गांधींच्या कधी न सांगितलेल्या गोष्टी

03
2013
Apr
अॅटलांटा, जॉर्जिया
महात्मा एखाद्या लहान मुलाला खूप बक्षिसं आणि भेटवस्तू मिळाव्यात, तसं आज मला वाटतय. आज भेटवस्तूंचा दिवस आहे.

असं नेहमी म्हटलं जातं की, “आपलं जीवन हीच देवाने आपल्या सगळ्यांना दिलेली एक भेट आहे.’ या भेटीचा आपण आदर करुया.

आज मी मोरहाऊस कॉलेजचे, इथल्या डीनचे, अध्यक्षांचे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो, ज्यांना मी ह्या पारितोषिकासाठी योग्य वाटलो आणि त्यांनी ते मला प्रदान केले. मी हे पारितोषिक त्या सर्वांना पुन्हा अर्पण करतो, जे त्यांच्या छोट्या छोट्या कानाकोपऱ्यात, त्यांच्या समाजात शांती आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी अथक आणि शांतपणे काम करत आहेत.

शांती आणि अहिंसा या गोष्टींना, सामाजिक परिवर्तनाला आणि सामाजिक न्यायाला चालना देणारे एक साधन म्हणून जी मान्यता मिळाली आहे ती उल्लेखनीय आहे.

युद्धासाठी, युद्धात पराक्रम गाजवलेल्या योद्धयांना पदकं मिळतात. पण शांती आणि अहिंसा या गोष्टींना पदक मिळते तेव्हा समाजातील आदर्शच बदलतो.

दुर्दैवाने गेल्या काही दशकात आक्रमकता म्हणजे अभिमानाची गोष्ट बनली आहे.आता अशी वेळ आली आहे की हे आपण उलटे करायला हवे. शांती आणि अहिंसा यांच्याची अभिमान जोडला गेला पाहिजे. आम्ही मुले महात्मा गांधींच्या गोष्टी ऐकत ऐकत मोठे झालो.

आज माझ्या एका शिक्षकांबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे, जे आजही हयात आहेत आणि आज त्यांचे वय ११८ वर्षांचे आहे. महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेतून परत आले तेव्हा ह्या सद्गृहास्थांनी त्यांना भगवद गीता शिकवली. आणि ते ४० वर्षे त्यांचे शिक्षक म्हणून आणि त्यांचे लेखनिक म्हणून त्यांच्या सोबत होते. ते दाक्षिणात्य भाषांचे भाषांतरकार आणि पटकथा लेखक होते. त्यांचे नाव आहे पंडित सुधाकर चतुर्वेदी.

तर ते आम्हाला महात्मा गांधींच्या बरोबरबरोबर घडलेल्या गोष्टी किंवा घटना सांगत असत.त्यापैकी काहींची नोंदही केली गेलेली नाही त्यामुळे त्या तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडणार नाहीत. आज अशा काही गोष्टी तुम्हाला सांगायला मला आवडेल की ज्यामुळे तुम्हाला स्फूर्ती मिळेल.

एकदा काय झालं, महात्मागांधी एका लहानशा ट्रेनमधून दार्जिलिंगला प्रवास करत होते. दार्जिलिंग हे उत्तर भारतातल्या डोंगराळ प्रदेशातलं एक थंड हवेचे ठिकाण आहे आणि तिथे जाण्यासाठी एक छोटीशी ट्रेन आहे. ही एक नॅरो गेज (रुळांमधील अंतर कमी असलेली) ट्रेन आहे. झालं असं की ती ट्रेन डोंगराचा चढाव चढत होती तेव्हा मधेच, ट्रेनचं इंजिन बाकीच्या डब्यांपासून अलग झालं. त्यामुळे इंजिन पुढे चाललं आणि डबे उतारावरून मागे घसरू लागले. विचार करा विस्तीर्ण असा डोंगराळ प्रदेश, डबे मागे मागे घसरताहेत, काय झाल असेल ? सगळा गोंधळ उडाला, लोक जीवन मरणाच्या पेचात सापडले होते. गाडीचे डबे कधीही खाली दरीत कोसळले असते आणि मग कुणाचं हाड सुद्धा सापडलं नसतं. तो हिमालयाचा प्रदेश होता. भोवती हा सगळा गोंधळ चालला होता आणि महात्मा गांधी पत्राचा मसुदा लिहून घ्यायला सांगत होते. माझ्या शिक्षकाना ते ‘बंगलोरी’ म्हणायचे, कारण ते बंगलोरचे होते, ‘ बंगलोरी लिहून घ्या.’

