साधनेचे सार

01
2012
Dec
बंगलोर, भारत


श्रोते : गुरुदेव, आज कनकदास जयंती आहे.

भारतात एक महान संत होऊन गेले. १२ व्या दशकात कर्नाटक मध्ये ते एक धनगर होते. त्यांचे नाव कनकदास होते. १२ वे शतक हा असा काळ होता जेव्हा भक्तीची लाट आली होती भारतभर, खरेतर संपूर्ण जगात पसरली. मला वाटते, फ्रान्सिस्को डी’असिसी (असिसी चे सेंट फ्रान्सिस, इटालीअन सेंट)हे सर्व त्याच काळात होऊन गेले, १२ व्या नि १५ व्या शतकाच्या दरम्यान.

कनकदास हे श्रीकृष्णाचे महान भक्त होते. त्यांनी कन्नड मध्ये अनेक सुंदर भजने लिहिली आहेत. त्यामुळे कर्नाटकात सर्वांना ही गाणी माहित आहेत.

त्यांची गोष्ट अशी आहे की ते खालच्या जातीचे आणि गरीब होते त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. ते बाहेरच बसून प्रार्थना करीत कारण ते मंदिर मुख्यत: श्रीमंत आणि वरच्या वर्गाच्या लोकांसाठी होते. तर काय झाले की त्या मंदिराची भिंतच पडली आणि श्रीकृष्णाने कनकदासांना दर्शन दिले. आणि दुसऱ्या बाजूला जे पुजारी पूजा करत होते ते आश्चर्य चकित झाले. ही इथली अगदी सुप्रसिद्ध घटना आहे.

आजही उडुपिच्या कृष्ण मंदिरात गेलात तर तुम्हाला दिसेल की मूर्तीचे तोंड दुसऱ्या बाजूला आहे. तिथे एक पडकी भिंत आहे, त्यातूनच दर्शन घ्यावे लागते. हिलाच कनकदासांची खिडकी असे म्हणतात, जिथे उभे राहून त्यांनी प्रार्थना केली.असे म्हणतात की तेव्हापासून जात आणि वर्ण यांचा भेद करणे बंद झाले.

बऱ्याच लोकांनी जात आणि वर्णभेदाच्या विरोधात लढा दिला. ते त्यांच्यापैकीच एक होते. आणि ते सर्वांचे आवडते होते. अशी गोष्ट आहे.

प्रश्न : गुरुदेव हिंदू धर्मात कितीतरी प्रार्थना (स्तोत्रे) आहेत.काही देवीची तर काही विष्णूची प्रत्येका बद्दल हेच म्हटले जाते की त्याचे रोज पारायण करण्याने फायदा होईल. आता प्रत्येक स्तोत्राबद्दल हेच म्हटले जाते. मग कुठले म्हणायचे हे आम्हाला कसे कळावे ?

श्री श्री : सर्वात आधी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देव एक आहे. मग तुम्ही त्याला कोणत्याही नावाने हाक मारत असाल. तो एकच आहे ही पहिली गोष्ट.

दुसरे म्हणजे देवाची स्तुती केल्याने (स्तुतीपर भजने किंवा स्तोत्रे) तो खुश होते हे खरे नाही. तुम्ही जेव्हा तुमच्या घराच्या खिडक्या उघडता तेव्हा सूर्यप्रकाश आंत येतोच. हो की नाही ? 

जर तुम्ही घराच्या खिडक्या बंद ठेवल्या तर सूर्य तुमच्यावर रागवेल कां ? असे केले तर सूर्य प्रकाश द्यायचे अचानक थांबवेल कां ? नाही !

आपण ज्या काही प्रार्थना करतो, स्तोत्रे म्हणतो ते सर्व आपल्या आनंदासाठी.आपल्या स्वत:च्या विकासासाठी आपण प्रार्थना म्हणतो. आपण देवाला खुश करण्यासाठी म्हणत नाही. ज्यांना असे वाटते की उपास करुन ते देवाला खुश करत आहेत तर ते मूर्ख आहेत. हे केवळ अज्ञान आहे.

