे उगमापासून , ती ज्या १२ तेहसील मधून जाते त्या सर्वाचे पुनरज्जीवन करण्याचे योजिले आहे. हा एक चांगले उपक्रम असून त्यामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जमिनीतील पाण्याचे स्तर खुप खाली जात आहे. काही वर्षांपूर्वी जे पाणी २० ते ३० फुटावर सापडायचे ते आता ६०० फुट खोल जाऊनसुद्धा मोठ्या मुश्किलीने सापडते! म्हणून हे स्वयंसेवक त्याचे आता पुनरज्जीवन करणार आहेत. ते आता पावसाच्या पाण्याचे साठवण करणार आहेत आनी नदीचे पुनरज्जीवन करण्यासाठी ते आवश्यक आहे. 

या कामासाठी काही कोटी रुपये खर्च झाले असते. पण लोक स्वतः पेट्रोल घालून, स्वतःच्या गाड्या घेऊन हे काम करीत आहेत. हा आनंद , हि सेवेची नशा काही औरच असते. 

त्याचप्रमाणे आमच्या दोन स्वयंसेवकांनी आज अशी घोषणा केली आहे ते एक नवीन प्रकल्प हाती घेत आहेत जेणेकरून सुमारे १००० शौचालये बांधली जातील.

प्रश्न: गुरुदेव, कृपया प्रश्न विचारण्याच्या कलेविषयी काही बोला कारण बऱ्याच वेळा मी मिळालेल्या उत्तराने समाधानी नसतो किंवा मी त्याने अधिक गोंधळून जातो.

श्री श्री : जेंव्हा मन बेचैन असते तेंव्हा काहीही उत्तर मिळाले तरी समाधान होत नाही. जेंव्हा मन शांत असते तेंव्हा उत्तरादाखल मिळालेली एखादे सूचक वाक्य पण पुरेसे असते कारण मग त्यावरून तुम्ही उत्तर काय असेल याचा अंदाज करू शकता कारण सर्व उत्तरे तुमच्या मनात असतात. जेंव्हा तुम्ही शांत असता तेंव्हा आपसूक ते उत्तर तुम्हाला सुचते. म्हणून काहीसा विश्राम आवश्यक असतो.

जेंव्हा तुम्ही एखाद्या बेचैन माणसाला काही जरी सांगितले तरी तो “पण” म्हणतो.तुम्ही जरी उत्तर दिले तरी तो म्हणेल कि “ ठीक आहे, पण.....” आणि मग ते विषय बदलत राहतील.

हि एका कल्पना आणि संकल्पाने मनाची खुण आहे जेंव्हा कोणताही नवीन विषयाला किंवा संकल्पनेला त्यात जागाच नसते.

एका गुरू शिष्यात अशीच एक गोष्ट घडली आहे.

एक शिष्य गुरुकडे आला आणि गुरूला काही प्रश्न विचारू लागला (तुमच्या आताच्या परिस्थिती सारखा). तो एका पाठोपाठ प्रश्न विचारीत होता पण गुरूच्या उत्तराने त्याचे समाधान होत नव्हते. म्हणून मग गुरू त्याला म्हणाले कि “चल, आपण चहा घेऊयात”

गुरूने त्याला विचारले कि “तुला चहा आवडतो का?

तो म्हणाला “होय”

मग गुरूने शिष्याच्या कपात चहा ओतायला सुरवात केली. कप भरला तरी ते चहा ओतत होते. कप भरून वाहताना तो चहा टेबल आणि जाजमावर सांडला.

त्या शिष्याने विचारले” गुरुजी तुम्ही हे काय करीत आहात? कप पूर्ण भरला आहे आणि चहा खाली जाजमावर सांडतोय!

यावर गुरू हसले आणि म्हणाले “ तुझी अगदी अशीच स्थिती झाली आहे. तुझा कप पूर्ण भरला आहे, त्यात आता बिलकुल जागा नाही तरीसुद्धा तुला अजून हवा आहे. पहिल्याने कपात आहे ते पिऊन तो रिकामा कर.”

पूर्वीच्या ऋषींनी वेदात हेच सांगितले आहे ‘श्रवण’, प्रथम ऐका आणि मग ‘मनन’ नंतर त्यावर विचार करा. उत्तर ऐकून ते समजावून घ्या आणि ते आत्मसात करा. त्याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कोणी काही सांगितले तर त्यावर तसाच विश्वास ठेऊ नका. हि एक मुलभूत गोष्ट सर्वांनी विचारात घ्यायला पाहिजे. माझा अनुभव हा माझा अनुभव आहे आणि तुमचा अनुभव हा तुमचा अनुभव आहे. एखादी गोष्ट मी सांगितली आहे म्हणून त्यावर चटकन विश्वास ठेऊ नका.त्याचप्रमाणे कोणी काही सांगितले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, तुम्ही एक चांगला श्रोता व्हा. प्रथम ऐका, नंतर त्यावर विचार करा. त्याचा अनुभव घ्या मगच ते आकलन होते. ज्ञान हे मग शहाणपण बनते.- श्रवण, मनन आणि निजध्यास.

