दोन अधिक एक बरोबर शून्य

29
2012
Dec
बँड अँनटोगँस्ट, जर्मनी
प्रश्न: गुरुदेव, कृपा करून आपण आध्यात्मिकता आणि गणित यांचा एकमेकांशी काय संबंध आहे या बद्धल काही बोलाल काय?

श्री श्री : आध्यात्मिकतेचे गणित म्हणजे दोन अधिक एक बरोबर शून्य.

हे लक्षात येतेय काय? यावर विचार करा!

जेंव्हा शरीर आणि मन, या दोन गोष्टी एका आत्म्यात मिसळून जातात तेंव्हा काहीही शिल्लक राहत नाही. हे असे आहे!

प्रश्न: प्रिय गुरुजी, आजपर्यंत तुम्हाला येशूचा अर्थ, त्यांचा जन्म, आणि त्यांच्या या जगातील अस्तित्वाबाबत बोलण्यासाठी अनेक वेळा विचारणा झाली आहे. त्याबद्धल काही थोडे बोलाल काय?

श्री श्री : येशू हे एक प्रेमाचे प्रतिक आहे.

त्यांना किती अपमान आणि वेदना सहन करायला लागल्या त्याकडे पहा. येशुंनी त्या वेदना आणि जखमा सहन करताना आपला समभाव आणि शांतपणा कधीही सोडला नाही.लोकांनी त्यांना दोषी ठरविले. त्यांचे स्वतःचे शिष्य त्यांना सोडून पळून गेले.

त्यावेळा त्यांच्यासाठी ते किती यातनामय असेल याची कल्पना करा.जेंव्हा तुम्ही तुमच्या भक्तांसाठी तुम्हाला शक्य आहे ते सर्व काही करता आणि तरीही ते तुमचा त्याग करून निघून जातात, याच्या वेदना काय असतात याची तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. पण येशुंचे आयुष्य असेच होते. आणि मग जेंव्हा सर्वजण त्यांना सोडून गेले तेंव्हा त्यांनी देवाला विचारले कि “ तुम्ही पण माझा त्याग केला आहे काय?”

अशा तऱ्हेने त्यांचे आयुष्य म्हणजे एका बाजूला अशा सर्व वेदना आणि दुसऱ्या बाजूला प्रेम असे होते.

आता याचा अर्थ असा नव्हे कि कोणीही जेंव्हा इतके प्रेम करतो तेंव्हा त्यांना अशाच वेदना सहन करायला लागतात. ते तसे नसते. त्यांनी लोकांना सदैव असा संदेश दिला कि” कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत हठवादी होऊ नका, कोणतीही तुलना करू नका आणि निर्दयी होऊ नका. सर्वांच्या बाबतीत दयाळू आणि प्रेमळ रहा कारण देव म्हणजे प्रेम आहे.”

त्याकाळी लोक डोक्याचा जास्त वापर करीत असत आणि ते फक्त पाप आणि शिक्षा याचाच विचार करीत असत.ते स्वर्गाची स्वप्ने पाहत असत आणि त्यांना नरकाची भीती वाटत असे.

येशूने अशी शिकवण दिली कि” वर्तमानात जगायला शिका. हा क्षण जगा आणि सर्वांप्रती दया आणि प्रेम असूद्यात.देवाला घाबरायचे कारण नाही कारण तो आपला पिता आहे आणि पित्याप्रमाणे तो आपला एक भाग आहे. माझा पिता आणि मी एकच आहोत.”

त्याकाळात त्यांनी असा क्रांतिकारी संदेश दिला आणि लोकांना याची जाणीव करून दिली कि हा आयुष्याचा प्रवास हा डोक्याकडून हृदयाकडे असा असून डोक्याकडून स्वर्गाकडे , ताऱ्यांकडे नव्हे.

त्यांनी असा संदेश दिला आणि सुमारे सत्तर वर्षे कोणीच त्याची नोंद घेतली नाही.

विद्वान लोकांकडून मी असे ऐकले आहे कि येशूच्या मृत्युनंतर सत्तर वर्षांनी बायबल लिहिले गेले. त्यानंतर त्या मूळ आराखड्यात अनेक बदल झाले असण्याची शक्यता आहे.म्हणून ख्रिस्ती धर्मात ७२ पंथ असून , प्रत्येकजण आपलाच खरा पंथ असल्याचा दावा करीत असतो.

येशू हा एकच होता पण त्या धर्मात ७२ पंथ असून त्या प्रत्येकाने बायबलचा आपल्यापद्धतीने अर्थ काढला आहे.

खरेतर त्यांनी त्यातील मतीतार्थ लक्षात घेऊन, त्यावर तार्किक वादविवाद करण्यात काही अर्थ नाहीये कारण मग तश्या तार्किक वादाला जगात काही अंत नाही.