असे समजू नका की तुम्ही देवाची पूजा केली आराधना केली तर देव तुम्हाला काही तरी खास भेट देईल. हं, तुम्ही प्राथना केली तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल कारण तसा निसर्ग नियम आहे. अगदी तसेच, जसे खडकी उघडल्यावर सूर्य प्रकाश आंत येणारच. आणि सूर्य प्रकाश आंत आला की तुम्हाला त्याचा फायदा मिळणारच.

हे बघा, देव आपल्यावर नेहमीच खूप प्रेम करत असतो.पण देव तुमच्यावर जितके प्रेम करतो तितकेच तुम्ही त्याच्यावर करण्याइतके मोठे व्हा, तीच खरी भक्ती आहे, हेच प्रार्थनेचे सार आहे.

पूजा म्हणजे ते जे पूर्णपणातून आणि पूर्णत्वाने जन्माला आले आहे.आपले हृदय कृतज्ञतेने आणि आनंदाने कसे भरून आले आहे हे व्यक्त करण्यासाठी आपण पूजा करतो. ‘ प्रिय प्रभो मी इतका कृतज्ञ आणि आशिर्वाद असलेला आहे. तुम्ही मला इतके सगळे भरभरून दिले आहे.’ ही भावना व्यक्त करण्यासाठी, आपण पूजा करतो. जेव्हा आपल्यात अशी भावना निर्माण होते तेव्हा त्याच्या बरोबर एखादी कृती नक्कीच जोडली जाते. कृतज्ञतेची गहिरी भावना एखाद्या कृतीशी किंवा कर्म कांडाशी जोडण्याचा मोह कुणीच आवरु शकत नाही. 

उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखद्या जवळच्या मित्राला भेटता तेव्हा जिव्हाळ्याने त्याच्याशी हात मिळवता आणि त्याची पाठ थोपटता.पंजाबमध्ये हे अगदी नेहमी दिसते. (भारताच्या उत्तरेकडील एक राज्य.) कधी कधी पाठीवर इतकी जोराची थाप मिळते की दुखल्यामुळे ओरडाल ! ( हशा) तर अशा प्रकारे एकमेकांबद्दलचे प्रेम आपण अशी एखादी तरी कृती करून व्यक्त करतो. अशाच प्रकाराने भक्त जेव्हा भक्तीरसात इतका बुडून गेलेला असतो तेव्हा त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी एक प्रतिक म्हणून काही तरी करावेसे वाटते. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी तरतऱ्हेचे विधी आणि पूजा करण्याच्या पद्धती सुरु केल्या.

पूजेमध्ये देवाने तुमच्यासाठी जे केले त्याचीच तुम्हाला नक्कल करायची असते आणि परतफेड करायची असते. देवाने तुम्हाला फुले दिली, ‘आमची हृदये देखील त्याच्यासाठी अशीच फुलू देत’ अशी प्रार्थना करत तीच फुले तुम्ही परत देवाला वहाता. देवाने आपल्याला पाणी दिले, आपणही आपणही पाण्यासारखेच नम्र व्हावे आणि सर्वांमध्ये अशीच शीतलता यावी या भावनेने, पूजेच्यावेळी देवाला पाणी वहातो. पाण्याप्रमाणेच आपल्यालाही एक मूलभूत पाया असावा. म्हणून आपण प्रार्थना करतो की आपले जीवनही असेच व्हावे.

आपण देवाला अक्षतही वाहतो, कारण ते एक न संपणाऱ्या समृद्धतेचे प्रतिक आहे. तांदुळाच्या अक्षतांचा कधी तुकडा झालेला नसतो. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, जडवस्तू आणि ऊर्जा कधीही नष्ट होत नाही आणि धक्का पोहोचत नाही. जेव्हा आपण भात खातो तेव्हा आपल्याला ऊर्जा आणि पोषण मिळते आणि ते शरीराकडून शोषून घेतले जाते. आणि जेव्हा आपण मारतो तेव्हा आपले शरीर दहन केले जाते आणि परत पृथ्वी तत्वात विलीन होते. त्या मातीतून पुन्हा तोच तांदूळ पिकतो आणि खाण्यासाठी अन्न तयार होते. जेव्हा शरीराचे राखेत रुपांतर होते ती राख अनेक माशांसाठी अन्न बनते आणि तेच मासे पुन्हा अनेक माणसाचे अन्न बनते. तर हे निसर्गात परत परत होत असते. जेव्हा तुम्ही प्रेत जमिनीत पुरता तेव्हा शरीर पंचतत्वात विलीन होते.

