ज्ञानामुळे दु:स्वप्न गोड स्वप्नात बदलू शकते


17
2012............................... Sofia, Balgeria
May

सोफिया, बल्गेरिया – १७ मे, २०१२
प्रश्न : आपले वास्तव आपण निर्माण करतो की ते आधीच ठरलेले असते ?
श्री श्री रविशंकर : तुमच्या घरी कुत्रा आहे कां ?
( उत्तर : होय )
बघा, जेव्हा तुम्ही बागेत जाता, तुम्ही कुत्र्याला साखळी बांधून नेता. तसा कायदा आहे. आता त्या कुत्र्याला तितकेच स्वातंत्र्य आहे जितकी त्याच्या साखळीची लांबी आहे. बरोबर ? जिथे साखळी सुरु होते तिथे तो बसू शकतो किंवा जितकी साखळी लांब आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. त्याला तेवढेच स्वातंत्र्य आहे. तुम्ही जर कुत्र्याला ठराविक जागेत रहाण्याचे शिकवले असेल तर तेच त्याचे स्वातंत्र्य. तो वीस किलोमीटर लांब जात नाही.
तसेच जीवनात प्रत्येकाला काही स्वातंत्र्य असते आणि काही गोष्टी ठरलेल्या असतात.
माणसाला स्वातंत्र्य असते कारण त्याला बुद्धी असते. जनावरांचे जीवन ठरलेले असते. ते कधीही जास्त खात नाहीत. त्यांचे जीवन निसर्गाशी मिळते जुळते असते. आपल्याला निसर्गाशी मिळतेजुळते घेण्याचे किंवा निसर्ग नियम मोडण्याचे स्वातंत्र्य असते. तुम्हाला कळतंय कां मी काय म्हणतोय ? तुम्ही जेव्हा निसर्गाशी मिळते जुळते घेता तेव्हा सुमेळ साधला जातो आणि जेव्हा तुम्ही निसर्ग नियमांच्या विरोधात जातो तेव्हा लय बिघडते. तेव्हा जीवनात बऱ्याच गोष्टी ठरलेल्या असतात आणि काही गोष्टींचेच स्वातंत्र्य असते.  
मी तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. जेव्हा पाउस पडत असे तेव्हा भिजायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही छत्री किंवा रेनकोट घेऊन जाउन कोरडे राहू शकता.
आयुष्य म्हणजे स्वातंत्र्य आणि नियती यांचा मिलाफ आहे. तुम्ही ध्यानात जेवढे खोलवर जाल तेवढे तुम्ही जास्त आनंदी होता, तुम्ही जेवढे आनंदी व्हाल तेवढेच तुम्ही निसर्गाशी जुळले जाता आणि तुमचे स्वातंत्र्य जास्त वाढते.

प्रश्न : जेव्हा जीवनाचा अंत होतो तेव्हा जगाचा अंत होत नाही. पण जेव्हा जगाचा अंत होतो तेव्हा जीवनाचाच अंत होतो. या जगाचा अंत होणार आहे कां ?
श्री श्री रवीशंकर : तुम्ही जर टेनिसचा बॉल बघून मला विचारलेत की बॉलची सुरवात कुठे आणि शेवट कुठे तर मी काय सांगणार ?
जगातील तीन गोष्टींना आदि ( सुरवात ) नाही आणि अंत नाही.
१.       दिव्य प्रकाश किंवा चैतन्याला आदि अंत नाही.
२.       जीवनाला आदि अंत नाही ते अनंत आहे.
३.       पृथ्वीला, आपल्या जगाला आदि नाही अंत नाही. त्याचे रूप बदलेले पण ते चालू राहील. काळजी करू नका. जगाचा अंत होणार नाहिये. विशेषत: २०१२ मध्ये . जगाचा अंत फक्त अमेरिकेतल्या सिनेमात होतो.

