28 April 2012


28
2012............................... Germany
April


शांती ही देवाच्या दिशेने जाणारी पहिली पायरी आहे

बॅड अँटागोस्त जर्मनी, 
२८ एप्रिल, २०१२
( प्रश्नांच्या टोपलीतील प्रश्न बघत बघत गुरुजी म्हणतात, )                                                        सुरवात करण्यासाठी एखादा चांगला प्रश्न शोधतोय. सगळे प्रश्न सारखेच आहेत. खरं म्हणजे जर बरोबर उत्तर ऐकले तर प्रत्येक प्रश्नाची एकच प्रतिक्रिया असते. जेव्हा बरोबर उत्तर मिळते तेव्हा तुम्ही काय म्हणता ? “ हो, मला पटतंय.” जर उत्तर बरोबर नसेल तर तुम्ही, “ हो, मला पटतंय.” असं म्हणू शकत नाही. तुम्ही म्हणाल, “ नाही, हे उत्तर बरोबर नाही.” पण जेव्हाही तुम्हाला बरोबर उत्तर मिळते तेव्हा तुम्ही काय म्हणता ? तुम्ही म्हणता, “ होय.” तर, प्रत्येक बरोबर उत्तर तुम्हाला होकाराकडेच नेते. पण जर प्रत्येक प्रश्नातून आणखी प्रश्न निर्माण होत राहिले तर मग तो न संपणारा प्रवास होऊन जातो. एका दृष्टीने ते चांगले आहे कारण तो बुद्धीला व्यायाम आहे पण त्या पलिकडे काही नाही. फक्त एक करमणूक आहे. पण मग प्रश्न अजिबात नसावे की काय? नाही, ते गरजेचे आहेत. बुद्धीला चालना मिळणे आवश्यक असते. बुद्धीमत्ता ही खूप महत्वाची आहे. अतिशय प्राचीन अशा भगवद्‌गीतेतही श्रीकृष्ण सगळे ज्ञान देतो आणि शेवटी म्हणतो, “ तू विचार कर, विश्लेषण कर आणि आणि मग ठरव तुझ्यासाठी सर्वात उत्तम काय आहे ते.” आणि मग तो म्हणतो, “पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्यासाठी जे उत्तम आहे तेच मी सागेन आणि मी सांगेन तेच तू निवडशील.” गुरु शिष्यातील हा संवाद खूपच रंजक आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी तो वाचायला हवा. आईन्स्टाईन सह जगातील श्रेष्ठ वैज्ञानिकांनी, तो वाचला आहे. आणि ते म्हणाले की त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले कारण प्रश्न विचारू नका असे त्यांना नेहमी सांगितले गेले होते. जात आणि धर्म म्हणजे नेहमी असेच मानण्यात आले आहे की , काहीही प्रश्न विचारू नका, फक्त आंधळेपणाने जसे सांगितले तसे करत रहा. पण योग, वेदांत तत्वज्ञानात असे सांगितलेले नाही. त्यात बुद्धीला दाबून टाकत नाहीत. त्यात असे म्हटले आहे की,” तुमची बुद्धी वापरा.पूर्णपणे वापरा.पण एवढे लक्षात ठेवा की बुद्धी म्हणजे सर्वस्व नाही. सत्य त्याच्याही पलिकडे आहे, एक पायरी पुढे. म्हणून बुद्धीमध्ये अडकू नका पण त्याचं वेळी बुद्धिमत्ता चमकू द्या. बुद्धीचे शमन केल्याने भक्ती आणि प्रेम हे बुद्धीच्या पलिकडे जाते. 
प्रश्न : बऱ्याच जणांच्या मनात लहानपणीच, त्यांचा कल डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक वगैरे बनण्याकडे आहे हे स्पष्ट असते. आणि ते त्याला धरून असतात. दुर्दैवाने मला तसे काही वाटत नाही. मी काही आता लहान नाही आणि मला अजूनही नेमकी दिशा न मिळाल्यामुळे भीती वाटते. मी काय करू ? 

श्री श्री रविशंकर: काळजी करू नका. आयुष्यात सगळे ठरलेले असते. जर तुम्हाला काय करावे ते कळत नसेल तर ध्यान करा आणि तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते करा.
मी तुम्हाला सांगतो, सर्व व्यवसाय सारखेच असतात. कोणताही व्यवसाय नसलेले लोक आनंदी असतात. डॉक्टरांचेच  बघा. ते किती त्रासात असतात पूर्ण आयुष्यभर त्यांना रुग्णांच्या सानिध्यात रहावे लागते. दिवसाचे पंधरा तास त्यांना रुग्णांसोबत रहावे लागते आणि त्यांचा त्रास ऐकून घ्यावा लागतो. आणि जरी त्यांना उपाय सांगितला तरी ते परत तोच प्रश्न विचारत राहतात. जर तुम्ही कुणाला सांगितले की तुम्हाला काहीही आजार झालेला नाही तरी ते तुमच्यावर रागावतात. तुमची तब्येत बरी असली तरी बऱ्याच डॉक्टरांना, “नाही, तुम्ही आजारी आहात असे म्हणावे लागते.” मग ते खुश होतात. आणि मग तुम्ही म्हणता की, “हं, हा डॉक्टर बरोबर आहे. त्याला माझा त्रास कळला. आणि त्याने तो अगदी बरोबर सांगितला.” डॉक्टरांची अवस्था सोपी नाही. ते सुट्टी घेऊन कुठे तरी निघून गेले असे होऊ शकत नाही. मध्यरात्री सुद्धा त्याना बोलावणे येऊ शकते. बहुतेक वेळा त्यांना अंदाज करून औषध द्यावे लागते आणि मग रात्रभर ते बेचैन असतात. हे या व्यवसायातलं गुपित आहे. तुमचं डोकं दुखत असलं तर ते तुम्हाला अॅस्प्रीन देतील पण कोणत्याही त्रासासाठी काय औषध द्यावे हे त्याना नेहमीच माहीत असते असे नाही. काही वेळा त्यांना अंदाज बांधावा लागतो. इंजिनियर लोकांचे बघा. रात्रंदिवस मशीन बरोबर काम करून ते मशीन सारखेच बनतात, असं तेच म्हणतात, मी म्हणत नाहिये. इंजिनियर लोक स्वत:च असं म्हणतात की, “ओह, किती कंटाळवाणे आहे, रात्रं दिवस मशीन, मशीन आणि मशीन.” त्यांच्या स्वप्नातसुद्धा त्याना मशीन दिसतात. ते गाड्यांच्या कारखान्यात काम करत असले तर त्याना स्वप्नात गाड्या दिसतात. गाड्यांमध्ये माणसे नसतानासुद्धा चालणारऱ्या गाड्या. इथे गाड्यांच्या कारखान्यात काम करणारा एक जण म्हणाला, “मला रोज फिरत्या पट्यावरून पुढे जाणाऱ्या गाड्या किंवा ट्रक् दिसतात. त्यात माणसे नसतात ! “. वकील, त्यांना तर त्यांच्या अवस्थेबद्दल बद्दल विचारायची सोय नाही. ते वाट बघत असतात की कुठे काय गडबड होते म्हणजे मग त्यांचा चरितार्थ चालेल. जर सगळे काही सुरळीत चालले असेल तर वकिलांचा चरितार्थ चालणार नाही. दोन भावात जर भांडण झाले तर वकील आनंदाने हसू लागतात. “त्यांनी माझ्याकडे यावं म्हणजे मी पैसे कमवू शकेन.” सुदैवाने त्याना जास्त विचार करावा लागत नाही कारण जगात भरपूर भांडणे चालू आहेत आणि सगळ्यांना त्यांच्याकडेच जावे लागते. ते म्हणतात, “या, मी तुमची समस्या सोडवतो.” पण ती पटकन सुटत नाही. ते त्याला पुढे पुढे ढकलत रहातात. कोणताही वकील खटला पटकन सोडवत नाहीत. कां सोडवतील? जितका जास्त दिवस खटला चालू रहातो तेवढे त्यांच्यासाठी बरे असते. दर वेळी हजर रहाण्याबद्दल ते त्यांच्या अशिलाला बिल लावू शकतात. खटला असाच हातातून जाऊ देण्याइतके ते मूर्ख नसतात. तुम्ही कोणताही व्यवसाय बघा, त्यात त्रुटी असतातच.                                                                         