अर्जुनाला ७०० श्लोकांची गीता सांगितल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले’ हे बघ अर्जुना,मला सांगायचे ते मी सर्व सांगितले. त्यावर विचार कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर’.

वैचारिक स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, श्रद्धा आणि विश्वासाचे स्वातंत्र्य याची गरज आहे. तुम्ही एखादी गोष्ट सर्वांवर लादू शकत नाही. विश्वास हा आतून तयार व्हायला लागतो.

प्रश्न: गुरुदेव, काम-वासना वाईट असते काय? आम्ही तिच्याकडे जितके दुर्लक्ष करतो तितकी ती अधिक दृढ होते.

श्री श्री : संयम! कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.

रिकाम्या वेळात काम-वासना जागृत होणे साहजिक आहे. जेंव्हा तुम्ही व्यस्त असता तेंव्हा ती तितकेसे डोके वर काढीत नाही. तुमची उर्जा तुम्ही रचनात्मक कामासाठी वापरता तेंव्हा तुम्ही जास्ती केंद्रित झाल्याचे जाणवेल.

प्रश्न: गुरुदेव, अध्यात्माच्या मार्गावर चालायला लागल्यापासून माझ्या कामात मी अक्षम होतो. या दोन्हीचे संतुलन कसे करावे?

श्री श्री : मग आध्यात्मिक मार्ग सोडा आणि कामाच्या ठिकाणी सक्षम व्हा.

जी गोष्ट तुम्हाला अक्षम बनवते ती कशाला करायची ? हा आध्यात्मिक मार्ग तुम्हाला सक्षम करण्यासाठी आहे. जर ती तुम्हाला अक्षम करीत असेल तर ती सोडून द्या. या आध्यात्मिक मार्गापासून दूर व्हा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून बघा तुम्हाला ते जमतेय का. तुमच्या विश्रामाला किंवा ध्यानाला अक्षमतेचा शिक्का मारू नका. तुम्ही म्हणताय ते होणे शक्य नाही असे मला वाटत आहे पण तुम्ही तसा प्रयोग करायला हरकत नाही.

हि तुमच्या आयुष्यातील शेवटची कृती असेल काय?

24
2013
Jan
बंगलोर, भारत
प्रश्न: गुरुदेव, असे म्हणतात कि आयुष्याच्या शेवटच्या घटकेला नारायणाचे ( भगवान विष्णू) नामस्मरण केल्याने मुक्ती लाभते. हे खरे आहे काय कि आयुष्याच्या शेवटच्या घटिका हि पुढील मार्गक्रमणासाठी सर्वात महत्वाची असते?

श्री श्री : होय, हे खरे आहे. मृत्यूच्या वेळी मन हे शरीरापासून वेगळे होते.म्हणून त्यावेळी मनात असणाऱ्या गोष्टी हे पुढील जन्माचे कारण होतात. हे शास्त्रीय सत्य आहे.

हे तुम्ही स्वतः पण अनुभवू शकता. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले तर असे लक्षात येईल कि रात्री झोपताना मनात असलेला शेवटचा विचार हाच सकाळी उठल्यावर मनात येणारा पहिला विचार असतो.

हल्ली मनात इतके विचार चालू असतात कि मृत्यूच्यावेळी देवाचे नामस्मरण करणे तुमच्या लक्षात राहणे अवघड आहे. म्हणून पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे कि सतत देवाचे नामस्मरण करीत रहा. रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करा, आंघोळ करताना, अगदी जेवणाच्या आधी सुद्धा देवाचे स्मरण करून जेवणासाठी अन्न दिल्याबद्धल त्याचे आभार माना.

कोणतीही नवीन गोष्ट सुरु करण्याआधी ती शुभप्रद होण्यासाठी देवाचे स्मरण करा.

आपले पूर्वज हे खूप बुद्धिमान होते म्हणून त्यांनी हि प्रथा सुरु केली.

म्हणून कोणी नवीन दुकान सुरु करताना आधी देवाचे नाव घेतो आणि मग ते दुकान सुरु करतात.जेंव्हा कोणी काही नवीन गोष्ट विकत घेतो तेंव्हा देवाचे स्मरण करून त्याचा वापर सुरु करतात.

आपण या सर्व गोष्टी करीत असतो, होय कि नाही? आजपण आपण या सर्व गोष्टी करीत असतो.

जेंव्हा तुम्ही परीक्षेला जाता तेंव्हा तुम्ही देवाचे स्मरण करून परीक्षेतील प्रश्न सोपे असण्याची आणि तुम्हाला सहजतेने त्याची उत्तरे लिहिता यावीत अशी प्रार्थना करता.

सर्वजण प्रार्थना करतात, मग ती लहान मुले असोत, प्रौढ असोत किंवा वयस्कर लोक असोत. पण ते तसे भीतीपोटी करतात. मी तर असे म्हणेन कि ती प्रार्थना भीतीपोटी न करता प्रेमापोटी किंवा खूप खोलवर असलेल्या कृतज्ञतेच्या भावनेपोटी असावी.

तुमची प्रार्थना जेंव्हा प्रेम आणि श्रद्धेपोटी असते तेंव्हाच ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते.

