ईश्वर तुम्हाला दु:ख देणे अशक्य आहे

17
2013
Dec
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव, जर देवानेच दुखावले तर आम्ही कुठे जायचं ?

श्री श्री: कुठेही जायचं नाही. देवाने तुम्हाला दुखावणे अशक्य आहे. लहानपणी शाळेत असताना आम्हाला कानडी मधला एक श्लोक शिकवला जायचा. त्याचा अर्थ असा आहे की, ऊस जितका जास्त पिळावा तितका त्यातून जास्तच गोड रस बाहेर पडतो. हिर्यालातुम्ही जितके जास्त तासाल तितका तो जास्तच चमकतो, सोन्यावर जितके जास्त हातोड्याचे घाव घालावे, आगीत घालावे तितके ते जास्तच चमकते. चंदन तुम्ही जितके जास्त घासाल तितका त्याचा सुगंध अधिकच दरवळतो.

निसर्ग तुम्हाला अनेकपरीक्षांमधून दिव्यांमधून जायला लावतो आणि तुम्ही त्यातून झळाळत बाहेर पडता. एक गोष्ट लक्षात ठेवा निसर्ग तुमच्यावारासा भार कधीच टाकणार नाही जो तुम्ही पेलू शकणार नाही. देव आधी शेपटीचे माप घेतो आणि मग ती प्राण्याला लावतो.म्हणजे त्याला शेपटी सहज हलवता येईल. विचार करा जर उंदाराला हत्तीची शेपटी असती तर ती त्याला उचलताही आली नसती.निसर्ग खूप हुशार आहे. तो तुमच्या सामोराशीच समस्या उभी करती, जी तुम्ही हाताळू शकता.

प्रश्न: गुरुदेव, माझे एक खोल दडवून ठेवलेले गुपित आहे, ज्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. जर मी त्याबद्दल बोललो तर मी सगळे काही आणि सगळ्यांना गमावून बसेन. मी एका भौतिक जगात रहातो, मी पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाही आणि मला अपयशाचे भय वाटते. मी काय करावे ?

श्री श्री: तुम्हाला परीकाम काय होणार ते दिसते आहे, मग तुम्ही अशी गोष्ट कां करता ज्याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाहिये.

‘कन्फेशन’ (पापाची कबुली) नावाची एक गोष्ट असते. आता, तुम्ही कोणत्याही एका टॉम, डिक किंवा हॅरी समोर जाऊन पापाची कबुली देऊ शकणार नाही. पण एखाद्या समजदार माणसा समोर पापाची कबुली देऊ शकता जो गोपनीयता पाळू शकेल. चर्च मध्येही ती पाळली जाते. चर्च मध्ये एक खोली असते तिथे जाऊन तुम्ही पापाची कबुली देऊ शकता. तिथे त्या पाद्र्यालाही दिसत नसते की त्यांच्याशी कोण बोलत आहे.तुम्ही कबुली दिली की तिथे असलेल्या एका छोट्या खिडकीतून ते तुम्हाला काही प्रसाद देतात ज्याने तुम्हाला छान वाटते.तुम्ही इथे आहात याचे हे ही एक कारण आहे, रिक्त आणि पोकळ होण्यासाठी. तुम्ही तुमच्या चिंता, काळज्या लिहून टोपलीत टाका आणि मोकळे व्हा.

भूतकाळात जी काही असुखकारक घटना घडली आहे, ती झाली, होऊन गेली. तुम्ही त्याला पकडून ठेऊन तुमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ खराब कां करताय ? म्हणूनच लिहा आणि टाकून द्या !

तुम्हाला जर असे वाटत असे की बोलून टाकल्याने फायदा होईल किंवा न बोलल्याने निरागस लोकांना त्रास होईल तर मग त्यांच्या बद्दलच्या जिव्हाळ्याने बोलून टाका म्हणजे ते अडकणार नाहीत. पण बोलणे कुणासाठीच चांगले नसेल तर मग तो विषय काढून चर्चा करण्यात काही अर्थ नाही. एखाद्या शहाण्या माणसाला सांगा किंवा लिहा आणि देवाला अर्पण करून टाका आणि मुक्त व्हा.

प्रश्न: श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक जास्त गरीब, असे कां ? गरीब लोक चौरस आहार मिळण्यासाठी धडपडत असतात, देव त्यांची काळजी कशी घेतो ?

श्री श्री: गरीब लोकांबद्दलचे माझे निरीक्षण असे आहे की देवाने त्यांना शिक्षा केळी आहे म्हणून ते गरीब आहेत असे नाही तर त्याचे कारण आहे दारू , तिच्यामुळेच लोक गरीब राहिले आहेत. एखादा कामगार जवळ जवळ, शहरात ऑफिसमध्ये सर्वसाधारण काम करणाऱ्या माणसाइतकेच कमवत असतो. पण त्याच्या कमाईतले दोन त्रीतीयांश तो दारूवर घालवतो त्यामुळे तो गरीब राहतो.

गरिबीचे दुसरे कारण आहे आळशीपणा. आजही तुम्ही एखादा गरीब मुलगा किंवा मुलगी बघीतली तर असे दिसेल की त्यांनी नीट कष्ट घेतले तर ते वर येऊ शकतात, खरोखरच वर येऊ शकतात. पिरॅमिडच्या पायथ्यापासून वरपर्यंत पोहोचलेली अनेक उदाहरणे दिसतात. तुमच्यात करून दाखवण्याचा जोश, इच्छा आणि उत्साह असायला हवा. बरेचदा लोकांमध्ये याचाच अभाव असतो.

आम्ही जेव्हा पहिल्यांदा ही जागा बघायला इथे बंगलोरमध्ये आलो होतो, तेव्हा हा आश्रम म्हणजे एक ओसाड जागा होती. ही जागा कुणालाही नको होती. इथे काहीही उगवत नव्हते, ना गवत, ना झाडं. या ६० एकर जागेत फक्त एकच झाड होते. कल्पना करा ! इथे काहीही नव्हते. फक्त पाणी उपलब्ध नसलेली खडकाळ, पडीक जागा होती. त्याकाळी फिलीप, किरण, विनोद मेनन आणि आणखी बऱ्याच लोकांनी ही सगळी झाडे लावली. सगळ्या आश्रमात लोक गवताच्या झोपड्यांमध्ये रहात होते. मला आठवते आहे ते बरोबर असेल तर, सरपंचाच्या मालकीचे एकच घर कौलारू छप्पर असलेले असे शेजारच्या खेड्यात होते. बाकीची सगळी घरं गवताचे छप्पर असलेली होती जी पावसाळ्यात गळायची आणि मोठा वारा सुटला तर उडून जायची. अशी परिस्थिती होती. फक्त इथेच नाही तर आसपास सगळीकडेच.

