गुरुचे सानिध्य हे तुम्ही गुरूशी एकरूप होण्यासाठी असते.
१९ जानेवारी २०१२
अराजका नंतर समाधान येते.
वादळानंतर नेहमीच शांतता असते. हा तर आयुष्याचा नियमच आहे. एकदा मी अमेरिकेच्या
राजधानीत सुमारे तीनशे लोकांसोबत सत्संग करीत होतो. आणि अचानकपणे मागून एक टोलेजंग
आणि धिप्पाड माणूस माझ्यासमोर येऊन ओरडायला लागला कि” तुम्ही दुष्ट आहात!”.
प्रभू येशूचे नाव घेऊन तो माझ्यावर हल्ला करू लागला. तो मोठ्याने ओरडू लागला कि “
हे योग, आध्यात्मिकता आणि हिंदुत्व हि सारी सैतानाची कामे आहेत.” सर्वजण भीतीने
गारठून गेले. कोणीच उठू शकत नव्हता, जणूकाही भीतीने ते जागीच थिजून गेले होते. जसा
तो माझ्याजवळ येऊ लागला तसे मी त्याला हात उंचावून म्हटले ”थांब ! हा काय प्रकार
चालविला आहेस?” मी थांब म्हणताच तो जमिनीवर कोसळला आणि ओक्साबोक्शी रडू लागला.
त्याचे हृदय परिवर्तन होऊन तो क्षमायाचना करू लागला.
तेंव्हा मला महर्षी पतंजली यांचे
एक वाक्य आठवले “ अहिंसा प्रतिष्ठायाम, तत् सान्निध्या वैर त्यागः”. यामुळे
असे सिद्ध होते कि जेंव्हा एखादा आपल्या आयुष्यात अहिंसेची स्थापना करतो, तेंव्हा
त्याच्या संपर्कात येणाऱ्यांच्या मनातून द्वेष आणि वैरभाव हद्दपार होतात. म्हणूनच
महर्षींचे विधान चुकीचे किंवा गैर असू शकत नाही हेच या घटनेवरून लक्षात येते. मला
तीन चार वेगवेगळया ठिकाणी याचा प्रत्यय असा आला आहे कि जेंव्हा अति द्वेषाने मला
मारायला आलेल्या लोकांमध्ये अचानक परिवर्तन घडले. नंतर ते लोक आर्ट ऑफ लिविंग चे
शिक्षक बनले!
इथे मला असे सांगायचे आहे कि
आध्यात्मिकता म्हणजे औट घटकेची करमणूक नव्हे , जसे कि तुम्ही एखादे पुस्तक वाचून
काहीसे समाधानी होऊन पुन्हा कामाला लागता. हे एक संपूर्ण आणि सिद्ध असे ज्ञान आहे.
“जो इच्छा करीहो मन मही, प्रभू प्रताप कछू दुर्लभ नही” ( परमेश्वराची जर इच्छा
असेल तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणे अवघड नाही.) मी तुम्हाला आत्मविश्वासाने
असे सांगू शकतो कि हि एक शक्ती आहे कि जी काम करते.
ती शक्ती काम करते, होय कि नाही?
तुमच्यापैकी किती जणांनी आयुष्यात याचा अनुभव घेतला आहे? तुम्ही ज्याची इच्छा करता
ते प्राप्त होते , होय कि नाही? चमत्कार होतात कि नाही? हे महत्वाचे आहे. नाहीतर
धर्मोपदेशक प्रवचन देतात, उपस्थित श्रोते ते काही वेळ ऐकतात आणि मग पेंगायला
लागतात. ऐकता ऐकता ते झोपी जातात आणि काही वेळा तर वक्तेसुद्धा झोपेतच व्याख्यान
देत असतात. मी कोणाची निर्भत्सना करीत नाहीये पण आजकाल आपल्या देशात हि एक सवयच
झाली आहे कि नुसते ऐकून, ते प्रत्यक्ष आयुष्यात कृतीत न आणता त्यावर फक्त
व्याख्यान द्यायचे.