कोणतेही नवीन काम सुरु करण्याच्या आधी देवाचे नाव घेणे हे एवढे अवघड आहे काय? तुम्ही भजन करून तुम्हाला आवडेल अशा कोणत्याही पद्धतीने देवाचे नाव घेऊ शकता. तुम्ही नारायण म्हणू शकता, जय गुरुदेव किनवा अगदी ओम् नमः शिवाय पण म्हणू शकता. तुम्हाला आवडते ते नाव घेऊ शकता. नाहीतरी तुम्ही आंघोळ करताना किंवा अगदी जेवताना सुद्धा तुम्हाला हवी ती गाणी म्हणत असताच कि “डफलीवाले डफली बजा”. आता डफलीवाला डफली नाहीतर अजून काय वाजवणार ? हे काय गाणे झाले?

हल्ली मला वेळ मिळत नसल्यामुळे मला हल्लीची गाणी काही फारशी माहित नाहीत. पण मला खात्री आहे कि हल्लीच्या काळी पण अशी अर्थहीन गाणी तयार झाली असतील.

“कोलावेरी डे” असे शब्द असलेले एक गाणे हल्ली फार प्रसिद्ध झाले आहे.अनेक लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीये. तमिळ भाषेत “कोलावेरी डे “ चा अर्थ असा आहे “मला कोणालातरी मारून टाकावे असे वाटत आहे”.

आता तुम्हाला कोणाला तरी मारून टाकावे असे वाटते आहे हे काही चांगले गाणे आहे काय? म्हणून मी म्हणतो कि तुम्ही नाम स्मरण करा. ओम् नमः शिवाय किंवा ओंकार चा जप करा. ज्या मुळे तुमची भक्ती जागृत होईल असा कोणताही जप करा.

आता मी कोणत्याही गाण्याला कमी लेखत नाहीये. आता तुम्हाला जर कोलावेरी डे म्हणायचे असेल तर खुशाल म्हणा. पण अशी आकर्षक धून जर सारखी तुमच्या मनात घोळत राहिली तर त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो.

एका अर्थाने हे बरे आहे कि अनेक लोकांना या गाण्याचा अर्थ समजत नाही. त्यांना जर तो समजत असेल आणि त्यांनी जर अर्थ लक्षात घेऊन ते म्हटले तर फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ते गाणे एक दुसऱ्या भाषेतील आहे, ते तमिळमध्ये आहे.

तुम्हाला जेंव्हा भजनाचा अर्थ माहित असतो आणि जेंव्हा तुम्ही ते कृतज्ञता आणि भक्तीने म्हणता तेंव्हा त्याचा तुमच्या आयुष्यावर फार खोलवर परिणाम होतो.

प्रत्येक शब्दाची स्वतःची काही कंपने असतात आणि जेंव्हा आपण चांगले शब्द उच्चारतो तेंव्हा त्यातून निघणाऱ्या कंपनामध्ये तुमचे मन आणि आयुष्य शुद्ध करण्याची शक्ती असते.

जप करून आणि सकारात्मक बोलण्याने मन आणि शरीर दोन्ही सक्रीय होतात. म्हणून नेहमी नाम स्मरण करावे असे म्हणतात.

दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी नाम स्मरण करावे. मी या आधी म्हटल्याप्रमाणे दिवसातले प्रथम जेवण घेण्याआधी देवाचे नाव घेऊन स्मरण करावे.

जेवण सुरु करण्याच्या अगोदर “अन्नदाता सुखी भव” हा मंत्र म्हणावा. याचा अर्थ असा कि आम्हाला जो हे अन्न देतो तो सुखी आणि आनंदी व्हावा. हा आशीर्वाद अगदी मनापासून द्या.

हा मंत्र म्हटल्याने घरातील स्त्री जी तुम्हाला अन्न शिजवून वाढते ती सुखी आणि आनंदी व्हावी. त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत जो धान्य पोहोचवितो तो व्यापारी आणि शेवटी जो ते धान्य पिकवितो तो शेतकरी या सर्वांना तो आशीर्वाद पोहोचतो. हा मंत्र म्हणून तुम्ही त्याला पण आशीर्वाद देत असता. हि एक इतकी चांगली गोष्ट आहे!

त्याच प्रमाणे सकाळी उठल्यानंतर “ओम् नमो नारायणाय” किंवा “ओम् नमः शिवाय” म्हणा.

जेंव्हा काही वाईट गोष्ट होईल तेंव्हा “हे राम” म्हणा.

जेंव्हा कोणी मरण पावेल तेंव्हा “राम नाम सत्य आहे” असे म्हणा.

देवाचे नाव लक्षात ठेवण्यामध्ये काय परिश्रम आहेत? काहीच परिश्रम नाही.

तुम्ही जेंव्हा मोटारीत बसता तेंव्हा “ओम् नमो नारायणाय” असे म्हणा आणि मग मोटारीत बसा. त्याच प्रमाणे मोटारीतून खाली उतरताना नाम स्मरण करा आणि मग खाली उतरा.

