आंतरिक अग्नी

23
2012
Oct
बंगलोर, भारत
(सत्संगाची सुरुवात ही संपूर्ण जगातील अनुयायांनी त्यांच्या राष्ट्रीय भाषेमध्ये श्लोक आणि गीत गायनाने झाली. विविध देशांमधून आणि भारताच्या संपूर्ण प्रांतांमधून आलेला तऱ्हेतऱ्हेचा जमाव हा संगीत आणि गायनाने एकत्र झाला होता.) 

संपूर्ण जगाने एकजूट होणे - हेच नवरात्रीचे चैतन्य आहे.

प्राचीन काळी प्रत्येक व्यक्ती ही नीरनिराळ्या वेदात, ज्ञानाच्या एका शाखेत पारंगत असे, आणि नवरात्रीत सगळे जमत असत आणि मग प्रत्येक जण ज्ञानात, नृत्यात, संस्कृती आणि सगळ्यात भाग घेत असत. आम्ही ठेवलेले बासरी वादन,तार वाद्ये,तबला,पखवाज, आणि गायन परवा तुम्ही बघितले असेल.

विश्वामध्ये वैवध्य आहे आणि ती विविधता एकजुटते ती एक चैतन्य;एक वैश्विक चेतना म्हणजेच दैवी चैतन्य (देव)सगळ्यामध्ये आहे या ज्ञानाने. तुम्ही देवाला घाबरू नका कारण तो आईप्रमाणे तुमची काळजी घेतो, तुमच्यावर माया करतो, त्याला तुमचे कौतुक आहे आणि तो तुमची उन्नती करतो. मातृत्वाचे सर्व गुण देवामध्ये उपस्थित आहेत.

आपण नेहमी म्हणतो,'देवाची भीती ठेवा, तुम्हाला शिक्षा द्यायला देव आहे', नाही! ही चुकीची कल्पना आहे. देव तुम्हाला कधीच शासन करणार नाही तर तो तुम्हाला शिकवेल आणि तुमची उन्नती करेल.

आपण जीवनोत्सव साजरा केला पाहिजे.

'ला-इल्लाह-इलल्लाह'- केवळ एकच दैवत्व आहे, असे आपण आत्ताच गाणे ऐकले आणि ते दैवत्व वर कुठेतरी स्वर्गामध्ये नाही,ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांमध्ये आहे.

म्हणून पृथ्वीचा मान ठेवा, पाण्याचा मान ठेवा आणि अग्नीचा योग्य वापर करा. केवळ बाह्य अग्नी नव्हे तर तुमच्या आतील अग्नीचासुद्धा योग्य वापर करा.

प्रत्येकाच्या आत एक आग आहे, एक उत्कटता आहे, त्याला योग्य दिशा द्या.

तुम्हाला माहिती आहे, आग ही विध्वंस करते आणि आग ही नवनिर्माणसुद्धा करते, म्हणून तुमच्या आत असलेल्या अग्नीला काहीतरी निर्माण करण्यासाठी परवानगी द्या. तुमच्या आत असलेल्या अग्नीला (उत्कटतेला) एक दिशा द्या.

दिव्य माता, पंचतत्वांमध्ये आणि स्वयंमध्ये असलेली दिव्यता लक्षात ठेवा. स्वयंमध्ये शांतपणे आणि सहजपणे परतणे हाच खरा उत्सव आहे.

देव माझ्यावर अतिशय प्रेम करतो - असा आपल्यामध्ये अत्माविशास असला पाहिजे. कसलेही प्रश्न नाहीत आणि कोणत्याही शंकाकुशंका नाही!

तसेच स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका, हेसुद्धा फार महत्वाचे आहे.

'अरे,ती व्यक्ती गाऊ शकते, मी नाही', 'ती व्यक्ती बुद्धिमान आहे पण मी नाही', असे चालणार नाही!

सगळे काही तुमच्या आत आहे. परिस्थितीनुसार निरनिराळ्या गोष्टी बाहेर येतील, तुम्ही केवळ धीर धरा.

दुसरे म्हणजे असे की आपल्याला आशीर्वाद आणि कृपा पाहिजे असते, हो ना?! आशीर्वाद मुबलक आहेत, परंतु जर तुमचे भांडेच छोटेसे असेल, तर कोण काय करणार?

जर ही वाटी घेऊन आलात (गुरुदेव एक अगदी छोटी वाटी उचलतात), आणि म्हणालात,'मला यामध्ये दोन लिटर दुध द्या', तर दोन लिटर दुध या छोट्याश्या वाटीत कसे मावेल? तुमची वाटी छोटी आहे आणि तुम्ही त्याच्या कितीतरी पटीने जास्त मागत आहात.

तुम्ही तीन लिटर क्षमता असलेले भांडे आणणे जरुरी आहे आणि मग मी तुम्हाला दोन लिटर किंवा तीन लिटर,तुम्हाला जितके पाहिजे तितके देऊ शकतो.

म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला जे मिळाले आहे ते तुमच्या क्षमतेनुसार मिळाले आहे, आणि जर तुम्हाला अजून पाहिजे असेल तर थांब ; तुमची क्षमता वाढवा. 

जेव्हा आपली क्षमता वाढते तेव्हा अजून जास्त नक्कीच आपल्या वाट्याला येते.

या कारणामुळेच लोक उदास असतात. ते छोटी वाटी घेऊन जातात आणि म्हणतात, 'यात मला एक लिटर दुध द्या'.

म्हणूनच आपल्याला हे माहिती असले पाहिजे.

