29
2012............................... Norway, Europe
April
आध्यात्मिकता म्हणजे तुमची स्वतःबरोबरची पूर्व-नियोजित वेळ होय.
नॉर्वे, २९ एप्रिल २०१२.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो कि तुम्ही स्वतःला फार जोखू नका.
एक अशी प्रवृत्ती
असते कि तुम्ही एक तर स्वतःला जोखत असता किंवा दुसऱ्याला. त्यातून मग तुम्ही
स्वतःला दोष देता किंवा मग दुसऱ्याला दोष देता. तुम्हाला असे वाटते कि तुम्ही
योग्य नाही किंवा दुसरा योग्य नाहीये. तुम्ही आता जागे होऊन हे जोखणे बंद करायला
पाहिजे.
तुम्ही स्वतःला फार
दुषणे देऊ नका. तुम्ही या सर्व घडणाऱ्या घटनांचा एक भाग आहात. जसे झाडे आहेत,
नद्या आहेत, पक्षी आहेत तसेच तुम्ही पण आहात. अनेक पक्षी जन्माला येतात आणि अनेक
पक्षी मरून जातात, होय कि नाही? अनेक झाडे नवीन उगवतात आणि मग ती नाहीशी होतात.
त्याचप्रमाणे, अनेक लोक, अनेक शरीरे येतात आणि मग ती पण नाहीशी होतात. आणि मग नवीन
लोक येतील आणि ते पण नाहीसे होतील.
काही कोट्यावधी
वर्षे हि पृथ्वी आहे. तुम्ही स्वतःला जास्त मोठ्या संदर्भात जेंव्हा बघाल तेंव्हा
स्वतःला दोष देणे थांबेल. अध्यात्माच्या वाटेवरचा पहिला नियम म्हणजे स्वतःला दोष
देणे थांबवा, कारण ज्यांना तुम्ही दोष देता, त्यांच्या बरोबर राहायला
तुम्हाला आवडेल का? तुम्ही ज्यांच्या बरोबर सुखी नाही त्यांच्या बरोबर राहायला
तुम्हाला आवडेल का? नाही ना? तुम्ही जर स्वतःला दोष देत असाल तर तुम्ही तुमच्या
बरोबर असू शकत नाही.
आध्यात्मिकता म्हणजे तुमची स्वतःबरोबरची पूर्व-नियोजित वेळ होय.
तुम्ही जर स्वतःला
दोष देत बसलात तर तुम्ही स्वतःबरोबरची पूर्व-नियोजित वेळ पाळू शकणार नाही. म्हणूनच
अध्यात्माच्या वाटेवरचा किंवा अध्यात्माच्या प्रवासातला पहिला नियम म्हणजे स्वतःला
दोष देणे थांबवा.
आता असे म्हणू नका
की “ वा! त्याचा अर्थ असा कि मी आता दुसऱ्यांना दोष देऊ शकतो.” नाही! जेंव्हा
तुम्ही दुसऱ्यांना दोष देता, आणि मग तुम्ही त्यांना का दोष देत आहात हे जेंव्हा
व्यापक दृष्टीकोनातून बघता, तेंव्हा असे लक्षात येईल की तुम्ही त्यांना वृथा दोष
देत होतात, आणि मग जेंव्हा तुमच्या असे लक्षात येते कि तुमचा या बाबतीत अंदाज
चुकला तेंव्हा मग तुम्ही स्वतःला दोष देता.
म्हणून मी असे
म्हणतो कि दुसऱ्याला दोष देऊ नका कारण ते परत तुमच्यावर उलटणार आहे. तुम्ही
कोणालाच दोष देता कामा नये.
गेल्या ५६ वर्षात मी
कोणालाही अपशब्द बोललो नाहीये. अगदीच वाईट शब्द माझ्या तोंडातून कोणता गेला असेल
तर तो “तू मुर्ख” असा होता. जेंव्हा मला खूप राग येतो किंवा मी फारच त्रस्त होतो
तेंव्हा “तू मुर्ख” असे शब्द माझ्या तोंडातून आलेले आहेत.