इतकेच नाही तर या कनकपुरा रोडवर फक्त दोन बसेस यायच्या. एक सकाळी आणि एक संध्याकाळी. आणि खाली असलेल्या नदीतली वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक्स असायच्या. (सुदर्शन क्रियेच्या टेप मध्येही तो आवाज ऐकू यायचा ! ) त्या काळी जयानगर मधून आश्रमात यायला दोन बसेस घ्याव्या लागायच्या.

आम्ही या जागी आलो तेव्हा हे पूर्णपणे एक खेडेगावच होते. आम्ही शेजारच्या २० खेड्यातून मुले गोळा केली आणि त्यांच्या साठी शाळा सुरु केली. आसपासचे लोक खूप गरीब होते.आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आमच्याकडेही पैसें कमीच होते. आश्रमासाठी आम्ही बँकेकडून बरेचदा ओव्हर ड्राफ्ट (आगाऊ रक्कम) घ्यायचो. आणि दोन तीन महिन्यांनी परत करायचो. 

नव्वदच्या शतकात मी या भागातल्या सगळ्या गरीब आणि बेरोजगार तरुणांना बोलावलं. सगळे २० ते २५ वर्षे या वयोगटातले होते. मी त्यांना सांगितले की त्यांनी काही नोकरी करावी असे मला वाटते. ते सगळे त्यांच्या कुटुंबियांवर एक ओझे बनून राहिले होते. काहीही करायचे नाहीत.संपूर्ण दिवस बसून रहायचे, रेडिओ ऐकायचे, पत्ते किंवा क्रिकेट खेळायचे आणि संध्याकाळी जाऊन दारू प्यायचे. आम्ही लहान मुलांसाठी शाळा काढली पण तरुण मात्र बेकार होते. ते दहावी पास होते आणि त्यांना शेतावर जाऊन काम करायचे नव्हते, शेतीतले कसलेच काम करायचे नव्हते. त्यांना असे वाटत होते की जे अजिबात शिकलेले नाहीत किंवा चौथ पर्यंत शिकले आहेत त्यांनी शेती करायची. हे शेती कां करतील ? त्यांना शेतात काम करायचे नव्हते.

मी कर्नाटक सरकारच्या लघु उद्योग विभागाच्या अधीक्षकांना भेटलो आणि त्यांच्याकडे असलेले सगळे प्रकल्प या मुलांना दाखवायला सांगितले. त्यांनी काहीतरी करावे असे मला वाटत होते. ( आमचा देखील गवताचे छप्पर असलेला एक हॉल होता जिथे आम्ही अष्टावक्र गीतेवर प्रवचने दिली.त्याचं जागी मी या मुलांना आणि त्यां अधीक्षकांना बोलावले होते.)

ते अधीक्षक अगदी उत्साहाने आले. त्यांनी खूप कष्ट घेऊन त्यांनी तीन ते चार तासांत जवळ जवळ २२५ प्रकल्प समजावून सांगितले. आणि त्या मुलांकडे दर वेळी हे जमणार नाही, ते शक्य नाही असे सांगायला कारणे तयार होती ! अधीक्षकांनी प्रत्येक प्रकल्प समजावून सांगितला की ते म्हणायचे, “गुरुदेव, हे शक्य नाही ! ” शेवटी मी त्यांना विचारले की “कशाने कां होईल ?” ते म्हणाले, “आम्हाला पोलिसमध्ये नोकरी मिळवून द्या किंवा आम्हाला बस कंडक्टर करा.”

पोलिसात किंवा कंडक्टर म्हणून किती जणांना नोकरी मिळू शकते ? कुणालाही व्यावसायिक व्हायचे नाही. कुणालाही कष्ट करायचे नाहीत. या लोकांना गरीबच रहायचं आहे , मग तुम्ही काय करू शकता?

त्यां वेळी मग आम्ही युवा नेतृत्व शिबिर सुरु केले. आम्ही त्या सगळ्यांना तीन महिन्यांचे कठीण असे प्रशिक्षण दिले. त्यांचा आळस निघून जावा म्हणून सकळच्या वेळी त्यांना चांगला व्यायाम करायला लावला. जेव्हा त्यांनी क्रिया आणि ध्यान करायला सुरवात केळी तेव्हा आम्ही त्यांना तीन महिन्यांसाठी नोकरी दिली. पण त्यांना हे सांगितले की तुम्हाला काहीतरी करावे लागेल. आज त्यांच्यापैकी बरेच जण व्यावसायिक झाले आहेत.

आज तुम्हाला आश्रमात कुठे गवताचे छप्पर दिसते ? नाही ! लोकांनी घरे बांधली. फक्त इथेच नाही तर आसपासची खेडीही आता संपन्न झाली. आर्थिक सुबत्ता आली. आता तुम्हाला या भागातून कामगार मिळत नाहीत. ते दुसरीकडून येतात.

असाच एक मुलगा होता. तो आमचा रखवालदार होता. आज त्याच्या हाताखाली ४०० लोक कामा करतात. या मुलाची कहाणी खूप रंजक आहे. लहान असताना त्याच्या शाळेत तो खूपच त्रासदायक होता. तो सगळ्या मुलांशी भांडायचा त्यामुळे कोणतीही शाळा त्याला प्रवेश द्यायला तयार नव्हती. त्याचे वडील त्याच्यापुढे थकून,कंटाळून गेले होते. त्यामुळे ते त्याला इथे सोडून गेले. ते आम्हाला म्हणाले, यांच तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांना तो घरी नको होता कारण तो सगळ्यांना मारायचा, सगळ्याची तोडफोड करायचा, सगळीकडे नुसता त्रास. मग तो नुसता शक्ती कुटीर च्या बाहेर बसून रहायचा आणि लोकांना माझ्या खोलीत येण्यापासून रोखायचा. त्या काळी आमच्याकडे दुसरा कुणी रखवालदार नव्हता, तोच एकटा होता. तो सगळ्यांना रोखायचा. अगदी माझ्या आईला सुद्धा ! बरेचदा तिला माझ्यासाठी जेवण घेऊन आत येण्यासाठी त्याच्याशी झगडा करावा लागायचा. केवळ इथे रहाण्याने त्याच्यात केवढा फरक पडला बघा ! मग तो परत गेला आणि त्याचं लग्न झालं. त्याने एक मोठा धंदा सुरु केला. तो फार शिकलेला नव्हता, पण आज त्याच्याकडे जवळजवळ ३०० ते ४०० माणसं काम करताहेत. आणखी बऱ्याच लोकांची हीच कहाणी आहे. आणखी बरीच उदाहरणं आहेत, एकच नाही. आळस मात्र जायला हवा.