हे पहा,जीवनात तुमच्या वाट्याला कटकटी येतात. 'अरे,हा माणूस काही कामाचा नाही', 'मी या लोकांबरोबर राहू शकत नाही,ते माझा अपमान करतात', असे विचार तुमच्या मनात येतात, आणि जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो. हो ना?

हात वर करून मला प्रामाणिकपणे सांगा,जेव्हा तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा या सगळ्याचा नाही का विचार करत- 'अरे,माझ्या नवऱ्याने असे केले तर बरे होईल', 'अरे,माझा मुलगा माझे ऐकत नाही'. शेजाऱ्यांचे, मित्र-मैत्रिणींचे, ओळखीच्या आणि अनोळखी लोकांचे विचार, सगळ्या बारीकसारीक कटकटी मनात येतात आणि त्यामुळे तुम्हाला संताप, हताशपणा आणि चिडचिड हे सर्व होते. तर मग अशी चिडचिड कश्याप्रकारे हाताळावी? 

समजा तुम्ही काही महत्वाचे काम करीत आहात आणि एक माशी येऊन तुमच्यावर बसली तर तुम्ही त्या माशीमुळे फार अस्वस्थ व्हाल का? नाही, एक साध्या क्षुल्लक माशीमुळे तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, तुम्ही त्या माशीला हलकेच उडवून लावाल.

या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे आहेत हे लक्षात घ्या.

ह्या लहानसहान कटकटी तुमच्यामध्ये स्वीकृती आणण्याचे काम करतात. चिडचिड म्हणजे अस्वीकार. अस्वीकार म्हणजे घट्ट आवळून धरलेली मुठ. स्वीकार करणे म्हणजे मुठ उघडणे होय.

चिडचिड म्हणजे ताठरता. तुम्ही जेव्हा चिडता तेव्हा तुम्हाला एकप्रकारची ताठरता नाही का जाणवत?

स्वीकारणे म्हणजे उघडणे, आणि जेव्हा तुम्ही तुमचा हात उघडता तेव्हा तुम्हाला आकाशसुद्धा ठेंगणे पडेल;सर्वकाही तुमच्यात आहे ( स्वतःच्या उघड्या हाताकडे निर्देश करतात). परंतु जेव्हा तुम्ही बंद असता (स्वतःच्या बंद मुठीकडे निर्देश करीत) तेव्हा त्यामध्ये काहीसुद्धा नसते.

म्हणून सोडून देणे महत्वाचे आहे.

'मी जर सोडून दिले तर मी कृती कशी काय करणार?' असा आता प्रश्न उपस्थित होईल. 

कोणी जर अन्याय करीत असेल आणि तुम्ही विचार कराल,' अरे, गुरुदेव स्वीकार करा असे म्हणाले आहेत, आणि म्हणून मी स्वीकार करतो'. चालणार नाही!

हे पहा, अग्नी आहे परंतु तुम्ही त्याला योग्य दिशा दिली पाहिजे.

चिडून काही कृती केल्याने मदत होणार नाही. सर्वप्रथम स्वीकार करा आणि मग नंतर योग्य कृती करा.

याकरिता भरपूर हिम्मत आणि धीरतेची गरज आहे.

अपमानित होणे ही अजून एक समस्या आहे.

मी तुम्हाला सांगतो की अपमान होणे फार चांगले आहे. अपमानामुळे तुमची क्षमता वाढते; त्यामुळे तुमचे भांडे अजून मोठे होते. अपमानामुळेच मी विरघळून जातो, तो अहंला पळवून लावतो आणि तुम्ही एका बालकाप्रमाणे होता.

तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लहान बालकाला अपमानित करू शकत नाही कारण लहान मुल हे पोकळ आणि रिकामे असते! परंतु जेव्हा आपण कोणीतरी बनतो,तेव्हा आपण आपल्याबद्दलच्या काही कल्पनांना घट्ट कवटाळून बसतो आणि मग आपल्याला वाटते ,'अरे हा तर अपमान आहे.'

कोणीतरी म्हणाले,'येऊ नको' ,किंवा 'असे करू नको', आणि या बारीकसारीक गोष्टींचा तुम्हाला त्रास होऊ लागतो.

म्हणूनच तर याला माया असे म्हटले आहे कारण या सर्व गोष्टी लक्ष देण्याच्या लायकीच्या नसतात, मन त्यात गुंतून पडते.

आणि जेव्हा तुम्ही म्हणता,' हेसुद्धा माझे नाहीये', तेव्हा ती महामाया असते; हा एक दैवी खेळ आहे. कारण तुम्ही मग त्याच्या सोबत लढू लागता, आणि लढल्यामुळे ते अजून वाढते. 'इकडे आड तिकडे विहीर', अशी ही परिस्थिती होते. तुम्ही यात अजून खोलवर अडकत जाता. 

म्हणून तुम्ही अपमानापासून लाजू नका. जर अपमान झाला तर तो तपसचा एक प्रकार समजा. (तपस म्हणजे ताप. हिंदुत्वामध्ये याला उपमेच्या दृष्टीने वापरले आहे. त्याचा अर्थ अध्यात्मीक कष्ट, शिक्षा किंवा अनुशासन होय)

'ठीक आहे हे तपस आहे. मी हे सहन करेन. मी याचा स्वीकार करतो'.

तपस तुम्हाला अधिक बलवान आणि अधिक सुंदर बनवते.

'ज्ञानमपी चेतनसी देवी भगवती हि सा,बलदक्रीशय मोहय महामाया प्रयछती' असे म्हणूनच म्हंटले आहे.