प्रश्न: मला स्वप्न पडले होते की मी ह्या कोर्सला येतोय आणि तुम्हीही माझ्या स्वप्नात आला होतात.स्वप्नात पुढे काय होणार त्याबद्दलचे अंतरज्ञान असते कां ?  
श्री श्री रविशंकर : सहा प्रकारची स्वप्ने असतात. तुम्हाला ऐकायचे आहे कां ?
पहिला प्रकार म्हणजे दिवा स्वप्ने. ते आपण बाजूला ठेऊया. ते स्वप्न म्हणण्यासारखे नसते. दुसऱ्या प्रकारचे स्वप्न असते ते भूतकाळातल्या अनुभवांबद्दल असते. तुम्ही पूर्वी अनुभवलेल्या गोष्टी आणि संस्कार यांची स्वप्ने पडतात.
तिसऱ्या प्रकारची स्वप्ने म्हणजे तुमच्या इच्छा आणि भीती, त्यांची स्वप्ने पडतात.
चौथ्या प्रकारची स्वप्ने म्हणजे तुमचे अंतरज्ञान किंवा अपशकून. पुढे काय होणार त्याचे स्वप्न तुम्हाला पडते. 
चौथ्या प्रकारच्या स्वप्नांचा तुमच्याशी काही संबंध नसतो पण तुम्ही ज्या जागेवर झोपता त्याच्याशी असतो. तुम्हाला काही अनोळखी चेहरे दिसतात, अनोळखी भाषा ऐकू येतात.
सहावा प्रकार म्हणजे या सर्वांचे मिश्रण. आणि ९९ टक्के स्वप्ने या प्रकारची असतात. त्यामुळे या स्वप्नांचा अर्थ न लावणे किंवा त्याची फारशी काळजी न करणे हे सर्वात चांगले. 
सांगता येत नाही ,काही स्वप्ने पुढे घडणाऱ्या चांगल्या किंवा गोष्टींबद्दल असू शकतील. आणि त्यातली  काही फक्त तुमची भीती किंवा काळजी यांची असू शकतात. त्यामुळे, जाऊन एक कपभर चहा घ्या आणि खुश रहा हे सर्वात चांगले. स्वप्नातून जागे व्हा.
सूज्ञ लोक आयुष्यसुद्धा स्वप्नच मानतात. तुमचा सगळा भूतकाळ म्हणजे एक स्वप्न समजा. ते होऊन गेले आहे, हो की नाही ? ते स्वप्नवतच आहे.   
स्वप्न म्हणजे दुसरे काही नाही तर संस्कारांच्या आठवणी असतात. ते सगळे मागे पडले आहे. आणि हे  आताचेही स्वप्नच होणार आहे. तेही मागे पडणार आहे. आणि उद्या,परवा,तीन दिवसांनंतर तुम्ही घरी परत  गेल्यावर म्हणाल, “आम्ही बल्गेरियाला गेलो होतो. हे स्वप्नवतच वाटते आहे.”
तसेच, तुम्ही जर विचार केलात तर दिवसानंतर दिवस असे करत करत आणखी पन्नास वर्षे या पृथ्वीवर जगाल आणि मग तुम्ही जागे व्हाल आणि म्हणाल, “ हे स्वप्नासारखे वाटते आहे. सगळे मागे पडले.”
आणि ज्ञानाने प्रत्येक दु:स्वप्न गोड स्वप्नात बदलू शकते.

प्रश्न : आत्मा आपल्याच कुटुंबात पुनर्जन्म घेऊ शकतो कां ?
श्री श्री रविशंकर : जर ती व्यक्ती आपल्या नातवंडांमध्ये खूप जास्त गुंतलेले असली, तर हे शक्य आहे. जर मनात फक्त एकच विचार असेल की, “ माझी नातवंडे, माझी नातवंडे”, तर त्यांचा जन्म तिथेच होईल. 
आपल्यात खोलवर रुजलेला जो ठसा असेल त्यावर पुढचा जन्म ठरतो.

प्रश्न : कर्म केवळ व्यक्तिगत असते की देशाचेही असते ?
श्री श्री रविशंकर : कर्माचे अनेक सत्र असतात. वैयक्तिक कर्म असते, कौटुंबिक कर्म, सामाजिक कर्म देशाचे असते आणि काळाचेही कर्म असते. कर्माचे अनेक स्तर असतात.पण सर्व बदलू शकते.
जेव्हा तुम्ही बसून ध्यान करता तेव्हा परिस्थितीमध्ये निरनिराळ्या प्रकाराने परिवर्तन घडू शकते. असे समजू नका की तुम्ही फक्त तुमच्यासाठीच ध्यान करत आहात. जेव्हा तुम्ही क्रिया किंवा ध्यान करता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे कर्म सकारात्मक करता असे नाही तर तुम्ही या ग्रहांवर आणि इतर सूक्ष्म ग्रहांवरही परिणाम करत आहात. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा त्याने मनाला छान वाटणारा आणि शांत करणारा परिणाम होतो. फक्त तुमच्यावरच नव्हे तर देहावसान होऊन निघून गेलेल्यांवारही होतो.