मंत्रीपदाचा उमेदवार असलेल्या एकाची चहाची टपरी होती. तो अगदी गरीब परिस्थितीतून आला होता. आज तो एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे रामनाथ गोएंका यांचे आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्र सुरु केले आणि त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवरही उघडपणे लिहीले. ते फक्त दुसरीपर्यंत शिकले आहेत. ते मुंबईच्या रस्त्यांवर हातगाडीवर भाजी विकायचे. ते गरिबीतून वर आलेले असले तरी आज त्यांनी साम्राज्य उभे केले आहे.

आध्यात्मिक जोश, आत्मविश्वास आणि गरिबीतून वर येण्याची प्रबळ इच्छाशक्ती हे आपल्याकडे असायला हवे. फक्त गरिबांना जेवण आणि इतर गोष्टी देऊन काही उपयोग होणार नाही.

इथियोपिया हे आणखी एक उदाहरण आहे. तिथे सात वर्षे दुष्काळ होता. इतकी वर्षे दुष्काळ असल्यामुळे तिथले लोक काम करेनासे झाले. आठव्या वर्षी पाउस पडला तरी लोक काही काम करेनात ! कारण त्यांना इतर देशांकडून मदत मिळण्याची सवयच झाली होती.

दुसऱ्या कुणीतरी मदत, अन्न आणि इतर गोष्टी द्याव्या असेच त्यांना वाटू लागले. आजदेखील इथियोपियामध्ये इतकी मोठी जमीन आहे पण चीनी आणि भारतीय लोक तिथल्या जमिनी विकत घेऊन त्या कसत आहेत. कारण तिथल्या लोकांमधला काही करण्याचा जोश राहिलेलाच नाही.

इथियोपिया मध्ये आणखी एक विचित्र गोष्ट आहे. कुठल्यातरी धार्मिक श्रद्धेमुळे वर्षातले सहा महिने इथियोपिया मधले लोक दूध किंवा कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. त्यामुळे मग आता कुणालाही दुग्ध व्यवसाय करायचा नाही कारण सहा महिने त्यांच्या मालाची विक्रीच होणार नाही.

कदाचित् पूर्वीचा कालीकुनितरी म्हटले असेल की थंडीच्या दिवसात थंड दूध पिऊ नये किंवा दुसरे काहीतरी ठोस कारण असेल.काही असो एक धार्मिक श्रद्धा म्हणून सहा महिने दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न करण्यामुळे त्या संपूर्ण व्यवसायावरच दुष्परिणाम होऊ शकतो. दारिद्र्यातून बाहेर येण्यासाठी मनाची एक विशिष्ठ धारणा असावी लागते. आणि मी तुम्हाला सांगतो हे आतूनच वाटायला हवे कुणीतरी कीव करून काही केल्याने काही होणार नाही. लोक म्हणतात, “मी बिच्चारा, इतरांकडे पैसें आहेत. माझ्याकडे नाहीत !”

तुमच्याकडे कां नाहीत ? कारण तुम्ही त्याच्यासाठी कष्ट घेतलेले नाहीत.

अर्थात याला दुसरी बाजूही आहे जिथे लोकांची पिळवणूक होते. हेही योग्य नाही.

प्रश्न: गुरुदेव,मी शिजवलेल्या भाताला हात लावला की माझे सासूसासरे मला हात धुवायला लावतात. माझी पाली चालू असताना मला देवघरात, स्वयंपाकघरात जाऊ देत नाहीत, कपड्यांना हात लाऊ देत नाहीत. अशा परंपरा कां पाळतात ? यामागे काही शास्त्रीय कारण आहे कां ?

श्री श्री: कोणताही प्रथा सिद्ध करायला किंवा बाद ठरवायला वैज्ञानिक प्रयोग करावे लागतात. प्रयोग केल्या शिवाय ती परंपरा चूक किंवा बरोबर ते ठरवता येत नाही. उदाहरणार्थ पारंपारिक घरामध्ये शौचास जाण्यापूर्वी पुरुष त्यांचे जानवे कानावर अडकवत असत. कधी कधी हे विचित्र वाटायचे. कारण असे सांगितले जायचे की जानवे खूप लांब असते आणि कशाततरी अडकू नये म्हणून कानावार अडकवून ठेवायचे. पण न्यूयार्क मधील एका वैज्ञानिकाने एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला ज्यात म्हटले होते की कानाचा मागचा भाग आणि कानाची पाळी ही मल विसर्जनाशी संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा कान पिळले जातात तेव्हा रक्तदाब खाली येतो आणि मल विसर्जना सुलभ होते. तर, या प्रथेचा परिणाम अजूनही आहे. त्यामुळे ती अंधश्रद्धा आहे असे म्हणता येणार नाही. जरी एका स्तरावर ती अंधश्रद्धा होती तर दुसऱ्या स्तरावर त्या प्रथेला शास्त्रीय कारण होते.

त्याचप्रमाणे स्वयंपाकात हळद वापरणे किंवा किंवा भांडी धुणे ही एक अंधश्रद्धा आहे असे लोकांना वाटत होते. बर्याचशा पदार्थांमध्ये पदार्थ शिजवून झाल्यावर त्याच्यावर पान ठेवायचे. ऐंशीच्या दशकात हळदीवर बरिच टीका झाली की त्याने फक्त रंग येतो, त्यात काही फारसे पोषण मूल्य नाही, त्यात पावित्र्य वागैरे काही नाही, त्याने जेवणात काही पोषक अशी भर पडत नाही. नव्वदच्या दशकात मात्र शास्त्रज्ञांनी शोधून काढले की हळद ही सर्वात चांगली अँटींऑक्सिडेंट आहे.

आयुर्वेदिक वैद्यांनी सांगितले आहे की हळद ही ‘वयस्थापन’ म्हणून काम करते. म्हणजे शरीराचे वार्धक्य रोखते. पण त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. एम.बी.बी.एस. डॉक्टर्स म्हणायचे की थोतांड आहे. नंतर शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की हळद तब्येतीसाठी खूप चांगली आहे. ती कॅन्सरला रोखते. तर कोणतीही प्रथा चुकीची आहे असे सिध्द केल्याशिवाय तुम्ही ती बाद करू शकत नाही.