तसेच तुम्ही देवाला चंदन लावता ते अशा भावनेने की त्याचा सुगंध सगळीकडे पसरू दे. आपली पाचही ज्ञानेंद्रिये जी आपल्याला इंद्रिय अनुभव आणि सुख देत असतात. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांच्यात काही तरी जाणीव होण्याचे कार्य आणि त्याच्याशी जोडलेल्या काही गोष्टी असतात. तर या पाच ज्ञानेंद्रियांनां आनंद आणि सुख देणाऱ्या सर्व गोष्टी आणि वस्तू देखील पूजेच्या वेळी वाहण्यासाठी वापरल्या जातात.पूजेच्यावेळी आपण घंटा वाजवतो कारण त्याने निर्माण होणाऱ्या नादामुळे इथल्या तिथल्या विचारांपासून मुक्त होतो आणि वर्तमान क्षणात स्थिर होतो. मग पूजेच्यावेळी होणाऱ्या त्यां एकमेव आवाजाशी त्या नादाशी मनाची एकतानता होते.म्हणूनच मनाची एकाग्रता येण्यासाठी पूजेच्या वेळी अनेक ढोल, सनई, चौघडे आणि झांजा यांचा गजर केला जातो. इतक्या मोठ्या आवाजामुळे मन वर्तमान क्षणात येते.

आरतीच्या वेळी कापूर लावला जातो. जसे देव तुमच्या भोवती सूर्य चंद्र यांना फिरवतो अगदी तसेच, तुम्ही आनंद मिळण्यासाठी कापराचा छोटा दिवा देवासमोर फिरवता. हे देखील अशी प्रार्थना व्यक्त करण्यासाठी की आपल्या जीवनातील प्रकाश कधीही देवापासून दूर जाऊ नये. तो नेहमी केंद्रित आणि देवाभोवती फिरणारा रहावा. याच गहिऱ्या भावनेने तुम्ही आरती करता. भारतभर सगळीकडे लोक आरती करतात पण त्यांना त्यातला खोलवर दडलेला अर्थ माहित नाही.

आरती म्हणजे सर्वात उच्चतम आणि महान असा परमानंद. देव हा आनंदाचा सर्वात महान स्रोत आहे याचे ते प्रतीक आहे. जेव्हा तुमच्या हृदायातून असे तीव्र प्रेम आणि भक्ती ओसंडून वाहू लागते की तुमच्या शरीराचा कान अन् कान त्यात चिंब भिजून जातो तेव्हा तीच खरी आरती. आरती तीच जी तुम्हाला संपूर्ण समाधान देते. आरती या शब्दाचे दोन भाग आहेत. ‘आ’ आणि ‘रती’ . ‘रती’ म्हणजे आनंद, परमानंद आणि अत्यानंद. तर जेव्हा आपण अशाप्रकारच्या भक्ती आणि परमानंदाने परिपूर्ण असतो तेव्हा त्याला ‘आरती’ म्हणतात. म्हणून आपण अशा प्रार्थनेने आरती करतो की आपले जीवनही असेच अत्यानंदाने आणि आणि भक्तीने भरून जावे जेणे करून जिथे पाहू तिथे आपल्याला देवच दिसेल. याला पूजा म्हणतात. पूजा ही कधीच देवाला खुश करण्यासाठी किंवा स्तुती करण्यासाठी केली जात नाही.

पण आपल्या देशात लोक मूर्तीच्या तोंडातही मिठाई भरवत असतात, इतके की त्यां मूर्तीचे तोंड अगदी घाण होऊन जाते. मग तुम्हाला मूर्तीचे डोळे,नाक किंवा तोंडही दिसत नाही. इतकेच नाही तर, भीतीपोटी ते देवाच्या प्रत्येक फोटोला आणि मूर्तीला फुल वाहातात कारण जर त्यांनी हनुमानाला फुल वाहिले आणि शंकराला वाहिले नाही तर शंकर त्यांच्यावर रागावेल आणि शिक्षा करेल. मनात अशा सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा निर्माण होतात. म्हणूनच असे म्हटले आहे की तुमची एकाच इष्ट देवता असावी. बाकी सर्व देव त्याच देवाची रूपे आहेत. त्याचे सार हे आहे की सर्वात एक देव आहे आणि प्रत्येकात दैवत्व आहे हे जाणणे. हे असे आहे.

