पुनर्जन्म

27
2012
Dec
 


प्रश्न: आपण पुनर्जन्म का टाळावा या विषयी काही सांगाल काय?

श्री श्री: रोज सकाळी उठून जेंव्हा तुम्ही पाहता तेंव्हा आयुष्यातील दुर्दैवी गोष्टी दृष्टीला पडतात आणि त्या तुम्हाला आवडत नाहीत. तुम्हाला दुर्दैवी गोष्टी नको असतात.

आपल्याला जे नको असते त्याला दुर्दैव म्हणतात आणि नेमके तेच आयुष्यात असतात.

पती-पत्नी, आई-वडील, आई-मुलगी, मुलगा-मुलगी, मित्र, या सर्व नात्यात किंवा अगदी शत्रूबरोबर पण काही दुर्दैवी गोष्टी असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने या दुर्दैवात भर घालीत असतो. तुम्ही काहीही केले तरी त्यात थोडेतरी दुर्दैव आड येते.

जेंव्हा तुम्ही या जगात जन्माला येता तेंव्हा तुम्ही परावलंबी असता.जेंव्हा तुम्ही बाळ असता तेंव्हा तुम्ही स्वतः होऊन काही करू शकत नाही, उठू शकत नाही , दुसऱ्या कोणीतरी तुम्हाला उचलून पुसावे लागते. जन्मापासून तुम्ही परावलंबी असता, म्हातारपणी पण तुम्ही परावलंबी असता, पण पैशामुळे तुमचा असा गैरसमज असतो कि तुम्ही स्वावलंबी आहात. म्हणून त्याला माया म्हणतात. माया म्हणजे अशी जी कि काही समज निर्माण करिते.

तुम्ही जेंव्हा दुसऱ्या कोणाला पैसे देऊन कामावर ठेवता, तेंव्हा ते तुमच्यासाठी काम करतात आणि मग तुम्हाला असे वाटते कि तुम्ही स्वतंत्र आहात.

आयुष्यात परावलंबित्व हे असते. आणि जेथे परावलंबित्व असते तेथे दुर्दैव हे पण असते. जे दुर्दैवी असते ते सुखकारक नसते आणि म्हणून तुम्हाला ते नको असते. म्हणून मग लोक म्हणतात कि “ आहे हे खूप झाले, मला आता पुनर्जन्म नको आहे.”

अशी कल्पना करा कि तुम्हाला पुन्हा शाळेत जाऊन छड्या खायच्या आहेत, मग महाविद्यालयात जायचे आहे आणि परत त्यासर्व किशोर अवस्थेतील संकटातून जायचे आहे.

त्या सर्व किशोर मुलांकडे पहा, त्यांचे चेहरे पहा कसे रागाने फुलले आहेत ते. ते त्यांच्या पालकांवर रागावले आहेत आणि काय करायचे हे त्यांना माहित नाही.

पहा तुमचे फक्त शत्रूच नाही तर मित्रसुद्धा तुम्हाला कधी कधी त्रस्त करतात.

प्रत्येक गोष्ट त्रासदायक असते.

तुमचे मन तुमच्या मित्रांनी जेवढे व्यापले आहे तेवढेच तुमच्या शत्रूंनी पण व्यापले आहे.ते सर्वजण तुम्हाला त्रस्त करून सोडतात. आणि त्यात अजून एक गोष्ट सांगतो, कि हे सर्व त्रासणे बाजूला ठेवा, तुमचे मन हे सर्वात जास्त त्रासदायक असते.

मी तुम्हाला सांगतो कि जगातील दुसरी कोणतीही गोष्ट तुम्हाला जेवढा त्रास देणार नाही तेवढे तुमचे मन तुम्हाला त्रास देत असते.

तुम्हाला असे वाटत असेल कि दुसरे जण तुम्हाला त्रास देताहेत, पण ते दुसरे लोक नसून तुमचे मनच तुम्हाला त्रास देत असते.

तुम्हाला तुमच्या मनापासून मुक्ती हवी असते म्हणून मग तुम्ही म्हणता कि “मला पुनर्जन्म नको आहे.” पण मग एकदा का तुमच्या ध्यानात आले कि दुसरे कोणी नसून तुमचे मनच तुम्हाला त्रास देत आहे हे झाले शहाणपण. आणि मग एकदा का हे शहाणपण आले कि मग तुम्ही म्हणता कि ‘ मला अजून दहा वेळा काय, शंभर वेळा काय किंवा हजार वेळा जरी जन्म घ्यावा लागला तरी मला ते चालेल.”