मी परत तेच सांगतो आहे की मनाची तयारी ठेवा. कधी ते बरोबर ठरवले जाईल आणि नंतर चूक. संपूर्ण देशात अशी एक लाट आली होती की शेंगदाणा तेल खूप वाईट आहे. दक्षिण भारतात फक्त शेंगदाणा तेल आणि तिळाचे तेल वापरत असत. पाम तेल विकणाऱ्या एका कंपनीने खोबरेल तेल वाईट आहे, बाकीची सगळी तेलं वाईट आहेत असा प्रचार केला. अचानक सगळे पाम तेल वापरू लागले.

नक़्विन संशोधनाने सिध्द केले आहे की शेंगदाणा तेल अतिशय चांगले आहे, ते सर्वात चांगले आहे. ते शेंगदाणा तेलाची स्तुतीसुमने उधळत असतात. खरे तर इथे शेकडो, हजारो वर्षे शेंगदाणा तेल वापरले जात आहे. तामिळनाडू मध्ये तिळाच्या तेलाला ‘नल्ला एनाई’ म्हणतात. म्हणजे ‘चांगले तेल’. आपल्या शरीरासाठी ते खूपच चांगले आहे.

तेल बाजारात मलेशियाहून पाम तेल भारतात आणायचे होते त्यामुळे काही वैज्ञानिकांनी हा निष्कर्ष काढला. एका कंपनीने हा निष्कर्ष काढला होता आणि त्यामुळे लोकांचे चुकीचे मत झाले. त्यामुळे संशोधन हे सच्चे असायला हवे. आणि पुढच्या संशोधनासाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी. भविष्यात आणखी एखादे संशोधन झाले आणि त्यात सिध्द झाले की हे चूक आहे तरमग तेच पकडून ठेवता कामा नये. नवीन स्वीकारायची तयारी हवी.

प्राची अशा आयुर्वेद पद्धतीची खासियत ही आहे की ती ५,००० वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे परंपरेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याचशा गोष्टी परंपरेच्या नावाखाली केल्या जातात.

उदाहरणार्थ, लोक म्हणतात की लहान बाळाच्या अंगावर गरम खीर चोळावी म्हणजे त्याची चांगली वाढ होईल. किंवा त्याचे पाय पकडून त्याला काही वेळ उलटे हलवावे म्हणजे कदाचित कुठलातरी देव प्रसन्न होईल किंवा असेच काही तरी. या सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी अगदी काही ठिकाणीच होतात. काही खेड्यांमधून धर्माच्या नावाखाली त्या पाळल्या जातात. पण हे मूर्खपणाचे आहे.

मी असे म्हणत नाही की सगळ्या परंपरा पाळाव्यात, त्याच वेळी त्यांना पूर्णपणे उडवूनही लावू नये. सुवर्णमध्य साधावा.

जर एखाद्याकडे कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना सुतक असते किंवा घरात मुल जन्मले सोयर असते. म्हणजे त्यांना दहा दिवस शिवायचे नसते. हे सगळे जवळचे नातेवाईक पाळतात. ते काही साजरे करत नाहीत किंवा कुणाच्याही घरी जात नाहीत. त्यांच्या घरचे अन्न कुणी घेणार किंवा खाणार नाही. याच्या मागचे कारण काय आहे ? कुणी तरी जाते तेव्हा त्यांच्या घरातले इतके द:खात बुडून जातात की त्यांच्या दु:खाच्या लहरी त्यांच्या घरात, त्यांच्या वातावरणात असतात. त्यामुळे ते सर्व नेहमीच्या जबाबदाऱ्यांपासून त्यांना सूट असते, इतकेच. असे नाही की तुम्ही कुणाला स्पर्श केला तर तुम्हाला काही तरी होईल. फक्त दहा दिवसांमध्ये लहरी तशा दु:खात बुडालेल्या असतात इतकेच.

समजा कुणाला दु:ख झाले नसेल ! समजा कुटुंबात कुणी तरी खूप काळ आजारी असेल, ते गेल्यावर कुटुंबातील लोकांना बरे वाटते. ते म्हणतात, “ चला, बरे झाले त्याला, मुक्ती मिळाली, मला त्याच्यासाठीही बरे वातेय आणि माझ्यासाठीही.” मग तिथे नकारात्मक, निराशाजनक, दु:खी लहरी नसतात. कारण त्यांना गेलेल्या व्यक्तीसाठी बरे वाटत असते. प्रत्येकाला एक दिवस जायचेच असते.

त्याचप्रमाणे जेव्हा एखादे मूल जन्माला येते तेव्हा सगळेजण खूप उत्साहात असतात, आनंदी असतात. त्यावेळी सुद्धा लहरी शांतिमय नसतात. त्यामुळे असे म्हटले जाते की त्यावेळीही त्यांना नेहमीच्या सर्व जबाबदाऱ्यांपासून सूट दिली जाते. पण लोक ही गोष्ट इतकी ताणतात की ते तुमच्या बुद्धीला पटत नाही.

जेव्हा स्त्रियांची पाळी सुरु असते तेव्हा त्यांना विश्रांतीची गरज असते. त्यामुळे हे फक्त त्यांना नेहमीच्या कामात अडकू नये म्हणून हो प्रथा पाळली जाते. स्त्रियांनी विश्रांती घ्यावी, झोपावे,आराम करावा, वाचावे, काही विणकाम करावे. नाही तर त्या काम करायला लागल्या तर मग खूपच काम करतात.

भात आणि शिजवलेल्या अन्नाचे असे आहे की पूर्वीच्या काळी शिजवलेले अन्न पिष्टमय आणि चिकट असायचे. बरेचदा ते भांड्यातून उतू जायचे. तुम्ही भांड्याला हात लावला आणि तोच हात आणखी कुठे लावला तर सगळेच चिकट होईल. तुम्ही अन्नाला हात लावला तर ते तुमच्या हाताला लागेल, त्यामुळे तुम्ही हात धुतलेले बरे, हेच कारण आहे. आज काळ तुम्ही त्याला हात लावत नाही चमचा वापरता. त्याकाळी स्वच्छता आणि आरोग्य याची खूपच काळजी घेतली जायची. त्यामुळे तुम्ही चिकट खरकट्या गोष्टीला हात लावला की तुम्हाला हात धुवायला लागतात. त्याकाळी फळेही वेगळी ठेवत असत. तरीही या प्रथांवर संशोधन व्हायला हवे.

ज्यू लोकांमध्येही अशाच प्रथा आहेत. जर तुम्ही दुधाला हात लावला तर मांसाला हात लावायचा नाही. त्यांच्यात असे खूप नियम आहेत.