प्रश्न : गुरुदेव, ऋषी महिलांच्या बद्दल सांगाल कां ?

श्री श्री :  होय. काही ऋषी स्त्रिया आहेत आणि आणखी येण्याचीही शक्यता आहे. अगदी थोड्या स्त्रिया ऋषी आहेत, जास्त नाही.

मीरा त्यापैकीच एक भक्त होती. तामिळनाडू मध्ये एक स्त्री होती. तिचे नाव अवैयार होते. आणि ती तामिळ साहित्याची जननी म्हणून ओळखली जाते. जो कोणी तामिळचा अभ्यास करतो तो अवैयारला चुकवू शकत नाही. हो नां ? इथे किती तामिळी आहेत ? ( श्रोत्यांपैकी काही जण हात वर करतात. )

( श्रोत्यांपैकी एक जण ‘आथी चुडी’ या आवैयार च्या रचनेचा उल्लेख करतो.)

‘आथी चुडी’? ही मुळाअक्षरे आहेत नां ? जसे ‘ ए फॉर अॅपाल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट’ असते तसे तिने प्रत्येक मुळाक्षरासाठी काहीतरी आध्यात्मिक बनवले आहे.म्हणजे लहानपणापासून मूल्यांसोबत मुळाक्षरे शिकवली जातात. या हुशार स्त्रीने, आईने बघा कसे केले.

तिची गोष्ट खूप रंजक आहे. ती एक सुंदर तरुण स्त्री होती. आणि तिच्या आई वडिलांना तिचे लग्न करुन द्यायचे होते पण तिला करायचे नव्हते. राजाने तिला बघितले आणि त्याला ती आवडली. तुम्हाला माहित आहे नां ? त्याकाळी राजाला सर्वात उत्तम तेच मिळण्याचे सौभाग्य होते. आणि ती इतकी चांगली होती. त्यामुळे राजाला तिच्याशी लग्न करारायचे होते. आणि राजाने विचारले म्हटल्यावर कुणी ‘नाही’ म्हणू शकत नाही. आणि मग पुढे असे होते की ती गणेश भक्त होती त्यामुळे तिने गणेशाची प्रार्थना केली.

भारतात तुम्ही तुमचा स्वत:ला हवा तो देव पुजू शकता. देव जरी एकाच असला तरी प्रत्येकाची एक इष्ट देवता असते. ( मनात भरलेली, आवडलेली देवता) प्रत्येकाचा त्यांच्या आवडीच्या रूपातला देव असू शकतो. बघा, देव एकाच आहे. एक अल्ला, एक परमात्मा. पण त्यां देवासाठी तुम्ही एक नाव, फक्त तुमच्यासाठी निवडू शकता. आणि मग तुमचे त्या नावाशी एक व्यक्तिगत खास असे नाते जुळते.

तिची इष्ट देवता होती गणेश आणि तिने त्याची प्रार्थना केली की ‘ मी म्हातारी दिसू दे.’ आणि असे म्हणतात की लगेचच तिचे केस पांढरे झाले आणि ती म्हातारी दिसू लागली. मग राजा आला आणि त्याने तिच्याशी लग्न केले नाही. अशी आहे तीची गोष्ट.

प्रश्न: गुरुदेव, समर्पणावर काही सांगाल कां ? मला वाटते की समर्पणामुळे मी जरा अंधश्रद्धाळू / अज्ञानी होतोय. मी जेव्हा मागे वळून भूतकाळाकडे बघतो, तेव्हा मला असे दिसते की जेव्हा मला काही निर्णय घ्यायचा असायचा किंवा काही करायचे असायचे तेव्हा सगळं गुरुजीच घडवून आणतात तर मग तेच सगळं करतील. त्यामुळे त्या त्या प्रसंगात मी जे करणे अपेक्षित असायचे ते करायचे सोडून, मी विचार करायचो की जे व्हायचे ते आपोआपच होईल. तर मला कृपया साला द्या की मी कोणत्या प्रकारच्या समर्पणात असावे जेणेकरून मी अज्ञानात / अंधश्रद्धाळू रहाणार नाही.

