थांबा आणि बघा आयुष्य कुठे चालले आहे

14
2012
Sep
..
तर मग आज कशावर चर्चा करायची ? माझी बोलणाऱ्याची भूमिका आहे आणि तुमची श्रोत्याची. आज तुम्हाला कशाची माहिती हवी आहे हे कळलं तर बरं होईल. तुम्ही अशा मुद्यांचा विचार करा.

तुम्हाला माहितिये कां, आपल्या एखाद्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वातावरण अगदी अनौपचारिक असावे लागते. विवेकपूर्ण आणि विश्वसनीय अशा गोष्टींबद्दल बोलण्यासाठी औपचारिक वातावरण पोषक नाही. मला सगळं अनौपचारिकरीत्या करायची सवय आहे.

तर आता आपण आपल्या समोरच्या, बाजूच्या आणि मागच्या व्यक्तीला शुभेच्छा देऊन सुरवात करुया. तुमच्या भोवतालच्या प्रत्येकाची ओळख करून घ्या.

मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खरे सर्वांना शुभेच्छा दिल्यात की केवळ औपचारिकपणे केलेत ? तुम्ही तुमच्या बाजूच्या माणसाला हे सांगायची गरज नाही. ‘ तुम्ही त्यांना हे सांगायची गरज नाही की “ मी तुम्हाला केवळ औपचारिकपणे शुभेच्छा दिल्या.” मला तुम्हाला स्वत:ला विचारायचे आहे की तुम्ही त्या व्यक्तीला खरेच शुभेच्छा दिल्यात कां ?

तुम्हाला माहितीये , जेव्हा तुम्ही विमानातून उतरता तेव्हा त्या हवाई सुंदरी तुम्हाला, “ दिवस छान जाउ दे” अशा शुभेच्छा देते. पण त्यांना खरेच तसे वाटत नसते. ते नुसते वर वरचे असते.

पण असेच शब्द जर तुम्हाला तुमच्या आईकडून किंवा बहिणीकडून, किंवा जवळच्या मित्राकडून आले तर त्यात काही तरंग असतात. तर आपण त्या तरंगाच्या द्वारे आपल्या भावना जास्त चांगल्या पोहोचवतो.

कुणी दोन तासं उभे राहून प्रेमाबद्दल भाषण देऊ शकेल पण एखादे बाळ किंवा कुत्रा आपल्या तरंगागामधून जे पोहोचवेल ते त्या भाषणातून पोहोचणार नाही.

जिथे लोक अगदी निराश आहेत तिथे तुम्हाला दिसेल की काही कारण नसताना तुम्हालाही उगाचच निराश वाटू लागेल. त्याचं प्रमाणे अशा एखाद्या ठिकाणी गेलात जिथे लोक अगदी आनंदी आहेत तर तिथे तुम्हालाही आनंदी वाटायला लागेल.

सर्व जग हे केवळ तरंग आहेत. लहरी आणि केवळ लहरी.

आपले मन तरंग आहे आपले शरीर तरंग आहे, विचार तरंग आहेत, भावना तरंग आहेत. पण त्या तरंगांना, सकारात्मकतेला सुधारण्यासाठी आपण काहीही करत नाही. हो की नाही ? 

ज्याच्यामुळे तुमचे तरंग अगदी आनंदी, सकारात्मक आणि शांतीपूर्ण होतील असे ते काहीतरी म्हणजेच ध्यान.

प्राणायाम आणि ध्यान यामुळे हे अगदी झटकन होते. सहसा ध्यान म्हटले की तुम्हाला वाटते की त्यासाठी कुठे तरी माचू पिचुला किंवा हिमालयात जावे लागते पण तसे नाहिये. तुम्ही त्याचा अनुभव तुमच्या स्वत:च्या घरातच घेऊ शकता.

आणि ध्यानाचे फायदे काय आहेत ? आपण ते कशाला करायचे ? जसे मी म्ह्टले की त्याने आपले तरंग सकारात्मक होतात.

कधी कधी तुम्ही एखाद्याला भेटता आणि तुम्हाला त्याच्यापासून दूर निघून जावेसे वाटते, तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलावेसेही वाटत नाही. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय कां ? आणि कधी कधी असेही लोक असतात की त्यांना भेटल्यावर तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते. त्यांच्याशी संबध ठेवावेसे वाटते. हेही पुन्हा तरंगाच.

तसेच तुमच्या मनात काही विचार येतात आणि ते अगदी बरोबर असतात. आणि कधी कधी तुमच्या मनात असे विचार येतात की जे अगदी चुकीचे असतात. असे होते नां ?

तर हे म्हणजे आपल्याच चेतनेला जाणून न घेता अंधारात चाचपडत राहिल्या सारखे आहे. तुम्ही जर चेतनेला जाणले तर बऱ्याच गोष्टी घडतात आणि तुमचे आयुष्य जास्त आनंदी होते. आपले स्वास्थ्य सुधारते, लोकांशी असलेले संबंध सुधारतात.तुम्ही ऐकले असेल की तुरुंगातल्या लोकांच्या हिंसक वृत्ती कशा कमी होतात.