जपानी लोकांच्याही अशा प्रथा आहेत. जुन्या विचारांचे लोक पाहुण्यांसाठी वेगळे कप आणि भांडी ठेवतात. त्यांच्याकडे या पाहुण्यांच्या भांड्यांसाठी वेगळे कपाट असते ज्यात त्यांच्यासाठी असलेली भांडी ठेवली जातात. हे जपानमध्ये बघून मला खूपच आश्चर्य वाटले होते.भारतात देखील आपल्या कपबश्या वेगळ्या ठेवण्याची प्रथा बरेच लोक पाळत असत. जपानमध्ये पारंपारीक घरांमध्ये आणि मॉनेस्टऱीज मध्ये हे प्रामुख्याने दिसते.

याच्यापैकी बऱ्याच सवयींच्या मागे काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी किंवा कारण नाही. अशावेळी त्या पाळणे आपण थांबवायला हवे. काही प्रथा असतील तर त्या चांगल्या आहेत कां हे बघितले पाहिजे किंवा त्या दिशेने काही प्रयोग तरी करून बघितले पाहिजेत. 

प्रश्न: गुरुदेव, नशेच्या आहारी गेलेल्या, स्वत:ला आणि इतरांना सतत त्रास देणाऱ्या माणसाला कसे काय स्वीकारायचे ?

त्याची ओढ , जिगर आणि समर्पण यात अंतर कसे ठेवायचे ?

श्री श्री: त्याला यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते ते करायला पाहिजे.युक्ती,शक्ती आणि प्रीती कसेही करून त्याला यातून बाहेर काढायला हवे. सर्वात उत्तम म्हणजे त्याला सुधारगृहात ठेवणे. कलकत्यात एक सुधारगृह आहे. इतर ठिकाणी सुद्धा अनेक सुधारगृहे आहेत. त्याला अशा ठिकाणी घेऊन जा. त्याला सुदर्शन क्रिया करायला लावा. तो जर क्रिया आणि प्राणायाम शिकला तर खूपच फरक पडतो. बऱ्याच लोकांनी सुदर्शन क्रिया नियमित करायला लागल्यावर नशा आणि दारू सोडली आहे.

प्रश्न: गुरुदेव, आजकाल बरेच लोक कॅन्सरने आजारी आहेत. या आजाराला आला कसा घालायचा ? त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्या रुग्णाने आणि त्याच्या कुटुंबियांनी काय करावे?

श्री श्री: जीवनशैली बदलण्याने फायदा होईल. तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक साधने बंद करा. तुमचे आय फोन, आय पॅड, वाय फाय, हे सगळे झोपताना बंद करा. झोपताना इतके सगळ्या इलेक्ट्रॉनिक लहरी भोवताली असणे चांगले नाही.

बरेचदा तुम्ही अयोग्य गोष्टी खाता. जर तुम्ही नीट ध्यान केले नाही तर शरीराला त्याची किंमत मोजावी लागते. योग्य वेळी, योग्य आहार घ्या. त्रिफळा, च्यवनप्राश घ्या. हे सगळे अँटींऑक्सिडेंट आहेत आणि ते तुमच्या शरीरात जायला हवेत.

असुयेवर विजय कसा मिळवाल

27
2013
Nov
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव असुयेवर कसा विजय मिळवावा?

श्री श्री: फक्त हे जाणून घ्या की तुम्ही एक दिवस मरणार आहात आणि दुसरा माणूस सुद्धा एक दिवस मरणार आहे. ज्या माणसाचा आपण द्वेष करता तो आणि तुम्ही दोघेही एक दिवस संपणार आहात. द्वेष करण्यासारखे त्यात काय आहे.

एक दिवस मुल्ला नसरुद्द्दिन आणि त्याचा मित्र भर उन्हाळ्यात दुपारी एका झाडाखाली विश्रांती घेत होते. विश्रांतीनंतर मुल्ला उठला आणि म्हणाला “ओह! मी मस्त स्वप्न पहिले. एक सुंदर मुलगी माझ्या प्रेमात पडली” त्याच्या डोळ्यात अजूनही चमक होती. तो इतका आनंदी दिसत होता, त्यावर त्याचा मित्र म्हणाला “मला तुझा इतका द्वेष वाटतो आहे, या सुंदर मुली माझ्या स्वप्नात का येत नाहीत? मला फक्त माझ्या बायकोची भीतीदायक स्वप्ने पडतात आणि घाम फुटतो”

मुल्ला म्हणाला “तुला काय वाटते मला माझ्या बायकोच्या आठवणीने घाम फुटत नाही? ते स्वप्न होते. तू सुद्धा तसे स्वप्न का बघत नाहीस? माझ्या स्वप्नाचा द्वेष का करतोस? तुला तुझी स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. ती खरी होवोत किंवा नाही.”

जेंव्हा तुम्ही दुसर्याचा द्वेष करता तेंव्हा आयुष्याकडे खूप संकुचित दृष्टिने पाहता. त्या पलीकडे पहा. त्यामुळेच इच्छाहीन होणे महत्वाचे आहे, त्यामुळे तुमच्यात एक स्थिरता येईल. ही स्थिरता पाहून तुमच्याबद्दल सगळ्यांना हेवा वाटेल.

प्रश्न: या जगा बद्दलची वास्तवता एका कुत्र्याच्या आणि माकडाच्या सुद्धा दृष्टीकोनातून वेगळी आहे. प्रत्येक माणसाचा दृष्टीकोन दुसर्यापेक्षा वेगळा असतो. मग खरे सत्य कसे कळेल? सत्य कसे कळेल?

श्री श्री: सत्याचे वेगवेगळे स्तर आहेत. जस जशी आपली चेतना विस्तारते तस तसे आपले ज्ञान सुद्धा वाढते. एका लहान मुलाच्या दृष्टीने जग वेगळे असते, जस जसे आपण मोठे होतो तस तसे सगळे बदलत जाते. त्यामुळे ज्ञान हे चेतना आहे. जस जशी चेतना विस्तारते तस तसे ज्ञान विस्तारते.

प्रश्न: गुरुदेव, शंकराचार्यांना आज सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्या सारख्या पूज्य वक्तीला या कटू अनुभवातून का जावे लागले? कोणताही राजकारणी किंवा माध्यमे या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसत नाहीत.