भगवान बुद्धांच्या बाबतीत पण तसेच झाले आहे. भगवान बुद्ध हे एक होते पण बुद्ध धर्माचे ३२ पंथ आहेत आणि प्रत्येक जण स्वतःला अस्सल दस्तऐवज समजतो, आणि त्यांच्या शिकवणीचे योग्य स्वरूप असल्याचे समजतो.

प्रेषित महमद यांच्याबाबतीत पण काहीसे असेच आहे. इस्लामचे पांच पंथ असून ते एकमेकांचा दुस्वास करतात. खरे तर ते एकमेकांचे खंडन करीत असतात.

माणसाला खरेतर कल्पना वास्तवात न अनुभवता त्यांना उगीचच कवटाळून बसायची सवय असते.

लोक त्या कल्पनांना त्यांची ओळख बनवितात आणि मग त्या ओळखीसाठी ते काही पण करायला तयार असतात.

येशूचा संदेश असा होता “ जागे होऊन पहा कि स्वर्गाचे राज्य तुमच्यातच आहे. देव म्हणजे प्रेम आहे हे जाणून घ्या.”

म्हणून लहान मुलांसारखे व्हा. मुलांना काही पूर्वग्रह नसतात. मुलांसारखे झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गात प्रवेश नाही. हा मूळ संदेश आता कोठेतरी हरवून गेला आहे.

लहान मुलांसारखा निरागसपणा आणि सर्वांप्रती आपलेपणा याचा सर्वत्र अभाव दिसतो. म्हणून धर्माच्या नावावर सगळीकडे गुन्हे घडताना दिसत आहे.

जेंव्हा धर्म हा राजकीय अधिकाराबरोबर मिसळायला लागल्यावर जातीयवाद डोके वर काढू लागतो.

हे सर्व घडायला कारण म्हणजे आपल्याला आपल्या अंतर-प्रकाशचा विसर पडला आहे कि आपण म्हणजे आपल्या अंतरात्म्याचा प्रकाश आहोत.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, जर काही न करिता आपल्याला जर एवढा आनंद आणि सुख मिळत असेल तर मग आपण इतर काही करायची काय आवश्यकता आहे?

श्री श्री : तुमचा स्वभाव धर्म असा आहे कि तुम्ही फार वेळ काही न करिता बसू शकत नाही. तुम्हाला माहित आहे कि आनंद हा घटनांच्या विरुद्ध क्रमाने मिळतो किंवा जाणवतो.

जेंव्हा तुम्ही एखादी गोष्ट करीत असता आणि तुम्ही त्यात १००% प्रयत्न केलेत तरच तुम्हाला काही न करण्याचे महत्व कळते.

असे पहा कि जेंव्हा तुम्ही सक्रीय आणि गतिशील असता, तेंव्हाच तुम्हाला गाढ विश्रांती मिळू शकते. पण जेंव्हा तुम्ही दिवसभर नुसते अंथरुणावर लोळत बसलात तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही. म्हणून तुम्ही जे करीत आहात ते करण्याची गरज असते.

तुम्हाला तुमची स्वतः ची काही कर्मे करायची असतात आणि मग ती कामे झाल्यावर, त्या काम करण्याच्या अवस्थेत आणि काम करीत असताना , काही न करण्याच्या स्थितीचा अनुभव आपण घेऊ शकतो.

प्रश्न: गुरुदेव, इच्छा या तयार केल्या जातात का आणि मग त्या बाजूला सारता येतात का? जर येत असतील तर कश्या?

श्री श्री : क्षणभर थांबा आणि तुमच्या लहानपणापासूनच्या आयुष्याचा आढावा घ्या. तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा होत्या, त्यातील काही पूर्ण झाल्या आणि बऱ्याच तुम्ही सोडून दिल्यात. लहान मुल असताना, किंवा तरुणपणीची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली असे नाहीये.

जर समजा तसे झाले असते तर तुम्ही फार विचित्र परिस्थिती उद्भवली असती. ते तसे झाले नाही म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. आणि म्हणूनच तुमच्या बाबतीत जे व्हायला पाहिजे तेच होत आले आहे.

काही कडवट अनुभवांमुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी खोली प्राप्त झाली आहे तर काही चांगल्या अनुभवामुळे तुमचे व्यक्तिमत्व व्यापक झाले आहे. त्या सर्व अनुभवांनी तुमचे आयुष्य समृद्ध केले आहे. चांगले किंवा वाईट अशा दोन्ही अनुभवांचे नेहमी स्वागत करायला पाहिजे कारण ते तुमचे आयुष्य बळकट करीत असतात.

तुम्ही कधीही कल्पना केली नसेल अशा तऱ्हेने ते तुमचे आयुष्य समृद्ध करीत असतात. ते सर्व तुमच्या साधनेचा एक भाग आहे असे समजा. म्हणून चांगले अनुभव हा तुमच्या साधनेचा एक भाग आहेत तसेच तुम्ही घेतलेले वाईट अनुभव हा पण तुमच्या साधनेचा एक भाग आहेत.