धार्मिक लोक, त्याची समस्या तर जास्तच कठीण आहे. रामायणात एक छान गोष्ट आहे. तुम्हाला गोष्ट ऐकायची आहे कां? एक भटका कुत्रा रस्त्यातून चालला होता आणि कुणीतरी त्याला दगड मारला आणि त्याचा पाठलाग केला. म्हणून मग तो कुत्रा न्यायालयात गेला. असे म्हणतात कि रामाच्या न्यायालयात सर्वांना न्याय मिळत असे, अगदी प्राण्यांना सुद्धा. कुत्रा म्हणाला की रस्ता सर्वांसाठी आहे. तो म्हणाला, “इथे कुठेही असे लिहिलेले नाही की या रस्त्यावर कुत्र्यांना परवानगी नाही. मी रस्त्यावर चालत होतो आणि या माणसाने मला मारले. तुम्ही त्याला शिक्षा करा.” मग श्रीरामाने त्या माणसाला विचारले की हे खरे आहे कां ? तो माणूस खोटे बोलू शकला नाही आणि कुत्र्याला मारल्याचे त्याने कबुल केले. त्याकाळी जो त्रासास बळी पडला असेल त्याला विचारले जायचे की दोषी व्यक्तीला काय शिक्षा द्यावी ? त्याप्रमाणे कुत्र्याला विचारले की त्याला दगडाने मारणाऱ्या माणसाला काय शिक्षा द्यावी ? तेव्हा तो म्हणाला, “ त्याला एखाद्या धार्मिक संस्थेचे मुख्यपद द्या. एखाद्या आश्रमाचा गुरु करा.” लोक म्हणाले ही तर अगदी विचित्र शिक्षा आहे. कुत्रा म्हणाला, “ विचारत काय बसलात ? मी सांगतो तसे करा. मी देखील माझ्या मागच्या जन्मात गुरु होतो आणि बघा काय झाले ? त्यावेळी मारायच्या आधी माझ्या मनात विचार आला की मी एक भटका कुत्रा असायला हवा होतो. गुरु होण्यापेक्षा ते जास्त बरे झाले असते. बघा, त्यामुळेच मी आता कुत्रा झालो आहे. मला किती त्रास होता. ह्याने सुद्धा आता आश्रमाचा मुख्य व्हायला हवे. मग त्याला कळेल की जीवनात त्रास म्हणजे काय, दु:ख म्हणजे काय आणि भोग म्हणजे काय ? अशी ही रामायणातली गमतीशीर गोष्ट आहे.’                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     
या जगातली प्रत्येक नोकरी, प्रत्येक व्यवसाय, प्रत्येक काम सोपं नाहिये. प्रत्येक व्यवसाय अवघड आहे. कोणचेही काम सोपे नाही. आणि एखद्या धार्मिक संस्थेचे मुख्य होणे तर अजूनच वाईट कारण तुम्हाला सर्वांचीच काळजी घ्यायची असते. जर तुम्ही एखाद्या माणसाकडे बघितले नाही तर तो तक्रार करतो की तुम्ही माझ्याकडे बघितले नाही. काल तुम्ही मला दु:खी केलेत. तुम्ही सर्वांना आनंदी करायला आला आहात पण त्यात तुम्ही कुणालातरी दु:खी केलेत. जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघत असता तेव्हा ते दुसरीकडे बघत असतात आणि जेव्हा ते तुमच्याकडे बघत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघावे असे त्याना वाटत असते नाहीतर ते दु:खी होतात. काय करावं? आणि तंत्रज्ञानाने तर ते आणखीनच बिघडवल आहे. तुम्हाला माहीत आहे मला किती इमेल आलेत ? मागच्या दोन आठवड्यात जवळ जवळ १,०१,०००. प्रत्येक आठवड्यात जवळ जवळ १०,००० इमेल येतात. आणि मला ते बघावे लागतात. कधी ८,००० तर कधी २,००० पण ते सगळे साठत जातात. त्यामुळे कोणताही व्यवसाय असला तरी काळजी करू नका. सगळे व्यवसाय सारखेच असतात. तुम्हाला जगण्यासाठी योग्य अशी नोकरी बघा. तुम्हाला अति हावरटपणा करायची गरज नाही आणि तुम्हाला अभाव असल्याचेही जाणवायला नको. आपल्या मनात, आपल्या अंत:करणात सुबत्ता असायला हवी. पैसा ही अशी गोष्ट आहे जी कधीच पुरेशी नसते. अब्जाधीश लोकही विचार करत असतात की त्यांचे पैसे कसे वाढतील, दुपटीने की तिपटीने. ही स्पर्धा कधीच संपत नाही.                  
मी ह्या वर्षी दावोस मध्ये गेलो होतो आणि तिथे सगळे अब्जाधीश लोक होते. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर बघीतले तर अजिबात तृप्ती नाही, आनंद नाही किंवा समाधान नाही. पावित्र्य नाही, उन्नतीचा भाव नाही. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय ? छोट्या झोपडीतही तुम्हाला हसू दिसेल पण एका महालात ते तुम्हाला दिसणार नाही. महालात कदाचित तुम्हाला शांत मनही दिसणार नाही. 

प्रश्न : आमची वाईट कर्म कशी पुसून टाकावी? मी स्वत:बद्दल खुपच विचार करतो. मी स्वत:वर प्रेम कसे करू ?
श्री श्री रविशंकर: भगवत गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही तुमचे कर्म पुसून टाकू शकत नाहीत. तुमच्यासाठी ते मी करेन. तुम्ही तुमच्या वाईट कर्माची चिंता करू नका, तुम्ही फक्त तुमचे काम करत रहा. भूतकाळातील तुमची वाईट कर्म पसून टाकण्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही ज्ञानात राहिलात, सत्संगात असलात, ध्यान करत असलात, सुदर्शन क्रिया करत असलात की ती आपोआप पुसली जातील. ह्या सर्व गोष्टी तुम्ही कां करतां ? तर ह्या सर्वामुळे तुमची वाईट कर्म पुसली जातील. वाईट कर्म म्हणजे काय ? तुमच्या मनावर, आत्म्यावर झालेले वाईट संस्कार. तरीही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही म्हणू शकता, ” गुरुजी माझ्या सगळ्या काळज्या मी तुम्हाला देतो. कृपया त्यांची काळजी घ्या. आणि मग ते सगळे निघून जाईल ? 

प्रश्न : तुमच्यात इतकी करुणा कशी काय आहे ? मी परत परत  त्याच त्याच चुका करून तुमचा अपमान केला आहे तरी तुम्ही माझ्यावर रागवत कसे नाही. मला माझीच घृणा वाटू लागली आहे.
श्री श्री रवीशंकर : काळजी करू नका. जे होऊन गेले त्याच्याबद्दल विचार करत बसू नका. तुम्हाला माहीत आहे , लहान मूल जेव्हा चालायला शिकते तेव्हा अनेक वेळा पडते. दहा वेळा पडला तरीपण तो उभे रहायचे सोडत नाही. उभे रहायला येईपर्यंत तो प्रयत्न करत रहातो.