श्री श्री: संकल्प आणि समर्पण दोन्ही एकत्र जातात. एकदा तुम्ही तुमचे १०० % दिलेत आणि आता काहीही करण्यासारखे शिल्लक राहिले नाही की मग समर्पण करा. तुमचे काम् तुम्ही केलेत की मग तुम्ही तुमच्या कर्माच्या फळाच्या इच्छेचे समर्पण करु शकता. पण काहीच न करण्याने काहीच साध्य होणार नाही. जे आपण करायला हवे ते १०० % करायलाच हवे आणि नंतर आपल्या कर्माच्या फळाची कामना देवाला समर्पण करायची. ‘माझ्यासाठी जे उत्तम आहे तेच मला मिळो’, ही भावना मनात ठेऊनच समर्पण करावे. आपण आपल्यापरीने सर्व कष्ट करावे आणि मग त्या कर्माच्या फलाची इछा देवाला अर्पण करावी. तुम्हाला कळतयं कां मी काय म्हणतोय ते ?

तुम्ही नुसते स्वस्थ बसून असा विचार करता कामा नये की, ‘ मी समर्पण केले आहे, आता सगळे आपोआप होईल.’

तशी सिद्धावस्था हळू हळू येते, त्याला वेळ लागतो. तुम्ही तुमच्या साधनेत जेव्हा अगदी सामर्थ्यवान बनाल, तुमच्यात कुठलीही वासना किंवा तिरस्कार शिल्लक राहणार नाही, कोणत्याही इच्छा रहाणार नाहीत, तेव्हा त्या स्थितीला ‘नैशकर्म सिद्धी’ म्हणतात. ( कुठलेही कर्म केल्याशिवाय काही मिळवण्याची क्षमता.) अशी स्थिती की ज्यात काहीही प्रयास न करता तुमच्या इच्छा पूर्ण होतात. तशी स्थिती येईपर्यंत आपण, कार्य, आपले काम करत रहायला हवे.

सिद्धावस्थेमध्ये भक्तीत इतके खोलवर जाता की तुम्हाला कशासाठीही काही प्रयास, मेहनत करावी लागत नाही. विचार करायच्या आधीच इच्छा पूर्ण होतात. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आहे ? ( श्रोत्यांपैकी बरेच भक्त हात वर करतात.) बघा, असे होतेच आहे.

तर मग आपल्याला अशी स्थिती मिळवता येईल कां ? आपण आध्यात्मिक मार्गावर जितके जास्त खोलवर जाऊ तितके आपण समाधानी होत जातो. आपण जितके जास्त समाधानी होत जातो तितक्या जास्त आपण सिद्धी प्राप्त करू शकू.

सिद्धी प्राप्त करणे भूतकाळ किंवा भविष्यकाळाची गोष्ट नाहिये. ती शी गोष्ट आहे जी वर्तमानातच मिळू शकते. तरीही सध्या त्या क्षमतांवर पडदा पडलेला आहे. हळू हळू तो पडदा दूर होईल.हा पडदा जसजसा दूर होईल तसतशा या क्षमता आपल्यात विनासायास दिसून येतील.

प्रश्न : गुरुदेव, मी अनेक ग्रंथांमध्ये वाचले आहे की ‘सगळे काही एकच चेतना आहे आणि आपण त्या चेतनेचाच भाग आहोत. मग असे असताना समर्पण म्हणजे तुम्ही काय सांगाल ? आपण कशाला समर्पित होतो ? सर्व एकाच चेतना आहे तर मग, असे काय आहे की ज्याला आपण समर्पण करतो आपण कोणाला समर्पण करतो ?

श्री श्री : होय, खरे आहे. खरे म्हणजे समर्पण करावे असे काही नाही. पण जेव्हा तुमच्या मनाला वाटते की , ‘मी वेगळा आहे, निराला आहे, मी एकटा आहे तेव्हा समर्पण करा आणि निवांत रहा. ‘आई घरी आहे’ ही जी भावना आहे, तसे हे आहे. ‘आई घरी आहे’ ही भावना निर्माण होण्यासाठी काळजी सोडून देण्याची जी भावना आहे त्याला समर्पण म्हणतात. इतकेच. असे काही नाही की तुम्ही समर्पण करायलाच हवे. कळले ? म्हणूनच तीन निरनिराळे मार्ग आहेत. ( कर्म योग, भक्ती योग आणि ज्ञान योग ).