अशापद्धतीने तुम्हाला नाम स्मरणाची सवय लागेल, होय कि नाही? म्हणून तुमच्या शेवटच्या क्षणाला , मृत्यूच्या वेळेस,प्राण शरीर सोडून जाताना मग सहजच तुम्ही नाम स्मरण करू लागाल आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल.

प्रश्न: गुरुदेव, मी आता पर्यंत किती आध्यात्मिक प्रगती केली आहे हे मी जाणून घेऊ इच्छितो. मी हल्ली तुमच्या गाडीच्या मागे पळणे सोडून दिले आहे. त्याचा अर्थ असा कि माझी आध्यात्मिक प्रगती झाली आहे कि माझी तुमच्यावरील श्रद्धा कमी झाली आहे?

श्री श्री : खरेतर ते तुम्हीच सांगू शकता.

एकदा का तुम्ही या मार्गावर चालायला सुरवात केली तर तुमची प्रगती निश्चित आहे. तुम्ही नेहमी पुढेच जात राहणार.

तुम्ही माझ्या गाडीच्या मागे पळता कि नाही यावर तुमची प्रगती मोजू नका.तसे कधीही करू नका. तुम्ही किती केंद्रित झाला हे मोजणे जरुरीचे आहे. तुम्ही जेवढे जास्ती केंद्रित व्हाल तेवढी जास्त प्रगती होय.

तुम्ही जेथे असाल तेथे असून स्तःब्ध व्हा. तुमचे मन आत्म-केंद्रित करा.

तुमच्यात भक्तीची कमतरता नाही हे ध्यानात घ्या. तुम्ही पुरेशी भक्ती करीत नाही असा विचारसुद्धा मनात आणू नका. काही वेळा भक्ती हि लपली जाते पण काही वेळाने ती परत वरती येते.

भावना ह्या नेहमी एकसारख्या नसतात. तुमच्यातील जोश हा पण कायम एकसारखा नसतो. त्यात नेहमी चढ उतार होत असतात.

भावना ह्या दगडासारख्या नसून त्या पाण्याप्रमाणे असतात.पाण्यावर जश्या लाटा उठतात तशाच भावना असतात. त्या वरती उठतात आणि मग शांत होतात काहीवेळाने परत वरती उठतात. हे अगदी नैसर्गिक आहे.म्हणून प्रेम आणि लालसा हे नेहमी बरोबर असतात. काहीवेळा तुम्ही तीव्र स्वरुपाची लालसा अनुभवता तर काही वेळा अमर्यादित प्रेम अनुभवता आणि मग परत लालसा अनुभवाला येते आणि मग अमर्यादित प्रेम. हे असे सारखे होत राहते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, तुम्ही मागे तीन प्रकारच्या भक्ताबद्धल बोलला होतात. मग गुरूंमध्येपण अनेक प्रकार असतात काय?

श्री श्री : होय, निश्चितच!

इतिहासात अशी अनेक प्रकारचे गुरू सापडतात. खरे पाहता त्यातील प्रत्येकजण अद्वितीय आणि वेगळा असे ते होते. काही लोकांकडे राजसिक गुण जास्त होते तर कोणाकडे तामसिक तर काहीजण सात्विक होते.

काही दिवसांपूर्वी मी सुमारे ८० च्या दशकात घडलेल्या एका गोष्टीबद्धल असे सांगत होतो कि मी सुमारे २३ किंवा २४ वर्षांचा असताना दिल्ली शहराबाहेरील एक संतांकडे गेलो होतो. ते संत मला असे म्हणले होते कि ‘ सोने जर २४ कॅरट असेल तर तुम्ही त्यापासून दागिने बनवू शकत नाही. मग त्यापासून दागिने बनवायचे असतील तर त्यात तांबे किंवा तत्सम धातूचे मिश्रण करावे लागते.’

पुढे ते असे म्हणाले कि “ तुमच्यात पण असे काही मिश्रण करावे लागेल. तुम्ही सोन्यासारखे २४ कॅरट असता कामा नये, नाहीतर तुम्ही कोणाच्या कामाचे नाही”.

मी त्यांना असे म्हणालो कि “ नाही बाबा, मला २४ कॅरट असे देत. जे काही व्हायचे असेल ते होईल” ते म्हणाले “ तुम्ही फार लवकर प्रसिद्ध होऊ शकता. तुम्ही तंत्रा बद्धल काही शिक्षण का घेत नाही. आत्म्याबद्धल काही शिका, त्यामुळे तुम्ही काही आत्म्यांवर ताबा मिळवून काही जादू करून दाखवू शकाल.” मी त्यांना म्हणालो कि “ मला त्या कशाची गरज वाटत नाही.” मला माहित आहे कि ते या मार्गावरील प्रगतीसाठी उपयोगाचे नाही.

म्हणून असेपण काही लोक असतात कि जे काही चमत्कार करून दाखवतात पण ते फार काळ टिकत नाहीत. त्याचे मग असे होते कि ज्या आत्म्यांकडून तुम्ही कामे करून घेत असता ते तुमची पिळवणूक करायला लागतात. या सर्व गोष्टी फार अल्पकाळ टिकतात आणि त्या काही आयुष्यभर पुरत नाहीत.