मी आतापर्यंत
कोणालाही दोष दिलेला नाही, तसेच अपशब्द पण बोललो नाही. मला तसे जमतच नाही. अगदी
पहिल्यापासून हे असेच सहज आहे कि मी असे होण्यासाठी स्वतःहून काही प्रयत्न केलेले
नाहीत. मी कुणाची शाब्दिक किंवा कोणत्याही प्रकारची निंदा केलेली नाही.
जेंव्हा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देता आणि अपशब्द वापरणे बंद करता, तेंव्हा
आशीर्वाद द्यायची शक्ती आपोआपच तुमच्या शब्दांना येते आणि मग तुमचे आशीर्वाद काम
करायला लागतात. मी काय म्हणतोय हे लक्षात येतेय तुमच्या?
म्हणून स्वतःला आणि
दुसऱ्याला दोष देणे थांबवा. आणि आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे चला.
काही वेळा लोक असे
म्हणतात कि “ हा माणूस धोकादायक आहे, तो तितकासा खरा नाहीये.”
पण जेंव्हा आपण असे
म्हणतो तेंव्हा समोरचा खोटा किंवा धोकादायक हे ठरविण्यासाठी एकच मापदंड असायला
पाहिजे. पण बऱ्याच वेळा लोकांकडे कोण खोटा किंवा धोकादायक हे ठरविण्याचा काही
मापदंड नसतो, तर ते आपले उगीचच एखाद्याला तसे ठरवीत असतात.
आजकाल समाजात अशी
उगीचच एखाद्याला दोष द्यायची प्रवृत्ती वाढत आहे, आणि मग ते स्वतःला दोष देतात आणी
मग उगीचच त्याबद्धल त्यांच्या मनात अपराधीपणाची जाणीव निर्माण होते. अध्यात्माचा
प्रवास हे सर्व काढून टाकण्यासाठी असतो.
ही एक फार नाजूक
गोष्ट आहे.
त्याचा अर्थ असा
नाहीये कि तुम्ही तुमच्या चुकांचे समर्थन करायला पाहिजे. जेंव्हा तुमच्या हातून कोणतीही
चूक होईल तेंव्हा तुम्ही असे म्हटले पाहिजे कि “ मी अध्यात्माच्या मार्गावर
असल्याने, मी माझ्या चुका खपवून घेऊ शकत नाही आणि मी स्वतःला दोष देऊ शकत नाही.
म्हणून मी योग्यतेच केले.” असे नाही !
म्हणून हे एक फार
नाजूक संतुलन आहे. चुकांचे समर्थन करता कामा नये, पण आपली चूक समजून घेऊन स्वतःला
दोष न देण्याचे असे हे संतुलन आहे.
तुम्ही जर आपल्या चुका
समजून घेतल्या नाहीत तर तुम्ही कधीच प्रगती करणार नाही. पण त्याच वेळी जर चुका
समजून, तुम्हाला अपराधी वाटत असेल आणि तुम्ही जर स्वतःला दोष देत बसलात तर तो फार
मोठा वेडेपणा होईल.
म्हणून इकडे किंवा
तिकडे न पडता तो समतोल साधणे फार महत्वाचे आहे.
प्रश्न: आम्ही जर एवढे
नगण्य असू तर वेळ, पैसा, शक्ती आणि उर्जा या अभ्यासक्रमासाठी का खर्च करीत आहोत?
आमच्या प्रत्येकामुळे काही फरक पडत नसेल तर आम्ही आध्यात्मिक का व्हायचे? नगण्य
अश्या आमचे चांगले होणे कोणासाठी मदतीचे ठरणार आहे?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला या
प्रश्नाचे उत्तर हवे आहे काय? त्यामुळे काही फरक पडत नाही!
तुम्ही हा प्रश्न
विचारायचा त्रास कशाला घेतलात? त्यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही?
तर ऐका, जगण्याचे
अनेक स्तर असतात तर ज्ञानाचे फक्त दोन स्तर असतात.एक व्यावहारिक ज्ञान तर दुसरे शुद्ध ज्ञान. शुद्ध
विज्ञान आणि व्यावहारिक विज्ञान.