तर हे आयुष्यात केंव्हा प्रगट
होतात? यात चार गोष्टी आहेत, त्या म्हणजे सानिध्य, सामीप्य, सारुप्य आणि सायुज्य
म्हणजेच एकात्मता. सानिध्य- जेंव्हा एखादा जण गुरूच्या संगतीत बसतो, तेंव्हा ते
जवळीकीचा अनुभव घेतात, तेथे तर वेगळेपणाची भावनाच नसते, गुरु वेगळे आणि मी वेगळा
असे नसते. मी स्वतः असतो. म्हणूनच असा एक श्लोक आहे “ मन्नाथ श्री जगन्नाथ”, माझा
देव हा सर्व विश्वाचा राजा आहे, माझे गुरु हे सर्व विश्वाचे गुरु आहेत, माझा आत्मा
म्हणजेच विश्वात्मा आहे, अशी भावना होते. हि जवळीक आणि आपलेपणाची भावना जागृत झाली
म्हणजेच सामीप्य होय. त्या पुढची पायरी म्हणजे सारुप्य , म्हणजे मी आणि माझा गुरु
हे वेगळे नाहीत. त्यानंतर सायुज्य, म्हणजेच संपूर्ण एकात्मता येते.
अशा तऱ्हेने गुरुचे सानिध्य हे तुम्ही गुरूबरोबर एकरूप होण्यासाठी असते..
प्रश्न: गुरुजी, आपल्या सभोवती
वाईट घटना घडत असतांना आपण मात्र त्याच्याबाबतीत काहीच करू शकत नाही. काय करावे?
श्री श्री: बऱ्याच वेळा अशा घटना
होत असतांना एकटा माणूस काही करू शकत नाही, पण काही लोक जर एकत्र येऊन जर एकसंघ
पणे प्रयत्न केले तर काही होऊ शकते. जर त्या समूहाचा पण काही उपयोग होत नसेल तर
तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या वागण्याची जाणीव होण्यासाठी प्रार्थना करू शकता.
जेंव्हा आपण एखादी गोष्ट करू शकत नाही तेंव्हा आपण शरण जाऊन अशी प्रार्थना केली कि
“ हे भगवती माते, हे काम माझ्याच्याने होत नसून, तू आता ते करावेस, देवा आता हि
तुझी जबाबदारी आहे, गुरुजी, हे तुमचे काम आहे.” असे केल्याने पण ते काम होऊ
शकते.
जसे आधी सांगितले तसे त्या
माणसाशी दोन हात करणे हे काही माझे काम नव्हते. कारण माझ्यावर धावून आलेला तो
चांगलाच धष्टपुष्ट , सात फुट उंच, धिप्पाड आणि बलदंड असा होता. तेंव्हा काय झाले?
मी काही घाबरलो नव्हतो. मी शांतपणे त्याला सांगितले कि ‘थांब! आणितो खाली पडून
रडायला लागला. असे या आधी पण अनेक वेळा झाले आहे. मी आता फक्त तुम्हाला उदाहरण देत
होतो.
प्रश्न: गुरुजी, असे दिसते
नेहमी सत्य हेच संकटात सापडते ? असत्य आणि खोटेपणा उजळ माथ्याने वावरताना दिसतात
आणि सत्य मात्र संकटात असते.
श्री श्री: सत्य किंवा असत्य
दोघांनाही त्रास होणार नाही. नेहमी सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यांना त्रास होतो
आणि असत्य बोलणारे आनंदी होतात हे असे नाहीये. असे मात्र दिसू शकते कि असत्याच्या
मार्गावर चालणारे राजासारखे जगत असतील. पण ते मात्र तात्कालिक असते आणि शेवटी
त्यांची रवानगी तुरुंगात होते.असे झाले आहे कि नाही?
असे घडले आहे कि डीएमके चे काही
मंत्री आणि त्यांचे अनुयायी जे स्वतःला नास्तिक समजतात तेच अध्यात्मिक गुरूंना
विरोध करीत असतात. हे लोक आयुर्वेद विभाग आणि आरोग्य विभागांचे प्रमुख होते.
यावरून मला एक गोष्ट आठवली.