तर मला तुम्हाला हे सांगायचे आहे की, तुमचं खूप चांगलं चाललं आहे. चालू राहू द्या. तुम्हाला निदान चुकल्याच दु:ख तरी आहे. ते तुमचा वारंवार चुका करण्यापासून बचाव करेल. 
तुम्ही चुका कां करता माहीत आहे कां ? कारण तुम्हाला वाटते की त्यापासून तुम्हाला काहीतरी आनंद मिळतोय. नशा करणे, मद्यपान करणे, सिगारेट ओढणे हे वाईट आणि घातक असते तरी तुम्ही ते करता, कां ? कारण तुम्हाला वाटते की त्यापासून तुम्हाला आनंद मिळतोय. ते फक्त तुम्हाला आनंदाचे आमिष दाखवते.
आणखी एक गोष्ट आहे. एक सज्जन बाजारात गेला आणि त्याने एका संताने मंत्रून दिलेला एक शंख घेतला. तो एक खास शंख होता. एक गुढ शंख. तुम्ही त्याला काहीही मागा आणि तो तुम्हाला ते देई. त्याच्या एका मित्राने तो शंख बघितला आणि त्यालाही तसाच शंख हवा होता. बरेचदा तुम्हाला एखादी गोष्ट हवी असते तेव्हा त्याची गरज असते म्हणून नाही तर केवळ दुसऱ्या कोणाकडेतरी आहे म्हणून. तुमच्या मित्राकडे आहे म्हणून तुम्हाला ही हवे. तुमच्या मित्राने औडी किंवा बेन्झ घेतली म्हणून तुम्हालाही औडी किंवा बेन्झ हवी. काय फरक पडतो ? तुम्हाला फक्त जाण्यासाठी गाडी हवी आहे. पण तुमच्या मित्राने मोठी गाडी घेतली म्हणून तुम्हालाही जास्त चांगली गाडी हवी. तर तोही शंख घेण्यासाठी बाजारात गेला. दुकानदाराने त्याला शंख दाखवला आणि म्हणाला तुम्ही काहीही मागितले तर त्याच्या दुप्पट तुम्हाला तो देईल.
समजा तुम्हाला एक गाडी हवी आहे तर शंख म्हणेल एकच कशाला तुम्ही दोन घ्या. ही गोष्ट कुणी ऐकली आहे कां ? नाही ? तुम्ही माझी पुस्तके वाचत नाही , माझ्या टेप्स ऐकत नाही ? ! तर त्याने तो शंख घेतला आणि तो घरी गेला. त्याने शंखाला एक किलो सोने मागितले. शंख म्हणाला, “ एक कशाला ? दोन किलो घे.” 
तर तो म्हणाला, “बरं दोन किलो दे.”                                                                  शंख म्हणाला, “ दोन कशाला ? चार किलो घे.”  तर तो म्हणाला, “बरं चार किलो दे.”   
शंख म्हणाला, “ चार कशाला ? आठ किलो घे.” तर तो म्हणाला, “बरं आठ किलो दे.मला आणखी नको आहे.”  
शंख म्हणाला, “ आठ कशाला ? सोळा किलो घे.”                                                         शंख फक्त दुप्पट करत राहिला. दिले काहीच नाही. तो म्हणाला, “ मला काहीतरी दे.”                   
शंख म्हणाला,” काहीतरी कशाला बरेच काही घे.”  त्या माणसाने कान टवकारले आणि म्हणाला, “ वाह” .
तुमच्या सवयींमुळे तुमचे नेमके असेच हेते. सवयी तुम्हाला फक्त आनंदाचे आमिष दाखवतात पण आनंद कधीच देत नाहीत. वाईट सवयी घालवण्यासाठी या तीन गोष्टींपैकी एक गोष्ट लागते. प्रेम, भीती किंवा हाव.
कशाबद्दल तरी खूप जास्त प्रेम किंवा प्रेमाच्या माणसाला दिलेले वचन की तुम्ही पुन्हा तसे करणार नाही यामुळे तुम्ही वाईट सवयींमधून बाहेर येऊ शकता. जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतील की जर तुम्ही दारू प्यालात तर तुमचे पित्ताशय खराब होईल आणि तुम्ही मराल, तर तुम्ही दारूला स्पर्शही करणार नाही. आणि जर तुम्हाला कोणी शब्द दिला की जर तुम्ही चाळीस दिवस प्यायला नाहीत तर तर ते तुम्हाला दशलक्ष डॉलर्स देतील तर तुम्ही थोडी जास्तच काळजी घेऊन पंचेचाळीस दिवस पिणार नाही. तर हाव, भीती आणि प्रेम या तीन गोष्टी तुम्हाला वाईट सवयींपासून दूर ठेवू शकतील. करुणामय रहाणे माझ्यासाठी स्वाभाविक आहे. इतक्या वर्षात जवळ जवळ ५६ वर्षात मी कुणालाही वाईट शब्द बोललो नाहिये. ह्यात काही विशेष कमावले असे नाही. हे शरीर असेच बनले आहे. मी असाच बनलो आहे. मी कधीच वाईट शब्द बोलू शकत नाही, अगदी मी बेचैन असतानाही. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की “तू मुर्ख आहेस”, त्या पलिकडे काही नाही. तेही मी फक्त सात ते आठ वेळा बोललो असेन. मी माझ्या हाताच्या बोटावर मोजू शकतो. शपथ घेणं, शाप देणं किंवा दुसर्याला दोष देणं हे मला शक्य नाही. मी तसं कधीच केलं नाहिये. माझ्या बाजूने कधीच कुणाला वाईट शब्दाने दुखावले नाहिये. तरीही लोक दुखावले गेले असतील तर ती त्यांची समस्या आहे. मी काय करू शकतो ?

प्रश्न : माझ्या अगदी प्रेमाची असलेली, जिच्या बरोबर मी गेली चार वर्ष आहे, तिने मला सांगितले की तिचे दुसऱ्या कोणावरतरी प्रेम आहे. तो तिला पाच महिन्यांपूर्वी भटला. मी काय करावे ? मी तिच्यावर खरेच प्रेम करतो आणि मला तिला घालवायची नाहिये. तिचा विचार पक्का होईपर्यंत तिने मला थांबायला सांगितले आहे. मी थांबावे की सोडून द्यावे ?
श्री श्री रविशंकर : एका दृष्टीने मला तुझी समस्या कळते आहे.पण दुसऱ्या बाजूने मला याचा काहीच अनुभव नाही. त्यामुळे मी तुला सल्ला देऊ शकत नाही. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की काही वेळ बाजूला हो आणि शांत रहा. तुझ्या आयुष्याबद्दल विचार कर की पूर्वी ते कसे होते. जेव्हा ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात नव्हती तेव्हाही तू आनंदी होतास ? जर त्या व्यक्तीने तुझ्यातली ठिणगी चेतवली असेल, तुला प्रेम अनुभवायला मिळाले असेल तर तिचे फक्त आभार मान. भविष्यात तिच्या शिवायही आयुष्य चालू राहिल. मी तुला सांगतो, तू फक्त पुढेच जाशील. जर ही व्यक्ती निघून गेली तर तुला दुसरी जास्त चांगली व्यक्ती भेटेल. हे नक्की. तू केंद्र बिंदू आहेस हे ध्यानात ठेव. तुझा आत्मा त्या दुसऱ्या व्यक्तीत ठेऊ नकोस तो तू तुझ्याकडेच ठेव.आणि जर ती व्यक्ती परत आली तर चांगलं आहे नाहीतर पुढे जात रहा. ह्या ज्ञानामुळे तुझे प्रेम तिरस्कारात न बदलण्यासाठी तुला मदत होईल. सहसा लोक कुणावरतरी प्रेम करतात आणि मग त्याचे असे थक्क करणाऱ्या कडवटपणात आणि तिरस्कारात रुपांतर होते. तर असे होऊ देऊ नका. जर तुमचे कुणावर प्रेम असेल तर सोडून द्या. जर ते तुमचे असेल तर ते तुमच्याकडे परत येईल. जर ते तुमच्याकडे परत आले नाही तर ते कधीच तुमचे नव्हते, हे जाणून घ्या आणि पुढे चला.

