12
2014
Nov
|
बेंगळूरु, भारत
|
(“सत्य हे काळाच्या कसोटीवर खरे उतरते” याचा उत्तरार्ध खालीलप्रमाणे) प्रश्न : गुरुदेव, कधी कधी ज्ञान लक्षात ठेवणे हेसुद्धा एक बोजा बनते. अशा वेळेस मनन ( पुन्हा पुन्हा सतत विचार) करून मिळालेले ज्ञान आम्ही निधीध्यासाकडे (ज्ञानाबरोबर संपूर्णपणे एकरूप होण्याकडे) कसे नेऊ शकतो? श्री श्री : हा प्रश्न विचारूनसुद्धा तुम्ही तुमचा बोजा का वाढवता आहात? (हशा) निश्चिंत राहा आणि काही काळ मौन धरा. मनाला त्याच्या सीमित आकलनशक्ती आणि संकल्पना यांच्याकडून परिवहन करून जागरूकतेच्या रुंदावलेल्या अवस्थेकडे नेणे हे ज्ञानाचे ध्येय आहे. मनाला एकमत करून ‘हो!’ म्हणायला लावणे हे ज्ञानाचे ध्येय आहे. जेव्हा तुम्ही ज्ञान ऐकता तेव्हा मन सर्वप्रथम ‘अरे हो!’ म्हणते आणि मग हळू हळू मन रुंदावते आणि मौन होते. मग तुम्ही ‘ते आहे’ असे म्हणता. तुम्हाला ‘हो’ म्हणायला लावणे हे बुद्धीचे काम आहे. जेव्हा विचारशक्ती विश्राम करते आणि ज्ञानाबरोबर एकमत होते तेव्हा तुमच्यात रुंदावलेल्या जागरूकतेचा उदय होतो आणि तुम्ही इतर काही नसून केवळ चैतन्य आहात ही तुमच्या खऱ्या अस्तित्वाबद्दलची जाणीव तुम्हाला होते. या अवस्थेपासून तुम्ही अजून पुढे प्रगती करता आणि तुम्हाला समजते की फक्त आत्माच सगळीकडे आहे. तुम्हाला जाणवते की जे काही ते सगळे केवळ आत्माच आहे. तर तुम्ही व्यक्तिगत चैतन्याच्या अवस्थेकडून म्हणजेच मीपणा कडून सगळेकाही केवळ तेच आहे ही रुंदावलेली अवस्था जाणवण्याकडे जाता. ज्ञानामुळे आपली जागरुकता या ओघाने रुंदावते. प्रश्न : गुरुदेव,जर आम्ही अद्वैत ज्ञानाचे पालन करीत असू तर आम्ही देवी आणि देवता यांच्यावर आमची श्रद्धा कशी ठेवावी? श्री श्री : सगळे काही एकाच प्रकाशाने बनलेले आहे व त्यानेच प्रकाशित आहे हे माहित असणे म्हणजे अद्वैत. (इथे एक दिव्यत्व किंवा एक परम चैतन्य याचा उल्लेख आहे) निरनिराळ्या देवी देवतांची पूजा आणि सन्मान करणे हे त्याचप्रमाणे आहे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगांचे आणि ध्वनीलहरींचे अनेक प्रकाश मिसळून एक शुभ्र प्रकाश बनतो हे समजणे आणि व्यक्त करणे आहे. सूर्याची सर्व किरणे समान प्रकाशच देतात. ते सर्व एकाच उगमस्थानाकडून येतात, पण तुम्ही प्रकाशाच्या किरणला जेव्हा काचेच्या लोलकातून किंवा पाण्याच्या एका थेंबातून जाताना पाहाल तर तो विविध रंगात विभाजल्या जातो. तर हे विविध किरण म्हणजे निरनिराळे देवी आणि देवता असा विचार करा. सरतेशेवटी या दोन्हीमधील एकता तुम्हाला दिसून येईल, आणि (द्वैताच्या पलीकडे एका चैतन्याकडे जाणे )हे करणे बुद्धीचे कार्य आहे. म्हणूनच आपल्या ग्रंथांमध्ये आपण असे म्हणतो, ‘हे खरे आहे आणि तेसुद्धा खरे आहे!’ उदाहरणार्थ, जेव्हा आपण या खोलीतील फर्निचर बघतो तर आपण म्हणतो की हे सर्व लाकडापासून बनलेले आहे. त्याचवेळी दरवाजा हे खुर्ची नाही, आणि खुर्ची हे खिडकी नाही जरी ते एकाच लाकडापासून बनलेले असले तरीसुद्धा. हे समजण्याला द्वैत म्हणतात. म्हणून, अद्वैत आणि द्वैत हे एकोप्याने एकत्र अस्तित्वात आहेत. प्रश्न : गुरुदेव, आम्ही काशीबद्दल (आधुनिक भारतातील वाराणसी हे शहर) चर्चा करीत होतो. असे म्हणतात की जर कोणी अखेरचा श्वास काशीमध्ये घेतला किंवा त्यांच्या