शुद्ध विज्ञान
म्हणजे काय? या खोलीत सर्व काही लाकडापासून बनविले आहे. सोफा लाकडी आहे, मेज लाकडी
आहे आणि दार पण लाकडी आहे. हे सर्व लाकूड आहे. आणखी स्पष्ट सांगायचे म्हणजे हि
प्रत्येक गोष्ट अणु आहे.
हे काय आहे?
प्रत्येक गोष्ट अणु आहे!
म्हणजेच हे सर्व
लाकडी आहे किंवा हे सर्व अणुपासून बनले आहेत हे झाले शुद्ध विज्ञान. पण तुम्ही
सोफा दार म्हणून वापरू शकत नाही किंवा दार सोफा म्हणून वापरू शकत नाही, जरी हे
सर्व अणुपासून बनले असले तरी. आले लक्षात?
त्याचप्रमाणे हिरा
आणि कोळसा हे एकच पदार्थाचे बनलेले असतात. ते वास्तविक पहाता एकच आहेत. पण म्हणून
कोणी कोळसा कानात अडकवून, चुलीत हिरे जाळीत नाही, बरोबर? म्हणून ते या एका बाबतीत
वेगळे असतात. पाणी आणि बर्फ एकच आहे असे म्हणण्यासारखे आहे. पण तुम्ही पाण्याचा
चहा करू शकता, बर्फाचा नव्हे. बर्फाचे पाणी झाल्यानंतर तुम्ही त्याचा चहा करू
शकता. हे झाले व्यावहारिक ज्ञान.
म्हणून, शुद्ध
शास्त्राच्यादृष्टीने असे म्हटले जाते कि तुम्ही नगण्य आहात. असे का ? तर अचानकपणे
संपूर्ण विश्वाच्या संदर्भात जेंव्हा तुम्ही स्वतःकडे बघता तेंव्हा ते तसे भासते.
याचा अर्थ असा नव्हे
तुम्ही जेवण जेवू नये. तुम्ही जर नगण्य आहात तर तुमचे अस्तित्व तरी कशाला? जेवण
कशाला? झोप कशाला? काही करावे तरी कशाला? बरोबर?!! तुम्ही ते सर्व करायला पाहिजे,
अगदी हा अभ्यासक्रम सुद्धा, आले लक्षात?
येथे आल्याने काय
होते? तुमचे मन उल्हासित होते, शरीर ताजे-तवाने होते, आणि तुमच्यात ज्ञानाची भर
पडते. अशा अनेक गोष्टी होतात.
प्रश्न: ध्यान आणि विश्राम
करतांना जर रडू आले तर ते योग्य आहे काय?
श्री श्री रविशंकर: ते योग्य आहे. एक,
दोनदा रडू आले तर ठीक आहे पण ती सवय लावून घेऊ नका. खास करून जेंव्हा सर्व जण
ध्यान करीत असताना, सर्वत्र शांतता असताना त्या भावनांकडे साक्षीभावाने बघून
आत्मसात करा आणि मग पहा ते कसे निघून जाते ते.
प्रश्न: दिवसा थोडी
वामकुक्षी घेणे योग्य आहे काय?
श्री श्री रविशंकर: जर तुम्ही वयाची ४५
ओलांडली असेल तर योग्य आहे , अन्यथा नाही.
प्रश्न: मला जर काहीच वाटत
नसेल तर?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला रिकामे
वाटतेय? मग काहीतरी आहे.
तुम्हाला माहित आहे
का कि काही अनुभव यावेत अशी अपेक्षा असते. तुम्ही दुसऱ्यांचे अनुभव ऐकून तुम्हाला
तसे अनुभव यावेत अशी अपेक्षा ठेवता आणि म्हणून तसे अनुभव येत नाहीत. तुम्ही तशी
अपेक्षा ठेऊ नका, येतेय लक्षात?
असे पहा कि जेंव्हा
तुम्ही अशी अपेक्षा ठेऊन असता, तेंव्हा तुमचा मेंदू सजग होऊन तुम्ही उत्तेजित
होता. अशा उत्तेजित अवस्थेत तुम्ही झोपू शकत नाही, आराम पण करू शकत नाही आणि मग
खोलवर जाऊन कोणताहि अनुभव घेऊ शकत नाही, अशी एक शक्यता असते.
