तीन गोष्टी ज्यासाठी आपण जगतो

24
2013
Apr
टोकियो, जापान
आपण आयुष्याकडे एका मोठ्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे.

आपण हे जे काही जीवन म्हणून आणि हे संपूर्ण जग म्हणून ज्याला समजतो त्याचे आकलन आपल्याला आपल्या ज्ञानेन्द्रीयांमार्फत ओळखतो. हे बघणे,ऐकणे, स्पर्श करणे आणि समजून घेणे याद्वारे होते. या पाच ज्ञानेन्द्रीयांद्वारे मिळणारे ज्ञान हे एका पातळीवर असते. या ज्ञानेन्द्रीयांद्वारा मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा वेगळे उच्च दर्जाचे ज्ञान आहे आणि ते म्हणजे बुद्धीद्वारा मिळणारे ज्ञान.

बुद्धीद्वारा मिळणारे ज्ञान हे ज्ञानेन्द्रीयांद्वारा मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते. आपण सूर्य उगवताना आणि मावळताना पाहतो, परंतु बुद्धीमुळे आपल्याला समजते की सूर्य ना उगवतो आहे ना मावळतो आहे, ती तर पृथ्वी आहे जी गोल फिरते आहे.

अजून एक प्रकारचे ज्ञान आहे जे की बुद्धीपेक्षादेखील श्रेष्ठ आहे. ते आहे अंतःप्रेरणेचे ज्ञान. मानवप्राणी म्हणून आपल्या सर्वांमध्ये या अंतःप्रेरणेला वाट फोडून द्यायची क्षमता आहे, आणि तेच तर अध्यात्मिक ज्ञान आहे. तुम्ही काळ आणि अवकाश याच्या पलीकडे जाता, आणि तिथून तुम्हाला सत्य दिसून येते.

मला वाटते की तुम्हा सर्वाना कधी ना कधी हा अनुभव आलेला आहे, तुमची बुद्धी काहीही म्हणत असेल परंतु तुमची अंतःस्थ भावना निराळी असते. तुम्हाला असा अनुभव आला आहे का?

तुम्हाला आतून मजबूत अंतःप्रेरणा होती परंतु तुमचा तर्क काहीतरी भलतेच म्हणत होता. तुमची अंतःप्रेरणा संपूर्णपणे वेगळीच होती, आणि तेच तसे घडले. तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आला आहे? ( अनेक लोक हात वर करतात ).

सगळ्यांमध्ये ही मनःशक्ती आहे परंतु ती कशी वापरावी हे माहित नाही.

ही जशी काही खजिन्याची पेटी आहे ज्याला तुम्ही कुलूप तर लावले परंतु त्याची चावी तुमच्याकडे नाही, आणि त्याचे काय करावे हे तुम्हाला काळात नाही. हे तर असे झाले की काँम्प्यूटर तर आहे पण त्याच पासवर्ड माहित नाही.तुमचा फोन लॉक झाला आहे आणि त्याचा कीवर्ड तुम्हाला माहित नाही आणि तो कसा उघडावा हे कळत नाही. आपल्याकडे फोन जरी असला तरी तो वापरता येत नाहीये कारण तो लॉक झाला आहे. आपल्याकडे आयपँड जरी असले तरी ते उघडत नाही कारण ते लॉक झाले आहे आणि तुम्ही कीवर्ड विसरला आहात. आपल्या आयुष्याच्याबाबतीसुद्धा हेच घडते.

आपल्या शरीराला सत्याच्या अनेक मिती आहेत, आणि त्या पातळ्यांवर पोहोचण्याची, इतरांच्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आपल्याकडे आहे, आपल्याकडे केवळ पासवर्ड नाहीये. इतके सोप्पे तरीसुद्धा फार फार गहन.

केवळ एक पासवर्ड आणि तुमचा काँम्प्यूटर उघडतो. एकदा का काँम्प्यूटर उघडला की मग सगळी माहिती तुम्हाला मिळते. आपल्या आतील वैश्विक उर्जेबरोबरची संबद्धता, वैश्विक शक्ती जरुरी आहे. एकदा का ती जोडणी झाली की मग विश्वातील कोणत्याही गोष्टीमुळे तुमचे हास्य, उर्जा, उत्साह, आनंद आणि बौद्धिक चमक लोप पावणार नाही. याच्याकरीतच,तुमच्या स्वतःच्या जीवनातील मौल्यवान परिमंडळ तुम्हाला मिळवून देण्याकरिता अध्यात्मिक तंत्रे आहेत.

जरा विचार करा, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे? तुम्हाला तीन उत्तरे मिळतील. सर्वात प्रथम तुम्ही म्हणाल , ‘ आनंद’.

तुम्ही काम का करता? तुम्ही पैसा का कमावता? कारण तुम्ही आरामात, आनंदात राहू शकाल.

दुसरे आहे प्रेम. समजा तुमच्या जीवनात प्रेम नाहीये तर तुम्हाला या ग्रहावर जगायला आवडेल? तुम्हाला आवडणार नाही. जरा कल्पना करून बघा की या ग्रहावर कोणीसुद्धा तुमच्यावर प्रेम करीत नाही, आणि तुमचे कोणावर प्रेम नाही, मग तुमची इथे असण्याचे कारण काय?

तर, आनंद, प्रेम आणि तिसरी गोष्ट आहे ज्ञान.

या त्या तीन गोष्टी आहेत ज्याच्याकरिता सगळे जगतात, आणि त्या- प्रेम, आनंद आणि ज्ञान या प्रामुख्याने आहेत.