मृतदेहाची राख जर गंगा नदीत विसर्जन केली तर त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळते. हे कितपत खरे आहे? श्री श्री : नाही, असे अजिबात नाहीये. काशीला वाराणसी असेसुद्धा संबोधितात, आणि हे नाव पडले आहे ते वरुणा आणि असी या दोन नद्यांच्या संगमाचे स्थान असलेल्यामुळे. काशी ही खरे पाहता बाहेर नाही तर ती आपल्या आतच आहे. अज्ञा चक्र (मानवी शरीरातील अतींद्रिय उर्जेचे सहावे केंद्र) हा ईदा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्यांचे (मानवी शरीरातील उर्जेच्या मार्गांचे) एका ठिकाणी मिळण्याचा बिंदू आहे. म्हणून ज्याचे प्राण हे अखेरीस सुषुम्ना नाडीमधून वाहतात त्यालाच मुक्ती प्राप्त होते (भौतिक जगाच्या द्वैतापासून मुक्त होऊन दिव्यत्वाबरोबर एकरूप होणे). याचा तुम्ही असा समज करून घेऊ नका की मोक्ष मिळवण्याकरिता प्रत्येकाने काशीलाच मृत्यू पावले पाहिजे वास्तविक काशी कोठे आहे? कपाळावर भुवयांच्या मधील भाग, अज्ञा चक्राचे क्षेत्र- हे वरुणा (ईदा नाडीचे प्रातिनिधिक) आणि असी (पिंगला नाडीचे प्रातिनिधिक) यांच्या संगमाचा बिंदू आहे. म्हणून मृत्युसमयी जर या क्षेत्रावर प्राण निश्चलपणे प्रस्थापित केले तर मोक्ष प्राप्ती होते. या आख्यायिकांचा हा खरा अर्थ आहे. काशी शहरासोबत अजून एक अर्थ जोडलेला आहे. काशी म्हणजे जे ज्ञानाने ओसंडून वाहत आहे. प्राचीन काळी, ती ज्ञान आणि शिक्षणाचे मोठे अधिष्ठान होते. त्याकाळी या महान नगरीच्या गल्लोगल्ली पंडित होते जे धर्मग्रंथांवर विवाद करायचे आणि त्यांचा अर्थ समजवायचे. लोक ज्ञान आणि धर्मग्रंथांवर चर्चा करायचे. आज गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून लोक जसे पत्ते खेळतात तसे पूर्वीच्या काळी खेळत नसत. आज आहे तशी नदी तेव्हा घाण नव्हती. त्याकाळी शहरात मांसाहारी अन्न ग्रहण केल्या जायचे नाही किंवा गायींची कत्तल व्हायची नाही. त्या काळी काशी शहर हे ज्ञानाने ओसंडू वाहणारे आणि प्रत्येक गल्लोगल्ली बौद्धिके यासाठी प्रसिद्ध होते. असे म्हणतात की शहर ज्ञानाने इतके संपन्न होते की पोपट आणि मैनासुद्धा ज्ञानावर चर्चा करायचे. म्हणून जो अश्या ज्ञानी आणि साक्षात्कारी लोकांच्या संगतीत बसतो त्याला केवळ ज्ञान ऐकण्याने मोक्ष प्राप्त होतो. तुम्ही इथे गेल्या तीन किंवा चार दिवसापासून बसत आहात. तुम्हाला उन्नत आणि आनंदी वाटत नाहीये का? येथील वातावरण फार निराळे आहे. प्रत्येकजण आनंदी आहे, ते ध्यान धरत आहेत आणि सेवा करण्यात मग्न आहेत. म्हणून अशा जागा जिथे लोक हे सर्व पाळत आहेत त्या नैसर्गिकपणे ज्ञानाचे केंद्र बनतात. म्हणूनच काशीबद्दल अश्या सर्व गोष्टी बोलल्या जातात. याचा असा अर्थ नाही की जे लोक इतर ठिकाणी मृत्यू पावतात त्यांना मोक्ष मिळत नाही. कर्नाटकात मृत्यू पावणाऱ्या बऱ्याच लोकांनासुद्धा मोक्ष मिळतो. (हशा ). दीर्घ कालावधीपासून काशीला महत्व प्राप्त झाले आहे कारण ते नेहमीच ज्ञान आणि बुद्धिमान लोकांचे केंद्र होते. जगभरातून विद्वान काशीला यायचे ते ज्ञानाच्या शोधात आणि ज्ञानावर चर्चा करण्यास, अशी तिची कीर्ती होती. परंतु आज तुम्हाला केवळ १५-२० असे लोक सापडतील ज्यांना अस्सल गहन आवड आणि ज्ञान आहे. अशी दुर्दैवी अवस्था आज या नगरीची आहे. मला हे