श्री श्री: त्यांनी दिलगिरी वक्त केली पाहिजे. राजकारणी आणि माध्यमे यांनी क्षमा मागितली पाहिजे, त्यांनी हे एका व्यक्तीच्या बाबतीत नव्हे तर एका संस्था बाबतीत केले आहे, अशी संस्था जी दोन हजार वर्ष जुनी आहे. ‘सनातन धर्माचा’ प्रतिनिधी जो या संस्थाचा प्रमुख होता. अनेक लोक अनेक वर्ष यामुळे बेचैन झाले. ९ वर्ष या कटू अनुभवातून जाणे हा एख्याद्या संता साठी मोठा काळ आहे. पण त्यांच्या साठी हे एक तप होते. त्यांच्या साठी याचा फार फरक पडत नाही. एखाद्या संतासाठी प्रशंसा किंवा दुषणे याने काही फरक पडत नाही. पण व्यवस्थेसाठी, लोकांच्या विश्वासासाठी हे मोठे प्रश्नचिन्ह आहे.

काही लोक बदनामी करून लोकांचा विश्वास तोडू पाहत आहेत. लोकांचा जर धर्मावर, अध्यात्मावर विश्वास असेल तर ते व्यसनाधीन होणार नाहीत, हातात बंदुका घेणार नाहीत. लोक भक्ती मार्गावर असतील तर व्यसने करणार नाहीत. या लोकांना आपली उत्पादने विकायची आहेत त्यामुळे ते लोकांना धर्म आणि अध्यात्म या पासून तोडू पाहत आहेत. यात काही नवीन नाही, पूर्वीपासून हे चालत आले आहे. त्यामुळे जे लोक झुरळ किंवा डीस सुद्धा मारणार नाहीत अशा लोकांवर असे गंभीर आरोप करतात. ९ वर्षानंतर हे सिद्ध झाले की सर्व ३२ जण निर्दोष आहेत. न्याय करायला उशीर लागता कामा नये, हे ६ महिन्यात वाहयला पाहिजे होते. पण याला ९ वर्ष्या इतका मोठा काळ लागला. आपला सत्य वर नेहेमीच विश्वास असला पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, विष्णूच्या १० अवतारापैकी कोणता सगळ्यात सुंदर आहे? आणि कृपया आम्हाला “कल्की” अवताराबद्दल सांगा.

श्री श्री: सुंदरता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला सुंदर वाटते. सुंदरता कुठे नाही? अगदी काट्यात सुद्धा सुंदरता आहे, पानात सुंदरता आहे. जर तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदलला तर तुम्हाला सगळीकडे सुंदरता दिसेल. प्रत्येक अवतारात काही चांगले आणि काही वाईट गुण आहेत.
18
2013
Dec
बंगलोर, भारत

आपल्या वेदना किंवा दुःखाकडे चार प्रकारे बघता येवू शकते, तुम्हाला वेदना देणारा हा स्वतः वेदनांनी पीडलेला असेल, जे तुम्हाला दुःख देत आहेत ते त्या बाबतीत अज्ञानी आहेत, तुम्ही जास्त सहनशील व्हावे यासाठी कर्म किंवा निसर्ग तुम्हाला यातून जायला भाग पाडीत असेल. तुमची प्रत्येक वेदना, तुम्ही त्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्यासाठी घेतलेली तुमची सत्व-परीक्षा असते. तुम्ही किती मजबूत आहात हे या परीक्षेत समजून येते. तुम्हाला आणखी मजबूत करण्याचे काम या वेदना करीत असतात. - श्री श्री.

ठीक आहे! तुम्ही ते केले नाहीत.

18
2013
Jul
माँट्रियल, कॅनडा.
प्रश्न : मी कर्तेपणाच्या भावनेपासून सुटकारा कसा मिळवू?

श्री श्री : केवळ कर्म करीत राहा, त्याच्याबाबत चिंता करू नका.

मला वाटते की तुमच्याकडे बसून ‘मी कर्ता आहे किंवा नाही’ असा विचार करत बसायला बराच मोकळा वेळ आहे असे दिसते. जी तुम्ही करायला पाहिजे आहे अशीच कर्मे करा.

प्रत्येक कियेचा मोबदला असतो; आनंददायी, अप्रिय किंवा मिश्र. मोबदल्याचे हे केवळ तीन प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही कृती करता, तेव्हा तुम्ही काही सकारात्मक मोबदला कमावता, किंवा काही नकारात्मक मोबदला कमावता, किंवा काही सकारात्मक आणि नकारात्मक मोबदला कमावता. या सर्व मोबादाल्यांचा परिणाम केवळ काही काळापुरता टिकतो. म्हणून तर ज्ञानी याबद्दल चिंता करीत नाहीत.

प्रत्येक क्रियेमध्ये काहीतरी असे आहे जे सकारात्मक आहे आणि काहीतरी असे आहे जे नकारात्मक आहे. एखादी कृती १००% परिपूर्ण असू शकत नाही. एखाद्या कृतीमधून विकसित होणाऱ्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आणि कृतीच्या परिणामांची काळजी करू नका, केवळ पुढे चालत राहा. 

जर तुम्ही चुकीची कृती केली असेल, त्यामुळे तुम्ही धडा शिकला असाल तर पुढच्या वेळी ती चूक पुन्हा करू नका. जर तुम्ही योग्य कृती केली असेल तर त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक तश्याच योग्य कृती करण्याची प्रेरणा मिळते.

जर तुम्हाला असे दिसून आले की तुम्ही केलेल्या कृतीमध्ये तुम्ही अजून काही सुधारणा आणू शकता तर तुम्ही नेहमीच त्याबाबतीत सुधारणा करू शकता.

केवळ पुढे जात राहा, ‘मी कर्ता आहे’ किंवा ‘मी कर्ता नाही’ असे म्हणू नका. खरे तर एका बाबतीत तर कोणीही कर्ता नाही आणि दुसऱ्या बाबतीत पाहाल तर, होय, तुम्हीच तर कर्ता आहात, कारण तुमच्या आत द्वंद आहे. 

उपनिषदामध्ये अतिशय सुंदर कथा आहे ती अशी, ‘ज्या विश्ववृक्षावर, दोन पक्षी बसलेले आहेत, एक आहे जो फळ चाखतो आहे, दुसरा केवळ बघतो आहे, एका साक्षीदाराप्रमाणे’. तर, तुमच्यातील एक भाग आहे जो काहीही करीत नाही, तो बराच मोठा आहे. आणि तुमच्यातील एक भाग आहे जो सर्व खी करतो आहे. हे दोन्ही तुमच्या आत उपस्थित आहेत. 

आता तुम्ही “कसे?” हा प्रश्न विचाराल.