प्रेम अशी गोष्ट आहे जी तुम्ही लपवू शकत नाही. जर तुमच्या हृदयात प्रेम असेल तर ते तुमच्या कृतीतून दिसून येते, ते तुमच्या अभिव्यक्तीतून, तुमच्या चेहऱ्यावरून आविष्कृत होते, आणि ते तुमच्या डोळ्यातून दिसून येते.

तुम्ही जर कोणाच्या डोळ्यात बघितले तर तुम्हाला दिसून येईल की ते काळजीत आहेत, तणावाखाली आहेत, रागावले आहेत किंवा प्रेमात आहेत. तुम्ही तान्ह्या बाळाच्या, कुत्र्याच्या पिल्लाच्या किंवा कुत्र्याच्या डोळ्यात पाहाल तर त्यांच्या सर्वांच्या डोळ्यात तुम्हाला प्रेम दिसेल. सकाल विश्वामध्ये एक बंधक शक्ती आहे ज्यामध्ये सगळे परमाणु बांधल्या गेले आहेत, ज्यामध्ये वृक्ष वाढतात, प्राणी जगतात, वारा वाहतो, पृथ्वी गोल फिरते, आणि ती बंधक शक्ती आहे प्रेम.

प्रेमाला लपवता येत नाही आणि ते पूर्णपणे अभिव्यक्तसुद्धा करता येत नाही. कोणीसुद्धा प्रेम पूर्णपणे व्यक्त करू शकत नाही, त्याला व्यक्त करण्याचा जितका जास्त प्रयत्न कराल तितकी तुम्हाला काहीतरी कमतरता भासेल. तुम्ही त्याला शंभर टक्के व्यक्त करू शकत नाही.

नंतर येते सत्य – तुम्ही सत्याला टाळू शकत नाही, एक ना एक दिवस तुम्हाला त्याला तोंड द्यावेच लागेल. केवळ डोळे बंद केल्याने दिवसाची रात्र होत नाही आणि रात्रीचा दिवस होत नसतो. सत्य तिथेच असते आणि तुम्ही त्याला चुकवू शकत नाही. आणि सत्याची व्याख्या तुम्ही करू शकत नाही. ते इतके प्रचंड आहे की तुम्ही त्याची व्याख्या करू शकणार नाही. 

त्याचप्रमाणे मृत्यू; आपण सगळे एक दिवस मारणार आहोत. आपण सगळे वृद्ध होणार आहोत, तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरवू शकत नाही.

तिसरी गोष्ट आहे सुंदरता.  सौंदर्याचा ना तुम्ही त्याग करू शकता ना तुम्ही त्याला धारण करू शकता.

जगात सगळ्या समस्या याच्यामुळेच उद्भवतात. आपण सत्याला टाळू पाहतो आणि आपण समस्यांमध्ये अडकतो; आपण प्रेम पूर्णपणे व्यक्त करू पाहतो आणि अडचणीत येतो; आपण सौंदर्य धारण करू पाहतो आणि आपण समस्यांमध्ये सापडतो.

तुम्ही सौंदर्याचा त्याग करू शकता का? जर तुम्ही सौंदर्याचा त्याग करू शकता तर ते सौंदर्य नाही. तुम्ही सौंदर्य धारण करू शकता का? तुम्ही ते धारण करू शकत नाही.

तर आजच्या ज्ञानाचे हे सार आहे. जर तुम्ही केवळ हे लक्षात ठेवले तर दैनंदिन जीवन तुम्हाला त्याची प्रचंड मदत होते आहे असे तुम्हाला दिसून येईल.

सत्याला टाळता येत नाही आणि त्याची व्याख्या करता येत नाही. सौंदर्य ना त्यागता येते ना धारण करता येते. प्रेम लपवता येत नाही आणि ते पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. या मुद्द्यांवर खोलवर विचार करा आणि अजून ज्ञान तुमच्यात फुलून येईल.

प्रश्न : मी सध्या योग शिक्षक आहे. माझी सर्वात समस्या आहे की लोकांना उद्युक्त कसे करावे? लोक प्रेरित होत नाहीत. लोकांना प्रोत्साहन देण्याकरिता एका शिक्षकाला सर्वात उत्तम सल्ला तुम्ही काय द्याल?

श्री श्री : त्यांना या तीन गोष्टी विचारा : तुम्हाला आनंदी व्हायायचे आहे का? तुम्हाला निरोगी बनायचे आहे का? तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक वेळ पाहिजे आहे का? जर हो तर मग योग करायला या.

तुम्ही मला १० मिनिटे द्या, मी तुम्हाला दोन तास देईन. जर तुम्ही योग कराल तर तुम्हाला दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उर्जा प्राप्त होईल.

योगचा सराव केल्यामुळे तुम्ही कमी आणि गाढ झोपाल, तुम्हाला अधिक उत्साही, अधिक आनंदी वाटेल आणि सर्वांबद्दल तुम्हाला कमालीचे प्रेम वाटेल. अजून अधिक तुम्हाला काय पाहिजे?

’अरे, कोणीसुद्धा प्रेरित नाहीये आणि कोणी येणार नाही’, ही कल्पना सर्वात प्रथम तुमच्या डोक्यातून काढून टाका, तुमच्या मनात हा विचार येता कामा नये. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे असे काहीतरी आहे जे सर्वाना हवे आहे आणि त्यांना त्याची गरज आहे, आणि ते तुमच्याकडे येणारच.

’अरे, कोणीसुद्धा प्रेरित नाहीये आणि कोणी येणार नाही’, असा विचार जर आपण मनात आणला तर मग कोणीच येत नाही. दररोज टोकियोमध्ये नवीन योग सेंटरचे उद्घाटन होत आहे याचा अर्थ असा की लोकांना ते पाहिजे आहे.