प्रश्न: मी अशा विचारात मोठा झालो आहे की देव जिवंत असू शकत नाही. आता मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटलो आहे आणि सर्व सुंदर ज्ञान ऐकले आहे. आणि मला असे वाटते आहे की मी जिवंत देवाला भेटतो आहे. पण देव जिवंत असू शकत नाही. माझ्या मनाला काही उमजत नाहिये. मला हे माहीत आहे की तुम्ही ज्ञान आणि प्रेमाच्या स्वरुपात आहात. पण तुम्ही व्यक्ती आहात म्हणावे तर मी तुम्हाला पूर्णपणे नीट मारू शकत नाही. मी दिव्यत्वाला बघू शकतोय, स्पर्श करू शकतोय, दु:ख सुद्धा होतयं पण उमजत नाहिये. कृपया सांगा.       
श्री श्री रविशंकर : देव म्हणजे प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे देव आहे आणि तो आपल्या प्रत्येकात आहे. जे देव नाही असे काहीच नाही कारण संपूर्ण सृष्टी प्रेमाने बनली आहे. तर देव म्हणजे एक व्यक्ती नाहिये. ते एक क्षेत्र आहे. तो सर्वव्यापी आहे, तो तुमच्यातही आहे. जर तो तिथे नेहमीच असेल तो इथे आत्ताही आहे.
तुमचं बरोबर आहे, काही लोकांना वाटते देव कुठेतरी स्वर्गात आहे. त्याने सर्व काही निर्माण केले आणि तो आतां निवर्तला, गेला. जसे तुम्ही कधी कधी गेलेल्या लोकांनां धन्यवाद देण्याचा विधी करता तसेच तुम्ही देवालाही कुणीतरी गेलेली व्यक्ती मानता आणि त्यांचे आभार मानता.
लोकांना कळत नाही, देव हे जीतजागतं अस्तित्व आहे, आत्ता, इथे जिवंत आहे. केवळ मौनाच्या सखोलतेतच तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. जेव्हा मन शांत असते आणि तुम्ही म्हणता की, “ मला कहीही नको आहे.” जे काही आहे ते फक्त तुम्ही आहात. या भावनेने जेव्हा तुम्ही बसता, ती उर्जा, ती शांतता, ते प्रेम त्यावेळी तो इथे आणि आत्ता असतोच आणि तुमहाला त्याचा अनुभव येतोच.
म्हणूनच लोक गौतम बुद्धांकडे गेले आणि त्यांना देवाबद्दल विचारले. त्यांनी कधीच काही सांगितले नाही, ते शांतच राहिले.
गौतम बुद्ध कधीच देवाबद्दल बोलाले नाहीत. त्यांच्या सत्संगामध्ये ही अट असायची की कुणीही त्यानां देवाबद्दल विचारायचे नाही. तिथे अकरा प्रश्नांना बंदी होती. एक म्हणजे देव. तुम्ही जरी विचारले तरी ते उत्तर द्यायचे नाहीत. कारण लोकांच्या मनात संकल्पना असतात आणि त्यांना असं वाटतं की त्याना देवाबद्दल खूप काही माहीत आहे आणि मग ते वाद घालू लागतात.
सर्वात उत्तम म्हणजे ते तुम्ही देवावरच सोडून द्या, त्याला थोडं मोकळं सोडायला हवे आहे. त्याला जरा विश्रांती हवी आहे. भारतात देवाला नागावर आनंदाने विश्रांती घेत पहुडलेला दाखवला आहे आणि एकीकडे निर्मिती चालूच आहे.
त्यामुळे मी म्हणतो की एक चांगला माणूस बना आणि वेळोवेळी स्तब्ध व्हा आणि अंतर्मनातल्या शांततेचा अनुभव घ्या. तुम्हाला गुपितातली गुपितं कळतील, तुमच्यासाठी सगळे दरवाजे सहजपणे उघडतील. आणि मग तुम्हाला जाणवेल की लोक सगळीकडे कशाबद्दल बोलत होते. सर्व ग्रंथांमध्ये हेच लिहिले आहे. बायबल, कुराण किंवा वेद सगळीकडे तेच सांगितले आहे. हे खरे आहे, ते इथेच आहे, आत्ता, माझ्यात हे जाणवणे. पुन्हा सांगतो, असे समजू नका की एक दिवस काहीतरी सिद्धी प्राप्त होईल. ते तर आत्ताच झाले आहे ! शांत रहा. शांती ही देवाकडे जाणारी पहिली पायरी आहे. दुसरी आहे खुशी आणि आनंद. तिसरी आहे प्रेम. देवापर्यंत पोहोचण्याच्या या तीन पायऱ्या आहेत.

27 April 2012


27
2012............................... Germany
April


आपल्या मनापासून कधीही कोणाबरोबर वैरभाव ठेवू नका
जर्मनीमधील सत्संग
२७ एप्रिल २०१२

तुम्ही नाचा, गायन करा आणि ज्ञानामध्ये वस्ती करा. ज्ञानाचा अर्थ म्हणजे केवळ माहिती, पुस्तकांमधून मिळणारे पुस्तकी ज्ञान नव्हे, ते ज्ञान नाही.
ज्ञान म्हणजे जे सत्य आहे त्याचा जसाच्या तसा अनुभव घेणे. जेव्हा ज्ञान आपल्या चेतनेच्या आत खोलवर स्थापित होते तेव्हा त्याला सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धी म्हणजे आपल्या आत खोल व्यवस्थित प्रस्थापित झालेले ज्ञान होय. याने तुम्ही विवेकी होता, ज्ञानी होता.
प्रत्येकाकडे विवेक असतो. कोणाकडे कमी असतो तर काहीजणांकडे जास्त. जीवनात तुम्हाला कामी विवेकाकडून जास्त विवेककडे नेणे हा काळाचा प्रश्न आहे.
शब्द निरर्थक वाटतात, तरीदेखील आपण कितीतरी वेळा ते वापरतो कारण आपल्याला तशी गरज पडते. आपण दवाखान्यात जातो आणि विचारतो "कसे आहात?" तुम्हाला माहिती आहे की ती व्यक्ती बरी नाही, तरी देखील आपण विचारतो, "कसे आहात?" आणि ती व्यक्तीदेखील ,"ठीक आहे" असे उत्तर देते. त्याव्यक्तीला माहिती आहे की ती ठीक नाही तरी ती म्हणते "ठीक आहे". त्याचप्रमाणे मला दिसते आहे कि तुम्ही सगळे आनंदात आहे आणि तरीसुद्धा मी विचारतो,"कसे आहात तुम्ही?". मला दिसते आहे तुमच्या चेहऱ्यांवरून आनंद ओसंडून वाहत आहे. हे वेगळ्या पातळीवर संवाद सुरु करण्याचे निमित्त आहे.