दुर्गा सप्तशती जी आपण काल गायलो त्यात हेच लिहिले आहे.

मायेची आणि अज्ञानाची शक्ती इतकी जास्त आहे की सर्वात शहाणे लोक आणि महान बुद्धिवान लोकसुद्धा तिच्या तावडीतून वाचू शकत नाही. ती सर्वाना नाचवते आणि असे म्हंटले आहे,'हे माझ्या प्रिय जगन्माते, तू आम्हाला या मनाच्या भ्रमाच्या खेळत खेळवत आहेस'. 

आपण क्षुल्लक गोष्टीना अतिशय महत्व देतो. आपण क्षणभंगुर आणि नश्वर गोष्टी ज्या राहणार नाहीत अशा गोष्टीना महत्व देतो. त्या सर्व गोष्टी संपून जातात आणि निघून जातात. म्हणूनच त्याला महामाया म्हटले आहे.

तुम्हाला माहिती आहे काल मी म्हणालो, ' या देवी सर्व भुतेशु भ्रांतीरूपेणसंस्थिता नमसतस्येनमो नमः' चैतन्य हे केवळ शांती रुपात किंवा शक्ती रुपात उपस्थित नाहीये तर ते भ्रमरुपात सुद्धा उपस्थित आहे. ते भूक , द्वंद , भ्रम यातदेखील हजर आहे आणि ही सर्व त्याचीच रूपे आहेत. जेव्हा तुमच्या हे लक्षात येते तेव्हा तुम्ही मनाच्या खेळाकडे बघून हसता.

आणि मग आता जेव्हा तुमचे कोते मन खेळ करू लागते तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एकरूप होत नाही,तुम्ही त्याच्या पलीकडे जाता आणि तिथेच तुम्हाला मिळते चिरशांती (कायमची शांतता). मन संपूर्णपणे शांत असते आणि अविचलीत असते.

हे जीवनात असण्यायोग्य आहे, आणि केवळ यासाठीच या सर्व आशीर्वादांची आवशक्यता आहे.

आज आपण ॠषी होम केला. कित्येक युगांपासून भूतकाळातील संतांनी हे ज्ञान जपून ठेवले आहे.

परंपरेनुसार ॠषी पराशर (ॠग वेद काळातील महर्षी आणि अनेक प्राचीन भारतीय लेखांचे लेखक) यांची तर या सर्व पूजा ही खासियत होती.

गुरु पूजेमध्ये आपण नारायणं पद्म भावं वशिष्ठं शक्तिं च तत पुत्र पराशरं च असे म्हणतो. 

ॠषी पराशर  हे संत परंपरेतील पाचवे संत आहेत. त्यांनी पुजांद्वारा प्रेम आणि भक्ती व्यक्त करणे यावर जास्त भर दिला-पूजादिषु अनुराग इति परशराय.

आजसुद्धा आयुध पूजा केली जाते. ती करण्यामागचे कारण असे की आपण वापरत असलेल्या सर्व यंत्रांचा बहुमान करायचा.

जर तुम्ही उद्या शहरात गेलात तर तुम्हाला दिसेल की सगळ्या बसेसना चंदनाचे गंध,हळद कुंकू आणि फुले लावलेले दिसेल. लोक आपापल्या गाड्यांना सजवतील.

याचा अर्थ असा की बारीक टाचणी असो वा मोठा खांब सर्व ठिकाणी देवाचा वास आहे आणि म्हणून सगळ्या यंत्रांचा बहुमान केला जातो. पिना,चाकू,कात्री,स्क्रू ड्रायव्हर,पान्हा, आणि अशासारख्या छोट्या वस्तू यांचे पूजन केले जाते आणि असे म्हंटले जाते की जगन्मातेचा वास या सर्व वस्तूंमध्ये आहे आणि म्हणून आपण त्यांचे पूजन केले पाहिजे. तुम्ही बघाल की वर्षातून एकदा कारखान्यातील सगळ्या यंत्रांची साफसफाई केली जाते. लोक आज यंत्रांचा बहुमान करून यंत्रे,गाड्या,बसेस आणि सगळ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतील कारण दिव्यता सगळीकडे सगळ्यांमध्ये आहे.

आयुध पूजा  ही नवरात्रीच्या नवव्या दिवशी केली जाते.

उद्या विजयादशमी , विजयाचा दिवस आहे.

म्हणून जेव्हा माया मनाचा ताबा घेते तेव्हा ही केवळ मनाची माया आहे असे जागरूक व्हा. हे तर केवळ मन आहे जे गोल गोल फिरत आहे आणि या सगळ्या गोष्टी करत आहे. फक्त ते सोडून द्या. नवरात्रीचा हाच तर मुख्य संदेश आहे.

उलटे असलेले झाड!

10
2012
Oct
बंगलोर, भारत
प्रश्न : गुरुदेव, गीतेतील १५ व्या अध्यायामध्ये एका उलट्या झाडाचे वर्णन आहे. फांद्या जमिनीमध्ये आणि मुळे आकाशाकडे. याचे महत्व कृपा करून समजवाल का?

श्री श्री : तुमचे उत्त्पतीस्थान हे ईश्वरीय आहे, तुमची चेतना याचे ते प्रतीक आहे. ते तुमचे मूळ आहे. मन आणि त्याचा सगळा फाफट पसारा हे फांद्याप्रमाणे आहे. आणि जीवनातील सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लयी, निरनिराळ्या भावना, इ.इ. या पानांप्रमाणे आहेत. त्या कायम राहत नाहीत,त्या कालांतराने गळून जातात.