ज्ञानयोगाचा मार्ग म्हणजे जेव्हा तुम्हाला जाणवते सर्व एकाच गोष्टीपासून बनले आहे
( अद्वैत) दोन असे काही नाहीच. ( अद्वैत) तेव्हा तो ज्ञानयोग आहे.

पण जेव्हा तुम्ही हे विसरता आणि तुम्हाला असे वाटते की दोन आहेत आणि तुम्ही काही तरी धरून ठवले आहे आणि ज्याचे ओझे तुम्हाला आता सहन होत नाही तेव्हा तुम्ही म्हणता की, ‘ आता मात्र मी हे टाकून देतो, तेव्हा त्यालाच समर्पण म्हणतात.

याचे एक चांगले उदाहरण म्हणजे, तुम्ही ट्रेनमध्ये बसला आहात आणि तुमचे सामान अजूनही खांद्यावरच आहे. तुमचे आसन जरी आरामशीर आहे तरी तुम्ही तुमचे सामान अजूनही खांद्यावर , डोक्यावरच ठेवले आहे आणि तुम्हाला अस्वस्थ वाटते आहे. मग कुणीतरी येते आणि म्हणते, ‘अरे, चल सामान खाली ठेव. असेही, ही ट्रेन तुझे सामान वाहून नेतेच आहे. आरामशीर बस. तुम्हाला संपूर्ण निवांतपणा देणारी भावना म्हणजे शरणागती. 

प्रश्न : गुरुदेव, जर माझी निवड रुळलेल्या मार्गापेक्षा निराळी असेल तर काय करावे ? लोक म्हणतात, ‘तू लग्न करावेस मुले होऊ द्याविस, संपत्ती गोळा करावीस वगैरे’ जी रुळलेली वाट आहे. जर मला या पेक्षा वेगळे काही करायचे असेल तर मला सारखे सांगितले जाते की, ‘ तू चुकतो आहेस.’ मला ते चूक वाटत नाही कारण ती माझी निवड आहे. मला निवडण्याची संधी असली पाहिजे. अशावेळी काय करावे ? कुटुंबियांच्या, समाजाच्या विरोधात कसे जावे आणि तरीही ठाम राहून आनंदी राहून स्वत: स्वत:ची निवड कशी करावी ?

श्री श्री  : होय, असे करणे खूप कठीण आहे. तुमहला तुमच्या पालकांना पटवून द्यावे लागेल की सगळे करतात ते तुम्हाला करायचे नाहिये. तुम्हला माहितीये ? या सर्व गोष्टींचा खुल्या दिलाने विचार करणे सर्वात उत्तम. एकदम आखडू राहू नका. मला वाटते खुल्या दिलाने राहा आणि बघा काय होते ते. मला वाटतं याकडे बघण्याचा हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. 

तुम्हला माहित आहे की लग्न आणि कुटुंब यात नेहमीच काही तरी तडजोड करावी लागते. ‘ फक्त मी म्हणेन तसेच’ असेच म्हणता येत नाही. काही तरी मधला मार्ग स्वीकारवा लागतो. तुमच्या जोडीदाराचेही मत विचारात घ्यावे लागते. तर जीवनात नेहमीच तडजोड करावी लागते. त्यामुळे खुल्या दिलाने रहा.

काहीही झाले तरी तुमचा आनंद आणि खुशी घालवू नका. काही लोक असे आहेत जे एकटे आहेत. त्यांचे लग्न झालेले नाही आणि ते खुशही नाहीयेत. आणि लग्न झालेले लोकही आहेत जे खुश नाहीयेत. ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत. मी म्हणेन की तुम्ही लग्न करा किंवा नका करू, पण जसे असाल तसे आनंदी राहा. ते गरजेचे आहे.