ज्ञानी व्यक्ती प्रथम हृदयाने, माणुसकीने आणि शेवटी बाह्य पातळीवर संवाद साधतो. जे अज्ञानी असतात ते बाह्य संवादावर अवलंबून असतात. आई आणि मुलामध्ये, मूल जे बोलते त्याला महत्व नसते कारण बाळाने अजून भाषा शिकलेली नाही. परंतु ती आई त्या बाळाबरोबर खोल पातळीवर संवाद साधते. तुम्ही भाषा शिकायच्यादेखील आधी आपल्या आईबरोबर संवाद करू लागता आणि तुमची आई तुमच्याबरोबर संवाद करते. हा गहन पातळीवरचा संवाद असतो.
त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमच्या कुत्र्या किंवा मांजरीबरोबर संवाद करता तेव्हा तुम्ही एका सूक्ष्म गहन पातळीवरून करत असता. ती भाषा नाही. नंतर तुम्ही त्याच्या डोक्यात भाषा टाकण्याचा बराच प्रयत्न करता. त्यांना भाषेची गरज नाही. तुम्ही आवाज करा आणि ते तुमच्याकडे येतील.तुम्हाला 'ये, ये, ये' असे म्हणण्याची जरुर नाही. केवळ आवाज करा आणि ते तुमच्याकडे येतील. तुम्हाला समजण्याकरिता त्यांना भाषा लागत नाही.
अशा प्रकारे झाडे, वारा, ही संपूर्ण रचना तुमच्याशी जोडलेली आहे; सगळे प्राणी तुमच्याबरोबर संवाद करीत आहेत. काही संवाद सूक्ष्म पातळीवर, तर काही खोल गहन पातळीवर.
'वाचाराम्भानार्ह विकारो नामधेय' अशी संस्कृतमध्ये जुनी म्हण आहे. याचा अर्थ असा कि शब्दांमुळे सत्याचा विपर्यास होतो. संवाद तर आधीपासून होतोच आहे. शब्दांद्वारे तुम्ही त्याची थोडीफार मोडतोड करीत आहात.
माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही कि शब्द अजिबात वापरू नका, त्यांची गरज आहे. परंतु शब्दांच्या खाली जी भावना असणे गरजेचे आहे ती असली पाहिजे. तूम्ही कोणाला, 'माझे तुझ्यावर प्रेम आहे!' असे सांगू शकता पण त्या शब्दात ती भावना असायला पाहिजे.
केवळ 'अरे,माझे तुझ्यावर प्रेम आहे,' असे वरपांगी म्हणू नका.
तर जो ज्ञानी आहे तो सूक्ष्म पातळीवर संवाद साधतो,आणि शब्दांचा उपयोग केवळ त्याला पूरक म्हणून करतो. पण जे अज्ञानी आहेत तो बाह्य संवादावर अवलंबून राहतात. यामुळेच जीवनात गैरसमज निर्माण होतात.
गैरसमज का होतात? कारण अंतरंग जोडलेले नसते म्हणून. तुम्ही काहीतरी बोलता आणि समोरचे त्याचा भलताच अर्थ लावतात.
तुम्ही तुमच्या जीवनाचे सिंहावलोकन करून पहा. तुम्ही पारख करीत होता, परीक्षण करीत होता. अमक्या आणि तमक्या' व्यक्तीबद्दल वाईट विचार करीत होतात, आणि पराकोटीचा राग होता. थोड्या अवधीनंतर, थोड्या महिन्यांनंतर किंवा एखाद वर्षानंतर, 'अरे मी एवढी काळजी का केली! हे सगळे निरर्थक होते. मी स्वतःचा नाहक त्रागा केला', असे स्वतःलाच हसत म्हणता.
एकदा एक महिला माझ्याकडे आली आणि म्हणाली, 'माझे नाते खुपच बिघडले आहे, माझा प्रियकर माझ्यावर इतका रागावला आहे कि तो मला सोडून चालला आहे आणि मी फारच दुखीः आहे.' ती रडतच चालली होती. तिच महिला दोन महिन्यानंतर आली आणि म्हणाली, 'ते नाते संपले ते खुपच चांगले झाले. मी आंधळी झाले होते. त्या माणसाने मला अडकवले होते. आता ते नाते संपुष्टात आले आणि मी खूप आनंदी आहे.'
तर,बऱ्याच वेळा आपल्याला काय हवे आणि आपण काय मागत आहोत ते आपल्याला माहित नसते. म्हणूनच अगदी सतत नाही तरी वेळोवेळी मागे वळून पहा आणि मन कुठे जाते आहे आणि त्याची ओढ कोणीकडे आहे याचे निरीक्षण करा.
वेळोवेळी जर तुम्ही अवलोकन करून मनाचे निरीक्षण केले तर तुम्हाला खूप समाधान आणि मुक्तता वाटेल. एक समाधान असेल की आपण आपल्या भूतकाळापासून काही शिकलो आणि दुसरे म्हणजे जे काही घडले ते काही तरी कारणामुळे घडले. त्यामुळे तुम्ही अनुभवाने श्रीमंत झालात, ज्ञानी झालात आणि तुम्हाला एक गहनता मिळाली.
तुमच्यापैकी किती जणांना असे वाटते?
जर झालेल्या घटना आपण मागे वळून बघितल्या नाहीत, तर मग आपले त्याच त्याच चुका करणे चालू राहते आणि आपण काहीच शिकत नाही.
जैन धर्मामध्ये 'प्रतीक्रमण' परंपरा आहे. त्याचा अर्थ आहे मागे जाणे, मागची कर्मे पुसून टाकणे आणि त्यापासून शिकून पुढे जाणे.
जैन साधू रोज तासनतास बसून आत्मनिरीक्षण करतात. खरे पाहता त्यांना ते करण्याची काहीच गरज नाही कारण ते जास्त काही करत नाही.
हे अशा लोकांनी करणे जरुरी आहे जे कामाच्या व्यापात, जगाच्या धावपळीत अडकलेले आहेत. त्यांनी रोज निदान दहा मिनिटे बसून सिंहावलोकन करावे -मी काय केले? मी माझ्या आयुष्यात काय शिकलो? आजचा दिवस कसा होता? जे झाले त्या पासून मी काय शिकलो?
तुम्ही जे शिकलात त्याला परतून घट्ट कवटाळून बसू नका. काही वेळेस तुम्हाला वाटते तुम्ही जे शिकलात ते बरोबर नसू शकते. म्हणूनच रिकामे आणि पोकळ असणे फार महत्वाचे आहे. ते सर्व पूर्व संकल्पना तोडून मुक्त करते.

प्रश्न : प्रिय गुरुजी, रक्तदान करणे चांगले असते काय?
श्री श्री रविशंकर : होय, रक्तदान करणे चांगले आहे. तुमची झीज २४ तासात भरून निघते. तुमचे शरीर हे रक्त बनवण्याचे यंत्र आहे. रक्तदान केल्याने अनेक जीव वाचतील.
प्रश्न : प्रिय गुरुजी,कृपया तालपत्र नाडी वाचन याबद्दल काही बोलाल का?
श्री श्री रविशंकर : प्राचीन भारतात, ऋषींच्या शाळा आणि विश्वविद्यालये असायची जिथे ते परमानासी होण्याचे प्रशिक्षण द्यायचे. परमानासी म्हणजे जो भविष्य बघू शकतो.
तर लोक बारा ते तेरा वर्षे राहायचे आणि ध्यान करायचे, 'आत खोल जायचे आणि मग गुरु त्यांना विशिष्ट कार्य द्यायचे. ते म्हणायचे, 'सन २०१५च्या या विशिष्ट दिवशी, या निश्चित वेळेला कोणी जन्म घेईल. ज्योतिषशास्त्राप्रमाणे आकडेमोड करून भविष्यवाणी करा की त्यांचे आयुष्य कसे असेल.'