मग तुमच्या असे लक्षात येईल कि आयुष्य म्हणजे आनंद, समाधान आहे. हे खरे शहाणपण!

मी काल असे म्हणालो कि आपले मन हा आपला चांगला मित्र आहे आणि आपले मन हा आपला वाईट शत्रू आहे. मनाला मित्रात शत्रू दिसतो आणि शत्रुत मित्र. मन हे काही गोष्टी विपरीत करू शकतो, त्यांना एक वेगळे वळण देऊ शकतो, मन हे स्वतःचा नरक बनवू शकते किंवा स्वतःचा स्वर्ग पण बनवू शकते. म्हणून खरे तर तुम्हाला तुमच्या मनापासून सुटका हवी असते पण तुम्ही म्हणता कि “ मला पुनर्जन्म नको आहे”.

प्रश्न: खूप अहंकारी लोकांच्या वागण्याचा आयुष्यावर आणि इतरांवर वाईट परिणाम होत असतांना त्यांच्याशी व्यवहार कसा असावा?

श्री श्री: त्यांना अहंकार असुदेत, तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्ती अहंकार बाळगा म्हणजे प्रश्न सुटला.

मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर नीट बघितले तर असे लक्षात येईल कि तुम्हाला जास्त अहंकार आहे. इतरांना अहंकार असुदेत तुम्हाला काय त्याचे? तुम्ही काय सर्वांचा अहंकार नष्ट करायचा किंवा कमी करायचा मक्ता घेतला आहे काय?

कोणी जर जास्ती अहंकारी असेल तर त्यांना आपोआप धडा शिकवला जाईल. केंव्हा ना केंव्हा तरी ते दुर्दैवाच्या फेऱ्यात येतील. ते तुम्ही त्यांचे त्यांच्यावर सोडून द्या.

पण दुसऱ्याच्या अहंकाराकडे बघून तुम्ही का दुखी होताय? ते मला समजत नाहीये.

तुम्हाला जे करण्याची आणि जितके करण्याची आवश्यकता आहे तेवढे करा आणि पुढे चला, म्हणजे झाले. आयुष्यात फक्त पुढे जात रहा.

कोणी जर तुमच्याशी वाईट वागले तर तुम्ही उठून उभे राहून त्यांच्यावर ओरडू शकता कि “ तुम्ही माझ्याशी काल , परवा किंवा दहा वर्षांपूर्वी असे का वागलात?

पण मी तुम्हाला सांगतो कि काल , परवा, किंवा दहा वर्षापूर्वी झालेल्या चुकीबद्धल आता बोलून तुम्ही हा क्षण वाया घालवीत आहात. या क्षणाचे मूल्य, त्याची सुंदरता वाया घालवीत आहात.

मी आता या क्षणाला तुम्ही एक निर्णय घ्यावा असे सांगतो आणि तो असा कि “ भूतकाळात काय झाले त्याची मला फिकीर नाही, पण मी हा क्षण वाया घालवू इच्छित नाही”, बस.

हे जग एका समुद्रासारखे आहे आणि मग अशा गोष्टी घडत असतात. त्या घडतात आणि निघून जातात. काही कारण नसताना मित्र हे शत्रू होतात, शत्रू हे मित्र होतात.

तुमच्यापैकी किती लोकांना असा अनुभव आहे कि तुम्ही एखाद्याशी कितीही चांगले वागलात, तरीही काही कारण नसताना ते तुमचे शत्रू झाले आहेत.( अनेक लोक हात वर करतात).

तुम्हाला उगीच आश्चर्य वाटत असते कि “ मी तर त्याच्याशी चांगले वागलो , तरी तो मला का दोष देत आहे? हा माणूस माझा शत्रू का झालाय?

अशी पण माणसे तुम्हाला सापडतील कि तुम्ही त्यांना उपकृत केले नसले तरीही ते तुम्हाला मदत करायला पुढे येत असतात. तुमच्यापैकी किती लोकांना असा अनुभव आहे? ( अनेक लोक हात वर करतात).

असे पहा कि कोण तुमचा मित्र होणार किंवा कोण तुमचा शत्रू होणार हे कर्माच्या नियमाप्रमाणे होत असते. म्हणून ते सर्व या टोपलीत ठेवा आणि निवांत रहा. मी हा नियम नेहमी पाळतो.

तुम्ही एखाद्यासाठी काही चांगले केलेत तरी तो तुमच्यावर रागावलेला असतो किंवा तुम्हाला दोष देत असतो, तेंव्हा तुम्ही काय करणार?