म्हणून जर तुम्ही पानांवर लक्ष केंद्रित केले, आणि मुळांना पाणी घालयला विसरलात, तर मग झाड तग धरून राहणार नाही.

म्हणून "अश्वत्थेनं सुविरुढमुलं असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा" (भगवद्गीता गीता, अध्याय १५, श्लोक ३) असे म्हटलेले आहे.

या वेगवेगळ्या भावना,हे जीवनाचे निरनिराळे स्वरूप हे तुम्ही नाही, हे लक्षात घ्या. म्हणून ते तसे म्हंटले आहे.

नाहीतर आपण वरपांगी रंगात इतके रंगून जातो की आपल्याला मुख्य मुळाचा विसर पडतो. या झाडाला वेळोवेळी छाटणे जरुरी आहे नाहीतर तो अस्ताव्यस्त वाढत जातो. तर ते सर्व छाटून टाका आणि तुमचे मूळ कुठेतरी वर आहे हे माहित करून घ्या.

"सुरमंदिरतरूमुलानिवासहसय्या भूतलामजीनं वासः सर्वपरीग्रह भोगत्यागः कस्य सुखं न करोति विरागः" असे आदिशांकाराचार्य यांनी फार सुंदरपणे म्हंटले आहे.

ते म्हणतात,"माझी मूळ जागा ही स्वर्गात आहे,मी इथे थोड्या दिवसांकारीतच आलेलो आहे; केवळ मौजमजा करायला.आज मी केवळ आराम करण्याच्या उद्देशाने आलो आहे, परंतु ही माझी आदिम जागा नाही, ती दुसरीकडे कुठेतरी आहे". माझे घर दुसरीकडे कुठेतरी आहे,मी इथे केवळ भेट देण्याकरिता आलो आहे- हा केवळ विचार तुमच्यामध्ये अंतर निर्माण करते.

हे जग एक प्रतीक्षालय आहे.

तुम्हाला माहिती आहे विमानतळ आणि रेल्वेस्थानक यावर अशी प्रतीक्षालये असतात, आणि प्रतीक्षालयामध्ये तुम्ही काय करता?

तुम्ही तुमचे सामान ठेवता आणि खायला बसता. तुम्ही तिथले स्नानगृह आणि बाकीचे वापरता, परंतु तुम्ही तुमचे सामान उघडत नाही आणि सगळीकडे तुमचे कपडे लटकवून ठेवायला सुरुवात करीत नाही. असे तुम्ही प्रतीक्षालयात करीत नाही. तुम्ही तुमचे सामान बांधलेलेच ठेवता.

त्याचप्रमाणे हे जग एक प्रतीक्षालय आहे. याला आपले घर समजायची चूक करू नका.

प्रश्न : माझ्या मुलाला पाच वर्षांपूर्वी द्वीध्रुवीय असल्याचे निदान झाले. तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मी प्रत्येक क्षणाला त्याचे दुःख अनुभवते आहे. ह्या आधी मी अतिशय आनंदी महिला होते परंतु आता मी १५० मिलीग्राम निराशा-निवारक गोळ्यांवर आहे. आता, मला तुम्ही खात्रीपूर्वक सांगा की टोकाची निराशा यासारखा आजार किंवा असाध्य दुर्धर व्याधी ग्रस्त करणार नाहीत.

श्री श्री : होय, मी तुमच्या वेदना समजू शकतो.

कित्येक वेळा थोडीशी निराशा येते आणि तेव्हा व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर औषध दिले जाते आणि त्याने अवस्था वाईट होते. मी असे होताना पहिले आहे.

छोटीशी निराशा ही टोकाच्या निराशेमध्ये बदलते आणि मग ते अशा व्यक्तींना 'लीथीयम' सारख्या औषधावर ठेवतात. या मुद्द्यावर संपूर्ण वैद्यक पेशामध्ये इतका प्रचंड गोंधळ आहे. म्हणूनच मानसिक आरोग्य इतके महत्वाचे असते.

इथे असलेल्या सगळ्यांनी आपल्या मुलांना आणि आपल्या मित्रांच्या मुलांना आर्ट एक्ष्सेल (Art Excel) , येस(YES) आणि येस+ (YES+) या कार्यक्रमांमध्ये घालावे. कसेही करून त्यांना प्राणायाम आणि ध्यान करायला लावा.

हे कसे होते ते तुम्हाला माहिती आहे? सर्वात आधी मनामध्ये थोडा तणाव असतो, आणि मग तो मोठा व्हायला लागतो आणि तो मोठा होतच जातो आणि मग तो इतका मोठा होतो की तो मेंदूमधील सर्व महत्वाच्या जोडण्या उडवून टाकतो. अशाप्रकारे सर्व सुरु होते.

आपण याची काळजी फार आधीच्या टप्प्यावर घेणे जरुरी आहे. आजार रोखणे हे आजारावरच्या इलाजापेक्षा कधीही चांगले. आणि हे रोखण्याकरिता तुम्हाला तुमच्या मुलांना आनंदी ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांच्या आतील नकारात्मकता आणि नकारात्मक भावना यांना योग्य पद्धतीने हाताळावयास शिकवायला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे.

प्रश्न : गुरुदेव, अष्टलक्ष्मी पैकी विजयलक्ष्मी एक आहे. तुम्ही म्हणालात की आपल्याला विजयलक्ष्मी ची गरज आहे. काहीही जिंकण्याची किंवा कशातही यशस्वी होण्याची ती उर्जा आहे. याबाबत कृपा करून अधिक विवरण कराल का?