पाहून फार दुःख होते. जेव्हा मी तरुण मुलगा होतो, मला आठवते की त्याकाळी अनेक नामांकित विद्वान होते. आज फार थोडे खरेखुरे विद्वान आहेत. प्रश्न : गुरुदेव, आपल्या देशात ३३,००० कत्तलखाने आहेत आणि दररोज जवळ जवळ एक लाख गायींची कत्तल केल्या जाते त्यांचे मांस व कातडीसाठी. गायींचा बचाव आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही काय करू शकतो यासाठी कृपा करून आम्हाला मार्गदर्शन करा. श्री श्री : होय, गायींचा बचाव करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे. याबाबतीत मीसुद्धा खूपच चिंतीत आहे. जर आपल्याला आपल्या देशाच्या सांस्कृतिक वारश्याचा बचाव आणि संरक्षण करायचे असेल तर गायींचा बचाव करण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व काही आपण करणे अतिशय जरुरी आहे. तुम्ही गावोगावी गेले पाहिजे आणि तेथील लोकांना देशी भारतीय गायींचा बचाव करण्याचे शिक्षण दिले पाहिजे. गायी जरी दुध देत नसतील तरी गोमुत्र हे लागवड केलेला मळा आणि शेत यात वापरता येईल. खरे तर गोमुत्राचे संकेंद्रीकरण करून त्याचा खत म्हणून वापर करणे शेतकऱ्यांना शिकवले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, एक एकर जमिनीला खतावण्यासाठी केवळ एक गाय बस आहे. आपण शेतकऱ्यांना कृत्रिम रासायनिक खाते विकत घेण्यापासून थांबवले पाहिजे. खत विकत घेण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या एक तृतीयांश पैसे खर्च करून गाय विकत घेता येईल जिला तुम्ही वाढवू शकाल आणि ठेवून घेऊ शकाल आणि तुमचे शेत अतिशय निरोगी शेत असेल जे उत्तम पिक देईल. प्रश्न : काश्मीर समस्येसाठी काय उपाय आहे? गेली ५० वर्षे शांततेच्या वाटाघाटी फोल ठरल्या आहेत. भगवान कृष्णानेसुद्धा सत्याकरिता युद्ध केले. काश्मीरची समस्या हा काय अहंकाराचा मुद्दा झाली आहे का? श्री श्री : नोंद केलेल्या जागतिक इतिहासानुसार, जग केवळ २८८ वर्षे शांत होते. हे काळाच्या केवळ ८% आहे! असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की तंटे हे कायम होतेच. भारत-पाक समस्येकरिता लोकांचा एकमेकांबरोबर संपर्क होणे जरुरी आहे. या मार्गानेच पुढे जाणे शक्य आहे. ज्या अतिरेक्यांना त्यांनी भारताविरुद्ध प्रशिक्षण दिले तेच आता त्यांच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांना हे समजायला हवे. त्यांनी हे डावपेच सोडून द्यायला हवेत आणि मंडळावर येऊन त्यांनी दक्षिण आशियाला गरिबीमुक्त केले पाहिजे. त्यांनी गरीबीविरुद्ध लढा पुकारला पाहिजे, भारताविरुद्ध नव्हे. भारत आणि पाकिस्तान यांनी गरीबी-निर्मूलनासाठी एकत्रितपणे कार्य केले पाहिजे. आज जर तुम्ही काश्मिरी लोकांना सांगाल, ‘ज्यांना पाहिजे त्यांनी पाकिस्तानात जावे’, तर कोणीही जाणार नाही. त्यांना माहिती आहे की त्याबाजुच्या काश्मीरमध्ये लोक खुश नाही आहेत. तेथील लोक हे भारतीय काश्मिरींपेक्षा गरीब आहेत. मुक्त काश्मिऱ्यांनी साधे बिछानेसुद्धा पाहिलेले नाहीयेत. त्यांना वातानुकूलन, जेवणाचे टेबल किंवा खुर्च्या म्हणजे काय हे माहित नाही. ते अतिशय गरिबीत आहेत. जेव्हा ते इथे येतात आणि येथील लोकांना पाहतात तेव्हा ते म्हणतात की हे खरोखर निराळेच आहे. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'