आणि म्हणून शुद्ध सात्विक ज्ञान, सर्वसमावेशक ज्ञान हे चांगले असते आणि ते सर्वकाळ टिकणारे असते. त्यात तमो गुण किंवा रजो गुण नसतात. त्यांचा परिणाम हा कायमचा असतो आणि तुम्हाला ते शिखरावर घेऊन जायला मदत करते, अगदी सर्वोच्च शिखरावर.

ते संत काही वाईट संत नव्हते तर ते एक चांगले संत होते. ते एक चांगला माणूस होते. त्यासुमारास त्यांचे वय ७० च्या आसपास असावे आणि त्यांनी मला तशी सूचना केली होती. पण मी जेंव्हा नाही म्हणालो तेंव्हा त्यांनी माझ्या निर्णयाचा आदर करून म्हणाले कि “हे चांगले आहे”.

कदाचित मी कोणत्या मोहाला बळी पडतोय कि काय याची ते परीक्षा घेत असावेत.

प्रश्न: जेंव्हा आपण कोणालाही पहिल्यांदा भेटतो तेंव्हा साहजिकपणे त्या व्यक्ती बद्धल काही मत आणि निर्णय तयार होतात. काही कारण नसताना काही लोक पहिल्या भेटीपासून आवडायला लागतात तर काही लोक आवडेनासे होतात. गुरुदेव, हे असे का होते?

श्री श्री : हे सर्व असेच असते. हे सर्व जग कंपनांवर चालते आणि आपण पण कंपनांवर चालतो. काही लोकांची कंपने हि सुखदाई असतात आणि तुम्ही त्यांना सहजपणे प्रतिसाद देता. बाकीच्या लोकांची कंपने हि प्रतिकारक असतात.

जेंव्हा तुम्ही केंद्रित असता , तेंव्हा तुम्हाला असे कोणीही भेटणार नाही कि ज्यांच्याबद्धल तुम्ही प्रतिकारक कंपने जाणवू शकाल आणि मग तुम्हाला तुमच्या केंद्रापासून कोणीही हलवू शकणार नाही. हि खरी इच्छित अवस्था होय कि ज्यात लालसा नसते कि घृणा नसते, प्रतिकर्षण नसते कि मजबुरी नसते किंवा आकर्षण पण नसते. अशावेळी सर्व गोष्टी ह्या चित्ताकर्षक असतात. अशा वेळी सर्वजण आणि सर्व गोष्टी याचे तुमच्याशी सामंजस्य असते. तोच खरा अंतरीचा आनंद जो तुम्हाला व्यापून राहतो.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही म्हणालात कि झोपेबद्धलचे ज्ञान हे मुक्ती देते. याचा अर्थ काय?

श्री श्री : झोप आणि स्वप्ने याबद्धलचे ज्ञान तुम्ही एकप्रकारच्या समाधीचा अनुभव देऊ शकते. योग सूत्र मध्ये ऋषी पतंजली यांनी सांगितलेली हि एक पद्धत आहे. या सूत्रात महर्षी असे म्हणतात कि “स्वप्ननिद्राज्ञानलम्बनाम वा”. वेगवगळ्या प्रकारच्या समाधीचे वर्णन करताना ते या समाधी अवस्थेबद्धल सांगतात.

झोप मनावर ताबा कशी मिळविते याचे जर तुम्हाला ज्ञान असेल तर, जागेपणा आणि झोप या दोन्हीच्या मध्ये पूर्ण शांततेचा एक क्षण असतो. मी शांततेचा क्षण असे म्हणतोय कारण कि शांतता हि एक सक्रीय आणि जिवंत गोष्ट आहे. त्यांना असे म्हणायचे आहे.

म्हणून तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले तर, झोप लागायच्या आधी, किंवा तुम्ही जागे झाल्यावर, तुम्ही काहीसे झोपलेले आणि काहीसे जागृत अशा अवस्थेत, काहीसी शांतता असते, चेतनेचा असा काही गुण असतो कि जो फार सुंदर, सुखदायक, आल्हाददायक असा असतो. या अवस्थेला त्यांनी समाधी असा शब्द वापरला आहे.

प्रश्न: गुरुदेव, जेंव्हा लालसा हि खूप तीव्र होते तेंव्हा त्याचा शेवट राग येण्यात किंवा निराशा येण्यात होते. हे कसे हाताळावे?

श्री श्री : जेंव्हा लालसा उत्पन्न होते तेंव्हा ती व्यवस्थितपणे हाताळावी लागते, तेंव्हा खोलवर ध्यानात जायची गरज असते. किंवा मग त्याला रचनात्मक वळण द्यावे, एखादी कविता, लेख लिहा. लेखनाची पण मदत होते. तुम्हाला माहित आहे काय अनेक महान कलाकृती मग ते चित्र असो, संगीत असो, नाटक किंवा साहित्य असो ते खोलवर अशा लालसेतून जन्माला आले आहे.