श्री श्री : मला वाटते की मी आठ लक्ष्मींबद्दल बरेच बोललो. ज्ञानी लोक कशाचेही जास्त विवरण देत नाहीत.ते सार कळण्याकरिता केवळ काही खुण, संकेत देतात.

असे म्हणतात, 'अल्पाक्षरं असंधीग्धं सर-वत विश्वतो-मुखं.'

अल्पाक्षरं चा अर्थ आहे केवळ थोडे शब्द.

सूत्रे ही अशीच आहेत, त्यात सार आहे आणि ती बहुमितीय आहेत. त्यात अनेक मिती आहेत. आणि ज्ञानी लोकसुद्धा असाच संवाद साधतात,केवळ अल्प शब्दांनी.

जे कमी ज्ञानी आहेत तेच फक्त उगाचच मोठेच्या मोठे लांबलचक स्पष्टीकरण देतात.

तुम्ही वाचता त्या पुस्तकातदेखील हेच असते, पाना मागून पाने लांबण लावणे चालू असते. मी तुम्हाला सांगतो की त्यांना केवळ एकाच ओळ लिहायला पाहिजे. इतकेच बस्स आहे! 

सगळ्या प्राचीन ऋषींनी हेच तर सांगितले आहे.

'हेयं दुःखं अनागतं', एवढेच आणि संपले.

'तदा द्रस्तुः स्वरूपे वास्थानां', झाले!

प्रश्न : गुरुदेव, प्रेमावस्थेत असणे हे साक्षात्कारापेक्षाही महान आहे का?

श्री श्री : वरचे आणि खालचे हे सर्व आधीच विरून जाते.

वरची पातळी आणि खालची पातळी असे काही नसते, ती शिडी कधीच अदृश्य होऊन जाते. अशी कल्पना करा की तुम्ही अंतराळात, विश्वामध्ये आहात. तिथे वर कुठे आणि खाली कुठे? पूर्व कुठे आणि पश्चिम कुठे? तिथे काहीच नाही. काही वरचे आणि खालचे नाही.

प्रश्न : तुमच्याकडून इतक्या ज्ञानाची प्राप्ती करूनसुद्धा मी ते पूर्णपणे जगू शकत नाही?

श्री श्री : तुम्ही ते ज्ञान थोडेफार जरी जगलात तरीदेखील मी आनंदी होईन. इतके करणेसुद्धा बस्स आहे. तुम्ही इंच इंचांनी पुढे व्हाल.

प्रश्न : गुरुदेव, घरात पिंपळाचे (बोधी वृक्ष) असणे शुभ आहे का?

श्री श्री : होय,ते अतिशय चांगले आणि फारच शुभ आहे. तुमच्या घरासमोर बोधी वृक्ष असणे म्हणजे देव स्वतः तिथे उभा आहे असे झाले.

म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 'झाडांमध्ये, मी अश्वत्थ (पिंपळाचे झाड किंवा बोधी वृक्ष)आहे'.

बोधी वृक्ष इतका महत्वाचा आहे कारण तो दिवसाचे २४ तास केवळ प्राणवायूच देतो. म्हणून हे झाड घरासमोर असणे अतिशय चांगले आहे.

काही लोक असे आहेत जे म्हणतात की घरासमोर चिंचेचे झाड असणे चांगले नाही. त्यामुळे कोणत्याप्रकारच्या लहरी निर्माण होतात, मला ते माहित नाही परंतु असे म्हंटले जाते.

आता जर तुमच्या घरासमोर चिंचेचे झाड असेल तर मी तर म्हणेन की ते तोडायला जाऊ नका, फक्त त्याच्या आजूबाजूला दुसरी झाडे लावा.

प्रश्न : गुरुदेव, भावना कुठून उगम पावतात? त्या शरीर आहेत का मन?

श्री श्री : भावना मनात असतात, परंतु त्यांच्याशी सलग्न संप्रेरक (हार्मोन) किंवा संवेदना शरीरात असतात. म्हणून ते दोहोंचे मिश्रण आहे.

जेव्हा एड्रनलीन ग्रंथी वेगाने काम करीत असते तेव्हा तुम्ही भीती आणि चलबिचल अनुभवता. तशा भावना वेगाने वाढू लागतात.

तर वेगवेगळी संप्रेरके अथवा ग्रंथी आपल्या भावनांवर वेगळे परिणाम करतात. तर हे पण नाही आणि तेसुद्धा नाही,तर सगळे एकत्र.

प्रश्न : गुरुदेव, एका साधकासाठी चांगल्या संगतीचे काय महत्व आहे? आणि अशी चांगली संगत उपलब्ध नसेल तर एखाद्याने काय करावे?

श्री श्री : जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सामर्थ्यवान आहात आणि तुम्ही तुमचा प्रभाव तुमच्या संगतीवर पाडू शकता तर त्यांच्यात बदल घडवून आणा. त्यांना तुमच्यासारखे बनवा. परंतु तुमच्यात तेवढी ताकद नसेल तर मग वाईट संगतीपासून दूर राहा. ते करण्याकरिता तुम्ही मोकळे आहात.

पंचमुखी नागाचे महत्व

11
2012
Oct
बंगलोर, भारत



तुम्ही जर पौराणिक चित्रांकडे पाहिले, तर तुम्हाला लक्षात येईल कि भगवान महावीर हे पंचमुखी नागाच्या फण्याखाली बसलेले दिसतील, किंवा भगवान विष्णू ध्यान करायला बसलेले आहेत आणि त्यांच्या मागे नाग आहे. काही

ऋषींच्या चित्रांमध्ये सुद्धा तुम्हाला फणा काढलेले नाग दिसतील.