दुसरे म्हणजे
तुमच्यापैकी अनेक जण विचारतात कि “ काय करावे, मला सारखी झोप येते.” तुम्ही
तुमच्या शरीर यंत्रणेला पुरेशी विश्रांती देत नाही मग अशी झोप येते. एक म्हणजे
तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्ती झाले तरी अशी झोप येते. दुसरे
म्हणजे तुमच्या शरीर यंत्रणेतील प्राण-शक्ती कमी झाली तरी झोप येऊ शकते. अशा वेळी
प्राणायाम उपयोगी पडतो. ध्यान करायच्या आधी दीर्घ श्वास घेणे उपयोगी पडू शकते. शरीरातील
साखर आणि इतर खनिजे यांच्या प्रमाणाकडे लक्ष देणे गरजेचे असते. काही वेळा त्यांची
कमतरता यामुळे तुम्हाला आळस आणि झोप येऊ शकते.
आणखी शक्यता म्हणजे
काही वेळेला शरीर खूप थकलेले असते आणि मग झोप येते. काही वेळा तर शरीर खूप थकलेले
असले तरी झोप येत नाही. तुमच्यापैकी किती जणांनी हा अनुभव घेतला आहे? तुम्ही खूप
दमला असला तरी झोप येत नाही.
ध्यानाने या सर्व
गोष्टी थांबविता येतात आणि हे एक कारण असू शकते कि तुम्हाला ध्यान करताना झोप
येते. पण काही हरकत नाही.
प्रश्न: माझ्या डोक्यात
नेहमी गाणी चालू असतात असे का?
श्री श्री रविशंकर: नेहमी असे म्हणू नका! नेहमी चालू असतील असे मला वाटत नाहीये. तुम्ही तुमच्या
डोक्याची उजवी बाजू खूप वापरली असेल म्हणून सहजच संगीत चालू होते.
त्याला पर्याय
म्हणजे काही वेळ कोडी सोडवा, शब्द-कोडी सोडवलीत तर डोक्याची दुसरी बाजू पण वापरली
जाईल. शांत पणे बसून आकडे मोजा, गणिते सोडवा किंवा पैसे मोजा.
मेंदूचा समतोल वापर
होऊन दुसरी बाजू पण वापरली जाईल असे काही करा, वाचन करा, ज्ञान ऐका.
आता तुम्ही ज्ञान
ऐकत आहात आणि तुमच्या डोक्यात संगीत नाहीये. म्हणजे वाचन, श्रवण, मोजदाद या सर्व
गोष्टी मेंदूचा डावा भाग वापरायला मदत करतात.
प्रश्न: आपण सर्व जण हे
श्वास आणि ज्ञान हे दोन्ही बरोबर घेऊन जन्माला येतो. मग प्रत्येकजण हा
तुमच्यासारखा गुरू का नाही? हे ज्ञान वापरून तुम्ही गुरू कसे झालात?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला माहित आहे
कि या भव्य आकृतीमध्ये आपण सर्वजण काही भव्य योजना घेऊन आलो आहोत. असे समजा कि
तुम्ही हे करायचे, त्यांनी ते करायचे आणि आपण सर्वांनी तसे करायचे.
असे पहा कि जेंव्हा
कोणतीही इमारत बांधली जाते तेंव्हा त्याचे सामान हे कोठेतरी ठेवले जाते. मग
रचनाकार येतो आणि सांगतो की “येथे खिडकी असेल. तेथे दरवाजा असेल आणि ते छप्पर
असेल. तो रचनाकार ते सर्व ठरवितो आणि मग इमारत तयार होते, बरोबर?
तसेच, आपले आयुष्य
असते!
त्या भव्य योजनेत
असे म्हटले आहे कि “तुम्ही तेथे जन्म घ्याल, ते तिथे जन्म घेतील आणि हे इथे जन्म
घेतील”
म्हणून आपण जगात
वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलो आणि काही विशिष्ट वेळेला सर्वजण येथे जमलो आहोत.