प्रश्न : आम्ही आमचे जीवनकार्य कसे शोधायचे ?
श्री श्री रविशंकर : कामगिरी लक्षात येण्यासाठी आधी तुमचे मन शुद्ध व्हायला हवे. आणि ‘ पोकळ आणि रिक्त’ ( हॉलो अॅँड एम्टी ) ध्यान करण्याने मन खूपच शुद्ध होते. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा अंतर ज्ञान स्फुरू लागते.
याचा विचार करा की लोकाना मी कसा उपयोगी पडू शकेन, आणि जेव्हा तुम्ही भोवतालच्या लोकाना उपयोगी पडू लागता, तुमचे जीवन सेवा करण्यासाठी असते तेव्हा तुम्हाला जीवन खूपच अर्थपूर्ण आणि समाधानकारक वाटू लागते. जर तुमचे जीवन तुमच्या भोवतीच केंद्रित झालेले असेल की “ माझे काय, मला काय मिळेल ? मी जास्त आनंदी कसा होईन ?” तर मग तुम्हाला नैराश्य येते.
हे बघा, तुमच्यातील सामर्थ्य आणि गुण दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरण्याकरता असतात. जर निसर्गाने तुम्हाला चांगला आवाज दिला असेल तर तो तुमच्यासाठी असतो की दुसऱ्यांसाठी ? तुम्ही स्वत:च गाऊन, स्वत:च स्वत:चे गाणे ऐकता कां ? जर निसर्गाने तुम्हाला आवाज दिला असेल तर तो दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी. जर निसर्गाने तुम्हाला चांगली शरीरयष्टी दिली असेल तर ती तुमच्यासाठी की इतरांसाठी. दुसऱ्यांनी तुमच्याकडे पाहून आनंद लुटण्यासाठी.
तर, तुमच्याकडे कोणतेही सामर्थ्य असेल तर ते तुमच्यासाठी नाही तर इतरांसाठी आहे.
तुमच्याकडे असलेले कोणतेही सामर्थ्य किंवा बळ दोन प्रकारे वापरता येते. तुम्ही ते सामर्थ्य दुसर्याशी मारामारी करण्यासाठी वापरू शकता किंवा दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी वापरू शकता. शेकडो वर्षांपासून जगातील लोक दुसऱ्यांशी लढण्यासाठी सामर्थ्य मिळवतात. हो की नाही ? दुसऱ्यांशी लढण्यासाठी सामर्थ्य मिळवतात आणि मग कोणाशी लढतात तर बरोबरीचे सामर्थ्य असलेल्यांशी.
आपल्यापेक्षा  कमी सामर्थ्यवान असलेल्यांशी नक्कीच कोणी लढत नाही. आपल्या बरोबरीचे असलेल्यांशीच कोणीही लढाई करते, आणि सामर्थ्य आहे म्हणून लढण्याने कोणालाही आनंद मिळत नाही. तुम्हाला दिले गेलेले सामर्थ्य चांगल्या कामासाठी, सेवा करण्यासाठी वापरले गेले तर तुम्हाला समाधान आणि आनंद मिळतो.
तर, तुमच्याकडे जे काही असेल, सामर्थ्य, सौंदर्य, पैसा, व्यक्तिमत्व, आवाज हे सर्व काही सत्कर्मासाठी, दुसऱ्यांच्या सेवेसाठी वापराचे आहे. मग तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यात किती समाधान वाटते.  

प्रश्न : (मंदबुद्धी मुलांना कशी मदत करावी यावरचा प्रश्न)
श्री श्री रविशंकर : जा आणि काही वेळ त्यांच्याशी खेळा.एवढे पुरेसे आहे. असे समजू नका की त्यांना वाईट वाटते आहे किंवा ते दु:खी आहेत. ते दुसऱ्याच परिमितीत जगत असतात.ते इथे तुमच्याकडून सेवा करून घ्यायला आले आहेत इतकेच.

प्रश्न : कुणी आपली मदत नाकारली असेल त्याना आपण मदत करण्याचा आपला अधिकार आहे कां ? त्यांची इच्छा पवित्र आहे हे लक्षात घेतले तर आपण त्याना मदत करावी  कां ?
श्री श्री रविशंकर : मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा एखादा लहान मुलगा भिंतीवरून धावत चालला आहे आणि तो पडण्याची भीती आहे तर तुम्ही काय कराल ? त्या मुलाला त्याचे स्वातंत्र्य उपभोगू द्यायचे ? नाही तुम्ही त्या मुलाला समजावून परत आणाल, बरोबर ?
तसेच जर कुणी मादक पदार्थांच्या व्यसनात अडकला असेल आणि त्यांच्यासाठी ते धोकादायक आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही जाऊन त्यांना मदत करणार नाही कां ? तर आपण आपले सर्व कष्ट पणाला लावून लोकांना त्रासातून बाहेर यायला मदत केली पाहिजे.
जर कुणी मानसिकदृष्ट्या आजारी असेल आणि औषध घेत नसेल तर घरचे काय करतात ? त्याचे तसे चालू देतात ? तो हिंसक होऊन सर्वांना मारू लागेल. कुटुंबातले सूज्ञ सभासद त्याला सांगितलेले औषध फळाच्या रसातून किंवा दुधातून त्याला देतात आणि त्याने त्याला बरे वाटते.
तर, नेमके असे काही नसते. त्या त्या परिस्थितीत तुम्ही तुमचा सुज्ञपणा वापरायला हवा. तुम्ही मदत करायची जबरदस्ती कुणावर करू शकत नाही. समजा कुणाला रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी न्यायची  असेल तर ते असे म्हणू शकत नाहीत की रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवायला मी स्वतंत्र आहे. तुम्ही समाजात रहात असताना तुम्हाला काही नियम पाळावेच लागतात.