तुम्ही असे चित्रे पाहिले आहेत का?

हे खूप मार्मिक आहे.

पहा, तुम्ही ध्यान करायला बसल्यावर काय होते? तुमची चेतना जागृत होत असते, जणू तुमच्या मागे हजार उभा मुखाचा नाग आहे. नाग हे सतर्कतेचे चिन्ह आहे.

तुमच्या पैकी किती जणांना, ध्यान करत असताना, मस्तकाच्या मागील बाजूस सतर्कता जाणवते? एक प्रकारची सजगता!

म्हणून नाग हे एका आच्छादित नसलेल्या उर्जेचे चिन्ह आहे, एक अशी उर्जा कि जी सतर्कता परंतु विश्राम किंवा आराम स्थितीत असलेली.

त्यांच्यामागे खरोखरिचा नाग नसून, नाग हा पूर्ण आराम आणि जागृत राहणे याचे प्रतीक आहे ज्याला आपण ध्यान म्हणतो – पूर्ण आराम, इच्छाहीन, काहीही श्रम न करता, अभाव पूर्ण, जणू नागाच्या फण्यासारखे; श्रम न करता जागृत राहणे.

ह्याचे दोन प्रकाराने वर्णन केले गेले आहेत. एका प्रकारात ते नागा विषयी सांगतात आणि दुसऱ्या प्रकारात फुलांबद्दल. जणू हजारो पाकळ्यांचे कमळ मुकुट चक्रावर उमलत आहे. 

काहीजण त्याचे फुलांसारखे वर्णन करतात म्हणजे नाजुकता, तर काहीजण नागासारखे, म्हणजे सतर्कता. ते दोन्ही चपखल आहेत.

आता तुम्हाला जर तसे वाटत नसेल याचा अर्थ म्हणजे तुम्ही खूप अन्न ग्रहण केले आहे. तुम्हाला अशावेळी नाग दिसणारच नाही, तुम्हाला फक्त म्हैसच दिसेल, कारण तुम्ही खूप अन्न ग्रहण केल्याने तुम्हाला आळस आलेला आहे. त्यामुळेच ते जगभर सर्वजण उपवास आणि प्रार्थना; उपवास आणि ध्यान या बाबतीत बोलत असतात.

त्याचवेळी असे लक्षात ठेवा कि तुम्ही खूप उपवास पण चांगले नाहीत. काहीजण दिवसभर उपवास करतात आणि रात्री खूप अन्न ग्रहण करतात. जे चांगले नाही. उपवास करण्याचे काही नियम आहेत त्याचे आपण अनुसरण केले पाहिजे.

उपवास कसा करावा हे आपल्याला निसर्गोपचार तज्ञ आणि वैद्य चांगल्या पद्धतीने सांगू शकतील.

नवरात्रीत आपण उपवास करतो पण उपवासाच्या नावाखाली आपण मेजवानी खातो.

लोक म्हणतात. “ आम्ही कडधान्य खात नाही, फक्त बटाटा खातो. ”, आणि बाहेर जावून ते फ्रेंच फ्राईझ आणि बाकी सर्व खातात.

“तांदूळ खाणार नाही असे म्हणतात आणि ते इडली खातात”.

ही फसवणूक आहे. मी तुम्हाला सांगतो उपवास करणे म्हणजे पुरी हलवा खाणे नाही. ही उपवास करण्याची चुकीची पद्धत आहे. असा उपवास तुम्ही करू नका.

अल्पाहार मित आहार – सोप्या रीतीने पचेल असे थोडे अन्न खावे.

हा सुद्धा एक प्रकारचा उपवासच आहे. थोडे फळे आणि पाणी ग्रहण करणे.

ज्या वेळेस शरीर जड आणि आळशी नसेल त्यावेळेस ते बहरेल आणि तुम्ही ध्यान छान प्रकारे करू शकाल. जास्त उपवास केल्याने तुमचे पित्त वाढते आणि तुम्ही ध्यान करू शकत नाही. त्यामुळेच जास्त पाणी पिल्याने तुमचे पित्त वाढत नाही.

प्रश्न: गुरुदेव, भगवान विष्णू आणि भगवान शिव याच्यामध्ये काही फरक नसला तरी कुणापासून कुणाचा उगम झाला आहे? विष्णू पुराणात भगवान विष्णूचे उदात्तीकरण केले आहे आणि शिवा पुराणात भगवान शिव चे.

श्री श्री : कुणापासून कुणाचा उगम झाला असा विचार तुम्ही केला तर तो एकरेषीय ठरेल. सत्य हे एकरेषीय नसून गोलाकार आहे.

म्हणूनच आपण म्हणत असतो हे पण खरे आहे आणि ते पण खरे आहे. आपण कुठे हि पाहिले तर आपल्याला त्याचे उगम स्थान दिसेल.

तुम्ही या बाजूने पाहिले तर तुम्हाला सत्य दिसेल, तुम्ही कुठल्याही बाजूने पाहिले तरी तुम्हाला सत्यच दिसेल.

तुम्ही कुठून सुरुवात करता आणि कुठे जाता याच्यावर ते अवलंबून आहे.

भगवान शिव आणि भगवान विष्णू वेगळे आहेत, पण ते एकच आहेत.

प्रश्न: अष्टवक्र गीते मध्ये असे म्हटले आहे, “तुम्ही धर्म ग्रंथ वाचत रहा, पण तुम्हाला मुक्ती ही धर्मग्रंथ बाबतचे विचार सोडल्यावर मिळेल’. मग धर्मग्रंथ वाचून काय उपयोग?