म्हणून सारखा तोच भूतकाळ चघळून हा आताचा क्षण का वाया दवडू नका.

हि चांगली कल्पना आहे कि नाही? चला हा क्षण साजरा करूयात.

पूर्वी मी लोकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचो पण त्यात एकमेकांना दोष द्यायच्या गोष्टीच जास्त असायच्या.

आणि मग अचानकपणे मला अशी जाणीव झाली आणि मग मी ठरविले कि “ नाही, मी आता कोणाच्याही तक्रारी ऐकून घेणार नाही. या क्षणाची शक्ती मला वाया घालवायची नाहीये.”

तुम्ही तुमच्या गोष्टी सांभाळा कारण ती तुमची कर्मे आहेत. प्राचीन काळातील लोक असेच सांगायचे. ते समुपदेशनासाठी बसून तुमच्या सर्व गोष्टी ऐकत बसत नसत. ते म्हणत” चला, जागे व्हा, आत्ता” (हाताने चुटकी वाजवीत), आणि असे केल्याने मन, शक्ती आणि काळ यात फार मोठा बदल व्हायचा.

जर तुम्ही आत्ता तसे करायला सुरवात केली नाही तर तुम्ही असंवेदनशील आणि उर्मट ठरवले जाल. आले लक्षात?

हळू हळू तुम्ही ते करू शकाल. मी जसे अनेक वर्ष करीत होतो, तसे तुम्हाला लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल.पण मग एक वेळ अशी येते कि , खासकरून दुसऱ्यांसाठी, जेंव्हा तुम्ही म्हणता “ बस झाले आता अधिक नाही.”

काही वेळा असे होते घरातील म्हातारी माणसे तक्रारी करीत राहतात. त्यांना तक्रारी करण्यात आनंद मिळतो. तुमच्यापैकी किती जणांना हा अनुभव आहे? ( अनेक लोक हात वर करतात).

पहा! त्यांना तक्रारी करण्यात आनंद वाटतो आणि जर कोणी श्रोता मिळाला तर त्यांना अजूनच उत्साह येतो. तेंव्हा तुम्ही संगीत सुरु करून त्यांना असे म्हणू शकता कि “ चला आता थोडा वेळी आपण नृत्य करूयात. तक्रार करणे थांबवा.”

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही म्हणाला होतात कि २०१२ हे “नंद” (आनंद) चे वर्ष आहे पण प्रत्यक्षात ते एवढे कठीण का?

श्री श्री : “नंद” हे अजून संपले नसून ते मार्च मध्ये संपणार आहे. अजून तीन महिने जायचे आहेत.

तुम्ही असे लक्षात घ्या कि जेंव्हा काही गोष्टी तुमच्या आतमध्ये ढवळून बाहेर येतात तेंव्हा ते चांगले असते , तेंव्हा तुम्ही जागे होता. असे काही फक्त बाहेरच्या भौतिक जगातच होते असे नाही तर ते तसे अध्यात्मात पण होते. लोक येथे अध्यात्मासाठी येतात पण ते इतर अनेक गोष्टींमध्ये गुंतून जातात.

एकदा एक माणूस माझ्याकडे आला आणि मी त्याला म्हणालो “तुम्ही माझ्याकडे कशाला आला होतात? तुम्ही माझ्याकडे ज्ञान मिळविण्यासाठी आला होतात आणि आता तुम्ही ज्ञान सोडून इतर गोष्टींच्यामागे लागला आहात.”

त्यावर तो माणूस असे म्हणाला कि “हा माणूस मला असे म्हणाला होता”.

असे पहा कि जर जग वाईट असेल तरी ते चांगल्या कारणासाठी आहे, म्हणजे मग तुम्ही आधी स्वतःला सरळ करायला पाहिजे. जेंव्हा तुम्हाला तुमचे स्वतःचे दोष दिसत नाहीत तेंव्हा तुम्ही इतर सर्वांमध्ये दोष शोधत असता आणि मग म्हणता “इतर सर्वजण वाईट आहेत फक्त मी चांगला आहे”.

मी तुम्हाला सांगतो कि जे लोक असा विचार करतात त्यांच्यात खरोखरच काहीतरी चूक असते. ते साधक नव्हेत. साधक म्हणजे असा कि जो आधी स्वतः च्या अंतरंगात डोकावून पाहतो आणि म्हणतो “ मला माझ्यामध्ये काय सुधारणा करायच्या आहेत त्या मला आधी करुदेत”.