आम्ही बेंगलोर मध्ये एक आयुर्वेदिक महाविद्यालय चालवितो आणि ते खूप चांगले म्हणून
प्रसिद्ध आहे. राज्यातील पहिल्या दहापैकी पाच आमचे विद्यार्थी होते. बाकीच्या
महाविध्यालायांचे निकाल जेंव्हा पन्नास ते साठ टक्के असत तेंव्हा आमच्या
महाविध्यालात मात्र त्रेयान्नव टक्के निकाल लागला. तेंव्हा ते लोक आमच्याकडे येऊन
त्यांनी सीबीआय ला चौकशीचे आदेश दिले. मग ते म्हणाले इथे प्राध्यापक नाहीयेत,
अस्पतालाचा दर्जा चांगला नाहीये आणि म्हणून त्यांनी प्रवेश रद्द केले. हा सुमारे
पन्नास मुलांचा प्रश्न होता. असा जर मध्येच अभ्यासक्रम थांबविला तर त्यांचे
भवितव्य काय म्हणून आम्ही कोर्टाकडून त्याला स्थगिती आणली.
आमच्याकडे पस्तीस शिक्षक असतांना
ते म्हणाले कि शिकवायला फक्त आठच शिक्षक आहेत. त्यांनी प्राचार्यांना दम दिला कि “
आम्ही कोण आहोत हे माहित आहे ना? आम्ही सीबीआई चे लोक आहोत. आम्ही जो विवरण केले
आहे त्यावर सही करा.” मग त्यांनी त्यावर सही केली पण आमचे हजेरी पत्र त्याला जोडले
ज्यात सर्व पस्तीसांची नावे होती. पण त्यांनी फक्त आठ शिक्षकांची माहिती देणाऱ्या
कागदावर सही करायला भाग पाडले.
हे माझे काम नाही असाच तुमचा जप
चालू असतोना? सप्त शती मध्ये काय मंत्र आहे?
म्हणून सत्याचा विजय हा नेहमीच
ठरलेला आहे. या बाबतीत तुम्ही नेहमी ठाम रहा. असे तात्पुरते दिसेल कि सत्य फसवले
जातेय, किंवा जो सत्याची कास धरतो त्याची अधोगती होतेय, पण अंतिम विजय नेहमी
सत्याचाच होतो.
जेंव्हा काही लोक आपल्या
उन्नतीसाठी अयोग्य मार्ग वापरून खूप वरती गेलेले दिसले तरी त्यांना ते कधीतरी
निश्चितच भोगावे लागते.
प्रश्न: गुरुजी, आपला “लोक,
वस्तू आणि परिस्थिती हे जसे असतील तसा त्यांचा स्वीकार करा” हा विचार एक मध्यमार्ग
किंवा समझौता वाटतो.
श्री श्री: नाही, समझौता करू नका.
प्रथम त्याचा स्वीकार करा आणि मग मन शांत झाल्यावर त्याचा प्रतिकार करा. आणि मग जर
तुम्हाला कोणाला एक थप्पड मारावीशी तर जरूर मारा पण हसतमुखाने मारा, रागाने नाही.
जेंव्हा तुम्ही हसतमुखाने मारता तेंव्हा ती फार
जोरात लागते. “साम, दाम, भेद, दंड” हा योग्य मार्ग आहे. तुम्ही जर एकदम
काठी उगारली तर ते योग्य नाही. तुम्हाला जेंव्हा राग येतो, तेंव्हा तुम्ही काठी
उगारता. पण त्याचा उलटा परिणाम दिसून येतो. म्हणून आधी “साम, दाम, भेद, आणि
जेंव्हा म्हशीला काठीची आवश्यकता असते तेंव्हा हातात काठीच घ्यायला पाहिजे.
प्रश्न: गुरुजी, मला पटकन राग
येतो. एखादी छोटीशी गोष्ट जरी माझ्या मर्जीविरुद्ध झाली तर मला खूप पटकन राग येतो.
यामुळे सर्वजण माझ्यापासून दूर असतात. या एकटेपणा पासून सुटका होण्यासाठी कधी कधी
मी आत्महत्येचा विचार करू लागतो. यातून’ माझी सुटका कशी होईल?
श्री श्री: असा विचार कधीच करू
नका. जेंव्हा तुम्हाला आत्महत्या करावीशी
वाटेल तेंव्हा आधी माझी परवानगी घ्या. मग मी तुम्हाला कधी आणि कुठे उडी मारायची ते
सांगेन! नाहीतर तुम्ही ना इकडचे राहाल ना तिकडचे असे मधेच लोंबकळत राहाल. काही
काळजी करू नका,जेंव्हा तुम्हाला खूप राग येईल तेंव्हा भश्रीका करा, कोठे तरी बसून
सुदर्शन क्रिया करा आणि त्यारागाला तुमच्या श्वासातून वाट करून द्या , मग बघा तो
कसा बाहेर निघून जातो ते! भाग दुसरा-मौनाची कला हा पाठ्यक्रम पूर्ण करा. तुम्ही जर
नियमितपणे ध्यान केले तर त्याचा खूप फायदा होईल.