याने दोन गोष्टी होतात-ज्योतिषशास्त्रानुसार आकडेमोड आणि अवकाश आणि काळ यात अंतर्दृष्टी. ते हि युक्ती वापरायचे.
परंतु हे सगळे विद्यार्थ्यांनी लिहिलेले होते म्हणून ते शंभर टक्के बरोबर असणार नाही. विद्यार्थ्यांकडून चुका होतात. ते सत्तर ते ऐंशी टक्के बरोबर असतील. त्यातले काही तर भविष्यात अजिबात सत्य होणार नाही, असे होऊ शकते.
दुसरे म्हणजे ते केवळ शक्यता वर्तवतात म्हणजे असे होऊ शकते असे वर्तवतात. जर तुम्ही मध्यस्थ आहात आणि अध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर चालत असाल तर तुम्ही तुमचे भाग्य बदलत राहता कारण तुम्ही तुमच्या जीवनात जास्तीत जास्त सकारात्मकता आणत असता.
या महिन्याच्या(एप्रिल२०१२ च्या) तीन तारखेला काय झाले ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. चीनहून एक साधू आला होता. तो त्रिकालदर्शी होता. त्याच्याकडे दररोज दोन ते तीन हजार लोक जातात.
त्याने आपल्या संयोजकांना संपर्क केला तेंव्हा मी इंडोनेशियाला होतो आणि तो म्हणाला कि त्याला यायचे आहे आणि गुरुजींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. तो म्हणाला, 'ज्ञानोदय होण्याकरिता धर्म हि आडकाठी होऊ शकत नाही. मी बौद्ध आहे पण त्याने काही फरक पडत नाही.मला माहिती आहे कि गुरुजी या जगात अवतीर्ण झालेले आहेत आणि पुष्कळ लोकांचे भले होणार आहे. मला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. ते फार फार काळानंतर, हजारो वर्षानंतर आलेले आहेत. त्यांच्या अशीर्वादांची मला खूप गरज आहे.'
तो फार चांगला माणूस आहे, एक भली आत्मा आहे. तो आला, थोडावेळ मुकपणे बसला, आशीर्वाद घेतले आणि पुढच्या विमानाने परत निघून गेला.
भक्तांपैकी एक फार चिकित्सक होता, तो म्हणाला,'तुम्ही आर्ट ऑफ लिविंगचे आणि गुरुजींचे काय होणार याचे भविष्य सांगा'.
तो म्हणाला, 'नाही, मी ते सांगू शकत नाही. जे मुक्त आहेत त्याबाबत मी काही भविष्य वर्तवू शकत नाही. जर मन अडकलेले असेल तरच मी वर्तवू शकतो. ज्याला मन नाही त्याबद्दल मी भविष्य वर्तवू शकत नाही.'
मी पण विचार केला होता कि बघू या काय घडणार आहे ते.
तो म्हणाला, 'जिथे मन नाही तिथे केवळ अवकाश असते, मी भाकीत करू शकत नाही. गुरुजी केवळ अवकाश आहेत, त्यांचे भाकीत मी नाही करू शकत.'
जर तुम्ही जप ,ध्यान आणि प्राणायाम केले तर तुमचे इच्छास्वातंत्र्य वाढेल आणि तुमचे स्वातंत्र्य वाढेल.
ते म्हणतात, 'तुम्हाला या अडचणी येतील,काळजी घ्या.'
जसे डॉक्टर सांगतात, 'तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे, तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यायाम करायला पाहिजे.'
तसेच तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही जपायला पाहिजे.
तुमच्या वैद्यकीय समस्यांनुसार त्यांचे भाकीत असते,आणि ते काही उपाय सुचवितात-जर असे केले तर तुम्हाला काहीच त्रास उरणार नाही.
ज्योतिषीदेखील त्याचप्रमाणे सांगतात, 'तुमचा गुरूग्रह तुमच्या आठव्या घरात दाखल होणार आहे आणि त्याने तुमचे मन दोलायमान होणार आहे. सगळ्यांवरची श्रद्धा उडेल. तुमच्यात आत्मविश्वास उरणार नाही, कोणावर आणि कोणत्याही कामावर श्रद्धा राहणार नाही आणि तुम्ही काळजीत पडाल. हे सगळे एक वर्ष चालेल, पण येत्या चार पाच महिन्यात याची तीव्रता जास्त असेल. तर ध्यान, प्राणायाम, प्रार्थना नियमितपणे करा आणि यातून तुमची सुटका होईल. अशा वेळेस कोणताही निर्णय करू नका.'
तर हे होते एक छोटेसे भाकीत मनाच्या प्रवृत्तींबद्दल आणि ते कसे चालते याबाबत !!

प्रश्न : माझा प्रश्न आहे, मला कसे कळणार कि या ग्रहावर मी काय आहे? मी कोणता व्यवसाय करावा? माझा काही वेळेस गोंधळ उडतो. माझ्यात बरेच कलागुण आहेत पण मला माझ्या क्षमतेबाबत असुरक्षित वाटते. आता मला वाटते आहे, 'प्रश्नकर्ता कोण आहे?' पुन्हा मला कळत नाही. मला कळण्याचा कंटाळा आला आहे.
श्री श्री रविशंकर : आता जर मी उत्तर दिले तर 'कोण ऐकते आहे?' असे तुम्ही बुचकळ्यात पडाल. स्वतःचे अति आत्मपरीक्षण करू नये. याचेपण वेड लागते. "कोण विचारते आहे? कोण साक्षीदार आहे? जर मी साक्षीदार आहे तर मी कोण आहे? बोलणारे कोण ?'असा सतत विचार करू नये.
आत्मपरीक्षण चांगले आहे. आत्मपरीक्षण करणे जरुरी आहे पण जर अतिरेक केला तर त्याने अकारण गोंधळ आणि चलबिचल निर्माण होते. हे तेव्हाच करावे जेव्हा तुम्ही शिबीर करीत असाल किंवा तुम्ही काही वेळ काढला असेल. तेव्हा तुम्ही विचारू शकता, 'मी कोण आहे? हे विश्व काय आहे?'
दिवसाचे चोवीस तास तुम्ही आत्मनिरीक्षण करू शकत नाही. नाहीतर मग तुम्ही काही काम करण्या अगर या जगात जगण्या लायक उरणार नाही.
हे स्नान करण्यासारखे आहे. दिवसाचे चोवीस तास तर तुम्ही अंघोळ करीत राहू शकत नाही. मग तुम्हाला तर पाण्यातला मासा व्हायला लागेल! जर तुम्ही प्रत्येक पायरीवर चौकशी आणि परीक्षण करीत राहिलात तर तुम्ही पाण्यातील माश्यासारखे बनाल.
तुमचे काम करा. काय काम करीत आहात ते महत्वाचे नाही. तुम्ही कोणतेतरी काम करा कारण तुम्हाला स्वतःचा चरितार्थ चालवायचा आहे. चरितार्थ चालवण्यास तुम्ही कोणतेही काम करा, असे काम करा ज्याने काही मिळकत मिळेल.
चरितार्थाचे काम आणि तुमचे मनोरंजन व छंद हे सेवेच्या कामपेक्षा वेगळे आहे हे लक्षात ठेवा. जर तुम्ही सगळे मिळून एकच करतो म्हणालात तर ते फार मोठे आव्हान होईल. जर तुम्ही तुमच्या चरितार्थाच्या कामाला  छंद कराल, बरेच लोक अशी चूक करतात आणि आपणहून स्वतःची हकालपट्टी ओढवून घेतात!