म्हणून जेंव्हा लालसा उत्पन्न होईल तेंव्हा तिला एक चांगले रचनात्मक वळण द्या किंवा मग व्यवस्थित हाताळून खोलवर ध्यानात जा.

प्रश्न: गुरुदेव, असे म्हणतात कि सत्तेमुळे भ्रष्टाचार वाढतो. सत्ता कशी हाताळावी यावर तुम्ही काही बोलाल काय?

श्री श्री : जेंव्हा तुमचे प्रयोजन चांगले नसते तेंव्हा सत्तेमुळे भ्रष्टाचार वाढतो. जेंव्हा तुमचे प्रयोजन चांगले नसते तेंव्हा तुम्ही गैर मार्गाने सत्ता मिळवायचा प्रयत्न करता.

काही लोक असे म्हणतात कि सत्ता म्हणजे विष आहे. तुम्ही जेंव्हा सत्ता वैयक्तिक कारणासाठी वापरता तेंव्हा असे होऊ शकते. पण जेंव्हा सत्ता हे सेवेसाठी वापरली जाते तेंव्हा ते एक साधन असते. जेंव्हा लोकांची सेवा करायची असे तुमचे उदिष्ट असते तेंव्हा सत्ता हे फक्त एक साधन असते.

प्रश्न: गुरुदेव, जेंव्हा सर्व काही सुरळीत चालू असते तेंव्हा कृतज्ञ सोपे असते. पण विपरीत परिस्थितीत पण कृतज्ञ राहून तुमच्यावर कृपा-दृष्टी आहे हे भान कसे ठेवावे?

श्री श्री : भूतकाळातील कठीण काळ पण कसा सुकर झाला ते आठवा. त्या कठीण परिस्थितीतून पण तुम्ही सुखरूपपणे बाहेर पडलात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्यात एक स्थिर स्वरुपाची आस्था निर्माण होईल.

प्रश्न: गुरुदेव, तंत्रज्ञानामुळे सुविधा वाढतात, त्याचप्रमाणे प्रदूषण पण वाढते. तर मग विकासाची कसोटी काय असावी, सुविधा कि प्रदूषण?

श्री श्री : तंत्रज्ञान हे नेहमी वातावरणाच्या विरोधी असायला पाहिजे असे नसते.

आजच्या काळात तंत्रज्ञान हे जास्तीत जास्त वातावरणाशी अनुकूल असे व्हायला लागले आहे. म्हणून मग आपण नवीन तंत्रज्ञान वापरूनसुद्धा वातावरणाची काळजी घेऊ शकतो, पण वातावरण हे महत्वाचे आहे, खुपच महत्वाचे आहे.

प्रश्न: गुरुदेव, नाते संबंधांमध्ये गृहीत धरले जाऊ नये यासाठी काय करावे?

श्री श्री : त्याची फार काळजी करू नका, ते अगदी साहजिक आहे.

लोकांना तुम्ही त्यांचेच आहात असे वाटत असते म्हणून ते तुम्हाला गृहीत धरतात आणि मग ते मग फक्त पाहुण्या लोकांची काळजी घेतात.

जेंव्हा तुम्ही कुटुंबाचा एक भाग असता तेंव्हा तुम्हाला कोणी कशाला विचारायला पाहिजे कि ‘तुम्ही कॉफी घेतलीत का? तुम्ही आता जेवणार आहात काय?’ सर्वसाधारण पणे असे कोणी करीत नाही.

जर कोणी असे प्रश्न विचारायला लागला तरी तुम्हाला शंका येईल.’ माझ्याकडे आज इतके लक्ष का देतायत? नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे.’ तुम्ही मग संदेह घ्यायला लागता.

एकदा एक सद्गृहस्थ मला सांगत होते कि’ गुरुदेव, मी जेंव्हा माझ्या बायकोशी जरा चांगले वागायला लागतो तेंव्हा ती शंका घ्यायला लागते. तिला वाटते कि काहीतरी गडबड आहे आणि मग ती मला विचारते ‘ काय भानगड आहे? तुम्ही काही तरी घोटाळा केलेला दिसतोय. तुम्ही प्रामाणिक दिसत नाहीत!’ मी जेंव्हा सर्वसाधारण वागतो तेंव्हा तिला असे वाटते कि मी तिच्याकडे दुर्लक्ष करतोय. गुरुदेव मी काय करावे?’

म्हणून जेंव्हा एखाद्याला शंका घ्यायची असते तेंव्हा ते असेही शंका घेताच असतात.

ते म्हणाले ‘ हे खूप अवघड आहे. मी जेंव्हा अर्धा तास उशिराने घरी पोहोचतो तेंव्हा तर ती चौकशा सुरु करते ‘ तुम्ही कोठे गेला होतात? तुम्ही कार्यालयातून केंव्हा बाहेर पडलात? पुढे काय झाले? ती असे सर्व प्रश्न विचारायला लागते.’

म्हणून मी म्हणतो कि आपण आपल्या मनाला हाताळायला शिकले पाहिजे.