एका पातळीवर तुम्हाला आढळेल की तुमच्यात परिवर्तन येत आहे. तुमचे विचार बदलत आहेत, तुमच्या भावना बदलत आहेत, तुमच्या शरीरात बदल घडून येत आहे. तरीसुद्धा एका निराळ्या गहन पातळीवर तुमच्यामध्ये असे काहीतरी आहे जे अजिबात बदलत नाही; ते तसेच्या तसे आहे. तर हे किंवा ते असे नाही; तर हे दोन्ही एकत्र एकाचवेळी कार्यरत असतात.

जेव्हा अपराधीपणाची भावना तुम्हाला आतून खात असते किंवा गर्व तुमच्या डोक्याचा ताबा घेतो तेव्हा तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही कर्ता नाही.  तुम्हाला समजते आहे का?

जेव्हा तुम्ही काहीतरी खूप चांगले काम करता आणि म्हणता, ‘अरे मी केले, मी केले’, तेव्हा तेसुद्धा तुम्हाला उदास करते. काहीतरी चांगले केल्यानेसुद्धा तुम्ही उदास होता कारण तुम्ही इतके काही करता आणि मग म्हणता की कोणालाही तुमची किमत नाही, कोणीही तुमचे ऐकत नाही.

तुमच्या चांगल्या कामाचे कौतुक झाले नाही म्हणून तुम्ही दुःखी होता, आणि जर तुम्ही काही चूक केली, तर तेसुद्धा तुमच्या मनाला खाते आणि अपराधीपणाची भावना निर्माण करते. जेव्हा अश्या गोष्टी घडतात तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही कर्ते नाही आहात. तेव्हा साक्षीदार व्हा.

या ग्रहावर सर्वात मोठे गुन्हे करणारे लोक कुठेतरी आत गहन विचार करतात, ‘अरे, मी हे केले नाही, असे कसे घडले.’

त्यांना आश्चर्यचकित आणि धक्कादायक वाटते, आणि ते विचार करतात की ते कर्ते नाहीत, हे असेच घडले. या ग्रहावरील सर्वात मोठ्या अपराध्यांबरोबर जर तुम्ही बोललात, तर तुम्हाला दिसून येईल की अपराधाच्या ठिकाणी ते कसे पोचले हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. त्याचप्रमाणे, ज्या कोणाच्या हातून सर्वोत्कृष्ट कार्य झाले त्यांनासुद्धा असेच वाटते की ते आपोआप घडले; ती नकर्त्याची भावना ही अनुभवण्यासारखी आहे. 

जेव्हा तुम्हाला गोष्टी करणे भाग आहे, तेव्हा ‘अरे, मी तर कर्ता नाही’ असे म्हणू नका. त्या साच्यामध्ये जाऊ नका. जर तुम्हाला काही कार्यावर लक्ष केंद्रित करणे गरजे आहे तर मग केवळ तिथेच लक्ष केंद्रित करा. मी कर्ता नाही, हा एक अनुभव आहे, कधीकधी त्याचा तुमच्या आत उदय होतो. जेव्हा तुम्ही अपराधीपणाच्या भावनेच्या किंवा गर्विष्ठपणाच्या गर्तातेत सापडता तेव्हा हा अनुभव तुमच्यासाठी एक कोपरखळी असतो.

प्रश्न : तुम्ही म्हणता की जेव्हा कधी आम्हाला भीती वाटते तेव्हा आम्ही आमच्या भयांचा सामना केला पाहिजे. माझा प्रश्न आहे की या भयांचा सामना करण्यासाठी मला धैर्य कोठून मिळेल?

श्री श्री : हे लक्षात घ्या की तुम्ही एकटे नाही, आणि अशी एक वैश्विक शक्ती आहे जी तुम्हाला खूप प्रेम करते, आणि तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला आठवते की तुमच्यावर अतोनात प्रेम केल्या जात आहे तेव्हा भीती नाहीशी होते. तुमचे सगळे त्रास सुरु होतात कारण तुमच्यावर खूप प्रेम केल्या जात आहे यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही.  तिथूनच सगळ्या अडचणी सुरु होतात, आणि तुम्ही अश्या तऱ्हेने वागू लागता की त्यामुळे सगळे लांब ढकलल्या जातात. तुम्ही स्वतःकरिता दुःख निर्माण करता, कारण तुम्ही स्वतःवर शंका घेता; मी चांगला आहे ना? माझ्यावर प्रेम केल्या जात आहे ना? देव माझ्यावर प्रेम करतो की नाही? लोकांचे माझ्यावर प्रेम आहे की नाही? अश्या प्रकारच्या शंका.

तुम्ही एक विदुषक जरी असलात तरीसुद्धा तुम्ही आवडते आहात आणि तुमच्यावर प्रेम केले जात आहे हे केवळ गृहीत धरून चला. तुम्ही एक जोकर जरी असलात तरीसुद्धा तुमच्यावर प्रेम केले जात आहे आणि तुमची काळजी घेतल्या जात आहे. तुम्ही जसे कसे आहात तसे लोकांना तुम्ही आवडता. केवळ पुढे जात राहा, बसून राहू नका आणि अधिक काळ स्वतःची काळजी करण्यात, स्वतःला तपासण्यात, आणि परीक्षण करण्यात घालवू नका. केवळ एखादी जबाबदारी घ्या आणि तुम्हाला जे करणे जरुरी आहे ते करा, आणि निःपक्षपातीपणे खोल विश्रांती घ्या.

उत्कटता, उदासीनता, आणि अनुकंपा  या तीन गोष्टी असणे महत्वाचे आहे.

जेव्हा तुमच्याकडे उत्कटता असते, तेव्हा काळजी करू नका. जेव्हा तुमच्याकडे उत्कटता नसते तेव्हा तुम्ही बसून काळजी करा. उत्कटतेची कमतरता असते तेव्हा आत्मविश्वासाचा अभाव येतो. उत्कटतेअभावी जीवनातील सगळी मजा निघून जाते आणि तुम्ही निराशेच्या गर्तातेत सापडता. उत्कटता जरुरी आहे; उत्कटतेला जगवा.

नुसतीच उत्कटता नाही तर उदासीनतासुद्धा महत्वाची आहे. लोक तुम्हाला सांगतील की तुम्ही उत्कट असले पाहिजे पण मी म्हणेन तुमच्याकडे उदासीनता असायला पाहिजे. उदासीनता म्हणजे निराश अवस्थेत कामे करणे असे समजले जाते. लोक खूप निराश दिसतात आणि विचार करतात की हेच उदासीन असणे होय. हा समज अतिशय चुकीचा आहे.