माझे शिक्षक महात्मा गांधींना उद्देशून म्हणाले,’ बापू, तुम्हाला माहिती आहे कां, काय चाललं आहे ते ? आपण कदाचित जिवंतही राहणार नाही. आपण जीवन मरणाच्या मधे उभे आहोत. डबे मागे घसरताहेत. त्यांना कुणी थांबवू शकत नाहिये आणि आता त्यांचा वेगही वाढत चालला आहे.’

यावर बापूजी काय म्हणाले माहितीये ? ते म्हणाले, ‘ जर आपण वाचलो तर आपण इतका सगळा वेळ वाया घालवल्या सारखे होईल. त्यामुळे, चला लिहून घ्या.’ थरथरत्या हातांनी माझी शिक्षक लिहून घेत होते.

मला ते म्हणायचे, ‘ ह्या म्हाताऱ्या माणसाकडे बघ ते त्यांच्या आयुष्यातला एक क्षणही वाया घालवत नसत.’ त्यांची आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल.

एकदा त्यांचं धोतर फाटलं, तर कुणीतरी त्यांना सांगितलं की, ‘ बापू तुमचं धोतर फाटलंय.’ तर ते बाथरूम मध्ये गेले आणि त्यांनी त्यांच धोतर जरा सावरून घेतलं आणि म्हणाले, ‘ बघा आता दाखवा कुठे फाटलं आहे धोतर ?’ यामागची धारणा अशी होती की कोणतीही गोष्ट वाया घालवू नये. भोगवादी वृत्ती नसावी.

प्रत्येकाची गरज भागवली जाईल इतके सगळे आहे. पण प्रत्येकाची हाव पुरी करण्याइतके नाहिये. असा त्यांचा संदेश होता.

गांधीचं हृदय अगदी लहान मुलांप्रमाणे कोमल होतं आणि लहान मुलाची निरागसता होती. 

आज कशाची गरज आहे तर गांधीजींची निरागसता आणि मार्टीन लुथर किंग ज्यू. यांचे शौर्य, जोश,बांधिलकी आणि दूरदृष्टी. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या तर आज आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत तोच प्रतिवाद असेल.

मी असं म्हणणार नाही की केवळ गांधीजींची तत्वच आजच्या परिस्थितीत लागू पडतील. जर तुम्ही उपोषण करू लागलात तर लोक म्हणतील, ‘ असंच उपोषण करत राहा, तेवढच तुमच्या हातून जगाचं काही तरी भलं होईल.’ मार्टीन लुथर किंग यांनी जगाला दाखवून दिली तशी जीगर आणि बांधिलकीही असायला हवी. त्याने पूर्णता येते आणि मग आजच्या जगात ज्याची अत्यंत गरज आहे असा सामाजिक न्याय आणि क्रांती घडून येऊ शकते. आणि हे युवकांकडून यायला हवे. इथे बसलेल्या सर्वांनी अहिंसेसाठी उभे ठाकले पाहिजे.

अमेरिकेत मागच्या एका वर्षात नोंद झालेल्या हिंसेच्या दहा लाख घटना आहेत. मुलांवरील अत्याचार, स्त्रियांवरील अत्याचार, जातींवरील अत्याचार, धार्मिक गटांवरील अत्याचार वगैरे. समाजातील सहनशक्ती कमी होत चालली आहे. पण आपण घाबरून जायचे कारण नाही सत्य आणि अहिंसा यांचा नेहमीच विजय होतो.

आपल्याला काय करायला हवे तर दहा लाख गोष्टी अहिंसेचा करायच्या. एका हिंसात्मक गोष्टीच्या तुलनेत आपण शंभर अहिंसात्मक गोष्टी करायच्या. अहिंसेचा आवाज जोरदार आणि स्पष्टपणे ऐकू आला पाहिजे. हे आपण करायला हवे.

आज आपण सर्वांनी गाणे म्हटले , ‘ जगात जो बदल घडून आलेला बघायचा आहे तो आम्ही स्वत:मध्ये करू.’ म्हणजे, बदल इथून, आपण जिथे आहोत तिथून, आपल्या प्रत्येकापासून घडून येतो.