श्री श्री : हे पहा, तुम्ही ज्या वेळेस एका बस मध्ये बसता काही काळाने तुम्हाला ती बस सोडावीच लागते. तुम्ही जर माझ्याबरोबर वाद सुरु केला कि, “ मला जर बस सोडायची असेल तर मी बस मध्ये कशाला बसू?” तुम्ही बस मध्ये एका ठिकाणाहून बसता आणि कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी उतरता.

जर तुम्हाला बस मधून उतरायचे असेल तर तुम्ही बस मध्ये चढता कशाला, ह्या वादाला काही अर्थ नाही.

धर्मग्रंथ तुम्हाला तुमच्या स्वभावाची ओळख करून देतात, या सृष्टीची ओळख करून देतात, तुमच्या मनाची ओळख करून देतात कि जे छोट्या छोट्या इच्छा मध्ये अडकलेले आहे आणि तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा एक मोठा दृष्टीकोन देतात.

ज्ञान हे साबणा सारखे आहे. पहा, तुम्ही शरीराला साबण लावता पण काही वेळाने तुम्ही ते धुवून टाकता, हो कि नाही?!

त्याचप्रमाणे, ‘मला मुक्ती पाहिजे’ ही तुमची इच्छा असते आणि या इच्छेमुळे तुम्ही बाकीच्या छोट्या इच्छा पासून दुरावले जाता. जर तुम्ही त्याच इच्छेला धरून राहिलात तर कालांतराने ती पण एक मोठी समस्या होईल. तुम्ही त्याचा त्याग करून मुक्त झाले पाहिजे. 

‘मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे’, असे म्हणत राहिल्याने मुक्ती मिळत नाही. तुम्ही जर छोट्या इच्छे पासून मुक्त असाल तर ती इच्छा आवश्यक आहे. मग एक असा क्षण येईल तुम्ही म्हणाल, ‘ मला जर मुक्ती मिळायची असेल तर ती मिळून जाईल’.

त्या क्षणी तुम्ही मुक्त असाल.

प्रश्न: गुरुदेव, महालय अमावस्येचे महत्व काय आहे?

श्री श्री : हि अमावस्या तसे पाहता मृत आत्म्यांसाठी राखीव आहे. तुमचा आत्मा ज्यावेळेस हे शरीर सोडतो त्यावेळेस काही देवदूत त्याला दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग दाखवितात. पुरुरावा, विश्वेदेवा हि त्यांची नावे. ते येतात आणि तुम्हाला एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर जाण्यास मदत करतात.

महालय अमावस्या म्हणजे सर्व मृत आत्म्यांना स्मरण करून त्यांचे आभार मानून, त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो हि प्रार्थना करणे.

एक पूर्वीची प्रथा आहे ज्यामध्ये कुटुंबातील लोक तीळ आणि तांदूळ घेतात आणि आपल्या पूर्वजांना स्मरण करून ते म्हणतात, ‘ तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला शांती लाभो, तुमच्या आत्म्याला शांती लाभो ‘. असे तीन वेळा म्हणून ते तीळ पाण्यात सोडतात.

या विधीचे महत्व म्हणजे कि आपण जणू काही पूर्वजांच्या आत्म्याला सांगतो कि – तुमच्या मनात अजूनहि काही इच्छा असतील तर त्या या तीळ सारख्या आहेत. त्या इच्छा महत्वाच्या नाहीत, तुम्ही त्या विसरून जा. तुमच्यासाठी आम्ही त्याची काळजी घेवू. तुम्ही आनंदी रहा, तृप्त व्हा! तुमच्या पुढे सर्व सृष्टी आहे. हि सृष्टी अनंत आहे, तुम्ही पुढे जात रहा; तुमच्या सर्व इच्छा विसरून जा.

यालाच तर्पण असे म्हणतात.

तर्पण म्हणजे पूर्वजांच्या आत्म्यांना कृतार्थता दर्शविणे आणि समाधान करणे. तुम्ही तृप्त रहा आणि पुढे जात रहा हे सांगण्यासाठी हे केले जाते.

पाणी हे प्रेमाचे प्रतिक आहे. पाणी देणे म्हणजे प्रेम देण्यासारखे आहे. 

संस्कृत मध्ये अप म्हणजे पाणी आणि प्रेम सुद्धा होतो. आपल्या प्रिय व्यक्तींना संस्कृत मध्ये आप्त असे संबोधले जाते.

म्हणून त्यांना स्मरून तुम्ही त्यांना पाणी देता जे प्रेमाचे आणि जीवनाचे प्रतिक आहे म्हणूनच त्याला महालय अमावस्या म्हटले जाते.

या दिवशी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करा.

वेदिक परंपरेनुसार, मातापित्याचे तीन पिढ्यांपर्यंत स्मरण केले जाते आणि आपले सर्व आप्त मित्र, नातेवाईक आणि सर्व जे आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांना स्मरण करून त्यांना विनंती केली जाते कि तुम्ही तृप्त आणि समाधानी रहा.

त्यांच्या स्मरणार्थ काहीजण अन्नदान करतात.

हे जगातील सर्व संस्कृती मध्ये केले जाते. मेक्सिको ची जनता हे मानते हे पाहून मला आश्चर्य वाटले. मेक्सिको मधील जनता प्रत्येक वर्षी २ नोव्हेंबर ला आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात.

त्याचप्रमाणे हे चीन मध्ये हि मानतात. चायनीज संस्कृती मध्ये एक दिवस असा असतो ज्या दिवशी ते आपल्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना जे काही प्रिय आहे ते त्यांना अर्पण करतात.