मी तुम्हाला सांगतो
कि वास्तवात डोकावणे हे फारच आकर्षक असते. आपल्याला वाटते, त्यापेक्षा कितीतरी
अधिक गोष्टी या जगात आहेत. आपण पाहतो ते एक फक्त हिमनगाचे टोक असते आणि आपण
त्यालाच जग समजून बसतो.
आपण विहिरीच्या
काठावर बसलेल्या बेडकाप्रमाणे असतो जो विहिरीलाच समुद्र समजत असतो. आपले आयुष्य
काहीसे असेच असते. आपण जर जागे होऊन विहिरीपलीकडल्या जगाकडे नजर टाकली तर अनेक
गोष्टींचा उलगडा होईल आणि मग त्याचा अर्थ पण लक्षात येईल.
म्हणूनच या सूक्ष्म
जगात योजना तयार असतात. जर कोणी डॉक्टर होणार असेल तर ते आधीच झालेले असते.
मग तुम्ही विचारलं
कि आम्हाला काही मोकळीक नाही का?
मी असे म्हणेन की,
होय आहे तर! आयुष्य हे भाग्य आणि तुमची स्वतःची विचारसरणी यांचा एक सुंदर मिलाप
असतो.
प्रश्न: माझी बहीण ही
मानसिक दुर्बल आहे. ती आम्हाला शक्ती-हीन करून नेहमी आम्हाला उदास करीत असते. मी
तिच्यापासून शक्य तितका लांब राहायचा प्रयत्न करीत असतो. पण मग ती एकटी पडते.
तुमची स्वतःची आणि दुसऱ्यांची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा?
श्री श्री रविशंकर: जर कोणी आजारी असेल
तर त्यांचे बोलणे फारसे मनावर घेऊ नका, शक्यतोवर कानात बोळे घालून बसा. तुम्ही
त्यांचे वागणे आणि बोलणे मनावर घेतले तर असा त्रास होतो. पण तुम्ही प्रयत्नपूर्वक
त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना शक्य तेवढी मदत करायला पाहिजे.
एक अशी जुनी म्हण
आहे की ”सुख किंवा दुःख हे कोणी देत नसते”
तुम्ही जर दु:खी
असाल तर ते तुम्हाला कोणी दिलेले नाहीये, तर ते तुम्ही तुमच्या स्वतःला दिलेले
असते, आणि जर तुम्ही आनंदी असाल तर तो पण तुम्हाला कोणी दिलेला नाहीये तर तुमच्या
स्वतःच्या कर्तबगारीने तो मिळविलेला असतो.
जेंव्हा तुम्हाला हे
माहित असते तेंव्हा तुम्ही तुमच्या सुख किंवा दुःख या विषयी दुसऱ्याला दोष देत
नाही. कारण जेंव्हा दुसरा कोणी तुम्हाला सुख देत असता तर तुम्ही त्यांना तो तसा
तुम्हाला वारंवार न देण्याविषयी दोष दिला असता. मी काय म्हणतोय ते लक्षात येतेय?
प्रेमाचे रुपांतर
द्वेषात कसे होते? तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता ते तुम्हाला आनंद देतात आणि मग
तुम्ही त्यांच्यावर रागावता कारण तुम्ही त्या भावनेचे एकप्रकारे गुलाम झालेले
असता. म्हणून ते जेंव्हा आनंद देत नाहीत तेंव्हा तुम्ही त्यांना दोष देता,
त्यांच्यावर रागावता, त्यांचा दुस्वास करायला लागता आणि मग ते संबंध संपुष्टात
येतात. होय कि नाही? म्हणून असे लक्षात घ्या कि आनंद आणि सुख हे तुमच्या योग्यते प्रमाणे
मिळत असते. बाकीचे फक्त ते दुःख किंवा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत
असतात. त्यांचे आभार माना! मग सर्वांबरोबर तुमचे चांगले संबंध राहतील.
प्रश्न: माझ्या आयुष्याला
योग्य दिशा मिळावी यासाठी मला आशीर्वाद द्या.
श्री श्री रविशंकर: तुम्ही अगोदरच
योग्य मार्गावर आहात. तुम्ही अगदी योग्य जागी आला आहात. मी तुम्हाला सांगतो,
तुम्ही निश्चिंत असा!