महात्मा गांधीबद्दलची आणखी एक घटना माझे शिक्षक आम्हाला सांगायचे. माझे सार महात्मा गांधींबरोबर येरवडा जेल मध्ये होते. तिथे फक्त तिघेजण होते, महात्मा गांधी, महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा आणि माझे सर. ही घटना कस्तुरबा गांधींच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसाची आहे. त्या मृत्यू शय्येवर होत्या. महात्मा गांधी खोलीच्या बाहेर आले आणि म्हणाले, ‘बंगलोरी, आज माझ्या परीक्षेचा दिवस आहे. मी माझा समतोल कसा राखू शकतो हे आज दिसेल. आज माझी परीक्षा आहे.’ हे बोलत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझे सर म्हणाले, ‘ मी त्यांना अशा अवस्थेत याआधी कधीच पाहिलं नव्हतं. पण ते अश्रुंचे थेंब सर्वकाही सांगून गेले.’

महात्मा गाधी म्हणाले, ‘ गेल्या ४० वर्षांच्या माझ्या सहचारीला आज मला निरोप द्यायचा आहे. ती माझी शक्ती होती, स्फूर्ती होती. आणि माझा सगळा कचरा माझ्यातल्या सगळ्या उणीवा स्वीकारणारी तीच होती आणि ते सगळं गिळून ती माझ्या बाजूला ठामपणे उभी राहिली. आता आज मला माझा समतोल राखला पाहिजे.आज माझ्या आध्यात्माची परीक्षा आहे.’

त्यामुळे, असे क्षण जेव्हा तुम्ही स्वत: निरीक्षण करता, बघता, स्वत: समजून घेता आणि तुमच्या आत काय चाललं आहे याकडे लक्ष देता तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप फरक पडतो. 

तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्हाला काय सांगायचे आहे ? याचे निरीक्षण केल्याने फरक पडतो.

तुम्हाला माहितीये, नकारात्मक भावनाकशा घालवायच्या किंवा संतुलीत मन कसे ठेवायचे किंवा प्रत्येकाशी आपलेपणाची भावना कशी वाटायला लागेल या गोष्टी न शाळेत शिकवतात न घरी. आज याचीच खूप गरज आहे. आपण सर्व जमातींपर्यंत पोहोचले पाहिजे. वेगवेगळ्या जमाती अलग अलग गट म्हणून राहू शकणार नाहीत. प्रत्येक जमातीने पुढे येउन इतर जातींशी हातमिळवणी केली पाहिजे.

मला याचा आनंद आहे की आयकेडा फौंडेशनही यात सहभागी झालेले आहे आणि ते बऱ्याच देशात वेगवेगळ्या जमातींना एकत्र आणण्याचे इतके चांगले काम करत आहेत.

बुद्ध, येशू आणि कृष्ण हे तिघेही एकच गोष्ट सांगतात आणि ती म्हणजे आपण प्रेमाने बनलो आहोत आणि आपण परम आहोत. आपण हे जगूया. आपण हे व्यक्त करण्याचा मार्ग शोधूया. आपल्या प्रत्येकात असलेली ही ज्योत ओळखुया.

येशूचा संदेश हाच आहे की, ‘ तुम्ही प्रेम आहात आणि प्रेम म्हणजेच देव आहे.’ एकमेकांवर विश्वास असलेल्या जमातींना, एकमेकांपासून खंडीत झालेल्या जमातींना एकत्र आणण्याची आणि हिंसेत गुंतलेल्या त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि आणण्याची खूप मोठी भूमिका बजावायची आहे. ह्यात घरगूती हिंसा आणि सामाजिक हिंसाचार दोन्ही आले. तसेच स्वत:शी हिंसक बनणे याचाही विचार करायला हवा.

बरेच लोक शेवटी आत्महत्या करतात कारण ते स्वत:शी खूप निर्दय होतात. आज जगात हजारो लोक आत्महत्या करत आहेत. नैराश्यामुळे केवढी मोठी किंमत मोजावी लागत आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी आवाज उठवायला हवा आणि अहिंसेसाठी काम करायला हवे.

काही दिवसांपूर्वी मी दक्षिण अमेरिकेत्, मेक्सिकोला गेलो होतो, रस्त्यातील सिग्नलजवळ दोन टॅक्सी चालकांची वादावादी चालू होती ते दोघेही टॅक्सीच्या बाहेर आले आणि त्यांनी एकमेकांना गोळी घातली. टॅक्सीमध्ये प्रवासी बसले होते, त्यांना काय करावे ते कळेना. टॅक्सी चालक पळून गेले. अशांशिलाता आणि तणाव यांच्यावर काम करायला हवे. आपण सगळे एकत्र येऊन या वर्षीदहा लाख अहिंसेची, मैत्रीची आणि करुणेची कामे करुया. आपल्याला ज्या जगाचा वारसा मिळाला आहे त्यापेक्षा जास्त चांगले जग आपल्या मुलांना मिळाले पाहिजे.