तसेच जेव्हा तुम्हाला कुणाला मदत करायची असेल तेव्हा तुम्हालाही काही नियम पाळावे लागतात.कुणावरही जबरदस्ती करू नका पण त्या बरोबरच कुणाच्या घराला लागलेली आग विझवण्यासाठी ते तुम्हाला आमंत्रण देतील याची वाट बघू नका. जर तुमच्या शेजाऱ्यांच्या घराला आग लागली असेल तर तुम्ही फोन येण्याची किंवा आग विझवण्याच्या आमंत्रणाची वाट न बघता आग विझवायला धाऊन जाता. तुम्ही ते करता की नाही ? तर ध्यानात घ्या , मध्यम मार्ग धरा.

प्रश्न : ( ऐकू आला नाही )
श्री श्री रविशंकर :  त्यांना मदत करण्यासाठी जे काही करता येईल ते आपण करू. मी तुमच्या सोबत आहे. आपण सर्वांनी एक गट बनवूया. त्यांना नवचेतना शिबीर करवूया. आणि मद्यपान व्यसनातून त्यांना बाहेर काढू. जिप्सी अल्पसंख्यांकांची हीच समस्या आहे की ते मद्यपान करतात, मद्यपान करतात आणि मद्यपान करतात. त्यांच्या कमाई पैकी पन्नास ते साठ टक्के पैसे ते दारूत खर्च करतात आणि त्यांच्या बायकानाही मारतात. त्या बायका बिचाऱ्या दु:खात असतात. हे आपण बदलायला हवे. आपण त्यांच्यासाठी विनामुल्य शिबिरे करुया.

प्रश्न : मी विद्यार्थ्यांबरोबर काम करतो. ते कुटुंब कां स्थापन करू शकत नाहीत ? ते एकमेकांना शोधून नाते कां जोडत नाहीत ?
श्री श्री रविशंकर : तुम्ही नातेसंबंध शोधताय कां ? होय ? बरं, आपण इथे एक वधु वर संशोधन केंद्र सुरु करुया. एकटे लोक नोंदणी करू शकतात.   

प्रश्न : मी प्रामाणिकपणे या सर्व साधना करतो पण मी बदललो आहे की नाही याबद्दल मला शंका आहे. मी अजूनही अस्वस्थ होतो आणि त्यामुळे मी दु:खी होतो.
श्री श्री रविशंकर : ऐका, आता तुम्ही कसे आहात ? आत्ता तुम्ही आनंदी आहात कां ? पूर्वीचे जाउदे. आता इथे असण्यात आनंद आहे कां ? तुम्ही मजेत आहात कां ? झाले तर मग.
आपल्या प्रत्येकाच्या आंत दोन गोष्टी असतात. एक गोष्ट आहे जी बदलत नाही. चैतन्याचा एक सतत चालू असणारा प्रवाह असतो तो बदलत नाही. भोवतालच्या अनेक गोष्टी बदलत असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा मागे वळून आयुष्याकडे बघता तेव्हा लक्षात येते की तुम्ही पूर्वी जे होतात ते आता राहिलेले नाहीत. पण त्याचं वेळी, बघायला गेले तर तुम्ही तीच व्यक्ती आहात. दोन्ही एकाच वेळी आहेत.
तुम्ही बदलला नाहीत असे तुम्हाला कधी वाटते ? तुम्ही अस्वस्थ होता तेव्हा. जर कुणी तुम्हाला, मुद्दाम चिथवले आणि तुम्हाला राग आला की तुम्ही म्हणता, “अरे, मी बदललो नाही, मला अजूनही राग येतो.” हीच समस्या आहे. बरोबर? हे खरे नाही. भूतकाळात तुम्ही रागावलात पण तुमच्यात तो राग महिनोन महिने टिकून राहिला. तुम्हाला अजूनही राग येतो, पण तो काही मिनिटेच रहातो किंवा तुम्ही एक छोटी क्रिया करेपर्यंत रहातो आणि पुन्हा ताजेतावाने होता.