असे पहा कि तुम्हाला
विमान किंवा रेल-गाडीत जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. एकदा का विमानात
बसलात कि मग काही पळायची गरज नाहीये कारण तसे केल्याने विमान काही लवकर पोहोचणार
नाहीये.
अशी कल्पना करा कि
कोणीतरी रेल-गाडीत चढल्यावर जोरात सामान घेऊन पळायला लागला आणि म्हणाला कि “ मला
सगळ्यांच्या आधी पोचायचे आहे”
तुम्ही निश्चिंत
असा!, सामान खाली ठेवा. तुम्ही योग्य मार्गावर आहात, तुम्ही ध्यानात आहात. तुम्ही
जर सहज समाधी चे शिक्षण घेतले नसेल तर ते घ्या. अष्टवक्र गीता ऐका. तुमच्या पैकी
कितीजणांनी अष्टवक्र गीता ऐकली आहे? त्याने तुमच्या आयुष्यात फरक पडला आहे का?
बाकीच्या कोणी ऐकली नसेल तर ती ऐका. तुम्ही ती ऐकून त्यावर साधक-बाधक चर्चा करायला
पाहिजे. दिवसातील काही वेळ हा ज्ञानासाठी द्यायला पाहिजे. सेलिब्रेटिंग
सायलेन्स, एन्टीमेट नोट टू सिन्सियर सीकर सारखी पुस्तके हाताशी ठेऊन वेळ मिळेल
तेंव्हा चाळली पाहिजेत. त्यामुळे तुमची विचार-सरणी बदलेल आणि तुम्ही समस्या कशा
तऱ्हेने हाताळता ते पण बदलेल. त्याचा निश्चितच फायदा होईल.
प्रश्न: मला जर एखाद्या
व्यक्ती बरोबर संबंध ठेवायचे नसतील तर मी त्यांना न दुखावता, स्पष्टपणे, प्रेमाने
मी ते संबंध कसे तोडू शकतो किंवा त्यांना ते कसे सांगू शकतो कि मला त्यांच्याशी
संबंध ठेवायचे नाहीत?
श्री श्री रविशंकर: तुम्ही ते तुम्हाला
हवे तेंव्हा, केंव्हाही करू शकता, त्यात फार काही नाहीये. तुम्ही ते सहज सांगू
शकता.
तुम्ही सर्व गोष्टी
काही बोलून दाखवायला पाहिजेत असे नाही. आयुष्य फार वेगाने जात असते, मग उगीच
तोंडाची वाफ कशाला दवडा? मला काल असे वाटले, मला आज असे वाटले. तुमच्या वाटण्याची
कोण कदर करतोय? तुमच्या आनंदाची कोण काळजी करतोय? आयुष्य फार वेगाने जात असते,
पृथ्वी फार वेगाने फिरती आहे, ती सूर्याभोवती वेगाने फिरत आहे.
सर्व काही बदलत
असते, झाडांची पाने गळतात, आणि मग नवीन पाने येतात. झाडाची किती पाने गळली याची
कोण मोजदाद ठेवतोय? तुम्हाला कसे वाटतेय आणि कसे वाटत नाहीये याची कोण काळजी
करतोय?
तुमच्या सर्व
भावनांचे एक बोचके बांधून ते समुद्रात फेकून द्या आणि निश्चिंत रहा! कोण काळजी
करतोय? तुमच्या भावना सारख्या बदलत असतात, होय कि नाही?
तुमच्या भावना किती
वेळा बदलतात? तुमच्या भावना किती वेळाने बदलतात? त्यात एवढे मोठे काय आहे? आपण
उगीचच त्याचा बाऊ करतो.
मला असे वाटते. मला
तसे वाटते. कोण काळजी करतोय? फक्त उभे रहा, तुम्हाला या जगात जे करायचे आहे ते
करा, संपले, त्यात एवढे मोठे काय आहे? वेळ कसा निघून जातो ते पहा.
आर्ट ऑफ लिविंग ला
३० वर्षे पूर्ण झाली. आर्ट ऑफ लिविंग जरी
१९८२ ला सुरु झाले असेल तरी त्याच्या थोडे आधी आम्ही आमची संस्था स्थापन केली. १३
नोव्हेंबर १९८१ ला आम्ही वेद विज्ञान महाविद्यापीठ नोंदविले.