जर तुम्हाला तुमच्या करमणूकीला काम बनवायचे असेल, तर मग तुम्ही पुरेसा पैसा कमावू शकत नाही आणि तुम्हाला कायम कमतरता भासत राहील. तुम्हाला पैसा कमी पडेल. तुमच्याकडे निर्णयक्षमता आणि तारतम्य असणे आवश्यक आहे.
जेव्हा तुमच्या अंगावर जबाबदारी असते, कुटुंबाची काळजी घ्यायची आहे, मुलांची काळजी, काम निवडायचे आहे, असे काम जे स्थिर आहे आणि जे तुम्हाला पुरेसा पैसा आणि वेळ देतो. एकदा का हे झाले मग पुन्हा विचार करू नका. परंतु तुम्हाला यापेक्षा जास्त चांगले काही मिळाले तर मग ते घ्या, काही समस्या नाही.
मग,थोडा वेळ काढा आणि समाजसेवा करा. जर तुम्ही तुमचे सगळे आयुष्य केवळ दोन वेळचे जेवण मिळवण्यात व्यतीत करीत असाल तर असे जीवन निरर्थक आणि शुल्लक आहे.
तुम्ही काय कराल? कमव, कमव कमावणार आणि ऑडी नाही तर बेन्झ गाडी विकात घ्याल. मग तुम्ही घर बांधाल आणि सोनेनाणे विकत घ्याल आणि झाले! याने तुम्हाला समाधान मिळणार नाही. थोडा वेळ काढा आणि समाजसेवा करा. इथे या आणि आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे सदस्य बना.
एकट्याने तुम्ही जास्त काही करू शकणार नाही. तुमच्यासारखे दहा वा पंधरा जण एक गट बनवून एक प्रकल्प हाती घेऊ शकता. अशी मुले आहेत ज्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर घरात एक बरणी ठेवा आणि तुम्हाला जसे जमेल तसे त्यात थोडे थोडे पैसे टाकत चला. याचा उपयोग एखाद्या सामाजिक कारणाला मदत करण्याकरिता करता येईल.
जर्मनीतील आणि युरोपच्या दुसऱ्या देशांमधील कितीतरी लोक शाळांना मदत पुरवीत आहेत. आम्ही भारतात आता १८५ शाळा चालवीत आहोत. जवळ जवळ २५,००० बालकांना चांगले अन्न, चांगले शिक्षण, आणि वैद्यकीय मदत मिळते आहे कारण लोक रोज एक युरो दान करीत आहेत.
याप्रमाणे तुम्ही काहीतरी सामाजिक कार्यात भाग घ्या. त्याने तुम्हाला समाधान मिळते, 'मी या कारणाला पाठींबा देतो आहे. मी या प्रकल्पाचा भाग आहे.'
जर तुम्ही एक प्रकल्प राबवू शकत असाल तर छानच आहे. जर नाही तर निदान त्याचा भाग तरी व्हा. तुम्ही इमारतीतील एक वीट होऊ शकता. एका विटेचा वाटा घ्या. त्याने तुम्हाला समाधान मिळेल.
मग तुम्ही वेळ काढा जसा तुम्ही आता काढला आहे(शिबिरार्थीकडे  इशारा करीत), ध्यान करण्यासाठी आणि नवचैतन्यासाठी. जेव्हा तुम्ही परताल तेव्हा तुम्हाला एकदम टवटवीत वाटेल. तुमच्यापैकी कितीजणांना परत गेल्यावर टवटवी वाटते? हा तुमचा अनुभव आहे.
वर्षातून दोनदा मानसिक कायाकल्प आणि चेतनेचा कायाकल्प होणे चांगले आहे. हे फार महत्वाचे आहे.
हे करा आणि थोड्या कालावधीत, चाळीस, पन्नास किंवा साठ वर्षाने निवृत्त व्हा आणि ज्ञानामध्ये स्वतःला संपूर्णपणे झोकून द्या. उच्च ज्ञान, उच्च सुजाणता किंवा सामाजिक कारणाकरिता स्वतःला समर्पित करा. समाजात काही चांगले कार्य करा. आणि जीवन निघून जाईल! एक दिवशी तुम्ही निघून जाल(चुटकी वाजवत),तुम्हाला कळणार देखील नाही! बाकीचे तुमचे शव नेण्याची तयारी करतील. झाले! संपले!
एक दिवस, ते सद्भावना सभा ठेवतील(हात जोडून)म्हणतील, 'त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.' तोपर्यंत तुम्हाला शांतता आधीच मिळालेली असेल! त्यांची सदिच्छा बऱ्याच उशिराने येईल.
एकदा शरीर सोडले कि आपण शांतच असतो, मग काही मजा नाही. जिवंतपणी शांतता मिळवायला हवी आणि आजूबाजूच्या लोकांच्या उपयोगी पडले पाहिजे. काय म्हणता? बरोबर ना? हेच ज्ञान आहे. ज्ञानामुळे आताच्या आता आनंद मिळतो.
मी असे नाही म्हणत,'तुम्ही काही तरी दहा दिवस, दहा वर्षे करा आणि मग एक दिवस तुम्ही आनंदी होणार.' हे असे आहे का? नाही.
आपल्याकडे दोन शास्त्रे आहेत-So Hum(सोहम) आणि So What(मग काय). सगळे बदलते.
या जगात सगळे सतत बदलत असते. दोस्त दुश्मन बनतात आणि दुश्मन दोस्त होतात. हेच जगात चालत असते. नाही का?
'मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही' म्हणणारे लोक नंतर 'मी तुझ्याबरोबर राही शकत नाही' म्हणतात.
हे नेहमीच घडते. एकदा नाही तर दोनदा, तीनदा, चारदा होते.
एकदा एक महिला प्रेम कसे यशस्वी करावे यावर एक परिसंवाद घेत होती. ती सात वेळा विभक्त झालेली होती! मी म्हणालो, 'ती महिला एकदम लायक होती कारण काय अडचणी येतात याचे तिला सातवेळा ज्ञान मिळाले होते आणि आता ती ते सगळ्यांना देऊ करत होती!'
बघा, जेव्हा जगात तुम्ही मित्राच्या शोधात जाता तेव्हा तुम्हाला एक चांगला मित्र मिळत नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या 'स्व'च्या आत शोध घेता, तुमच्या आतील त्या श्रेष्ठ 'स्व'बरोबर मैत्री करता, तुमच्या आतील चैतन्यासोबत तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि तुमच्यातून मित्रत्व नैसर्गिकपणे बाहेर येते.
जेव्हा तुम्ही मैत्रीपूर्ण असता तेव्हा संपूर्ण जग तुमचे मित्र बनते. सगळे तुमच्या दिशेने वळतात. तुमचे सर्वात कट्टर शत्रू तुमच्या समोर तुमचे मित्र होतात आणि तुमच्यापासून दूर गेल्यावर त्यांना पुन्हा शत्रुत्वाची भावना वाटू लागेल.
तुमच्या मनापासून तुम्ही कोणाबरोबर वैरभावनेला चालना देऊ नका. माझे तर हेच धोरण आहे. माझ्या बाजूने, मला कोणी शत्रू नाही.
जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी एक संस्कृत श्लोक शिकलो. तो असा होता,'अजातशत्रू आजारास्वर्वर्ती' त्याचा अर्थ,'मी कधीच वृद्ध होणार नाही कारण मी माझ्या आत विसावा घेतो. मी जवळ जवळ दहा ते बारा वर्षाचा होतो. दहा हजार श्लोकांपैकी हाच माझ्या लक्षात राहिला. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत विसावता तेव्हा तुमचे वय वाढत नाही. वय होणे म्हणजे थकणे, निरुत्साही, काही चांगले नाही वा सगळे निराशाजनक आहे असे वाटणे; मनात नकारात्मक संवाद ,'अरे मला हे सगळे माहिती आहे. मी हे सगळे बघितले आहे'-असा दृष्टीकोन असणे. ताजेतवाने किंवा जिवंतपणा न वाटणे.