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होतात. चार प्रकारचे लोक असतात. काही लोकांना इच्छा असतात. ते इच्छा करत राहतात पण त्या कधीच पूर्ण होत नाहीत. काही लोक असे असतात की जे इच्छा करतात आणि त्या साठी ते भरपूर मेहनत घेतात आणि बऱ्याच काळानंतर त्या पूर्ण होतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असे असतात की ते इच्छा करतात आणि फारसे कष्ट न करताच त्या पूर्ण होतात. आणि चौथ्या प्रकारचे लोक असे असतात की ज्यांना इच्छा करावी पण लागत नाही, गोष्टी आपोआपच झालेल्या असतात. तर तुम्हाला कोणत्या प्रकारात राहायचे आहे ? चौथ्या नां ? होय. ते सर्वात नशीबवान असतात . हे म्हणजे असे आहे की तुम्हाला अजून तहान लागलेलीही नाही आणि पाणी तयार आहे.

भारतात एक म्हण आहे की,” दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत.” बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती असते. ते संपूर्ण आयुष्यभर इतकी मेहनत घेतात , खूप पैसे कमावतात, बँकेत ठेवतात आणि मरून जातात. आणि आई वडिलांनी कमावलेल्या त्या पैशांसाठी मुले भांडत बसतात. जगातील ७० टक्के न्यायालयीन खटले हे वारसा हक्कावरून असतात. बघा, कोणीही स्वत: कमावलेल्या पैशांसाठी भांडत नाहीत. तुम्ही काय केले ? तुम्ही पैसा कमावला, तो बँकेत ठेवला आणि मुलांना एकमेकात भांडण्यासाठी तो ठेवून दिला. हे हुशारीचे काम आहे कां ?

आपण आपले अर्धे आरोग्य पैसे कमावण्यात घालवतो आणि मग अर्धी संपत्ती आरोग्य परत मिळवण्यासाठी खर्ची घालतो. हे काही तितकेसे हुशारीचे नाही. आर्थिकदृष्ट्या योग्यही नाही.

आपल्याला हे बघायला हवे की आयुष्य कुठे चालले आहे ?

एका पढत मूर्खाची एक गोष्ट आहे. एक पढत मुर्ख एका गाढवावर बसला होता आणि गाढव पळत होता. त्याच त्याचं रस्त्यावरून तो बराच वेळ गोल गोल फिरत राहिला. तेव्हा कुणीतरी त्या सज्जन गृहस्थाला विचारले की,” मी बराच वेळ तुम्हाला इथेच फिरताना बघतो आहे . तुम्हाला नक्की कुठे जायचे आहे ? “ तर तो म्हणतो, “ मला माहित नाही. गाढवाला विचारा.”

बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असेच होते. आपण समजून न घेताच काम करत रहातो, अनेक गोष्टी करत रहातो की याचा उद्देश काय आहे ? असे करताना निसर्गाने जे उपलब्ध केले आहे त्याचा आनंदही उपभोगत नसतो.

बघा जेव्हा मनात कडवटपणा असेल तेव्हा तुम्हाला जगात कुठेही आनंद मिळणार नाही. जेव्हा मनात गोडवा असेल तेव्हा तुम्हाला सगळीकडेच गोडवा दिसतो.

तर ध्यान म्हणजे आपल्यातलाच खोलवर दडलेला गोडवा शोधणे. आणि जेव्हा तुम्हाला तो मिळतो तेव्हा तुम्हाला काय करायचे असते माहित आहे ? तुम्हाला तो सर्वांना द्यायचा असतो.

लोक मला विचारतात की तुम्हाला स्फूर्ती कशी मिळते आणि तुम्हाला यातून काय मिळते ? तुम्ही जगभर सारखे कां फिरत असता ? मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, “ तुम्ही जर एखादा चांगला सिनेमा बघितला तर तुम्ही काय करता ? तुम्ही तुमच्या खोलीत गपचूप बसून रहाता कां ? की तुम्ही फोन उचलून तुमच्या मित्रांना फोन करून सांगाता की “ अरे, मस्त सिनेमा आहे, तुम्ही बघायलाच पाहिजे. “ तर असे करण्याने तुम्हाला काय मिळते ? त्या सिनेमाचे निर्माते तुम्हाला काही पैसे देतात कां ? ते सगळे फोन करून तुम्हाला काय मिळते ? तुम्ही तसे करता कारण सर्वांना वाटणे हा आनंदाचा स्वभाव आहे.

आनंदाचा स्वभाव सर्वांना देण्याचा आहे.

आनंदाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे हिसकावून घेण्यातला आनंद लहानपणी अशी वृत्ती उपजतच होती.जर इथे तुम्ही एखाद्या मुलाला सोडले तर तो फुलच घेईल, चादरच खेचेल, खुर्चीच ओढेल , सगळे उलटे पालते करेल आणि वस्तू धरून ठेवेल. तो काहीही धरून ठेवेल. अगदी चाकूही धरेल. नकळत त्याच्या हाताला लागू शकते. मूल चाकू धरेल पण आया चाणाक्ष असतात. त्या मुलाला दुसरे काही तरी देऊन त्याचा सुरीवरचा हात सैल करतील . हो की नाही ? अशी नुकसानकारक गोष्ट मुलांनी घेतली तर तुम्ही त्यांना दुसरे काही तरी देता. 

तर, काही तरी मिळण्यातला आनंद, हा एक प्रकारचा आनंद आहे जो पोरकट आनंद आहे. दुसऱ्या प्रकारचा एक आनंद आहे तो म्हणजे देण्यातला आनंद.

इथे हजर असलेल्या स्त्रियांनो, जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा मुले घरी येणार असतील, तेव्हा तुम्ही काय करता ? तुम्ही तऱ्हे तऱ्हेचे पदार्थ बनवता आणि ते छान सजवून टेबलावर ठेवता. आई म्हणून तुमचा आनंद देण्यात असतो.हो की नाही ?

आजी आजोबांचे बघा, त्यांनाही नातवंडानां सतत काही तरी देण्यात आनंद वाटतो. हो नां ? देण्यात आनंद असतो आणि हा सर्वात जास्त प्रगल्भ असा आनंद आहे.

आपण देण्यातला आनंद घेतल्याशिवाय फक्त घेण्यातला आनंद घेत आयुष्य जगू शकत नाही. एकदा कां तुम्ही देण्यातला आनंद घेतला की मग तुम्हाला जीवनात काही अर्थ वाटू लागतो समाधान वाटू लागते.

त्यामुळे हसत रहा ! तुम्हला माहितीये, लहान बाळ दिवसातून ४०० वेळा हसते, तरुण लोक फक्त १७ वेळा हसतात आणि प्रौढ क्वचितच हसतात. आणि जर तुम्ही मोठे अधिकारी किवा राजकीय नेते वगैरे झालात तर तुम्ही हसायचेच विसरता. तुमचे हसू नाहीसेच होते, हवेत विरून जाते.

हसणे म्हणजे कृत्रिम हसणे नाही, ते आतून आले पाहिजे. आणि जेव्हा तणाव पूर्णपणे निघून जाईल , जेव्हा आपण ध्यानात खोलवर जाऊ तेव्हाच हे शक्य होईल. जर कुणी म्हणाले की, “मी ध्यान करतोय”, याचा अर्थ ते जास्त हसू शकतात. पवित्रता संवेदनशीलाता ,समज, अध्यात्मिकता खूप आहे.

अध्यात्मिकता म्हणजे संवेदनशीलता,समाज,गोडवा,स्मीत हे सगळं एकत्र.

प्रश्न: जर मला बाहेरून तणाव कारणीभूत होत असेल तर काय करावे ? जर माझ्या नियंत्रणा पलीकडचे काही घडत असेल तर काय ? तर मी शांती कशी आणावी ?

श्री श्री : त्यासाठीच आपण लोकांना हे शिकवायला हवे की त्यांच्या तणावावर नियंत्रण कसे करायचे. जर घरातल्या एकाला बरे वाटत नसेल तर त्याचा परिणाम घरातल्या सगळ्यांवर होतो की नाही ? हो, नक्कीच होतो. तसेच समाजात मानसिक दृष्ट्या आजारी असलेले काही जण असतील तर समाजात गुन्हेगारी वाढते.

तुरुंगात असलेले काही जण म्हणताहेत की, “ आता आम्हाला हिंसेमध्ये रहायचे नाहिये.” पण बाहेर अजूनही कितीतरी आहेत जे समाजात त्रासदायक ठरत आहेत.आणि त्यासाठीच लोकांना हे अध्यात्मिक शिक्षण देण्याची गरज आहे.

आपण लोकांना हे शिकविण्याची गरज आहे की शांत कसे राहायचे, नकारात्मक भावनांना कसे हाताळायचे आणि मनाला कसे सावरायचे. कारण मनाला कसे सावरायचे हे ना घरात शिकवले जाते ना शाळेत शिकवले जाते. त्यामुळे राग, द्वेष,तिरस्कार हे सगळ असतं आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्यां भावनांसोबत जगत असता त्यावेळी आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया होते. त्यां भावनांना कसे घालवायचे ते तुम्हाला समजत नाही. त्यांना तुम्ही धरून ठेवता आणि त्याप्रमाणे तुमचे वागणे असते. आणि मग तशा वागण्याचा तुम्हाला पश्चाताप होतो. हीच समस्या आहे. ही साधना आणि हा विवेक हाच त्यावर उपाय आहे.