काय झाले? ३० वर्षे
झाली आहेत. मार्च १९८२ ला आम्ही पहिला अभ्यासक्रम घेतला, आम्ही ३० व्या वर्षात
पदार्पण केले आहे. वेळ कसा भरकन जातो.
मला वाटते कि हा
माझा या महिन्यातला १४वा थांबा आहे.१ एप्रिल पासून मी जगातल्या १४ शहरांना भेटी दिल्या
आहेत. मला सर्वत्र आनंद आणी उत्साह दिसून आला.
जिथे प्रेम व्यक्त
करायला वेळ नाही, आयुष्य व्यक्त करायला वेळ नाही, मग तुम्हाला कसे वाटते किंवा कसे
वाटत नाही याचा विचार करायला कोठे आणि कोणाला वेळ आहे? जगात करण्यासारखे खूप काही
आहें आणि करण्यासारखे काहीही नाही, हे दोन्ही बरोबर असतात.
जगात करण्यासारखे
खूप काही आहें आणि तुम्हाला करण्याची गरज नाही, कारण ते सर्व काही झाले आहे,
पूर्णत्वास पोहोचले आहे.
प्रश्न: अस्तित्वाच्या सहा
स्तरांशिवाय स्वतःचे अस्तित्व असते काय?
श्री श्री रविशंकर: होय निश्तितच! हे
सर्व सहा स्तर हे स्वतःचे समज किंवा अंदाज असतात. ज्याप्रमाणे स्वतःच्या थुंकीतून
तयार केलेल्या जाळ्याशिवाय कोळ्याचे अस्तित्व असू शकते त्याचप्रमाणे चेतनेतून तयार
झालेले हे सहा स्तर असले तरी, त्या स्तरांशिवाय चेतना असू शकते.
प्रश्न: मौन हे विजेरीत
उर्जा साठविण्यासारखे असते, पण मला मात्र त्यातून एकटेपणा का जाणवायला लागतो? खरे तर इतर लोकांबरोबर देवाण
घेवाण करण्यासारखे अनेक विषय असतात!
श्री श्री रविशंकर: हे एकटे पण हि एक
तात्पुरती अवस्था आहे. तुम्ही जेंव्हा या जगात एकटे येता, तेंव्हा एकटेपणा जाणवत
नाही. जरी तुम्ही जुळे असलात तरी ते पण या जगात एकटे येण्यासारखेच आहे. जेंव्हा आपण
हे जग सोडतो, तेंव्हा पण एकटेच असतो.
तुम्ही जर एका जागी
बसून असा जप करू लागलात की “ मी एकटा आहे, मी एकटा आहे.” तर ते काही खरे नाही! ते
सोडा! खूप खोल स्वतः मध्ये असा विचार करा कि दुसरा कोणी नाही.
प्रश्न: गुरुजी, मी यशस्वी
आणि सुखी कसा होऊ?
श्री श्री रविशंकर: यशस्वी होण्यासाठी
तीन गोष्टींची गरज असते.
१.
कौशल्य
२.
उर्जा
३.
गतिवाद
तुमच्याजवळ जर
कौशल्य असेल, उर्जा असेल आणि तुम्ही जर काही केले नाही तर तुम्ही यशस्वी होऊ शकणार
नाही. आणि कौशल्यशिवाय जर तुम्ही काही करायला गेलात तर ते होणार नाही. तसेच तुमच्याकडे कौशल्य आणि गतिवाद असेल आणि शक्ती नसेल
तर ते काही कामाचे नाही.
यश मिळण्यासाठी आधी
कौशल्य, मग उर्जा आणि मग गतिवाद पाहिजे, तुम्ही खूप गतिशील असायला पाहिजे, खूप
कष्ट करायला पाहिजेत. या सर्व तिन्ही गोष्टींची गरज असते.
काही लोक असे असतात
कि जे फक्त नियोजन करीन असतात, फक्त नियोजन, नियोजन आणि नियोजन. सर्व आयुष्य ते
फक्त नियोजन करत बसतात आणि काही नाही.