सिंगापूर मध्येही हे मानले जाते. जरी सिंगापूर हे स्वच्छ शहर असले तरी वर्षातून एकदा काही तासांसाठी ते अस्वच्छ असते कारण तेथील जनता रस्त्यांवरच हे कार्य करतात. तुम्हाला माहीत आहे ते काय करतात? ते कार्ड बोर्ड चे मोठे घर आणि गाड्या बनवितात आणि ते रस्त्यांवरच जाळतात, ते सर्व पुर्वजांपर्यंत पोहचेल असे ते मानतात. ते खोटे मुद्रांक विकत घेतात आणि ते जाळतात, ते असे मानतात कि हे सर्व पुर्वजांपर्यंत पोहचले कि ते त्यांना आशिर्वाद देतात.

पिढ्यानपिढ्या जगात सर्वत्र हे मानत आले आहेत.

ख्रिस्ती धर्मात सुद्धा All Saints’ Day म्हणून एक दिवस असतो ज्या दिवशी सर्व आपल्या पुर्वजांचे स्मरण करतात. या दिवशी ते स्मशान भूमीत जावून प्रार्थना करतात.

या प्रार्थने मुळे आपल्याला सुद्धा कळते कि हे जीवन अस्थायी आहे, हे सर्व जण कितेक वर्षे इथे राहिले आहेत आणि आपल्याला सोडून गेले. आपण या जगात आलो आहोत आणि एक दिवस आपणही हे सर्व सोडून जाणार आहोत. म्हणून आपण त्यांचे स्मरण करून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. भारता मध्ये ह्या रुढीसाठीचे मंत्र संस्कृत मध्ये आहेत त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. पंडित जे सांगतील ते आपण विश्वासाने करतो. हे चुकीचे नाही पण जर त्या विषयी ज्ञान असणे आवश्यक आहे.

प्रश्न: गुरुदेव, मातापिता किंवा पूर्वज यांच्या कर्माचा आपल्यावर काही प्रभाव होतो का? त्यांच्या वाईट कर्मामुळे आपल्याला शिक्षा होते का?

श्री श्री : ऐका, जर तुमचे पूर्वज तुमच्यासाठी घर ठेवून गेले असतील तर ते तुमच्या साठी वरदानच आहे नाही का? तुम्ही असे प्रश्न का विचारत आहात?

त्यांनी कष्ट करून पैसे मिळविले, त्यातून घर बांधले आणि तुमच्या साठी मागे ठेवून गेले. तुम्ही त्यांच्या चांगल्या कर्माचे उपभोग घेत आहात. हो कि नाही? आणि त्यांनी जर का तुमच्या डोक्यावर बँकेचे कर्ज ठेवून गेले असतील ज्याची तुम्हाला परत फेड करायची असेल तर ते तुमचे कर्म आहे. त्याचा साहजिकच तुमच्यावर परिणाम होईल. आई वडीलच नाही तर तुमच्या साथ संगतीचा पण तुमच्यावर परिणाम होतो.

तुमची संगत जर उदास व्यक्तींची असेल तर तुम्हाला पण उदास वाटेल. पण तुमची संगत जर आनंदी आणि अध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या व्यक्तींची असेल तर तुमचे कर्म सुधारेल.

या जगात चांगल्या किंवा वाईट कर्मापासून तुमची सुटका नाही. ते आपल्या बरोबर राहणार आहे, कारण एक वेळ अशी येईल कि आपल्याला आजारी व्यक्तींशी संपर्क साधावा लागेल. त्यावेळी तुम्ही असे म्हणू शकत नाही कि मला यांच्याशी बोलायचे नाही. जर असे सर्वानीच ठरविले तर सर्व रुग्ण आणि रुग्णालयाचे काय होईल?

या जगात आपण सर्वाशी चांगला व्यवहार केला पाहिजे त्यासाठी ज्ञान घेतले पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. म्हणूनच ज्ञान आणि सेवा यांना कवच म्हटले आहे.

ओम नम: शिवाय हा मंत्र जप केल्याने आपल्या भोवती चिलखत असल्यासारखे वाटते, म्हणून या मंत्राला कवच असे म्हटले आहे. तो आपल्याला वाईट कर्मापासून वाचवितो,

पण हा मंत्र २४ तास जाप करण्याची गरज नाही. जर तसे तुम्ही केले तर तुम्हाला कंटाळा येईल. दिवसातील काही मिनिटे, जसे तुम्ही दात घासता.

तुम्ही तुमचे दात प्रत्येक तासाला घासत नाही, हो कि नाही? जर तसे कोणी करत असेल तर त्याचे दात राहणार नाही, सर्व दात पडून जातील. आणि जर का तुम्ही दात घासलेच नाही तरी देखील ते पडून जातील.

ज्या प्रमाणे आपण आपल्या दातांचे आरोग्य जपतो त्याचप्रमाणे आपण आपले मानसिक आरोग्य जपले पाहिजे. थोडा वेळ ध्यान, मंत्रोपचार याची खूप मदत होते.

आपण अंघोळ थोड्यावेळच करतो, हो कि नाही?

सर्वानी पाणी वाचविले पाहिजे. जगात सर्वत्र पाण्याची फार कमतरता आहे, बंगलोर मध्ये सुद्धा. सर्व तळे सुके पडले आहेत आणि या वर्षी पाणी कमी आहे. म्हणून आपण सर्वानी पाणी जपून वापरावे. जितके जरुरी आहे तेवढेच वापरा.