उदाहरणार्थ, लोकांनी तुमची केलेली वाहवा किंवा तुमचे केलेले अपमान हे दोन्ही तुमच्या साधनेचे भाग आहेत. या दोन्हीमुळे तुम्ही कणखर होता, तुम्ही केंद्रित होता आणि जशी तुमची वाढ व्हायला पाहिजे तशी ती होते.

हि सर्व स्तुती आणि अपमान, हे सर्व या पृथ्वीतलावर फक्त होत असतात आणि आपण त्यांचा धैर्याने सामना करून पुढे जायला पाहिजे.एक सशक्त आत्मा, एक सशक्त व्यक्ती व्हा. हीच खरी शक्ती आहे.आयुष्यातील कोणत्याही प्रसंगात तुमच्या चेहऱ्यावर हसू कायम असते काय? या सर्वाचा तोच एकमेव उद्धेश आहे. तुम्ही तुमचे हास्य कायम ठेऊ शकता काय?

ते तसे कायम ठेवणे अवघड आहे हे मला माहित आहे, पण तुम्ही ते तसे करणे आवश्यक आहे.

तुम्ही जर काही गोष्टींपासून लांब पळायचा प्रयत्न केला तर त्या तुमचा पाठलाग करू लागतील. या आयुष्यात नाही तर पुढच्या आयुष्यात ते नक्की होईल. म्हणून असे म्हटले आहे कि आता जे घडत आहे ते तसे होऊ देत, आणि चेहऱ्यावर मोठे हास्य ठेऊन त्याचा स्वीकार करून धैर्याने आणि उत्साहाने पुढे जात रहा.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, ध्यासाचा त्रास का होतो? माझा रोख परमेश्वर आणि त्या अव्यक्त अनंताच्या ध्यासाकडे आहे. या बाबतीत आपण कोठून आले आहोत?

श्री श्री : असे पहा कि प्रेम आणि वेदना हे दोन्ही नेहमी बरोबर आणि हातात हात घालून असतात.

जेंव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करीत असता तेंव्हा काही वेळा दुखः पण भोगायला लागते. हे नेहमी असेच होते असते आणि आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. त्यापासून सुटका करायचा प्रयत्न करू नका. वेदना हा प्रेमाचा एक भाग आहे.

आज कोणीतरी माझ्याकडे आले आणि सांगू लागले कि “ माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, तो माझे काही ऐकत नाही.”

असे पहा कि हे नैसर्गिक आहे. आई आपल्या मुलासाठी बरेच काही करीत असते आणि मग तो मुलगा जेंव्हा तिचे काही ऐकत नाही तेंव्हा साहजिकच तिला वाईट वाटते.

एका आईला आपल्या मुलासाठी सर्वोत्तम तेच हवे असणे हे नैसर्गिक आहे, पण मुलगा असा विचार करीत असतो कि त्याला आपले बरे वाईट चांगले कळते. म्हणून तो मग आईचे काही ऐकत नाही. अशा वेळी कोणी काय करायचे?

आई मग माझ्याकडे आली आणि म्हणाली कि “ मी काय करावे असे तुम्हाला वाटते?”

मी तिला असे सांगितले “ असे पहा कि मला सर्वांचे चांगले व्हावे असेच वाटते. म्हणून मला तुमच्या मुलासाठी चांगले पाहिजे आणि तुमच्यासाठी पण चांगले पाहिजे”

मग तिने असे म्हटले कि “ पण गुरुदेव, माझा मुलगा माझ्यापेक्षा तुमचे अधिक ऐकतो”.

त्यावर मी असे म्हणालो कि “ जर तो तुमच्यापेक्षा माझे ऐकत असेल तर याचा अर्थ असा कि त्याची अशी खात्री आहे कि गुरुदेवांचा यात काही स्वार्थ नाही आणि ते योग्यच सांगतील.”

मी मुलाला सांगितले “ तुला हवे ते तू कर”

पहा मी कुणाला जबरदस्ती करीत नाही कि ” तुम्ही असे करा, तुम्ही तसे करा”.

दुःख हा खरोखरच प्रेमाचा एक भाग आहे. या वेदना टाळू शकत नाही.

जिथे प्रेम असते तेंव्हा काही वेळा त्याच्याबरोबर दुःख पण येते. पण बरेच लोक असे करतात कि त्या वेदना टाळण्यासाठी ते प्रेम करणे सोडून देतात , हे काही बरोबर नाही.

प्रेमाबरोबर येणाऱ्या वेदना टाळण्यासाठी प्रेम करणे सोडून देणे यात काही शहाणपणा नाही. असे कोणी केले तर तो एक मुर्खपणा होईल. पण जे कोणी त्या वेदना सहन करून पुढे जातात त्यांना निश्चितच खऱ्या आणि आनंददायी प्रेमाचा लाभ होतो.

प्रश्न: गुरुदेव, मनुष्याला आत्मज्ञान होण्यासाठी या साऱ्या प्रक्रियेतून जाण्याची काय गरज आहे?

श्री श्री : याची गरज आहे एवढेच फक्त आता ध्यानात ठेवा.