सुमारे १५ ते २०
वर्षांपूर्वी बंगलोर येथे एक युवक सत्संग करण्यासाठी येत असे. आणि प्रत्येक
महिन्याला तो “यशस्वी कसे व्हावे “ आणि “पैसे कसे मिळवावेत” या विषयावर सुमारे २०
मासिके विकत घेत असे. तो ती मासिके वाचून नियोजन करीत असे आणि मग प्रत्येक वेळी तो
मला असे सांगत असे कि “ या मासिकात मला हि एक भव्य कल्पना मिळाली आहे, मला
आशीर्वाद द्या”.
मी म्हणालो “ ठीक
आहे, जा यशस्वी हो”
पुढच्या आठवड्यात तो
एक नवीन मासिक घेऊन येत असे आणि परत तसाच आशीर्वाद मागत असे. मी वर्षभर वाट बघितली
कि तो आता काहीतरी सुरु करेल. पण त्याने तर काहीच सुरु केले नाही. तो फक्त प्रत्येक
वेळी नवीन मासिक घेऊन नवीन योजना तयार करायचा.
बंगलोर आश्रमात
आमच्याकडे १०० एकर शेत-जमीन आहे आणि एक गृहस्थ गणक यंत्रावर बी कोणते पेरायचे,
त्याला खत कोणते घालायचे, वगैरे योजना बनवायचे. ते शेती विभागाचे प्रमुख होते. इतर
सर्व लोक म्हणायचे कि ते गणक यंत्रावर शेती करतात. प्रत्यक्ष जमिनीत त्यांनी कधी
बी पेरले नाही.
त्याच प्रमाणे हा
माणूस फक्त मासिक विकत घेऊन वाचत बसायचा. शेवटी एक दिवस मी त्याला बोलावून
सांगितले कि “ ती मासिके बाजूला ठेव. त्यातली एक योजना घे आणि त्यावर काम करायला
सुरवात कर. यापुढे तू जर प्रत्यक्ष काम करणार नसलास तर तुला आशीर्वाद नाही. तू जर
प्रत्यक्ष काम केलेस तरच आशीर्वाद काम करेल. एक योजना घेऊन त्यात यशस्वी होऊन
दाखव.”
मी असे म्हटले कारण
काही लोकांकडे खूप भव्य कल्पना असतात पण ते त्या प्रत्यक्षात उतरवीत नाहीत. आणि
असे पण लोक असतात कि जे नियोजन न करता, विचार न करता फक्त कष्ट करतात. ते पण
यशस्वी होत नाहीत कारण त्याला दोन्हीची गरज असते.
आशीर्वाद असल्याशिवाय
काम होत नाही हे मला माहित आहे. पण फक्त आशीर्वाद पण कामाचे नाहीत कारण कष्ट
करण्याची पण गरज असते.
कष्ट आणि आशीर्वाद
हे दोन्ही जेंव्हा एकत्र येतात तेंव्हाच यश मिळते.
मी असे म्हणेन कि
तुम्ही जर खूप कष्ट केले आणि तुम्हाला यश मिळाले तरी खरे यश हे तुमच्या
आत्मविश्वासात असते. खरे यश म्हणजे तुम्हाला किती आत्मविश्वास आहे, तुम्ही किती
स्मित हास्य करताय आणि किती धीटपणे तुम्ही चालताय यावर असते. यावर तुमचे यश अवलंबून असते.
प्रश्न: मी भाग १ आणि
मौनाची कला हा क्रम दोन वेळा केला आहे. माझ्या भागात मी मागचे एक वर्ष सर्व करीत
आहे.आमच्या भागात शिक्षक नाहीये, तर मी शिक्षक होऊ शकतो का?
श्री श्री रविशंकर: निश्चितच! आता मला
अधिकाधिक शिक्षक पाहिजे आहेत. आम्हाला जास्तीत जास्त लोकांना शिकविण्यासाठी आणखी
शिक्षक पाहिजे आहेत. तुमच्यापैकी किती जणांना शिक्षक व्हायचे आहे? होय, तुम्ही
सर्व शिक्षक व्हायला पाहिजे. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी खूप काही करू
शकता. फारच छान!