जर्मनीत हिवाळ्यात खूप थंडी असते अशी तुम्ही तक्रार करू शकत नाही. तशी ती असणारच. अशावेळी घरात बसून राहणे चांगले.

म्हणून शहाणपणा मिळविण्याकडे लक्ष द्या. हेच खरे सत्य आणि खरी परिस्थिती आहे. आणि त्याचसाठी हि सर्व साधना, ज्ञान आणि ध्यान आहे. ते तुम्हाला अशी एक आंतरिक शक्ती देते कि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत चेहऱ्यावर स्मित हास्य ठेऊन चालू शकता. प्रत्येकाला तर हेच पाहिजे असते, होय कि नाही?

अशी एक आंतरिक शक्ती, कि काहीही झाले तरी कोणी तुमच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हिरावून घेऊ शकणार नाही.

आज याचीच तर गरज आहे.

प्रश्न: आंतरिक शक्ती कशी मिळवावी आणि ती कशी टिकवून ठेवावी?

श्री श्री : या ज्ञानाला उपयोगात आणून.

असे नाही कि वर्षातून एकदा तुम्ही येथे येऊन ज्ञान घेतले कि काम झाले. असे ज्ञान घेणे आणि ते आचरणात आणणे हा तुमच्या रोजच्या जीवनाचा एक भाग झाला पाहिजे.

त्याचप्रमाणे विनम्रता पण आवश्यक आहे. काहीवेळा लोक असे म्हणतात कि मला हे सर्व माहित आहे आणि मग ज्ञानाकडे ते दुर्लक्ष करतात.

‘मला हे सर्व माहित आहे, त्यात काय एवढे’ असा उर्मट दृष्टीकोन कोणी ठेऊ नये.

या ज्ञानाच्या सतत संपर्कात राहून त्याचे पुनरज्जीवन करणे, जे मुद्धे तुम्हाला माहित आहेत ते परत जगणे, आचरणात आने महत्वाचे असते.

हे काही खूप अवघड किंवा कठोर काम नाहीये. तुम्हाला जरी एक क्षण त्याचे विस्मरण झाले तरी ते परत स्मरणात येते. आणि ते तसे परत येते हे माहित असण्याने ते हरवत नाही तर ते तेथे असते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, काही वेळा सुविधा क्षेत्राच्या, जेथे आपल्याला सुरक्षित वाटत असते तेथून बाहेर येऊन, आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत किंवा ज्या गोष्टी करायला आवडत नाहीत अशा गोष्टी का कराव्यात ते स्पष्ट करा.

श्री श्री : परत परत तुमच्या सुविधा क्षेत्राच्या बाहेर येऊन काम केल्याने तुमची क्षमता आणि शक्ती वाढून तुम्ही जास्त सशक्त होता.

तुम्ही तुमच्या सुविधा क्षेत्राशी स्वतःला जखडून ठेवता. आणि मग ते तुमच्या भीती, चिंता आणि बंधनाचे कारण होतात. खरेतर तुमचे सुविधा क्षेत्र हे तुमचे बंधन होते.

काही वेळा जेंव्हा तुम्ही जागे होऊन असे म्हणता कि “आता बस, मी यातून बाहेर पडणार आहे”, मग त्याने तुमची शक्ती तुम्हाला परत मिळते.

प्रश्न: आपले प्रिय लोक आत्महत्या का करतात? त्यांना आमचे प्रेम जाणवत नाही का?

श्री श्री : खरे तर, त्यांचा ज्ञानाशी फारसा संबंध आलेला नसतो, त्यांना खरे जगणे आणि मरणे माहीतच नसते.

त्यांना त्यांची प्राणशक्ती किंवा त्यांचे आयुष्य याची कल्पना नसते. ते त्यांच्या स्वतःच्या सुविधा क्षेत्राबद्धल इतके गुंतून गेलेले असतात कि मग ते आत्महत्या करतात. ज्या लोकांना कमालीच्या सुविधा लागतात ते लोक आत्महत्या करतात. त्यांच्यात अजिबात धैर्य नसते , ते थोड्यापण असुविधा सहन करू शकत नाहीत. म्हणून तुम्हाला जास्त प्राण-शक्ती आणि उर्जेची गरज असते.

एखाद्याला तुम्ही जेवढे सांगाल कि आत्महत्या करणे योग्य नाही, तितका तो म्हणेल कि “ नाही, मला आत्महत्या करायची आहे”. काहीवेळा मी अशा लोकांना म्हणतो,’ठीक आहे, तुम्हाला आत्महत्या करायची आहे ना मग एव्हरेस्त पर्वतावर जाऊन उडी मारा.घरी टांगून घेऊन जीव देऊ नका.काही साहस करा आणि मग मेलात तर मेलात.’