प्रश्न: गुरुजी, हल्लीची मुले दूरदर्शन कडे फारच आकर्षित होत आहेत.
श्री श्री: फक्त मुलेच ? अहो हल्ली मोठेही दूरदर्शन कडे फारच आकर्षित होत आहेत!
प्रश्न: गुरुजी, या जगाचा कोणी नियामक आहे कि ते आपोआप चालले आहे?
श्री श्री: तुम्हाला काय वाटते? हा
प्रश्न मी तुमच्यावर सोपवितो. त्याच्यावर विचार करीत रहा. या जगाचा कोणी नियामक
आहे कि ते आपोआप चालले आहे? याच्यावर विचार करा. याचा विचार करणे म्हणजे तर्क करणे
होय. हा तर्क तुम्हाला आत्मज्ञानाकडे घेऊन जाईल. असे काही प्रश्न असतात कि ज्यांची
उत्तरे ज्यांना माहित आहेत त्यांनी सांगायची नसतात. कोणी बुद्धिमान माणूस काही
प्रश्नांची उत्तरे कधीच देणार नाही. त्यापैकी हा एक आहे. “मी कोण आहे?” किंवा “हे
सर्व काय आहे?” हे इतर काही प्रश्न आहेत. तो यांची पण उत्तरे सांगणार नाही.
त्यामुळे तुम्हाला खोलवर विचार करायची सवय लागेल.
प्रश्न: गुरुजी, कृष्ण आणि
अर्जुन यांच्यामध्ये, अर्जुन हा कृष्णाला परत, परत प्रश्न विचारीत असतो. पण असे
काही भक्त असतात कि ते केंव्हाच प्रश्न विचारीत नाहीत. तुम्हाला कोणते भक्त आवडतात?
श्री श्री: मला सर्व जण आवडतात. मी
सर्व नमुने गोळा करतो. इंग्रजीत त्याला “मिश्रित वेडे” म्हणतात. एक नव्हे तर सर्वच
प्रकारचे लोक माझ्याजवळ आहेत.
प्रश्न: गुरुजी, आध्यात्मिकता आणि विज्ञान यांच्यात नेहमी संघर्ष चालू असतो.
श्री श्री: नाही, असे अजिबात
नाहीये. आध्यात्मिकता आणि विज्ञान यात संघर्ष कोठे आहे? विज्ञान जिथे संपते तेथे
आध्यात्मिकता सुरु होते. आपल्या देशात हा संघर्ष कधीच नव्हता. हा तर फक्त
पश्चिमेकडील देशात होत आला आहे कारण कि तेथे धर्म हा विज्ञानाच्या विरुद्ध
असल्यामुळे ते एक संघर्षाचे कारण झाले आहे. आपल्याकडे आपण प्रथम तत्वज्ञान (
पदार्थ विज्ञान,जे सर्व पदार्थांच्या आत काय दडले आहे याची माहिती सांगते) समजून
घेतो आणि नंतर आत्मज्ञानाकडे वळतो.
तत्व म्हणजे काय? प्रथमतः
पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आणि आकाश या पंच तत्वांबद्धल ज्ञान मिळवून मग मन,
बुद्धी, अहंकार हे शिकवले जाते आणि मग आत्म ज्ञान. भारतात हे फार पद्धतशीर आहे.
श्रीमद भगवत गीतेच्या सहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात
“ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो
विजितेन्द्रियः |
युत्क इत्युचते योगी सम
लोष्ट्राश्मकान्चनः ||
ज्ञान आणि विज्ञान यामुळे तुम्ही
समाधानी व्हायला पाहिजे हेच आत्मज्ञान
होय. आम्ही केंव्हाच विज्ञानाच्या विरोधी नव्हतो, म्हणून आम्ही एक प्रगत राष्ट्र
होतो.