'अजरा'चा अर्थ जुना किंवा गलितगात्र न होणे. तुम्हाला माहिती आहे उत्साही आणि क्रियाशील म्हातारी माणसे आहेत.
मी तैवानला होतो आणि आमचा जवळजवळ ८००० जणांचा मोठा सत्संग होता. लोक एवढे आनंदी होते. त्यानंतर जेव्हा मी माझ्या ठिकाणावर परत आलो तर ८० वर्षाचे सद्गृहस्थ आले. ते अतिशय उत्साही होते. ते म्हणाले, 'हे किती महान आहे! मला काही कार्य करायचे आहे. मला या ज्ञानाचा प्रसार करायचा आहे. मेनलॅन्ड चीनमध्ये कितीतरी करोडो लोक कर्करोग आणि दुसऱ्या आजारांनी ग्रस्त आहेत. गुरुजी, मला तुम्हाला मेनलॅन्ड चीनमध्ये  घेऊन जायचे आहे. मी आयोजन करेन आणि मी हे करेनच'.
तो ८० वर्षांच्या वर आहे आणि कुठेही प्रवास करण्याची त्याची तयारी आहे. तो क्षीण दिसतो पण हिमत किती आहे! तो सोबत त्याच्या मित्राला घेऊन आला होता. तो देखील त्याच्याच वयाचा होता. ते दोघे म्हणाले, 'आम्ही सैनिक आहोत!' ते मला पहिल्यांदाच भेटत होते.
त्याचप्रमाणे जपानमध्ये ७८ वर्षाचा ज्येष्ठ गृहस्थ होता जो उत्साहाने सळसळत होता. त्याने माझ्याकरिता चर्चा सत्राचे आयोजन केले आणि बऱ्याच लोकांना बोलावले. त्याने असे नाही म्हटले, 'अरे,मी तर म्हातारा आहे, मी काही करू शकत नाही.' नाही, असे काही नाही पण उलट त्याला इतका उत्साह संचारला.
त्याने जाहीर केले, 'संपूर्ण जपानला या ज्ञानाची गरज आहे.' तो चांगला कर्तृत्ववान सद्गृहस्थ आहे.
जपानमध्ये दर वर्षी तीस हजार लोक आत्महत्या करतात. हे मोठ्या प्रमाणावर आहे. आज कशाची गरज आहे तर आनंदाच्या लहरीची. जपानचे स्थूल एतद्देशीय उत्पादन सर्वात जास्त आहे. विमानतळावरून घरी जाण्याकरीता पन्नास डॉलरचा जकात कर भरावा लागतो. याची तुम्ही कल्पना करू शकता? तुम्ही दोन फेऱ्या मारा आणि तुमचे दोनशे डॉलर्स खर्च होतात. अंतर एवढे जास्त आहे. तेथील राहणीमान फार महागडे आहे. अमेरिकनांना जपानमध्ये राहणे फार महाग वाटते. लोक पैसा कमावत आहेत परंतु तिथे आनंद नाहीये.
हे केवळ जपानमध्ये नाहीये. आनंदाचा अभाव हे लक्षण आज खूप देशांमध्ये दिसून येते. ते हास्य करीत नाहीत, ते हसत नाहीत आणि त्यांना मनःशांती नाहीये. आपण आनंदाची लहर निर्माण करण्याची गरज आहे आणि ते केवळ ज्ञानाद्वारे, जीवनाविषयीचा दृष्टीकोन मोठा केल्याने शक्य आहे. हीच तर आहे जीवन जगण्याची कला(दी आर्ट ऑफ लिविंग). दी आर्ट ऑफ लिविंग हे (जीवन जगण्याची कला ही) काही अत्याग्रही मत नाही. ते संकल्पनांचा संच किंवा काही रिवाज नाही. जीवन जगण्याची कला(दी आर्ट ऑफ लिविंग) म्हणजे जीवनाविषयीचा दृष्टीकोन विशाल करणे आणि जीवनला उत्सव बनवणे हे होय. दी आर्ट ऑफ लिविंगचा हाच मुख्य हेतू आहे.
'देवाची खरी भक्ती म्हणजे माणसांच्या हृदयात आनंद निर्माण करणे' असा एक संस्कृत श्लोक आहे.
येनकेनप्रकारेण यस्य कस्यापि देहिनः|संतोषम जनायेत प्राज्ञा तादेवेश्वरापुजानाम-माणसांच्या हृदयातील आनंद हीच देवाची खरी पूजा आहे. केवढे मोठे ज्ञान, किती चांगल्या शब्दात भूतकाळात सांगितले गेले आहे. म्हणूनच ते कालातीत ज्ञान आहे.
ते कोणी लिहिले तेदेखील माहिती नाही. लिहीणार्‍याने खाली स्वतःची स्वाक्षरीदेखील केली नाही, पण त्याने जीवांची अनमोल रत्ने देऊ केली. ते दी आर्ट ऑफ लिविंग आहे; जुन्या परंपरेचा बहुमान करणे, भविष्याकरिता आधुनिक विज्ञानाकडे बघणे, आणि दोन्ही बरोबर घेऊन पुढे जाणे.
विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात कधीही कलह नाही. ते नेहमी एकत्र जातात .धर्म आणि विज्ञान यांच्यातील संघर्ष हा बऱ्याच काळापासून आहे, पण अध्यात्म आणि अनुभवावर आधारित असलेला भाग नाही.म्हणूनच मी म्हणतो कि आपण वैज्ञानिक मनाने आणि प्राचीन हृदयाने बघावे, एक नवीन मन आणि प्रेमळ हृदय.
आपल्याला याची गरज आहे. तुम्हाला नाही वाटत?
मी म्हणतो, हे जग केवढे रोचक आहे! तर या जगात राहा, मजा करा पण यात अडकू अगर बुडून जाऊ नका. स्वतःला थोडेसे अलिप्त ठेवा. बाह्य घटनापासून स्वतःला थोडे निर्लेप ठेवा. स्वतःच्या आत्म्याला वाचवा,स्वतःच्या मनाला वाचवा,स्वतःच्या चेतनेला वाचवा आणि स्वतःच्या उल्हासाला जपा. जगाच्या घटनांमध्ये याचा घोळ होऊ देऊ नका. तुम्हाला कळत आहे का मी काय म्हणतो आहे ते?
कोणा व्यक्तीमुळे अगर कोणत्या प्रसंगामुळे तुमचे स्वातंत्र्य, तुमचा उल्हास आणि तुमची मनःशांती हरवून बसू नका. हे आहे दी आर्ट ऑफ लिविंग.
हे भले मोठे काम आहे. हे एक आव्हान आहे. हे सोपे नाही. मी असे नाही म्हणत की हे सोपे आहे. हे फुलांचा बिछाना अगर लोणी आहे असे नाही! मी तुम्हाला सांगतो जीवन म्हणजे फुलासारखे कोमल किंवा लोण्यासारखे मउ नाही. इतकी आव्हाने आहेत परंतु ज्ञान आणि बुद्धिमता आपल्याला आव्हाने पेलाण्याकरिता सज्ज करते.
अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्हाला वाटू लागते कि जीवनात आव्हाने अजिबात असता कामा नये. तेव्हा मग आव्हाने खूप मोठी भासू लागतात. जीवनात आव्हाने असतातच परंतु त्यांच्याबरोबर दोन हात करण्यास ज्ञान आपल्याला सज्ज करते.