हे सर्व मनाचे खेळ आहेत. तुमचे मन जर चांगल्या पद्धतीने हाताळलेत तर तो तुमचा सर्वात चांगला मित्र बनू शकतो आणि जर वाईट पद्धतीने हाताळलेत तर तो तुमचा सर्वात वाईट शत्रू बनू शकतो.

प्रश्न: गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण जेथे जात तेथे भांडणे आणि मारामाऱ्या सुरु होत. पण तुम्ही जेथे जाता तेथे मतभेद दूर होतात.

श्री श्री : होय, जेंव्हा मी कोणत्याही शहरात येणार आहे अशी बातमी मिळताच तेथे लोकांमध्ये वाढ सुरु होतात. एक जण म्हणतो कि ‘ गुरुदेव माझ्या गाडीतून प्रवास करतील’, तर दुसरा म्हणतो कि ‘ते माझ्या घरी मुक्कामाला येतील.’ तिसरा म्हणतो कि ‘ते माझ्या घरी जेवायला येतील’ आणि मग यावरून भांडणे सुरु होतात.

पण माझ्या भेटीनंतर लोक आनंदी होतात. ते आनंदी होतील याची मी निश्चितच काळजी घेतो.

प्रश्न: गुरुदेव, पती पत्नीच्या सर्व साधारण नात्याला मी अजून वरच्या पातळीवर कसे घेऊन जाऊ शकतो?

श्री श्री : दोघांनी बरोबर चालून आणि एकमेकांचे समर्थन करून.

काही वेळा असे होते कि एक साथीदाराला लग्न संबंधात काही रस वाटेनासा होतो तर दुसऱ्याला त्यात रस असतो. मग त्यातून काही निष्पन्न होत नाहीसे होते. असे होऊ शकते. पण असे असताना सुद्धा दोघांनी नेहमी बरोबर चालले पाहिजे आणि नेहमी एकमेकांना समर्थन दिले पाहिजे.

आपल्याला प्रत्येक प्राणिमात्रांची निगा राखणे जरुरी आहे

06
2013
Feb
बंगलोर, भारत
प्रश्न: कृपा करून काही खाण्याच्या आधी देवाला दाखवण्यात येणाऱ्या नैवेद्याचे महत्व आम्हाला सांगा. कृपा करून नैवेद्य दाखवण्याची खात्रीलायक पद्धतसुद्धा आम्हाला सांगा. कोणत्या मंत्राची आवश्यकता असते काय?

श्री श्री : भारतात वैश्व देव नावाची परंपरा आहे. जेव्हा घरातील महिला अन्न शिजवते तेव्हा सर्वात प्रथम ती एक घासभर भात किंवा डाळ घेते आणि बाहेर अंगणात ठेवते पक्षी, मुंग्या आणि पशु यांच्या करिता. वातावरणाचा बहुमान करणे हे या मागचे महत्व आहे.

आणि अनेक लोक जेवताना ताटाच्या बाहेर अन्नाचे काही कण ठेवतात आणि नंतर ते पशु-पक्षी यांना देऊ करतात.

पक्षी हे विश्वाचा एक अविभाज्य घटक आहेत. म्हणून आपल्याला पक्षांची निगा राखली पाहिजे; आपल्याला मुंग्यांची काळजी घेतली पाहिजे;आपल्याला प्रत्येक प्राणीमात्राची निगा राखली पाहिजे. या विश्वातील एक जरी जीव कमी झाला तर हे विश्व टिकून राहू शकणार नाही.

जे अन्न मिळाले त्याचा तुम्ही भेट म्हणून; आशीर्वाद म्हणून स्वीकार करा हाच प्रसादाचा अर्थ आहे. प्रसाद म्हणजे देवाने दिलेला आशीर्वाद होय. अन्न हे आशीर्वाद आहे, जीवन हे एक आशीर्वाद आहे, समय हा आशीर्वाद आहे, आपले श्वसन हा एक आशीर्वाद आहे. या सगळ्या भेट मिळालेल्या आहेत.

प्रश्न : भारतीय पुराण कथांनी प्रत्येक शक्तीला मूर्त रूप का दिले आहे? सर्व पुराण कथा खऱ्या आहेत का?

जर ऋषी मुनी हे साक्षात्कारी होते तर ते आपले नियंत्रण हरवून शाप कसे काय देऊ शकत होते?

श्री श्री : संपूर्ण हे नाम आणि रूप यांनी युक्त आहे. ज्याक्षणी तुम्ही नाम देऊ करता त्याक्षणी त्या नामासोबत रूप हे सुद्धा येतेच.आणि यातील अनेक रूपे ही तरल पातळीवर ओळखल्या गेली होती. म्हणून ते तरल परिमंडळात अजूनसुद्धा आहेत.

आता, ऋषी (साक्षात्कारी पुरुष) क्रोधीत होऊन शाप का देत होते, ते मला माहित नाही. सामान्यतः प्रत्येक ऋषी असे करीत नसे. थोडेफारच असे होते जे असे करायचे. परंतु दरवेळेस जेव्हा जेव्हा त्यांनी शाप दिला त्या प्रत्येक वेळेस त्यांच्या शापातून काही तरी महान घडले. म्हणूनच असे म्हणतात की साक्षात्कारी मनुष्याच्या क्रोधामुळेसुद्धा समाजाचे नेहमी भलेच झाले आहे आणि अज्ञानी मनुष्याच्या प्रेमामुळेसुद्धा नुकसान होते.