तुम्हाला माहित आहे का पहिले
विमान हे भारतात तयार झाले होते? बंगलोर जवळ अनेकल नावाचे एक गाव आहे. त्या गावात
सुब्बराया शर्मा शास्त्री नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांना एका संताने विमान
कसे बनवायचे हे सांगितले होते. त्यांनी त्याप्रमाणे विमानाचे पहिले रेखाचित्र
बनविले. मग ते मुंबईला गेल्यावर दादा भाई नवरोजी यांनी विमान बनविण्यासाठी पैसे
दिले. त्यांनी चौपाटीवर पहिले विमान उडविले. ते सुमारे पंधरा मिनिटे हवेत उडत
होते. आणि मग इंग्लंड च्या वर्तमानपत्रांनी हि बातमी छापली कि “अवकाशातील
पहिलेविमान भारतातून झेपावले. मग ब्रिटिशांनी त्या दोघांना तुरुंगात टाकले आणि
त्यांना त्या विमानाची रेखाचित्रे द्यायला भाग पडले. त्या रेखाचीत्रांवर आधारित
विमान राईट बंधूंनी त्यानंतर सुमारे तीस वर्षांनी उडविले. परंतु ते काही फारसे
चांगले उडाले नाही कारण त्यांनी पूर्ण रेखाचित्रे उघड केली नव्हती. राईट बंधूंना
सुमारे तीस वर्ष प्रयत्न केल्यावर विमान उडविता आले. पण हि वस्तुस्थिती कि पहिले
विमान भारतात उडविण्यात आले होते हे भारतीयांना आणि आपल्या मुलांना माहिती नाहीये.
त्यांना असेवाटते कि विज्ञान हे पश्चिमेकडून आले आहे. त्यांना असे वाटते कि
“पृथ्वी गोल आहे आणि सूर्याभोवती फिरते हे प्रथम गालिलिओ ने शोधून काढले. आमच्या
पंडितांना विचारा ते त्याला खगोल आणि भूगोल ( भू-पृथ्वी, गोल- वर्तुळाकृती)
म्हणतात कारण ती गोल आहे म्हणून ते त्याला भूगोल म्हणतात. ते आम्हाला आधीच माहिती
होते.
अभ्यासक्रम ठरविण्याऱ्या सर्व
वामपंथी लोकांना चीनला पाठवायला पाहिजे. त्यांनी आपली शिक्षण पद्धतीचा नाश केला
आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या लोकांच्या आत्मविश्वासाला तडा दिला आहे. त्यामुळे
आपल्या देशाचे फार नुकसान झाले आहे. पहिले लोह आपल्या देशात तयार केले गेले हे आज
कुणालाच महिती नाहीये. त्याचप्रमाणे पहिली शस्त्रक्रिया हि पण भारतात झाली.
सुश्रुताने पहिली शस्त्रक्रिया केली तेंव्हा जगाला त्याबद्धल काहीही माहिती
नव्हती. www.bharatgyan.com नावाची वेबसाईट आम्ही भारताविषयी जास्ती माहिती देण्यासाठी
सुरु केली आहे त्याला जरूर भेट द्या.
प्रश्न: गुरुजी, मी जरी
सर्वांशी प्रेमाने वागतो, पण मला मात्र कोणीच प्रेमाने वागवीत नाही. त्याला माझी
पुर्वकर्म कारण असू शकतात का?
श्री श्री: तुम्हाला प्रेम मिळणार
नाही असा विचार करू नका. थोडे उशिराने का होईना पण तुम्हाला प्रेम जरुर मिळणार.
तुम्ही त्याबाबतीत निश्चिंत असा.
प्रश्न: गुरुजी, अनेक लोक शनी
आणि साडेसाती यात अडकलेले दिसतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय निरोप द्याल?
श्री श्री: ग्रहांचे आपल्यावर
परिणाम होतात हे खरे आहे पण साधकांवर (जे अध्यात्माच्या मार्गावर आहेत
त्यांच्यासाठी) त्यांचा परिणाम काहीसा कमी प्रमाणात होतो.आणि भक्तावर तर फारच अल्प
प्रमाणात होतो, त्यांच्यावर ग्रहांचा हारच कमी परिणाम दिसतो. म्हणून तुम्ही
जेंव्हा साधना करीत असता तेंव्हा ”ओम नमः
शिवाय” चा जप करा कारण सर्व ग्रह हे भगवान
शिवांच्या अधिपत्याखाली असतात. जेंव्हा घराचे स्वामी तुमच्या मुठीत असताना
घरातल्या नोकर काय करणार? तुम्ही ”ओम नमः शिवाय” चा जप करा.