उदासीनता तुम्हाला केंद्रित करते. ती तुमचे हास्य आणि संयमशीलता कायम ठेवते. ती तुमच्या बुद्धीला समजूतदार आणि भावनांचा समतोल राखते. जेव्हा तुमच्याकडे उदासीनता असेल तेव्हा तुमचे कुणाकडेही कशाबद्दलही तक्रार करणे थांबवते. हे जग जसे आहे तसे आहे, तुम्ही लोकांबद्दल वा प्रसंगांबद्दल तक्रार करणार नाही, आणि तुम्ही स्वतःबद्दल तक्रार करणार नाही. ही उदासीनता आहे.

अनेक वेळा आपण इतरांबद्दल तक्रार करतो, ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त माया करतो त्यांच्याबद्दलसुद्धा तक्रार करतो. आपण समोरच्या व्यक्तीला बचावात्मक बनवतो, किंवा त्यांना स्पष्टीकरण द्यावयास लावतो. ही केवढी मोठी डोकेदुखी आहे!

सुरुवातीला मी यामुळे हलून जायचो. लोक म्हणायचे, ‘तुम्ही माझ्याकडे बघत नाही’, किंवा ‘तुम्ही माझ्याबरोबर बोलत नाही’, किंवा ‘तुम्ही माझ्यावर रागावला आहात का?’ , अरे देवा! आजकाल मी अश्या प्रश्नांची उत्तरेच देत नाही. जर तुम्ही तसा विचार करता तर असू दे. हरकत नाही! जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांमुळे मात खाता तेव्हा त्याने तुम्ही शक्तिशाली बनता.

हे सगळे म्हणजे केवळ लक्ष वेधण्याचे प्रकार आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या आणि मग ते ठीक असतात. अगदी एखाद्या बालकाप्रमाणे-जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते आदळ-आपट करतात तुमचे लक्ष वेधण्यासाठी. तुमच्या कधी हे लक्षात आले आहे? जेव्हा तुमच्याकडे घरी पाहुणे येतात आणि तुम्ही त्यांच्याबरोबर बोलण्यात गुंग आहात त्याच वेळी मुलांना त्यांचे चित्र तुम्हाला दाखवायचे असते. त्यांनी ते तुम्हाला आधी दहावेळा दाखवून झाले असेल. परंतु तुम्ही काही महत्वाची चर्चा करीत असाल तेव्हा ते येतील आणि व्यत्यय आणतील. तुम्हाला नवल वाटेल की हे बालक इतके शांत होते आणि आता अचानक काय झाले!

आपण त्या अवस्थेतून अजून बाहेर आलेलो नाही, आपल्याला कायम लोकांकडून लक्ष पाहिजे असते. आणि या लक्षाकरिता आपण इतरांकरिता तणाव निर्माण करतो.

म्हणून उदासीनतेमुळे, तुम्हाला ना लक्षाची उणीव भासते ना तुम्हाला काही तणाव राहतो. तुमच्यात बसून लक्ष मिळवण्याची अभिलाषा उरणार नाही. उदासीनता आवशयक आहे.

आणखी एक गोष्ट खरोखर जास्त फायदेशीर आहे ती म्हणजे अनुकंपा. जेव्हा तुमच्यात अनुकंपा असते तेव्हा ती तुम्हाला प्रेरणा देते, प्रोत्साहन देते. तुमच्याबरोबर वाईट केलेल्या लोकांकरिता जेव्हा तुम्हाला अनुकंपा असते तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल तिरस्कार किंवा कडवटपणा वाटत नाही. अनुकंपा ही उत्कटपणा आणि उदासीनता यांच्यात वंगणाचे काम करते आणि त्यांचे संतुलन राखते.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, संपूर्ण आयुष्यभर आपण आपल्या नातेसंबंधातून प्रेमाचा शोध घेत असतो आणि तरी हे प्रेम क्षणिक असते. परम प्रेम किंवा कधीही नष्ट न होणारे प्रेम काय आहे?

श्री श्री : तुम्ही प्रेम या द्रव्यापासून बनलेले आहात. जे तुम्ही इथे आणि तिथे शोधात आहात तेच तुम्ही आहात. अंतराभिमुख व्हा आणि विश्राम करा. जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला इतरांकडून प्रेमाची आवश्यकता नाही आणि त्याचे उगमस्थान तुम्हीच आहात, तेव्हा तुम्ही देण्यास सुरुवात कराल. जेव्हा तुम्ही मुबलक प्रमाणात देऊ लागाल तेव्हा ते मुबलक प्रमाणात परतून तुमच्याकडे येईल.

प्रश्न : जेव्हा मला दुसऱ्यांमध्ये सौंदर्य आणि प्रतिभा दिसते तेव्हा माझे मन एक तर त्यांना खाली दाखवण्यास सुरुवात करते किंवा माझ्या मनाला मत्सर वाटू लागतो. जर मी माझ्यामध्ये पूर्ण आहे तर माझे मन उणीवेच्या गर्तातेत का सापडते?

श्री श्री : कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल की एके दिवशी सगळे मृत्यू पावणार आहेत. हे सगळे सुंदर लोक आहेत, तेसुद्धा मरण पावणार आहेत. भूतकाळात जिवंत होते ते सर्व सुंदर होते, आणि लढाया लढल्या गेल्या आणि ते सर्व मृत्युमुखी पडले. ते सर्व ज्यांच्याबद्दल तुम्हाला मत्सर वाटतो, तेसुद्धा मृत्यू पावणार आहेत. जागे व्हा आणि पहा, हा मत्सर कुठे आहे? सौंदर्य काय आहे? जी वरवरची कातडी आपल्याला सुंदर वाटते ते सौंदर्य नाही.

तुमच्या स्वतःच्या चैतन्याचे स्वरूप ही सुंदरता आहे. जेव्हा तुम्ही आनंदी आणि समाधानी असता, तेव्हा तुमच्या आत उदय पावणारी चेतना किंवा जीवन यांचे गुणधर्म हे सौंदर्य आहे. बाहेर दिसणारी छबी हे सौंदर्य नाही.

प्रश्न : कर्माचे विघटन करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?

श्री श्री : केवळ कृती करून. काळजी करू नका, कर्म हा भूतकाळ आहे. ज्ञान, जागरूकता, ध्यान आणि चांगली कृती, या गोष्टींमुळे भूतपूर्व कर्म पुसले जातात.

जागरूक असणे आणि भूतकाळ हा भूतकाळ आहे हे जाणणे, जे काही झाले ते काही काहीतरी कारणाने झाले याची जाणीव ठेवणे; या ज्ञानाची जागरुकताच स्वतः गत कर्मांना पुसून टाकते. चांगल्या कृती करा, काहीतरी चांगले करा.