एका ज्ञानी माणसाचा क्रोधसुद्धा फायदेशीर असतो. तो कोणाचे नुकसान करू शकत नाही,तो समजाचे भलेच करतो.

म्हणून जेव्हा जेव्हा ऋषींनी प्रत्येक वेळा शाप दिला तेव्हा तेव्हा तो मनुष्यजातीकरिता एक मोठे वरदानच ठरला.

प्रश्न : मला वाटते की स्वातंत्र्य हे अतिशय सापेक्ष आहे. कित्येकवेळेस माझे स्वातंत्र्य हे दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याला परस्परविरोधी आहे. 'संपूर्ण स्वातंत्र्य' असे काही अस्तित्वात आहे का? का तसे असणे म्हणजे निव्वळ अराजकता होय?

श्री श्री : बंधन आणि स्वतंत्रता हे केवळ मनात असते, आणि जेव्हा तुमचा दृष्टीकोन संकुचित असतो तेव्हा तुम्हाल अनेक प्रकारची बंधने जाणवू लागतात. जस जसा तुमचा दृष्टीकोन रुंदावत जाऊ लागतो, तुमच्या लक्षात येऊ लागते की केवळ स्वतंत्रताच आहे.

प्रश्न : बंधने आणि गुंतागुंत यांच्यापासून दूर राहण्याचा सर्वात सोप्पा मार्ग कोणता?

श्री श्री : केंद्रित व्हा. हे लक्षात ठेवा की हे केवळ एक स्वप्न आहे आणि सगळे काही नष्ट होणार आहे. सगळे नाश पावणार आहेत, आणि एक दिवशी सगळे काही संपणार आहे.

मागे वळून भूतकाळाकडे पहा आणि बघा,तुम्ही या ग्रहावर गेली ३० ते ५० वर्षे घालवली आहेत, त्या सगळ्या घटनांना काय झाले? सगळे गेले आहे, हो ना! चला जागे व्हा!

प्रश्न : गुरुदेव, निवडीकडून सुरु करून निवडीच्या पलीकडे कसे जावे?

श्री श्री : चांगले आणि वाईट यात निवड होऊ शकत नाही. निवड ही नेहमी वाईट आणि अति वाईट; किंवा चांगले आणि अतिशय चांगले यातच होऊ शकते. जर तुम्ही हे लक्षात घेतले तर तुमच्या लक्षात येईल की निवड करायला काही नाही.

प्रश्न : कित्येक वेळा माझे तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे मला त्रास होतो जेव्हा माझी तुमच्याबरोबर भेट होत नाही. माझे मन म्हणते की तुम्ही सर्वव्यापी आहात, परंतु माझ्या हृदयाला हे पटत नाही. मी काय करू?

श्री श्री : निश्चिंत राहा आणि स्वतःला व्यस्त ठेवा. या जगात भरपूर सेवेची आवश्यकता आहे, तर मग चला कामाला लागा.

अभिलाषेचे रुपांतर सृजनात करा.अभिलाषा तुमच्यातील सृजनता आणि जोश यांना अभिव्यक्त करण्याचे एक अभिकर्ता अथवा एक उत्प्रेरक बनू शकते. तर त्याचा असा उपयोग करा.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही मला ओळखता का आणि मी काय करतो आहे हे तुम्हाला माहिती असते का असे मला कुतूहल वाटते?

श्री श्री : तुम्हाला काय वाटते?

तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट मला माहित का असावी? मला माहित असण्याची काही गरज नाही.

प्रश्न : प्रशासनाची योग्य पद्धत कोणती? अध्यात्मिक पद्धतीच्या प्रशासनासाठी ही वेळ योग्य आहे, हो ना?

श्री श्री : होय, भांडवलवाद, साम्यवाद, धर्मनिरपेक्षतावाद, हे सर्व वाद एकदम बेकार आहेत, खरे पाहता हे सर्व मनावतावादाशिवाय निष्फळ आहेत. मानवतेचे आवाहन कसे करता येईल? तर अध्यात्माद्वारा.

प्रश्न : गुरदेव, आपल्या शरीरात हृदय हे डावीकडे असते. याला काही अध्यात्मिक कारण आहे का?

श्री श्री : खरे तर अश्या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत. नाकपुडीला दोन छिद्रे का आहेत. एकाच जागी दोन डोळे का जेव्हा की एक डोळा पुढे आणि एक मागे ठेवता आला असता.

आता हृदय डाव्या बाजूला का आहे यावर कोण काय बोलणार. कुठेतरी काहीतरी असणे जरुरी होते.

मला तर वाटते की तुम्हाला विचारायला काही चांगला प्रश्न नव्हता.

मला वाटते की तुम्हाला जीवनात अनेक गोष्टींचे कुतूहल वाटते.आपण करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. जगाला तुमच्याकडून अधिक लक्ष आणि जास्तीजास्त सेवा आवश्यक आहे.