प्रश्न: याआधीच्या प्रश्नाशी संलग्न असा प्रश्न आहे कि पितृ दोष ( मृत नातेवाईकांचा
वाईट परिणाम) असा काही प्रकार असतो का? काहीजण त्यांच्या मृत्युनंतर पण त्रास देऊ
शकतात का?
श्री श्री: असे असू शकते.काही
अतृप्त आत्मे थोडासा त्रास देऊ शकतात पण ते तुमचे वाईट करू शकणार नाहीत. तुम्हाला
थोडा त्रास होऊ शकतो , पण मी तुम्हाला सांगो कि भक्तांवर त्याचा काहीपरिणाम होत
नाही. ”ओम नमः शिवाय” चा जप करा आणि वाईट गोष्टींचा तुमच्यावर परिणाम होणार नाही
कारण सर्व ग्रह हे भगवान शिवांच्या अधिपत्याखाली असतात.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही कोण आहात? जेंव्हा मी तुमचा विचार करतो, तेंव्हा मला उत्तर
मिळत नाही.
श्री श्री: होय, मी लाजवाब आहे!
प्रश्न: गुरुजी, महाभारतात कर्ण आणि अर्जुन यात श्रेष्ठ कोण?
श्री श्री: अहो, महाभारतात भाऊ भाऊ
युद्धाला समोर आले आणि तुम्ही त्यांच्यात अजून एक भांडण लावू बघताय. ते तर
राज्यासाठी, जमिनीसाठी लढले. आत्ता त्यात कोण महान आणि कोण लहान यात तुम्हाला काय
फरक पडतोय? ते तर आपापल्या जागी श्रेष्ठ होते. तुम्ही मला सांगा तुम्हाला काय
व्हायला आवडेल , कर्ण कि अर्जुन? पहा जागा रिकामी आहे.
प्रश्न: मला लोकांच्या
पुर्वानुभावानुसार , त्यांच्यावरच्या रागाचे कारण बनून मग ते माझ्या सहनशक्तीच्या
पलीकडे जाते. आणि मग मी त्यांच्यावर चिडलो, ओरडलो कि त्यांना बरे वाटते. हे ठीक आहे का?
श्री श्री: होय , काही वेळा ते ठीक
आहे , पण तुम्ही असे कुठवर करणार? तुम्हाला रागवण्यात गम्मत वाटते आहे असे दिसते.
तुम्ही लोकांशी बोलून तुम्ही तुमचा राग या पद्धतीने त्यांच्यावर काढून मोकळे होताय
हे त्यांना सांगायला पाहिजे. त्यांना तसे सांगून मग रागवा.
प्रश्न: गुरुजी, मला तुमच्यासारखे व्हायचे आहे, मी काय करू?
श्री श्री: फार काही नाही, फक्त आरश्यासमोर उभे रहा, आणि तुमच्याकडे बघा. तुम्ही आहात
तोच मी आहे.
प्रश्न: माझे मन वर्तमानकाळात
फारसे नसते. त्याला वर्तमानकाळात आणायला
कर करावे लागेल?
श्री श्री: असे, तर मग ते जाते
कुठे? भूतकाळात जर जात असेल तर भूतकाळ हा पण वर्तमानकाळ आहे. त्यापासून वेगळे
व्हायचा प्रयत्न करा, जे काही घडत आहे ते एक स्वप्न आहे असे समजा. हे स्वप्न असून
ते केंव्हातरी संपणार आहे. आपले संपूर्ण
आयुष्य हे एक स्वप्न आहे!
प्रश्न: गुरुजी, तुम्ही माझे खूप लाडके आहात. ( पुढचे ऐकू आले नाही.)
श्री श्री: गीतेचा बाराव्वा अध्याय
वाचा. त्यात भगवान कृष्णांनी त्यांचे कोण लाडके आहेत त्यांचे गुणवर्णन केले आहे.
माझ्याशिवाय इतर कुठेही त्याचे मन रमत नाही ( पुढचे ऐकू आले नाही).
प्रश्न: गुरुजी, श्री कृष्ण आणि
श्री रामांना पण आपापले गुरु होते. कृपाकरून तुमच्या गुरुंविषयी आम्हाला सांगा.