ज्या लोकांना मुले नाहीत ते रात्रंदिवस रडत असतात आणि खुश नसतात. असेही लोक आहेत ज्यांना मुले आहेत आणि ते खुश नाहीयेत. तर, तुमच्या आनंद, परिस्थिती आणि प्रसंग यांच्यापासून अलग करायला हवा. असे समजू नका की, ‘ मी सुंदर दिसलो तर मी आनंदी होईन.मी म्हातारा व्हायला लागलो तर मी आनंदी असणार नाही.’ नाही ! एक गोष्ट नक्की करा की, ‘ काहीही झाले तरी मी आनंदी आणि सामाधानीच रहाणार’

प्रश्न : गुरुदेव, मला एक घटना तुम्हाला सांगायची आहे. मी कुठेतरी जात होतो आणि मी दोन केळी विकत घेतली.मी एक केळे खाल्ले आणि दुसरे ठेऊन दिले. रस्त्यात मला एक भिकारी दिसला आणि आणि मनात विचार आला की ते केले त्याला देऊन टाकावे. पण मनात असाही विचार आला की ते नंतर खाण्यासाठी ठेऊन द्यावे. मी ते ठेऊन दिले. मी चूक केली कां ? मी त्यां भुकेल्या माणसाला ते केळे द्यायला हवे होते कां ?

श्री श्री : मी तुम्हाला सांगतो, नेमके असेच होते. लोक केवढे तरी अन्न विकत आणतात आणि मग फ्रीजमध्ये ठेवतात. काही काळाने त्यांच्या लक्षात येते की ते खराब होतेय आणि मग ते फेकून देतात. तुमच्यापैकी किती जण असे करतात ? फ्रीजमध्ये अन्न ठेऊन मग ते फेकून देतात. ( श्रोत्यांपैकी काही लोक हात वर करतात. ) जगभरातल्या लोकांची ही सवय आहे. तुम्हाला माहित आहे कां ? टाकून दिलेल्या अन्नापैकी १ / ३ अन्न फ्रीजमधले आसते. आणि जवळ जवळ १ / ४ इतके टाकून दिलेले अन्न दुकानातले असते कारण त्यावरची मुदतीत विकण्याची तारीख उलटून गेलेली असते. ही साठा करुन ठेवण्याची वृत्ती जगभर आहे. मी म्हणतो उत्स्फूर्त रहा.जर ठेवावेसे वाटले तर ठेवा. जर कुणी भुकेला दिसला आणि त्याला द्यावेसे वाटले तर द्या. एकाच निर्णयावर ठाम राहू नका. ‘ मी केले नेहमी स्वत:कडेच ठेवायला पाहिजे. देऊन टाकता कामा नये.’ हे चांगले नाही. असाही विचार करायला नाकी की, ‘ मी नेहमी देऊनच टाकायला हवे.’ हे ही चांगले नाही. सहज राहा, स्वाभाविक राहा आणि कधी असे करा तर कधी तसे करा.

प्रश्न : गुरुदेव, काल मला एक बाई भेटल्या. त्यांनी मला सांगितले की जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी त्यांचे गुरु त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितले की समाजाचे रक्षण करण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे. या स्वप्नामुळे प्रोत्साहित होऊन त्या भारतीय पोलिस खात्यात (IPS) भारती झाल्या, जरी त्या कधीही खेळाडू वगैरे नव्हत्या. त्यांनी सांगितले की त्यांच्या प्रशिक्षणात त्यांच्या गुरूंनी त्यांना मदत केली आणि आज त्या भारतातल्या एक करारी पोलिस अधिकारी आहेत. असे काही खरेच होऊ शकते कां ? अशी काही शक्ती आहे कां , जी एखाद्या व्यक्तीला इथपर्यंत नेऊ शकते ?

श्री श्री : तुम्हाला माहिती आहे कां ? पाच प्रकारची स्वप्ने असतात. पहिल्या प्रकारचे स्वप्न हे तुमच्या स्वत:चेच प्रगटीकरण असते. तुमच्या स्वत:च्या इच्छा, भीती हे स्वप्न म्हणून येते. 

दुसऱ्या प्रकारची स्वप्ने असतात ती तुम्ही पूर्वी अनुभवलेल्याच गोष्टी स्वप्न म्हणून येतात.

तिसऱ्या प्रकारचे स्वप्न अंत:प्रेरणा असलेले स्वप्न असते. भविष्यात जे होणार आहे तेच स्वप्न पडते.