आत्महत्या करणे हा एक मुर्खपणा आहे. त्यांचा या सुंदर ज्ञानाशी संपर्क आलेला नाही आणि त्यांना आयुष्याची किंमत माहित नाही. म्हणून आपल्यासाठी हे महत्वाचे आहे कि आपण त्यांना त्यांच्या श्वासा बद्धल माहिती दिली पाहिजे.

जेंव्हा प्राण शक्तीची पातळी कमी असते तेंव्हा आत्महत्येचे विचर यायला लागतात. जेंव्हा प्राणशक्ती वाढते तेंव्हा असे विचार येत नाहीत.

प्राण शक्ती वाढल्यावर कोणतेही गुन्हे होणार नाहीत. जेंव्हा प्राण शक्ती वाढते तेंव्हा तुम्ही स्वतः शी किंवा दुसऱ्यांशी हिंसक होणार नाही. म्हणून प्राणायाम, सुदर्शन क्रिया, ध्यान अशा गोष्टींचा अभ्यास लोकांना शिकवायला पाहिजे.

अजून म्हणजे ज्या लोकांची अशी प्रवृत्ती असते त्यांना दुसऱ्याच्या सेवेत गुंतविणे महत्वाचे असते. प्राचीन भारतात कोणालाही काही सेवा केल्याशिवाय ज्ञान मिळत नसे. १० ते १२ वर्ष लोक मठात राहून खूप सेवा करायचे.त्यानंतर त्यांना ज्ञान दिले जायचे.

जेंव्हा एवढी सेवा केल्यावर शरीर तंदुरुस्त व्हायचे , मग मन पण तंदुरुस्त आणि नम्र व्हायचे. ते एक प्रकारचे सैनिकी प्रशिक्षण असायचे. तुम्ही कधी सैनिकी प्रशिक्षण बघितले आहे काय? त्यात शरीर आणि मन यांचा समन्वय साधला जातो.

सैनिकी प्रशिक्षणात असे शिकविले जाते कि मग तुमच्या भावना इतरत्र विखुरलेल्या नसतात आणि तुम्ही सर्व काळ फक्त स्वतःचाच विचार करीत नाही.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, जेंव्हा आपल्यासमोर काही प्रश्न असतो किंवा जेंव्हा काही निर्णय घ्यायचा असतो तेंव्हा आपल्या आतून एक आवाज ऐकू येतो,तो आवाज कोणाचा हे कसे ओळखू शकू? ते आपले मन असते, का अंतर्ज्ञान कि प्रत्यक्ष परमेश्वर?

श्री श्री: ते सगळे एकच आहेत, त्याची काळजी करू नका.त्याचे फार विश्लेषण करायची गरज नाहीये, फक्त आराम करा. जेंव्हा तुम्ही आरामाच्या स्थितीत असता तेंव्हा योग्य उत्तर आपोआप सापडेल. तुम्ही जोरात प्रयत्न केल्यावर अंतर्ज्ञान होणार नाही कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, रागासारख्या तीव्र भावना जेंव्हा जागृत होतात, तेंव्हा त्यांना आवरणे फार अवघड होते आणि मग माझ्या हातून अशा गोष्टी होतात कि त्यांचा मग मला पश्चाताप होतो. असाह परिस्थितीत काय करावे? ( ७ नोव्हेंबर २०१२ च्या रागाला कसे आवरावे या भागातून)

श्री श्री: आता पहिल्यापेक्षा खूप बरे वाटत आहे कि नाही?

पूर्वी तुम्हाला पटकन राग यायचा पण आता त्यापेक्षा बरे आहे. नेहमी योग्याभ्यास करीत रहा. त्याने तुमचा राग कमी व्हायला मदत होईल. त्याने जर तुमचा राग कमी झाला नाही तर देवच तुम्हाला मदत करू शकतो. माझ्या तुम्हाला शुभेच्छा!

अजूनही तुम्हाला राग येत असेल तर खुशाल रागवा. तुमच्या खर्चाने इतरांची करमणूक होईल. जगात त्याची पण गरज असते. थोडे मसाले इकडे तिकडे, थोडे लोणचे इकडे तिकडे, थोडी मिरी इकडे तिकडे. जो पर्यंत ती तुमच्या डोळ्यात जात नाही तोवर मिरी पण चालेल.
>