श्री श्री: होय, बालपणापासून मला
अनेक गुरु होते. मी अनेक लोकांना भेटलो. “आनंदाचे गुरु” हे पुस्तक वाचा. त्यात
त्यांच्याविषयी सर्व गोष्टी आहेत.
प्रश्न:गुरुजी, मला तुमच्याबरोबर राहायचे आहे. मला त्यासाठी काय करावे लागेल याचे
कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री: होय, तुम्ही नक्कीच येऊ
शकता. स्वामींना विचारा, प्रथम त्यांच्याबरोबर रहा आणि मग तुम्ही माझ्याबरोबर येऊ
शकाल. जे देशासाठी तीन महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ देऊ शकत असतील
त्यासर्वांचे माझ्या बरोबर स्वागत आहे. तुम्ही जर सर्व आयुष्यासाठी आमच्याबरोबर
येऊ इच्छिता तरी चालेल. सर्वांचे स्वागत आहे, पण तुम्हाला खूप काम करावे लागेल.
प्रश्न: गुरुजी, मी योग्य
मार्गावर चाललो आहे कि नाही हे समजून घ्यायला काय परिमाण आहे?
श्री श्री: सर्वासाठी सर्वकाळ आनंद
देण्याचे तुमचे जर स्वप्न असेल तर ते ठीक आहे. अल्पकाळ आनंद आणि कायमचे दुखः हे
काही योग्य नाही.
प्रश्न: गुरुजी, अद्वैत म्हणजे
काय? आम्ही ते कोणत्या उदाहरणाने समजू शकतो?
श्री श्री: हि खुर्ची, हा मंच तसेच
त्याचा पृष्ठभाग हे सर्व लाकडापासून बनले आहे. हे सर्व लाकडापासून बनले आहे हे
समजणे म्हणजे अद्वैत. परंतु त्याकडे जर असे बघितले कि हि खुर्ची, हा मंच, हा
पृष्ठभाग हे सर्व वेगवेगळे आहे तर तो झाला द्वैतवाद. दोन्ही सत्य आहे. तुम्ही जर
सोनाराकडे सोने घेऊन गेलात तर तो त्या सर्व सोन्याचे वजन करेल, मग तो बांगडी असो,
कानातले असो, गळ्यातले असो कि अंगठी असो. तो त्यांचे सोने म्हणून वजन करेल कारण
त्याला फक्त त्यातले सोने दिसत असते. पण तुम्ही गळ्यातले हातात घालू शकत नाही,
किंवा बांगड्या कानात घालणार नाही. तुम्हाला जर कोणी गळ्यातले कानात घाल म्हटले तर
तुम्ही काय म्हणाल? “ नाही, कानातले आणि हातातले वेगवेगळे आहेत.” हे झाले द्वैत
ज्ञान. दोन्ही सत्य आहेत. “हे सर्व सोनेच आहे” हे पण सत्य आहे आणि “ ह्या आंगठ्या,
हे कानातले, हे गळ्यातले असे वेगवेगळे आहे” हे पण सत्य आहे. पण तुम्ही गळ्यातले
हातात घालणार नाही आणि बांगडी गळ्यात घालणार नाही. तुम्ही तसे करू शकता का ?
नाही!, हे झाले द्वैत ज्ञान.
प्रश्न: गुरुजी, तुम्ही म्हणता कि चांगल्या लोकांनी राजकारणात जायला पाहिजे.मग “आर्ट
ऑफ लिविंग” च्या माध्यमातून मी राजकारण प्रवेश करू शकतो काय?
श्री श्री: होय, नक्कीच, का नाही?
तुम्ही राजकारणात प्रवेश करा, आमचा तुम्हाला पाठींबा आहे. आपण प्रामाणिक लोकांची
एकगठ्ठा मत पेढी तयार करयला पाहिजे. आज वेगवेगळ्या जातींची मत पेढी आहे. आपण जर
सच्च्या लोकांची मत पेढी सुरु केली तर सर्व राजकारणीमध्ये सच्चेपानाच्या आधारे
स्पर्धा सुरु होईल. सध्याची जात-वार विभागणी आल्यामुळे ते त्यानुसार एकमेकांशी
स्पर्धा करीत आहेत. पण आपण जर सच्च्या लोकांची मत-पेढी केली तर ते आपापल्या
सच्चेपणावर जोर देऊन स्पर्धेत उतरतील. आणि आज ह्याचीच कमतरता असून हे व्हायला
पाहिजे.