चौथ्या प्रकारचे स्वप्न असते त्याचा तुमच्याशी काहीही संबंध नसतो तर तुम्ही जिथे राहत असता त्याच्याशी असतो. समजा तुम्ही ओरिसा मधल्या एखाद्या हॉटेल मध्ये गेलात किंवा कुणाच्यातरी घरी गेलात तर तुमच्या स्वप्नात तुम्हाला ओरिया भाषा ऐकू येईल. तुम्हाला असा अनुभव आला आहे कां ? तुम्ही जर बंगालमध्ये गेलाआसाल आणि झोपलात तर स्वप्नात तुमच्या तोंडी बंगाली शब्द येतील. तर हा झाला चौथा प्रकार.

पाचव्या प्रकारात ह्या सगळ्यातले थोडे थोडे मिसळलेले असते. ती सरमिसळ असते. आपल्या स्व्प्नांपैकी ९० % स्वप्ने यांच प्रकारची असतात. त्यात थोडेसे अंतर्ज्ञान, थोडेसे हे थोडेसे ते असते. त्यामुळेच तुम्ही तुमच्या स्वप्नांवर जास्त अवलंबून राहू नये.

काही अंतर्ज्ञान असलेली स्वप्ने असतील. नक्कीच. पण कधी कधी तुमच्या स्वत:च्या भीती महत्वाकांक्षा सुद्धा त्या स्वरुपात येऊ शकतात. मी काय म्हणतोय ते कळतयं नां ? तुम्ही ते पूर्णपणे झिडकारू शकत नाही आणि त्याचबरोबर पूर्णपणे स्वीकारही करू शकत नाही. तुम्ही त्याची काळजी करण्याची गरज नाही. याला योग माया म्हणतात. साधकाच्या बाबतीत या गोष्टी होतात. तेही त्याना जेव्हा सल्ल्याची गरज असेल तेव्हा. आणि जेव्हा तुम्ही ध्यान करता आणि ज्ञान मार्गावर असता तेव्हा या सर्वातून बाहेर पडू शकता.

प्रश्न : गुरुदेव, रुपाकडून अरुपाकडे प्रवास आहे.तर मग गुरु बरोबर असण्याचे किती महत्व आहे ? अगदी जेष्ठ लोकांनाही गुरुच्या मागे धावताना आपण बघतो. तर आम्ही केवळ ज्ञानात राहायचे, की अस्तित्व जाणवून घ्यायचे की तुमच्या मागे धावायचे ?

श्री श्री : हे बघा, माझ्या मागे कुणीही नाही. सगळे माझ्या पुढे आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा. मला काहीच हवे आहे असे नाही. तुम्ही एका जागी राहिलात आणि समाधानी असलात तर चांगलेच आहे. आणि अपराधी वाटून घेऊ नका. मला तुम्हाला आणखी समस्यांमध्ये टाकायचे नाहिये. जेव्हा तुमचे मन हृदय म्हणते पळ आणि बुद्धी म्हणते पळू नको, तुम्ही आधीच एका द्विधा मन:स्थितीत आहात. मी तुमच्या ह्र्दयाची बाजूही घेणार नाही आणि बुद्धीचीही नाही कारण दोन्ही महत्वाचे आहेत. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचे आहे. कधी एकाला जिंकू द्या तर कधी दुसऱ्याला. कधी डोक्याने जिंकावे तर कधी हृदयाने, हेच जीवन आहे.

इतकेच जाणा की एक शक्ती आहे आणि चमत्कार होतात. चमत्कार होण्यासाठी थोडी जागा ठेवा.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही आम्हाला म्हणता की ‘ निवड तुमची, आशिर्वाद माझा.’ जर आम्ही निवडलेली गोष्ट तुमच्या मोठ्या दृष्टी नुसार नीट झाली नाही तर आम्हाला कसे कळेल आणि ती आम्ही सुधरावी ? आम्हाला पुन्हा मार्गावर आणण्याची जबाबदारी तुम्ही घ्याल कां ?

श्री श्री : ( हसतात) प्रत्येक मार्ग माझाच आहे. मी तुमच्या साठी उत्तम तेच चिंततो आणि ते तुम्ही निवडावे हे मला आवडेल. मी तुमच्यासाठी ठरवतो असे नाही. मला तुम्ही निवडायला हवे आहे कारण प्रत्येक वेळी तुम्ही निवड केल्याने तुमचा विकास होतो.