प्रश्न: गुरुजी, अशी एक म्हण
आहे कि “ चोर चोर हे मावस भाऊ असतात. हे वाईट लोक एकत्र असतात पण चांगले लोक मात्र
एकत्र नसतात. काय करावे?
श्री श्री: मी पण त्याचाच विचार
करीत आहे. सर्व चांगल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी काय करायला पाहिजे? तसे ते
एकत्र येत असतात. जेंव्हा आम्ही आर्ट ऑफ लिविंग ची रजत जयंती साजरी केली तेंव्हा
एकाच मंचावरती सुमारे हजार संत मंडळी एकत्र बसली होती. तुम्ही असे होतांना कधी
बघितले आहे? चांगले लोक एकत्र येतील. त्यासर्व मोत्यांना एकत्र गुंफणारा धागा फक्त
पाहिजे आहे.
प्रश्न: गुरुजी, लग्नाच्या
वेळेला कुंडली जुळून येण्याला किती महत्व आहे?
श्री श्री: तुम्हाला तसे वाटत असेल
तर तुम्ही कुंडल्या जुळवून घ्या. नाहीतर तुमच्या मनात उगीचच शंका राहायची कि त्या
जुळतात कि नाही, त्या जुळवून घेणे चांगले. पण समजा एखादी व्यक्ती तुम्हाला इतर
सर्व बाबतीत अनुरूप वाटतीय फक्त कुंडली जुळत नाहीये तर त्याला एक मार्ग आहे.
ध्यान, प्रार्थना करा,
हवन करा, आणि मग सर्व मार्गी
लागेल. ग्रहांना प्रसन्न करून घेणे अवघड नाहीये.”ओम नमः शिवाय” चा जप करा आणि समझा
कि तुमचे काम झालेच.
प्रश्न: आपले पालक व गुरुजन यापैकी कोणाची सेवा आधी करावी?
श्री श्री: हे तर सत्य आहे कि
पालकांचा मान पहिला. त्यांच्यानंतर समाज, गुरु आणि राष्ट्राचा नंबर येतो. ज्यांनी
आपल्या पालकांची परवानगी घेतली नाही त्यांना आमंत्रण देत नाही. आधी तुमच्या
पालकांचे मत परिवर्तन करा. अश्या काही आया आहेत कि ज्या मुलांना समाजसेवा आणि
राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करीत आहेत.
प्रश्न:जगात सर्व-श्रेष्ठ कोण आहे?
श्री श्री: तुम्हीच!
(प्रश्न विचारणारा)-मी माझ्या आईला श्रेष्ठ समजतो.
श्री श्री: तुम्ही तुमच्या आईला
श्रेष्ठ मानता म्हणून मी तुम्हाला श्रेष्ठ समजतो. मी बरोबर आहे? एक श्रेष्ठच
दुसऱ्या श्रेष्ठाला ओळखू शकतो. बघा, तुम्हाला जर सर्व प्रश्नांची उत्तरे जात माहित
आहेत, तर मग मला ती कशाला विचारताय?
प्रश्न: (ऐकू आला नाही)
श्री श्री: “नास्ति तपः
प्राणायामात परम|” प्राणायामापेक्षा कोणतेही तप मोठे नाही. योग्य तऱ्हेने
प्राणायाम करणे हेच मोठे तप आहे. “तपोः द्वंद्व सहनं”, तुम्ही परस्पर विरोधी
गोष्टी सहार करायला पाहिजेत. आनंदाच्या क्षणी खूप उत्तेजना आणि दुःखाच्या वेळी
गळून जाणे योग्य नाही. यालाच ताप म्हणतात. परस्पर विरोधी गोष्टी सहन करता यायला
पाहिजेत. तुम्ही इथे उन्हाळा आणि थंडी सहन करायला पाहिजे. बेंगलोर आणि पुणे इथे
काही फार थंडी किंवा उन्हाळा नसतो. पुण्यातल्या लोकांना फार काही सहन करायला लागत
नाही.या भागात तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे. बघा, मी असे म्हटले आणि आकाशात ढग जमा
झाले. हा निसर्ग माझा मित्रच आहे. मी त्यांचा बरोबर एक करार केला आहे!
© The Art of Living Foundation